शिवाजी महाराजांनी अफझल खानाला मारले हे सत्य आहे पण तो एक मुस्लिम म्हणून नाही तर स्वराज्याचा शत्रू म्हणून त्याला मारले होते, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.
पुणे – राज्य चालवताना शिवाजी महाराजांनी संकुचित विचार ठेवला नाही, तरीही शाळेत छत्रपतींचा इतिहास वेगळा शिकवण्यात आला. ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ हा शब्दप्रयोग अनैतिहासिक असल्याचे ज्येष्ठ इतिहास संशोधक शेजवलकरांनी सिद्ध केले, तर महात्मा फुले यांनी ‘कुळवाडी भूषण’मधून वास्तव दाखवून दिले. मात्र काही जण जाणीवपूर्वक वेगळा इसिहास लादण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात त्यांना यशही येत आहे. ही गोष्ट अस्वस्थ करणारी असून वास्तव इतिहास लोकांपुढे आणला गेला पाहिजे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येथे केले. श्रीमंत कोकाटे लिखित ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या सचित्र चरित्राचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
छत्रपती शाहू महाराज अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, पी. ए. इनामदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रवीण गायकवाड उपस्थित होते. पवार पुढे म्हणाले की, शाळेत शिकत असताना वेगळाच इतिहास शिकविला गेला. तर विशिष्ट वगार्ने त्यांना सोयीचे असलेले ज्ञान देण्याची खबरदारी घेतली. त्यामुळे बहुजन समाजातील काही पिढय़ा वेगळ्या इतिहासाची मांडणी करण्यात गेल्या. आता कुठे हळूहळू वस्तुनिष्ठ इतिहास समोर येऊ लागला आहे,‘सज्जनांचे संरक्षण आणि दुर्जनांचा नाश’ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे सूत्र होते.
जातीवाचक विचार न करता स्वराज्यावर निष्ठा ठेवणा-या सर्व घटकांना त्यांनी एकत्र केले. या देशात अनेक राजे-महाराजे होऊन गेले. त्यांची राज्ये ही त्या राजांच्या नावानी ओळखली गेली. मात्र शिवाजी राजांचे राज्य कधी ‘भोसल्यां’चे राज्य झाले नाही. ते नेहमी रयतेचे राज्य म्हणूनच नावाजले गेले, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, सन २००४ मध्ये दादोजी कोंडदेवांचा विषय ऐरणीवर आला होता. त्यावेळी मी इतिहासाच्या पुनर्मांडणीची गरज व्यक्त केली होती. दादोजी कोंडदेव, रामदास यांना शिवाजीचे गुरु म्हणून दाखवणे चुकीचे आहे. स्वातंत्र्याचा सर्वात मोठा संस्कार शहाजी राजांनीच शिवाजी महाराजांवर केला.कोकाटे म्हणाले, इतिहास रमण्यासाठी नसून प्रेरणा घेण्यासाठी असतो. या भूमिकेतून वस्तुनिष्ठ इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रास्ताविक प्रविण गायकवाड यांनी केले, तर राहूल पोकळे यांनी आभार मानले.
अफझलखान मुस्लीम होता म्हणून नव्हे..
अफझलखानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी काढला ही वस्तुस्थिती आहे. मात्र, तो स्वराज्याचा शत्रू होता आणि राज्य उद्ध्वस्त करायला तो आला होता म्हणून त्याला नष्ट केले; मुसलमान म्हणून नव्हे. शिवाजी महाराज मुस्लीमद्वेष्टे असते तर अफझलखानाचा वकील कृष्णाजी कुलकर्णी सुटला असता. छत्रपतींची लढाई मुस्लीमविरोधी नाही. रयतेच्या राज्यावर चालून येणा-या हिंदू, नात्या-गोत्यातल्या लोकांविरुद्धही त्यांनी संघर्ष केला, असेही शरद पवार यांनी सांगितले.
जर अफझलखान राज्य उद्ध्वस्त करायला तो आला होत तर त्याने पंढरपूर आणि तुळजापूरच का उद्ध्वस्त केले .
एखादी मशीद स्वराज्यात आहे ती पण उद्ध्वस्त करायची ना !!!
रोज रोज नवीन नवीन इतिहासाचे शोध लावतात कुठून हे लोक .
एकदा काही तो तुम्हाला कळलेला इतिहास कळू द्या लोकांला पुराव्या सकट.
अफझलखान अतिरेकी होता हे तरी मान्य करा …… आणि अतिरेक शिवाजी महाराजांनी जसा संपवला तसाच संपवावा लागतो.
आणि त्याचे स्मारक कसे आपण उभे राहू देतो महाराष्ट्रात ???