आमचा मालवणी मुलूख म्हणजे अस्सल मांसाहारी. मासे, मटण मिळाले नाही तर या मुलखाचा घास उतरत नाही. शिमगोत्सवातील पोस्ताची परंपराही अशीच आहे. गावची पारध कधी होणार याचे वेध गावातील ग्रामस्थांपासून मुंबईतील चाकरमान्यांपर्यंत सर्वानाच लागलेले असतात. पोस्त म्हणजे मटण आणि भाकरी गावातील सर्वानी एकत्र येऊन एका जागेवर बसून खाण्याचा आनंद. काही गावांमध्ये पारधीची कोष्टी देण्याची परंपरा आहे. कोष्टी म्हणजे गावाच्यावतीने करण्यात आलेल्या शिकारीचा वाटा प्रत्येक घरात पोहोचविला जातो. चांदवडाच्या पानातून ही कोष्टी प्रत्येक उंबरठयापर्यंत पोहोचवली जाते. होळीच्या काळात कोणतीही शिकार होवो त्यावरचा हक्क देवाचाच आणि देवाची शिकार म्हणजे समस्त रयतेला भोजन असते. पारधीच्या दिवशी जेवढी जंगलात मजा असते त्यापेक्षा चव्हाटयावर.. पोस्ताच्या रात्री धाडसी असे अग्निदिव्य रंगते, मशालींचे रोंबाट रात्र जागवते.
शिगम्यातली रंगत आता कमालीची वाढली आहे. अनेक भागात शबयचे सूर निनादू लागले आहेत. गावागावात चव्हाटयावर देव पोहोचले आहेत. देवतांची तरंग काठी गाववासीयांना आशीर्वाद देण्यासाठी परंपरागत प्रथांमध्ये व्यस्त आहेत.
चव्हाटयावर आलेल्या देवांमुळे गावात एक नवा उत्साह संचारला आहे. या शिमगोत्सवात देवतांच्या स्वारीचा मुक्काम गावांमध्ये होणा-या पारधीवर ठरलेला असतो. ही पारधीची परंपरा सह्याद्रीतल्या अनेक गावांत आहे. चव्हाटयावरचे पोस्त म्हणजे एक वेगळीच लज्जत असते.
देवाला साक्षी ठेवून जंगलात रान काढण्यासाठी गावातील मंडळी रवाना होतात. वन्य कायद्याप्रमाणे जंगलातील शिकार करणे हा गुन्हा असला तरी परंपरा टिकविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला जातो. या मागची भूमिका शुद्ध असते. गावाचा एकोपा टिकावा, समस्त गाव एखाद्या दिवशी तरी या पोस्ताच्या निमित्ताने एकत्र व्हावे.
शिकार म्हणून एखादाच पशू मारावा. पुन्हा अशा पद्धतीने शिकार करू नये, हाही गावाचा एक दंडक असतो. सृष्टीचक्राप्रमाणे जंगलातील पशूंची संख्याही मर्यादित राहायला हवी, जंगलाशेजारी असलेल्या शेतीची नासधूस या प्राण्यांकडून होऊ नये हीच यामागची भूमिका असते.
चव्हाटयावर देवाचे तरंग पोहोचल्यावर शिमगोत्सवाचा एक दिवस जंगलात जाण्यासाठी निश्चित केला जातो. एरव्ही जंगलात जाताना झाड तोडू नये, फांद्या मोडू नयेत. एका पशूपेक्षा अधिक कोणावरही बंदूक चालवू नये अथवा अन्य कोणत्याही हत्याराने मारू नये, असा अलिखित रिवाज आहे. सहयाद्रीच्या घनगर्द झाडीत शिकार मिळत नाही, असे कधी होत नाही.
तर ठरलेल्या दिवशी शिकारीला जाणे एक मजा असते. नियोजित ठिकाणी जंगलातच तळ टाकला जातो. येथे जेवण-खाण्याची व्यवस्था केली जाते. जंगलात जेवण करताना मिळणारा आनंद हा पंचपक्वान्नाच्या आनंदापेक्षाही अधिक असतो. हे सर्व होत असतानाच दुसरीकडे हाकारे-कुकारे सुरू होतात.रान काढले जाते आणि शिकार पडतेच.
ही शिकार मग वाजत गाजत चव्हाटयावर आणली जाते. त्याची मिरवणूक काढली जाते. गुलाल उधळला जातो, गावागावात असलेल्या मांडांवर दर्शन सोहळा होतो आणि पारध चव्हाटयावर पोहोचते. या सावजाचा मांसाहारी प्रसाद गावातील प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होतो.
चव्हाटयावर ही मिरवणूक आल्यानंतर मोठया रांजणात मटण शिजविले जाते. गावातील विशिष्ट घाडी, गुरव व अन्य ग्रामदेवतांची सेवा करणा-या घरांना जमिनी कसण्यासाठी देण्यात आलेल्या आहेत. या मंडळींनी देवाची सेवा करतानाच वर्षातून एक वेळा देवाचा प्रसाद म्हणून पारध झाल्यानंतर भाक-या द्याव्यात, असा प्रघात आहे.
