सर्नच्या ‘लार्ज हॅड्रॉन कोलायडर’च्या प्रयोगात ‘हॉग्ज बोसॉन’ अर्थात मूलकणांचं अस्तित्व सापडलं. सांख्यिकीतल्या अपघातस्वरूप हा दैवी कणांच्या अस्तित्वाचा योगायोग घडून आला, हे शास्त्रज्ञ मोकळेपणाने मान्य करतात. मात्र त्याच तारखेस त्याचवेळी भारतातील एका महाराजांच्या हातातूनही दैवी कण घरगंळून आल्याचा दावा केला गेला. दैवी कणांना असलेलं कृष्णगडद द्रव्याचं कोंदणही त्यामुळे स्पष्ट झालं.
दैवी कणांच्या शोधात शास्त्रज्ञ उगाच होते. या दैवी कणांसाठी तिकडे युरोपात काहीबाही प्रयोग सुरू होते. ‘सर्न’ नावाचा संशोधकांचा संस्थात्मक समूह हे रिकामे धंदे करत होता. त्यांना काय माहीत, इकडे भारतात एका परमपूज्य बाबाच्या अस्तनीतून असे दैवी कण साखर पडावी तसे पडतात. नस्ता पब्लिकचा पैसा बरबाद झाला. बारा वर्षे आणि लाखो डॉलर्स वाया गेले.
सनातनच्या जयंत आठवलेंनी हे असलं कायपण केलं नाही. ना जमिनीच्या पोटात खोलवर भुयार खणलं, ना प्रोटॉन कणांच्या बारुदी फैरी झाडल्या. त्यांनी ‘लार्ज हॅड्रॉन कोलायडर’ नावाच्या प्रयोगाचा घाट थिटा ठरवला.. ‘बिग बँग थिअरी’चा त्यांनी बिग बँड वाजवला.
‘सर्न’मधल्या शास्त्रज्ञांना तर मूलकण नुस्ते दिसले. म्हणजे त्याचं अस्तित्व समजलं, तेही सांख्यिकीशास्त्राच्या अपघातामुळे. हुकमी संशोधन वगैरे त्यात काहीही नाही. दहा लाखांत अशी एक घटना घडते म्हणतात. म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ झाली. आठवले महाराजांचं तसं काही नव्हतं. त्यांनी पण बारा र्वषच घेतली. ते इथेच बसून साधना करत राहिले. परंतु, त्याचा परिणाम असा झाला की ज्यादिवशी तिकडे युरोपात दैवी कण दिसले बरोबर त्याच दिवशी आणि त्याचवेळी इकडे आठवले महाराजांच्या हातातून दैवी कण झरू लागले. एवढंच नाही तर गोव्यातल्या विविध आश्रमांमधून या दैवी कणांची बौछार होऊ लागली. त्यांच्या सनातनच्या ‘कठोर’ साधकांच्या घरातही दैवी कण बरसू लागले. रुमालावर, श्रीकृष्णाच्या तसबिरीवर, भक्तांच्या नारळावर एवढंच नाही तर सनातनच्या प्रिंटिंग प्रेसवरदेखील दैवी कण दिसून आले. त्यांच्या ‘कठोर’ साधकांनी ते वेचले आणि डबीत भरले आणि पत्रकारांना दाखवले. मधेच सोनेरी तर मधेच सप्तरंगी दिसणारे हे दैवी कण दिसतात, पण त्यांना स्पर्श करता येत नाही म्हणे! चमत्कारच म्हणायचा हा. हे थंडीसारखं झालं.. वाजते, पण ऐकू येत नाही.
तर, युरोपात ‘सर्न’मध्ये जे निव्वळ स्टॅटिस्टिक्समधल्या अपघाताने म्हणजे दुर्मीळ योगायोगाने झालं ते सनातनी दाव्याप्रमाणे त्याचवेळी गोव्यात मात्र आध्यात्मिक साधनेमुळे झालं. अखेरीस विज्ञानापेक्षा अध्यात्म उजवं ठरलं. योगिक शक्तीचा विजय झाला. शास्त्रज्ञ मूर्ख ठरले आणि बाबा लोक स्मार्ट ठरले. एका गणिती शिक्षकाच्या घरात जन्मलेल्या वैद्यकीय पार्श्वभूमीच्या माणसाचं महाराजीकरण असल्या चमत्कारी टोकाला गेलं.
मुळात ज्या मूलकणांच्या शोधासाठी ‘सर्न’चा ‘लार्ज हॅड्रॉन कोलायडर’ हा प्रयोग रचला गेला त्या प्रयोगाबद्दल वैज्ञानिक मठीतल्या अनेक शास्त्रज्ञ बाबा-बुवांचाही विरोध होता. हा विश्वाच्या जन्माच्या भातुकलीचा खेळ आहे, अशी संभावना या प्रयोगाबद्दल केली गेली. एवढंच नाही तर या प्रयोगामुळे विश्वाच्या जन्माच्या वेळची परिस्थिती उद्भवेल आणि पराकोटीचं गुरुत्व विकसित होऊन त्याचं पर्यावसन एका नव्या कृष्णविवरात होईल, असेही तारे कुणी तोडले होते. थोडक्यात, ही विश्वाच्या नाशाची सुरुवात आहे, असं पसरवायला सुरुवात झाली होती. त्यामुळे हा प्रयोग काही वेळा पुढे ढकलला गेला, असंही सांगितलं गेलं. त्यात भरीस भर पडली २०१२ सालातल्या जगबुडीच्या भाकिताची. असे सगळे योगायोग झाडून या दैवी कणांच्या आड होते. या सगळ्या कॉन्स्पिरसी थिअरीज रंगत असताना शास्त्रज्ञ मात्र डार्क मॅटरचा विचार करत होते. आपलं विश्व दृश्यमान कणांचं बनलेलं असतं, तसंच या विश्वात डार्क मॅटर म्हणजे कृष्ण पदार्थ अर्थात अदृश्य कणही आहेत. थोडक्यात सांगायचं तर दैवी कण अर्थात मूलकणांना वस्तुमानच असायला नको, असं सैद्धांतिक पातळीवर सांगितलं जात असताना हे वस्तुमान का आहे, हे काही कळत नव्हतं. त्यामुळेच डार्क मॅटरच्या अस्तित्वाबद्दल वेगवेगळे सिद्धांत मांडले जात होते. पीटर हिग्ज यांनी साठच्या दशकात सर्वप्रथम याची मांडणी केली. या मूलकणांच्या अस्तित्वासंबंधी त्यांनी गणिती प्रयोगही केले. या प्रयोगातल्या निष्कर्षाना ‘हिग्ज फील्ड’ म्हटलं गेलं आणि या मूलकणांना ‘हिग्ज बोसॉन’ हे नाव पडलं.
मात्र विज्ञान पुरावा मागतं आणि सैद्धांतिक मांडणी असूनही पुराव्याअभावी ते सिद्ध होत नव्हतं. ‘हिग्ज बोसॉन’च्या अस्तित्वाचा पुरावा सिद्ध व्हायला पन्नास वर्ष उलटावी लागली. अर्थात, हा पुरावा सापडल्याची घोषणा झाली तेव्हा हिग्ज यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्या भावनिक अर्थाने म्हणायला गेलं तर हे दैवी कण त्यादिवशी हिग्ज यांच्या डोळ्यातूनच झरत होते. प. पू. आठवले महाराजांच्या हातातून पडलेल्या कणांच्या चमत्कारामागे काय कारणं असतील ती त्यांची त्यांना माहीत. त्याला ते ‘चैतन्याचे घनिकरण’ म्हणतात. आणि हे कण वस्तुमानरहित असल्याचं अतिवैज्ञानिक समर्थनही ते देतात. एकीकडे वस्तुमानरहित दैवी कणांचा दाखला देणारे परात्पर गुरू असताना सनातन संस्थेचे साधक आपलं आध्यात्मिक वस्तुमान वाढवण्यासाठी अॅ ग्रेसिव्ह झाले असल्याचं सर्व स्तरावर दिसून येत आहे. त्यांचे धार्मिक आणि सांस्कृतिक पोलिसिंग जोरात सुरू आहे. देवळातल्या भाविकांच्या वर्तणुकीलाही ते आचारसंहिता लावू पाहतायत. आंतरिक भावभक्तीऐवजी बाह्यात्कारी लक्षणांवरच त्यांचा अधिक भर आहे. त्यामुळे चैतन्याच्या घनिकरणाचं माहीत नाही, पण कृष्ण पदार्थाचा जो शोध शास्त्रज्ञांनी चालवला आहे त्याचं एक गडद स्वरूप इथे असं घनिभूत झाल्याचं जाणवतं खरं!
स्तंभ लेखक पराग महाशयांनी सनातनला प्राप्त झालेल्या कणांचा व त्या प्रक्रियेचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला आहे का? केला असेल तर त्यांनी नेमका काय अभ्यास केला ब त्यातून कसे निष्कर्ष काढले, हे या लेखात का प्रसिद्ध केले नाही? आणि असा अभ्यास केला नसेल तर हा लेख केवळ सनातन द्वेषापोटी लिहिला आहे, असे आंम्ही का मानू नये? अशाप्रकारे आमच्या संतांवर व श्रद्धास्थानांवर चिखलफेक करत असलेल्या सवंग लेखकाने जाहीर क्षमा मागावी अथवा आपले ठोकताळे सिद्ध करून दाखवावेत.