छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. छत्रपतींच्या आशीवार्दाने महाराष्ट्रात तीन वेळा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार आले.
कणकवली – छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. छत्रपतींच्या आशीवार्दाने महाराष्ट्रात तीन वेळा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार आले. त्यांच्याच आशीर्वादाने चौथ्या वेळेलाही महाराष्ट्रात काँग्रेसचीच सत्ता येईल, असा ठाम विश्वास काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला.
काँग्रेसचा प्रचारप्रमुख म्हणून राज्यात फिरावे लागल्याने मतदारसंघात कमी वेळ देता आला. मात्र माझ्या मालवणी माणसाने पंचवीस वर्षे मला आशीर्वाद दिले. आताही ते मला समजून घेतील आणि भरघोस मताने विजयी करतील, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला ‘प्रहार भवन’ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले की, पंचवीस वर्षानंतर सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवीत आहेत. याचा फायदा काँग्रेसला होईल. राज्यात चार प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
त्यात काँग्रेसची परिस्थिती अधिक भक्कम आहे. मतदारांवर प्रभाव पाडू शकेल, असा एकही नेता महाराष्ट्रात भाजपकडे नाही. म्हणूनच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात सत्तावीस प्रचार सभा घ्याव्या लागल्या. गल्लीबोळात सभा घेऊन नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा आब घालविला. यापूर्वीच्या एकाही पंतप्रधानाने पक्षीय राजकारणात इतका रस घेतला नाही.
मोदी यांनी सत्तावीस प्रचारसभा घेतलेल्या असल्या तरी आता त्यांची लाट उरलेली नाही. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या विरोधात जे निर्णय घेतले त्यामुळे मराठी माणसांच्या मनात चीड निर्माण झाली. मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सवर झालेल्या त्यांच्या प्रचार सभेचे रेकॉर्डिग पहा. तिथे तुम्हाला एकही मराठी माणूस दिसणार नाही.
बहुतेक गुजराती लोक तिथे जमले होते. मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून नव्हे तर गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत. म्हणूनच त्यांच्या सभांना आता प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. काल कासार्डे येथे मोदींची सभा झाली. मी सकाळी कुडाळकडे चाललो होतो. सर्व गाडय़ा गोव्यावरून येत होत्या. निवडणूक महाराष्ट्राची आणि सभेला माणसे गोव्याची. तिथे गाडीत बसण्यासाठी एका माणसाला दोन हजार रुपये दिले जात होते, अशी माहिती मिळाली आहे. मात्र तरीही गाडय़ा भरल्या नव्हत्या.
इतका आटापीटा करून त्यांनी सभा घेतली. त्यांनी जे मुद्दे मांडले, ते पाहता स्थानिक लोकांनी त्यांना योग्य माहिती दिलेली दिसत नाही. ते म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हा गोव्यासारखा विकसित करायचा आहे. त्यांनी नीट माहिती घेतली असती तर गोव्यापेक्षा आमच्या पायाभूत सुविधा चांगल्या आहेत, हे त्यांना कळले असते आणि मुख्य म्हणजे आम्हाला गोव्यासारखा विकास नको आहे.
गोव्याचा सर्व अर्थसंकल्प कॅसिनो, मसाज पार्लर, ब्राऊन शुगरवर अवलंबून आहे. गोव्याच्याच आरोग्यमंत्र्यांनी मध्यंतरी जाहीर केले होते की तेथे एकही गाव असे नाही की, जेथे एडस्चा रुग्ण नाही. गोव्याची संस्कृती बिघडल्यामुळे तिथले स्थानिक लोक युरोपात स्थलांतर करीत आहेत. तिथले सुज्ञ नागरीक आपल्या तरुण मुलांना गोव्यात ठेवत नाहीत. आम्हाला असला विकास नको आहे. आम्ही संस्कृतीचे जतन करून पर्यटन वाढविणार आहोत. त्यासाठी सिंधुदुर्गात सीवर्ल्ड येत आहे. विमानतळाचे काम पूर्ण होत आले आहे. मला माझ्या येथील लोकांनी संधी दिली आणि सिंधुदुर्गचा विकास झपाटय़ाने होतो आहे. या विकासाला गती देण्यासाठी मालवण-कुडाळचे मतदार पुन्हा मला आशीर्वाद देऊन सेवेची संधी देतील, असेही ते म्हणाले.
मालवणची जनता मला समजून घेईल
काँग्रेसचे प्रचारप्रमुख म्हणून जबाबदारी असल्याने मालवण-कुडाळ या तुमच्या मतदारसंघांत लक्ष द्यायला कमी वेळ मिळाला का, असे विचारले असता राणे म्हणाले की, काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी माझ्यावर राज्याचा प्रचारप्रमुख म्हणून जबाबदारी टाकली. राज्यभर सभा घ्याव्या लागल्या. त्यामुळे मालवण-कुडाळ मतदारसंघाला कमी वेळ देता आला, हे सत्य आहे. मात्र येथील माणसांचे माझ्यावर प्रेम आहे. गेली पंचवीस वर्षे ते मला मोठय़ा विश्वासाने निवडून देतात. या वेळी मला कमी वेळ मिळालेला असला तरी आपला माणूस म्हणून ते मला समजून घेतील आणि प्रचंड बहुमताने विजयी करतील.
सिंधुदुर्गच्या लोकांना अभिमान वाटला पाहिजे
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रचारप्रमुख म्हणून महाराष्ट्राच्या अस्मितेचे मुद्दे तुम्ही उपस्थित केलेत आणि त्यानंतर तेच मुद्दे घेऊन इतर पक्षांनी प्रचार केला, अशी आठवण पत्रकारांनी करून दिली असता राणे म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून महाराष्ट्र आणि मुंबईचे महत्त्व जाणीवपूर्वक कमी करीत आहेत. रिझव्र्ह बँकेची तीन कार्यालये दिल्लीला हलवली, मुंबई बंदरातील वाहतूक गुजरात येथील बंदराकडे वळवली. पालघर येथील किनारपट्टी सुरक्षा दलाचे प्रशिक्षण केंद्र गुजरातला हलवले. हे मुद्दे पहिल्यांदा मीच मांडले. त्यानंतर शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी या सर्व पक्षांनी त्याच मुद्दय़ाभोवती प्रचार केला. सिंधुदुर्गातील प्रत्येक
नागरिकाला याचा अभिमान वाटला पाहिजे, असे राणे म्हणाले.
प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनानंतरच कामाला सुरुवात
टाळांबा प्रकल्पातील धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाल्याशिवाय त्याच्या पुढील कामाला सुरुवात करणार नाही. तसेच तिलारी धरणाच्या वन टाइम सेटलमेंट संदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आचारसंहिता उठताच तो प्रश्नही निकाल काढला जाईल. तोपर्यंत त्या प्रकल्पाचे कामही सुरू होणार नाही, असे राणे यांनी सांगितले.
राणे फक्त कोकण मधेच प्रचारात अडकले आहेत . बाकी महाराष्ट्र त्यांनी प्रचार केलाच नाही. म्हणे महाराष्ट्र राज्य प्रचार प्रमुख . हम दो हमारे दो
नारायण राणे म्हणे महराष्ट्र राज्य प्रचार प्रमुख पण त्यांनी कुडाळ आणि कणकवली सोडून कुठेच प्रचार केला NAAHI