ठरल्याप्रमाणे ज्यांची वरसल देवाच्या सेवेसाठी ठरलेली असते ही मंडळी भाक-याची व्यवस्था करतात. प्रत्येक घरातून कमीत कमी ५० तर जास्तीत जास्त कितीही भाक-या दिल्या जातात. या भाकरीचा घास मटणाबरोबर घेण्याची परंपरा म्हणजे पोस्त! रानपानावरचा हा घास घेण्याचा आस्वाद अनुभवणे हा एक एक वेगळाच आनंद असतो.
पोस्ताची दवंडी शिकार झाल्या झाल्या वाडीवस्तीवर असलेल्या मांडांवर दिली जाते. पोस्ताची वेळ निश्चित करण्यात आलेली असते. पोस्त म्हणजे गाववासीयांनी एकत्र यावे आणि प्रसाद घ्यावा, हे ठरलेले. पोस्तासाठी रानातीलच पाने निवडली जातात. चांदवड, कुडा अथवा पळस याची रास लागते. या पानांवर मटण आणि भाकरी वाढली जाते.
देवाचा प्रसाद म्हणून सर्व जण सेवन करतात. लांबच्या लांब पंक्ती बसतात आणि मग मटण आणि भाकरी प्रत्येकाला वाढली जाते. देवाचा प्रसाद म्हणून हे पोस्त श्रद्धेने स्वीकारले जाते.
शिकार कुणीही केली तरी सावजाला आणल्यानंतर त्याचे पुढील सोपस्कार कुणी कसे करावेत हे ठरलेले असते. प्रथेप्रमाणे ती-ती मंडळी पुढे होतात आणि काही तासातच मटणाचा प्रसाद तयार होतो. या मंडळींचा त्यांच्या त्यांच्या कामानुसार प्रसादाचा वाटाही ठरलेला असतो.
या प्रसादासाठी लागणारी भाकरी कुणी तयार करावी, तो हक्क कुणाचा, तो मान कुणाला मिळणार हे वरसलीप्रमाणे बदलत जाते. वरसल म्हणजे वर्षातून प्रत्येकाचा हक्क बदलत जातो. ही प्रथा सहयाद्रीच्या कुशीतील अनेक गावांमध्ये सुरू आहे.
पारधीनंतर गावात तळी फिरते आणि मग धुळवड रंगते. पारध झाल्याशिवाय देव चव्हाटयावरून प्रस्थान करत नाहीत. त्यांचा मुक्काम ७ दिवस अथवा ९ दिवस असतोच.
या कालावधीत पारध होत नाही, असे कधी होत नाही. होळीच्या काळात कोणतीही शिकार होवो त्यावरचा हक्क देवाचाच आणि देवाची शिकार म्हणजे समस्त रयतेला भोजन असते.
देवाच्या मनात जसे येते तसे घडते ही गाववासीयांची श्रद्धा अधिकच वृद्धिंगत होते. कारण शिमगोत्सवात एकाच वेळी, एकाच दिवशी शिकार अशी काही होते की, गाववासीयांना भरपेट प्रसाद दिला जातो. या मांसाहारी प्रसादाची परंपरा गावागावात या होळीच्या उत्सवातच अधिक प्रमाणात पाहायला मिळते.
काही ठिकाणी अशा प्रथेला ‘दांडे पारध’ ही म्हणतात. ही चव्हाटयावरची पारधीची मजा अनुभवायची, सहयाद्रीची स्वैरभ्रमंती करायची तर सध्या गावोगावच्या रयतेला भेटायला निघालेल्या ग्रामदेवतांच्या उत्सवात सहभागी व्हायला हवे.
पोस्ताच्या निमित्ताने अख्खा गाव एकत्र होतो. गावाची एकजूट कायम राखली जाते. या दिवशी एकूण उत्सवाची रूपरेषा सांगण्याचीही परंपरा आहे. धार्मिक आणि पारंपरिक प्रथांमधून चालणा-या पोस्ताच्या विधी अलीकडे बदलत चालल्या आहेत. वन्यप्राण्यांची हत्या करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे काही ठिकाणी जंगली पशूऐवजी पोस्तामध्ये कोंबडया, बक-याना कापत परंपरा पूर्ण केली जाते.
या पोस्ताच्या रात्री अग्निदिव्याचे रोंबाट रंगते. आगीचे खेळ सुरू होतात. मशाली पेटतात..आणि होळदे ऽऽ रे होळदे..चा जयघोष होतो. ढोलांचा नाद घुमू लागतो. ताशा कडाडतो. एकसुरात ठेका धरला जातो. ढोल वाजत असतात.
मशालीचे खेळ सुरू होतात. उत्साही मंडळी दोन्ही बाजूने पेटलेल्या दिवटया घेऊन बनाटी फिरवू लागतात. कोणी मशाली रॉकेल फुंकून अग्निलोळ काढतात. हा उत्साहच भारी असतो. त्याला शब्दात पकडणे अवघड असते.
नुसती नावे वाचून तोंडाला पाणी सुटते.