महाराष्ट्राचे पुरोगामीपण जपण्यासाठी संघाच्या हातात हा महाराष्ट्र द्यायचा नसेल तर, आता महाराष्ट्रात आघाडीचेच राजकारण हवे. कारण नुसती ‘रात्र वै-याची नाही तर, दिवससुद्धा वै-याचा’ आहे.
श्री. शरदचंद्र पवार यांनी चांगला निर्णय जाहीर केला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने श्री. शरदचंद्र पवार यांना सन्माननीय ‘डी. लिट्.’ पदवी देऊन विद्यापीठातर्फे कृतज्ञता व्यक्त केली. त्यानिमित्ताने शरद पवारसाहेब नांदेडला आले होते. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेत जिथे जिथे काँग्रेस-राष्ट्रवादी बहुमत मिळवू शकेल, त्या त्या जिल्हा परिषदांमध्ये आघाडी करण्याचा त्यांच्या पक्षाला आदेश दिला आहे. आता काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी कोणतेही फाटे न फोडता ताबडतोब महाराष्ट्रातील किमान १६ ते १७ जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादींनी एकत्र येऊन आघाडी करावी व सत्ता काबीज करावी. सपाटून पराभव झाल्यानंतर आघाडी करण्याच्या उशिरा सुचलेल्या शहाणपणाचे स्वागतच करायला हवे. जर हाच निर्णय जिल्हा परिषद, महानगरपालिका किंवा त्या आगोदरच्या नगरपालिका निवडणुकीत घेतला असता तर भाजपाची एव्हढी मिजास राहिली नसती. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत आघाडी मोडण्याची घोडचूक अजितदादा पवार यांनी राजकीय आगाऊपणा करून केली. शिवसेना-भाजपाने आघाडी तोडली म्हणून अजितदादांना घाई झाली होती. पण महाराष्ट्रात आज कोणताही राजकीय पक्ष एकटय़ाच्या बळावर बहुमत मिळवू शकत नाही, हे सिद्ध झाल्यावर नगर परिषद निवडणुकीतच शरद पवारसाहेबांनी आपल्या लोकांचे कान उपटायला हवे होते. लोकसभा, विधानसभा निवडणूक पराभवानंतर महाराष्ट्राचे राजकीय चित्र काय असेल, याचा अंदाज शरद पवारसाहेबांना यायला हवा होता. त्याचवेळी सोनियाजी व राहुल गांधींपर्यंत जाऊन आघाडी का झाली पाहिजे, हे त्यांना पटवून आघाडीचा निर्णय तेव्हाच व्हायला हवा होता. आता काँग्रेसपक्षानेसुद्धा प्रश्न अकारण प्रतिष्ठेचा न करता मुख्य शत्रू भाजपा आहे, हे लक्षात घेऊन १७ जिल्हा परिषदांमध्ये आघाडीची सत्ता आणावी आणि त्यानंतर दोन्ही गोष्टी तातडीने कराव्यात.
पवारसाहेब तुम्हाला हात जोडून पुन्हा विनंती आहे, तुम्ही स्वत: पुढाकार घेऊन जिल्हा परिषदेत जी काही आघाडी केली जाईल, ती आघाडी महाराष्ट्राच्या पातळीवर २०१९ची लोकसभा, २०१९ची विधानसभा या दोन्ही निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आता कायम राहील, हे प्रथम जाहीर करा. तुमच्या पक्षातील अहंकारी लोकांना सांगा पुढची अडीच वर्षे आता एकत्र काम करायचेय. काँग्रेसचे नेते पृथ्वीराजबाबा चव्हाण किंवा पतंगराव कदम असले आघाडी मार्गातले जे अडथळे आहेत, त्यांना गप्प बसायला सांगावे. ते गप्प बसत नसतील तर पक्षातून दूर करावे. पुढची अडीच वर्षे महत्त्वाची आहेत. मोठय़ा शत्रूशी लढाई आहे. पन्नास वर्षापूर्वी देशातील सगळे विरोधीपक्ष काँग्रेसच्या विरुद्ध एक होत होते. आता सर्व विरोधी पक्षांना भाजपाविरुद्ध एक व्हावे लागेल. कारण हा शत्रू फार भयानक आहे. चंगेजखान आहे. घटना मोडून-तोडून टाकणारा आहे. लोकशाही मोडीत काढणारा आहे. हुकूमशाहीचा पुरस्कर्ता आहे. मुंबई शहराचे लचके तोडणारा आहे. नतद्रष्टसुद्धा आहे. जाहीर व्यासपीठावर पारदर्शकतेच्या गप्पा मारणारे पुण्यात कोणत्या फिल्म बघत बसतात आणि त्यांचा पारदर्शकपणा कुठे आहे? हे महाराष्ट्राला माहीत आहे. पैशाच्या जोरावर मत विकत घेऊन ज्या मतदाराने आपले इमान विकले ते लोकशाहीचे शत्रू आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने इथून पुढे ३ वर्षे एकमेकांचा सन्मान करून प्रत्येक विषयात ‘आघाडी’ या बॅनरखाली काम करावे. काँग्रेसच्या राजकीय मेळाव्यांना विशेष मार्गदर्शक म्हणून पवारसाहेबांनी जावे. राष्ट्रवादीच्या मेळाव्याला नारायण राणे, सध्या अध्यक्ष असलेले अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात या सर्वानी जावे, एका जीपमधून या नेत्यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यक्रमाला हजर राहावे. १५ दिवसांत महाराष्ट्राचे राजकारण बदलेल. घरात साप शिरल्यावर घरातल्या सर्वाना त्याच्यापासून धोका वाटतो आणि सगळे मिळून तुटून पडतात. आज भाजपाच्या रूपात हा विषारी साप भारतीय राजकारणात घुसलाय आणि हा शत्रू कोण हे समजून घेऊन आता इथून पुढे दोन्ही काँग्रेसचे नाव ‘आघाडी’ हे पडले पाहिजे. अडीच वर्षे मेहनत करा. गावोगाव जा. मोदी, भाजपा, फडणवीस हे देशावरच्या राजकारणावर कसे संकट आहे? ह्यांचे चारित्र्य किती भ्रष्ट आहे. ह्यांचे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील प्रेम किती खोटे आहे, हे सर्वापुढे मांडत राहा. आघाडीतील नेते प्रामाणिकपणाने महाराष्ट्रात एकत्र काम करत आहेत, हे चित्र दिसले तर भाजपाचा पराभव करणे फार अवघड नाही.
पवारसाहेब, तुम्ही म्हणालात की, जिल्हा पातळीवरील आघाडी स्थानिक नेत्यांनी करावी. तसे करू नका, त्याचे गांभीर्य कमी होईल. तुमच्यासकट राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटी करा. ही कमिटी पुढील अडीच वर्षाचे निर्णय एकत्र घेईल. यात पक्षीय अभिमान कुठेही येऊ देऊ नका. सत्तेवर बसलेला शत्रू एवढा मोठा आहे की, तुम्ही थोडे ढिले पडला तर २०१९ची लोकसभा, विधानसभा भाजपाने खाल्ली म्हणून समजा आणि म्हणून पुढच्या अडीच वर्षात परवलीचा शब्द ‘आघाडी’ असला पाहिजे.
तसे केले तर कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, हिंगोली, अमरावती या ७ जिल्हा परिषदांमध्ये तातडीने सत्ता येऊ शकते. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद काँग्रेसच्या हाती असलेली एकमेव जिल्हा परिषद होय. रायगड शेकाप व राष्ट्रवादीच्या हातात आहे. रत्नागिरी सेनेकडे आहे. म्हणजे भाजपाकडे नाही. म्हणजे झाल्या १० जिल्हा परिषदा. पुणे, सातारा राष्ट्रवादीकडे मजबुतीने आहे. यवतमाळमध्ये सेनेची सत्ता येऊ शकते. म्हणजे नियोजन केले तर १६-१७ जिल्हा परिषदांमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवता येईल. तेव्हा विचारपूर्वक निर्णय केलेत आणि यातील गांभीर्य टिकवले तर भाजपाच्या उधळलेल्या हत्तीला रोखता येईल. नाहीतर आता हातात आलेली ग्रामीण पातळीवरील सत्ता आठ महानगरपालिका, यातून मिळणा-या टक्केवारीने पुढच्या अडीच वर्षात ४-५ हजार कोटी जमा करणे भाजपाला अशक्य नाही आणि पुण्यात, पिंपरी-चिंचवडमध्ये जसा पैसा ओतला. एका अधिका-याचा ‘सहारा’ घेऊन १२ लाख नावे मतदार यादीतून जशी गायब झाली, त्याप्रमाणे आता हवे ते करू शकतील. मदतीला गुंड आहेतच. पवारसाहेब, तुम्ही स्वत: पुढाकार घेऊन हे सर्व केले पाहिजे. काँग्रेसने या प्रत्येक विषयात मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे.
नाहीतर काँग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष महाराष्ट्रात बुडून मरतील, हे लिहून ठेवा. महाराष्ट्राचे पुरोगामीपण जपण्यासाठी संघाच्या हातात हा महाराष्ट्र द्यायचा नसेल तर, आता महाराष्ट्रात आघाडीचेच राजकारण हवे. कारण नुसती ‘रात्र वै-याची नाही तर, दिवससुद्धा वै-याचा’ आहे.
देव करो आणि दोन्हीकडील नेत्यांना अक्कल येवो