चविष्ट, चवदार कोंबडी खायची म्हटल्यावर मांसाहारी व्यक्तीच्या तोंडाला पाणी सुटते. आता ही कोंबडी खाण्यासाठी किती सुरक्षित आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. कारण या कोंबड्यांना वेगाने वाढवण्यासाठी आणि त्यांना रोग होऊ नये म्हणून ‘अॅँटिबायोटिक्स’ दिले जात आहेत. धोकादायक बाब म्हणजे त्याचे अंश मानवाच्या पोटात जात आहेत. त्यामुळे कोंबडी खा, पण जपून, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
मांसाहार म्हटला की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पापलेट, सुरमई, कोळंबी, मांदेली या मत्स्य आहाराबरोबरच कोंबडीचा बेत आखला जातो. भाजलेली कोंबडी किंवा चटकदार रस्सा असल्यास मांसाहारी व्यक्तीची रसना चाळवली जाते. या चमचमीत कोंबड्या खाल्ल्यानंतर मांसाहारी व्यक्तीचा आत्मा शांत होतो. सध्या प्रकृतीला उपयुक्त ठरणा-या गावठी कोंबड्या मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे अनेकांनी ब्रॉयलर कोंबड्यांकडे मोर्चा वळवला आहे. या ब्रॉयलर कोंबड्या आरोग्याच्या दृष्टीने किती उपयुक्त असतात याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. कारण या कोंबड्यांना पटापट वाढवण्यासाठी औषधांचे डोस दिले जातात. या डोसमुळे हे मांस खाणा-या माणसांच्या पोटात या अॅँटिबायोटिक्सचे अंश जात असतात. त्यातून विविध आजार संबंधितांना होण्याची शक्यता वाढत असते.
सध्या थंडीचे दिवस आहेत. या दिवसात खाण्यापिण्याची एकदम चंगळच असते. बाजारात फळे आणि भाज्या भरपूर दिसतात. जणू खुणावत असतात. शिवाय, व्यायाम करून शरीर कमवायचं, त्याला भरपूर खुराक देऊन तब्येतीत जगायचं ते याच दिवसात. घामाची चिकचिक नाही की उन्हाचा कडाका नाही. कोमट ऊन हवेहवेसे वाटते. शिवाय, जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात हुरडा पार्टी आणि भरपेट कोंबडी- वडे यांची रेलचेल आलीच.
मात्र, हे सगळं अन्न आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे ना, याची पारख कशी करणार ? रसना तृप्त व्हावी अशी चव, अगदी जिभेवर रेंगाळणारी आणि पदार्थ कसे तर तोंडात जणू विरघळणारे. मग त्यात आरोग्यासाठी धोकादायक काय असणार? आपण खातो गरमागरमच. म्हणजे चांगलं रटारटा शिजलेलं नाहीतर खरपूस भाजलेलं, खमंग, तळलेलं. कच्च काही नाही. त्यात म्हणजे कसं, की काही असलंच चुकीचं तर तेही नाहीसं होणार, असं सगळे सांगतात. तेव्हा आरोग्याची अशी भीती वगैरे घालून चांगल्या कोंबडी-वड्याच्या मेजवानीची मजा घालवायची नाही, असं सर्वसामान्य खवय्यांनी म्हटलं, तर ते बरोबरच आहे.
झालंय असं की, कोंबड्यांच्या आत दडलंय काय, याचा शोध जनहितार्थ कार्यरत संशोधकांनी घेतला. विज्ञानाचा अभ्यास नवनव्या शोधांना जन्म देतो. त्याच वेळी त्याच्या चुकीच्या उपयोगांची धास्तीही बाळगावी लागतेच. नवे संशोधन हवेच, मात्र त्यावर तितक्याच माहीतगार तज्ज्ञांची नजरसुद्धा असावी हवी. ही गरज सर्व जगभर आहे आणि सर्व देशांमध्ये असे जनहितार्थ संशोधन / परीक्षण करणारे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञसुद्धा आहेत. त्यामुळे नफा, आणखी नफा आणि त्यासाठी विविध प्रकारे वैज्ञानिक प्रगतीला दावणीला बांधणा-या बेलगाम उत्पादक कंपन्यांना चाप बसायला मदत होते. निरागस, सर्वसामान्य ग्राहकांच्या संरक्षणाचा मार्ग प्रशस्त होण्यासही मदत होते. आपण ग्राहकांनी मात्र, ही माहिती करून घ्यायला हवी.
आता कोंबडी-वडे खाणा-यांची आपल्या भारतातील लोकांची संख्या किती? तर मांसाहार करणा-या एकूण लोकसंख्येपैकी ५० टक्के मंडळी कोंबडी खातात. कुक्कुटपालन हा देशभर एक चांगला व्यवसाय आहे. शिवाय आता केएफसीसारख्या परदेशी साखळय़ाही वेगळय़ा धर्तीचे, चवीचे कोंबडीचे पदार्थ घेऊन शहरी, निमशहरी भागात बस्तान बसवीत आहेत. पोल्ट्रीफार्ममधल्या गोजिरवाण्या, गुबगुबीत कोंबड्या काय काय खातात, त्यांच्यासाठी जे खास अन्न बनविले जाते, त्यात कोणते घटक असतात, या बाबत खवय्यांना माहीत असणे कठीण. त्यांना कल्पना ही नसेल की या चविष्ट कोंबडीबरोबर आपल्या पोटात अगदी कमी प्रमाणात का होईना अॅँटिबायोटिक्स जात आहेत. प्रत्येक वेळी जात आहेत. ज्यांचा आपल्या मानवी शरीराच्या प्रतिकारशक्तीवर वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो आहे. त्याचा एक परिणाम, पुढे जाऊन असा होऊ शकतो, की या व्यक्तींना कोणत्या आजारासाठी जर तीच अॅँटिबायोटिक्स औषध योजनेचा भाग म्हणून घ्यावी लागली, तर शरीर त्यांना योग्य तो प्रतिसाद देणार नाही. याचे कारण म्हणजे कोंबडी खाता खाता ही अॅँटिबायोटिक्स त्यांच्या एकूण चयापचय प्रणालीत कायमच जात राहिली आहे.
सेंटर फॉर सायन्स अॅँड एन्व्हॉयरमेंट (सीएसई) च्या अन्न सुरक्षा विषयक पथकाने दिल्ली व परिसरातील ७० नमुन्यांचे केलेले सर्वेक्षण, सर्व देशभरात लागू होण्यासारखे आहे. कारण या संदर्भातील आज तरी कोणतेही नियम अस्तित्वात नाहीत. कुक्कुटपालन व्यवसायात कोंबड्याचे वजन वाढावे व त्यांची वाढ पटापट व्हावी म्हणून ‘माणसांसाठी औषधे’ वापरण्यात येणारी अॅँटिबायोटिक्स वापरण्यात येत आहेत, असे संशोधनानंतर आढळून आले आहे. या नमुन्यांचे मांस, लिव्हर (यकृत) आणि किडनी (मूत्रपिंड) यामध्ये सहा प्रकारची अॅँटिबायोटिक्स आढळली आहेत. अधिक तांत्रिक तपशिलात न शिरता सांगायचे झाले तर टेट्रासायक्लीन वर्गीय तसेच निओमायसीन, सिप्रोफ्लॉक्सेसिन या वर्गात मोडणारी ही अॅँटिबायोटिक्स आहेत. सर्वसामान्यपणे एका नमुन्यात (म्हणजे कोंबडीत) एकच प्रकारचे आढळले, तरी १७% नमुन्यात एकापेक्षा अधिक अॅँटिबायोटिक्सचे घटक आढळून आले आहेत. बेलगाम पद्धतीने कोंबड्यांना ही अॅँटिबायोटिक्स देण्यात येत आहेत. ती त्यांच्या शरीराचा भाग बनत आहेत. इतकेच नव्हे तर या गैरवापराचा परिणाम मुळात त्या कोंबड्यांच्या शरीरातील सूक्ष्म जीवांवर होतो. नंतर ते माणसांच्या शरीरात जातात.
आता मानवी शरीराशी संबंधित सर्वेक्षणेही तपासणे आले. सीएसईने तेही केले. त्यातून असे लक्षात आले की २००२ ते २०१३ या दहा वर्षात अॅँटिबायोटिक्स लागू न पडण्याचे प्रमाण (ंल्ल३्र्रु३्रू १ी२्र२३ंल्लूी) त्याच वर्गामध्ये वाढते आहे. ज्या वर्गातली अॅँटिबायोटिक्स कोंबड्यांना देण्यात येत आहेत, नमुन्यांमध्ये आढळलेली आहेत. ती आहेत सिप्रोफ्लॉक्सेसिन, डोक्सिसायक्लिन आणि टेट्रासायक्लिन.
ही समस्या वेळीच आटोक्यात आणण्याची गरज आहे. सतत पण सूक्ष्मपणे, नकळत अन्नातून होणारा आरोग्यावरचा हल्ला आपण रोखायला हवा. काही विकसित देशांमध्ये याबाबत अतिशय कडक नियम आहेत. जिथे तसे नाहीत तिथे समस्या आहेच. भारताच्या विविध भागांत आरोग्यविषयक जाणीव-जागृती मुळातच कमी आहे. शिवाय मांसाहार करणा-यांची संख्या वाढत आहे. भारतात पोल्ट्री उद्योग दरवर्षी १० टक्के वेगाने वाढत आहे. या उद्योगातून अंड्यांबरोबरच कोंबड्यांचे मांसही विकले जाते. या अन्नाद्वारे अपाय होऊ शकतो, असा विचारही मनात येणे कठीण ठरते. अशा परिस्थितीत केवळ ‘नफा’ हे उद्दिष्ट ठेवून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणा-या कोणत्याच अन्न व्यावसायिकांना मोकळे रान असता कामा नये. ‘अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६’ अंतर्गत आरोग्यदायी अन्न मिळण्याचा आपला हक्क आपण जागरूकपणे बजावायला हवा.
त्यासाठी सीएसईच्या वेबसाईटवर जाऊन जुलै २०१४ मधले हे संशोधन नीट पाहा. त्याच्या आधारे आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवा. शक्य असेल तर तुमच्या परिसरातील कोंबड्यांमध्ये ‘अॅँटिबायोटिक्स’चे अंश आहेत का ? या प्रश्नाच्या उत्तरासाठी परीक्षणही करून घ्या. सर्व आघाड्या उघडून छुप्या हल्ल्याला नेस्तनाबूत करायलाच हवे. पुढच्या पिढय़ांच्या आरोग्यासाठीही ते आवश्यक आहे.
सध्या महागयीच्या जमान्यात बकर्याचे मटण महाग आहे त्यामुळे जनता हि बॉयलर कोंबडी खाणे अधिक पसंत करतात
जर सरकारने बकर्याचे मटण स्वस्त केले तर जनता चिकन खाणे कमी करेल आणि बकर्याचे मटण खाणे अधिक पसंत करेल