‘भल्ली भल्ली भावय.. ‘हर हर महादेव..’ अशा जयघोषात ढोल-ताशांच्या गजरामध्ये ऐतिहासिक वारसा लाभलेल्या देवगड तालुक्यातील ‘कसबा साळशी’ गावात श्री पावाणाई देवालयासमोर ‘भावईचा वार्षिकोत्सव’ गुरुवारी १६ जुलै रोजी होत आहे. हा उत्सव पाहण्याचे पंचक्रोशीतील मंडळींना एक अप्रूप असते. ढोल-ताशांच्या गजरामध्ये एकमेकांवर चिखलफेक केली जाते. आनंदवृत्तीने पावणाई देवालयासमोर मोकळय़ा जागेत गाडलेले श्रीफळ कोपराने खोदून शोधून काढण्यासाठी सर्व जण ‘सापसीडीचा’ खेळ खेळतात. लुटुपुटुची शिकार खेळली जाते. हा उत्सव म्हणजे कोकणची एक अनोखी परंपरा आहे.
सकाळपासूनच ढोलांचा आवाज वाजू लागतो. आदल्यादिवशी देसरूढ झाल्यामुळे भावई देवीचा उत्सव अख्या गावात सुरू झालेला असतो. दुपारनंतर मातीतला खेळ सुरू होतो. ढोल वाजू लागतो. आणि त्या तालावर भल्ली-भल्ली भावयऽऽचा सूर निनादू लागतो.
माती आणि मतीचे नाते एक होते. देवीच्या जल्लोषात सर्व ग्रामस्थ रममाण होतात. कुणी कोपराने मातीखाली पुरलेला मानाचा नारळ शोधू लागतो तर कुणी आपल्या ताकदीचा अंदाज घेण्यासाठी देवाचा दगड उचलण्याचा प्रयत्न करतो.
परंपरांवर परंपरा सुरू होतात. ४ तास हा जल्लोष सुरू असतो. महिला-पुरुष सारेच जण यात रममाण झालेले असतात. अखेर खेळ संपण्याची थाप ढोलावर पडते, आवाजाची चाल बदलते आणि भल्ली-भल्ली भावयचा उत्सव या वर्षीपूरता संपलेला असतो. नव्या वर्षासाठी सारे जण नव्या उत्साहाने कामाला लागतात. कृषीकर्माचा एक आदर्शवत धडा गाववासीयांनी गिरवलेला असतो. ही परंपरा आहे. देवगड तालुक्यातील साळशी गावातली.. पावणाई सिद्धेश्वराच्या मंदिरासमोरची!
कोकणातल्या सण-उत्सवाना त्या-त्या गावाची अशी एक परंपरा असते. एक दिमाख असतो. काही परंपरा थेट मातीचे नाते सांगणा-या असतात. देवीच्या नावाने वसुंधरेशी जोडले जाणारे असतात. मी एक मातीचा भाग आहे. या मातीतूनच मला माझी निर्मिती करायची आहे. आणि या मातीतच मी संपणार आहे. याचे भान दाखवून देणारी परंपरा असू शकते का असा आजच्या पिढीने प्रश्न केला तर त्याला उत्तर देवगड तालुक्यातील साळशी गाव देईल.
कित्येक वर्षापूर्वीची भावईची शिवकालीन परंपरा हे सर्व प्रश्न चुटकीसरशी मार्गी लावेल. कारण भावई देवीच्या नावाने सुरू असलेल्या या उत्सवात सर्व गाव देवीच्या प्रांगणात एकवटवतो. आणि मनसोक्त मातीत नाचतो, रमतो. एकमेकांना चिखलात बुडवून आम्ही मातीची लेकरे आहोत. याचे भान पुन्हा एकदा देतो.
ही परंपरा गावात कधी सुरू झाली याबाबत ग्रामस्थ पिढय़ान् पिढय़ांचे उत्तर देतात. इतिहास संशोधक भावईच्या उत्सवाला वसुंधरेच्या नात्याशी सांगड घालतात. साळशी गाव म्हणजे श्री देव सिद्धेश्वर पावणाईचे इनाम देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
शिवकालीन महत्त्व लाभलेला साळशी गाव ४०० वर्षापूर्वी साळस महाल म्हणून प्रसिद्ध होता. त्यावेळी तालुके नव्हते तर महालांची संकल्पना अस्तित्वात होती. घाटमाथ्याशी जोडलेला पाटण महाल, सध्या देवगड, कणकवली व मालवण तालुक्याचे क्षेत्र असलेल्या साळस महाल. कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग क्षेत्राचा कुडाळ महाल. आणि गोव्याचा पेडणे महाल यांचा समावेश होता. साळशी हा गाव महाराष्ट्रात देवगड बंदरापासून
२५ किमी अंतरावर तर मुंबई-गोवा महामार्गापासून २० किमी अंतरावर आहे. प्राचिन ऐतिहासिक व जागृत देवस्थान म्हणून सिद्धेश्वर-पावणाई देवीला श्रद्धापीठ मानले जाते. या मंदिराच्या प्रांगणात या ऐतिहासिक परंपरा कर्क संक्राती दिवशी साजरी केली जाते. आषाढ महिन्यात येणारी ही कर्क संक्रांत म्हणजे साळशी गावातला उत्सव असतो. भावईच्या उत्सवादिवशी घरा-घरात गोडधोड तर कुठ वडे-सागोतीचा बेत आखलेला असतो. ही संक्रांत म्हणजे गावचा मोठा उत्सव असतो.
