भारतातील प्रेक्षकांना क्रिकेटकडे आकर्षित करण्यासाठी बीसीसीआयने ‘क्रिकेट हा धर्म आहे’, असा प्रचार केला. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.
मुंबई – भारतातील प्रेक्षकांना क्रिकेटकडे आकर्षित करण्यासाठी बीसीसीआयने ‘क्रिकेट हा धर्म आहे’, असा प्रचार केला. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. आयपीएलला प्रसिद्धी मिळण्यासाठी गेल्या सात हंगामात अनेक रंजक जाहिराती दाखवण्यात आल्या.
आयपीएलच्या आठव्या आवृत्तीची प्रसिद्धी करताना वेगवेगळय़ा जाहिराती पाहायला मिळतात. त्यातील ‘इंडिया का त्योहार’ ही जाहिरात प्रभावी वाटते. आयपीएलच्या दीड महिन्यांच्या कालावधीला त्यांनी ‘सण’ असे म्हटलेय. भारतात अनेक सण साजरे होतात. त्यात आयपीएलची भर घातली जात आहे. मात्र आयपीएल सण ‘खर्चिक’ आहे. तसेच तुमचे नुकसान करणारा आहे, हे सर्वसामान्य कधी समजणार?
जाहिरातींचा ‘भूलभुलैया’
जाहिराती अधिक प्रभावी ठरण्यासाठी सेलेब्रिटींचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. आयपीएल त्याहून वेगळी नाही. सध्या दाखवल्या जाणा-या आयपीएलच्या जाहिरातींमध्ये अभिनेता रणबीर कपूर, प्रतिभावंत फलंदाज विराट कोहली, त्याची मैत्रिण अनुष्का शर्मा दिसते.
प्रसिद्ध नट आणि नटी किंवा क्रीडापटूंना दाखवल्यानंतर एक वेगळा ‘इम्पॅक्ट’ होतो. आयपीएलच्या जाहिराती बनवणा-यांनी तेच केलेय. ‘स्टार्स’ना दाखवतानाच आयपीएलच्या जाहिरातींची शीर्षके किंवा ‘थीम साँग्ज’ अप्रतिम बनवलीत. तसेच मोठय़ा प्रमाणात लोकांना सामावून घेतले गेलेय. ‘इंडिया का त्योहार’ अशा जाहिरातीनंतर चाहते आकर्षित होणारच. आयपीएलच्या रूपाने भारतात आणखी एक ‘सण’ साजरा केला जातो, हे लोकांना खूपच भावतेय.
आणखी एका जाहिरात कुणी एक संघ जिंकल्यानंतर एक मुलगा ‘चॉकलेट’ विकत घ्यायला येतो. तसेच त्यातील एक चॉकलेट दुकानदाराला देत आपला आनंद वाटण्याचा प्रयत्न करतो. मात्र दुकानदार त्याला आणखी चॉकलेट देत ‘अपनी टीम जीती है’ असे सांगतो. ‘इंडिया का त्योहार’ असे म्हटले तरी हा कसला सण? आयपीएल म्हणजे तुमच्या पैशांचा आणि वेळेचा अपव्यय आहे. मात्र चाहत्यांच्या ते लक्षातच येत नाही. ते जाहिरातींच्या ‘भूलभुलैया’त अडकले आहेत.
विश्वचषकात दीड महिना गेला, पुढील दीड महिना आयपीएलमध्ये
भारतीयांसाठी क्रिकेट जीव की प्राण आहे. त्याचा प्रत्यय ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या ११व्या वनडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आला. केवळ १४ देश खेळूनही ‘विश्व’चषक म्हणवल्या गेलेल्या या स्पर्धेला सर्वाधिक पाठिंबा भारतीयांचा मिळाला. टीव्हीवरून तब्बल ६३.५० कोटी भारतीयांनी विश्वचषक स्पर्धेचा आनंद लुटला.
भारतातील दूरचित्रवाणीच्या इतिहासात सर्वाधिक संख्येने पाहिली गेलेली ही पहिलीच स्पर्धा आहे. यंदा भारतात विश्वचषकाचे प्रक्षेपण सहा भाषांमध्ये करण्यात आले. त्यामुळे क्रिकेट सामने पाहणा-यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली. आयसीसी आणि बीसीसीआयने प्रेक्षकांची नाडी अचूक ओळखली आहे. दीड महिना विश्वचषकात गेला आता पुढील दीड महिना आयपीएलमध्ये जाईल. जगभरातील (म्हणजे १५ ते २०) संघांचा विश्वचषक दीड महिना चालतो. मात्र तितकाच कालावधी आयपीएल या देशांतर्गत टी-२० लीगला मिळतो. यावरून बीसीसीआयच्या आयसीसीवरील वर्चस्वाचा अंदाज येतो.
शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान
एप्रिल महिना म्हणजे परीक्षांचा महिना. दहावी, बारावी परीक्षा सोडल्यास अन्य इयत्तांच्या वार्षिक परीक्षा याच महिन्यात असतात. आपला मुलगा किंवा मुलगी या परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण व्हावी, असे प्रत्येक पालकाला वाटते.
मात्र नेमक्या याच महिन्यात आयपीएल आहे. आयपीएलच्या धबडग्यात मुलांचा अभ्यास कसा होणार? संध्याकाळची किंवा रात्रीची वेळ ही अभ्यासाची. आयपीएलचे सामने दुपारी चार वाजता सुरू होऊन रात्री अकरा वाजता संपणार. परिणामी, आयपीएलमुळे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. मात्र बीसीसीआय आणि आयपीएलला त्याच्याशी देणेघेणे नाही. विश्वचषकाप्रमाणे आयपीएलचे सामनेही एकत्रित पाहण्याला अनेक जण प्राधान्य देणार. आयपीएलचे बहुतांश सामने रात्रीचे असल्याने पुढील दीड महिना हॉटेल्स, पब आणि बारवाल्यांचा व्यवसायही तेजीत असेल.
.. तरीही प्रेक्षकांचा ‘हौस’फुल्ल प्रतिसाद लाभेल
आयपीएलच्या सातही मोसमांमध्ये प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला. मुंबई असो किंवा दिल्ली, पंजाब असो किंवा चेन्नई, आयपीएलच्या सामन्यांना मोठी गर्दी झाली. याचा फायदा सर्वच फ्रँचायझींना झाला. तिकिटे मिळवण्यासाठी ‘ऑनलाईन’ सुविधा तसेच घरपोच सेवेमुळे प्रेक्षकांना पूर्वीप्रमाणे तिकिटे मिळवण्यासाठी आता तितकी दगदग करावी लागत नाही.
लांबच लांब रांगा नाहीत की काळाबाजार नाही. अर्थात एकाहून अधिक तिकिटे (एक गठ्ठा) मिळवून अवाच्या सव्वा किमतीने विकणारेही आहेत. तिकिटावर वैयक्तिक माहिती छापली गेली नसल्याने एकाचे तिकीट दुसरा वापरू शकतो. खुल्या तिकीटविक्रीमुळे मोठय़ा प्रमाणावर काळाबाजार होत होता. आता थोडा कमी झालाय. तसेच ‘ऑनलाईन’मुळे कुणालाही तसेच आगावू तिकीट मिळवता येते. स्टेडियमवर सामने पाहण्याचा आनंद आगळावेगळा असतो. त्यातच आयपीएलचे सामने सायंकाळी चार किंवा रात्री आठ वाजता (विद्युतझोतात) असल्याने रंगत वाढते.
मात्र तिकिटांचे भरमसाट दर पाहता सर्वसामन्यांना प्रत्येक सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहता येत नाही. त्यातच स्टेडियममध्ये पाणी किंवा खाद्यपदार्थ नेण्यास बंदी असते. या वस्तू स्टेडियममध्ये मिळत असल्या तरी खूप महाग असतात. तिकिटांनंतर स्टेडियममधील खाद्यपदार्थाच्या माध्यमातून संघमालकांना खूप फायदा होतो. हे सर्व माहीत असूनही अनेक जण स्टेडियममध्ये जाणारच. (क्रमश:)
कोहलीची विकेट झहीर घेतो आणि आपण टाळय़ा वाजवतो
क्रिकेटला अधिक रंजक करण्याहेतूने तसेच त्यातून अधिकाधिक पैसा मिळवण्याहेतूने आयपीएलची स्थापना झाली. प्रत्येकी २० षटकांचे क्रिकेट तसेच केवळ तीन तासांत निकाल लागत असल्याने प्रेक्षकांना या प्रकाराने वेडे केले. त्याहून कहर म्हणजे विराट कोहलीची विकेट झहीर खान घेतो आणि आम्ही टाळय़ा वाजवतो. हेच दोन क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना भारताचे प्रतिनिधित्व करतात. तसेच प्रतिस्पर्धी संघाला हरवण्यासाठी जीवाचे रान करतात. मात्र आयपीएलमध्ये एकमेकांचे शत्रू बनतात. आयपीएलमुळे क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार मोठय़ा प्रमाणात वाढला, असे बीसीसीआयचे म्हणणे आहे. मात्र ‘खुन्नस’ही वाढली.पहिल्याच आवृत्तीत हरभजन सिंगने श्रीशांतला कानशीलात लगावलेला प्रसंग तसेच सहाव्या हंगामात (२०१३) विराट कोहली आणि गौतम गंभीरची झालेली चकमक कोण विसरेल? आयपीएलचे अनेक दुष्परिणाम असले तरी आयपीएलचा गोडवा गाणारे कमी नाहीत, हेही खरे.
band kara ipl