गुजरातमध्ये दलितांना गोरक्षकांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्याप गप्प का, असा खडा सवाल भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्या नेत्या वृंदा करात यांनी केला आहे.
राजकोट- गुजरातमध्ये दलितांना गोरक्षकांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्याप गप्प का, असा खडा सवाल भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्या नेत्या वृंदा करात यांनी केला आहे. या प्रकरणात मोदी यांनी बाळगलेले मौन म्हणजे गुन्हेगारीला समर्थन असल्याचा आरोपही त्यांनी केला.
करात आणि माकपचे खासदार पी. के. बिजू यांनी गुजरातमधील उना तालुक्यातील पीडित दलित कुटुंबीयांची भेट घेतली. गोहत्या केल्याच्या संशयातून गेल्या आठवडय़ात येथील दलित तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या घटनेंतर गुजरातमध्ये दलित जनतेत संतापाची लाट उसळली होती. अनेकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. तर काहींनी आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्नही केला होता.
वृंदा करात यांनी राजकोट विमानतळावर पत्रकारांसोबत संवाद साधताना पंतप्रधानांनी या प्रकरणी मौन बाळगल्याबद्दल शंका व्यक्त केली. दलितांना मारहाण प्रकरणी आपल्याला कोणतेही राजकारण करायचे नाही. या भेटीमागे दोषींना कडक शिक्षा व्हावी व मारहाण झालेल्या दलितांना न्याय मिळावा, हाच एकमेव उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी याप्रकरणी धारण केलेल मौन म्हणजेच गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांना पाठीशी घालून गुन्हेगारीला पाठिंबा देण्यासारखे आहे, असा आरोपही वृंदा करात यांनी केला. पीडित दलित कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर आंदोलनादरम्यान आत्महत्येचा प्रयत्न करणा-या दलित तरुणांचीही त्यांनी भेट घेतली. भाजपा सरकारच्या पंधरा वर्षाच्या राजवटीत गुजरातमध्ये दलितांवरील अत्याचारात वाढ झाल्याचा आरोप यावेळी भाकपा खासदार पी. के. बिजू यांनी केला.
ब्रिंदा करात या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (भारताचा) या राजकीय पक्षाच्या नेत्या आहेत. माकप आणि भाकप हे दोन वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत.