राज्यात गाजलेल्या जळगाव येथील घरकुल घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेले माजी गृहनिर्माणमंत्री सुरेशदादा जैन यांनी प्रकृती अस्वास्थाचे कारण देत मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली आहे.
मुंबई- राज्यात गाजलेल्या जळगाव येथील घरकुल घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेले माजी गृहनिर्माणमंत्री सुरेशदादा जैन यांनी प्रकृती अस्वास्थाचे कारण देत मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. जैन हे गेल्या २७ महिन्यांपासून अटकेत आहेत.
जैन यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, गेल्या २७ महिन्यांपासून ते कोठडीत आहेत आणि याच कालावधीत त्यांच्यावर एक बायपास शस्त्रक्रियाही झाली आहे. मधुमेह आणि वाढत्या वयामुळे अशक्तपणा, रक्तदाब, पचनासंबंधीचे आजार आदी त्रास होत असल्याचे जैन यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. आरोग्यासंबंधी तक्रारींमुळे जामीन मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार असल्याचे समजते.
दरम्यान, सरकारी वकिलांनी या याचिकेस विरोध केला. त्यांच्या मते, सुरेश जैन राजकारणातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे त्यांच्याकडून साक्षीदार किंवा पुराव्यांमध्ये फेरफार करण्याची शक्यता आहे. मात्र हा खटला जळगाव येथून धुळे जिल्ह्यात हस्तांतरित करण्यात आल्याने अशा कोणत्याही प्रकारची फेरफार होणार नसल्याचे जैन यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच या खटल्यासंबंधी ५१ आरोपींपैकी ४६ जणांना जामीन मिळाला असून, त्यांच्याविरोधात साक्षीदार किंवा पुराव्यांसोबतच्या छेडछाडीचा कोणताही आरोप नसल्याचेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे.
घोटाळा करताना साहेबांची प्रकृती एकदम धडधाकट होती ना ???