भावईच्या उत्सवाच्या आदल्यादिवशी म्हणजे संक्रांतीच्या आदल्यादिवशी सूर्यास्तानंतर कातरवेळी देसरूढ काढली जाते. रूढी परंपरेने, रितीरिवाजाप्रमाणे देसरूढीचा मार्ग ठरलेला असतो. कलडा, मलडा या ठिकाणी या कातरवेळी भक्ष देण्याची परंपरा आहे. अळवतीच्या चिंचेकडे दुसरा भक्ष दिला जातो. पडळीत (परडी) पेटता काकडा घेऊन गावातील परंपरांगत घरातील मंडळी रवाना होतात. गावाच्या सीमारेषेपर्यंत यांचीही धाव सुरू होते. सीमेबाहेर पोहोचल्यावर गावातील दुष्ट शक्तींना बाहेर काढण्याचे गा-हाणे केले जाते. आणि परंपरेप्रमाणे रिवाज पूर्ण केला जातो. देसरूढ काढल्यानंतर सारा गाव आनंदित होतो. गावात कोणतेही संकट येणार असा विश्वास ग्रामस्थांना असतो.
या उत्सवाच्या दुस-या दिवशी भावईचा ढोल वाजू लागतो. त्याचा एक नाद ठरलेला असतो. देवीच्या प्रांगणात ढोलावर काठी बसते. भल्लीऽऽ भल्ली.. असा आवाज घुमू लागतो. याच वेळी पावणाई देवीच्या मंदिरासमोर असलेल्या भावईच्या खळय़ात फुटभर खोल मातीत उभा नारळ पुरला जातो. हा नारळ मानाचा आणि देवाचा समजला जातो. भावईचा उत्सव सुरू झाल्यावर हाताच्या कोपराने बोटे न लावता जो कुणी मातीतून नारळ बाहेर काढेल त्याला गावाचा सन्मान दिला जातो. गाववासीय त्याचे कौतुक करतात.
ढोल वाजू लागताच आता प्रत्येकाने देवळात यायलाच हवे असा सांगावा घरा-घरात पोहोचलेला असतो. या दिवशी दुपारी घरा-घरात सर्व ग्रामदेवतांना नैवेद्य दाखविला जातो. दुपारी भल्ली-भल्ली भावयचा सूर सुरू होतो. ढोलताशांचा गजरात जल्लोषपूर्ण वातावरणात एकदा का उत्सव सुरू झाला की इतर दिवशी कपडय़ांना माती लागू नये म्हणून दक्षता घेणारे ग्रामस्थ मातीशी खेळू लागतात.
मानाचा नारळ काढण्यासाठी जो-तो जमिनीबरोबर कोपर घासू लागतो. कुठच्या भागात नारळ ठेवला आहे. हे कुणी सांगणार नाही. याची दक्षता मानकरी अगोदरच घेतात. प्रमुख मानकरी आणि बारा-पाच मिळून देवीचा जयघोष करतात. नारळ काढण्याचे कौशल्य सुरू होते. त्याला ‘सापड’ म्हणतात. हा नारळ काढण्यासाठी काही जण प्रयत्न करत असताना मातीत पाणी उडविले जाते आणि होणारा चिखल एकमेकांच्या अंगावर मारला जातो.
जो-तो चिखलात बुडून जातो. नारळ मिळाला तर ठीक. नाहीतर तास, दोन तास हा खेळ झाल्यावर सर्वाच्या साक्षीने ढोलताशांचा गजर थांबविला जातो. आणि नारळाची परंपरा पूर्ण केली जाते. सायंकाळी उशिरा काठीला रुमाल बांधून तरंग (शिवकळा) काढली जाते. याच परिसरात असलेल्या ८४च्या चाळय़ावर श्रीफळ व भक्ष देण्याचा प्रघात आहे. तेथे नवस बोलणे आणि फेडण्याचे कामही होते.
या खेळानंतर शिकारीचा कार्यक्रम रंगतो. उपस्थित मंडळी चिखलातच सावज शोधू लागतात. सावज कुणी व्हायचे, शिकारी कुणी करायची, शिकार केल्यानंतर कुणी कापायचे हे सारे ठरलेले असते. प्रतिकात्मक शिकारीची हालचाल सुरू होते. सोनार व शिंपी समाजातील मंडळींना या परंपरेत काही मान असतात. ते अवसर नाटक सुरू करतात. आणि शिकार कापण्याचा हुकूम देतात.
शिकारीस सुरी लावण्याचा मान पारधी घराण्याचा असतो. रिवाजानुसार देवीच्या दरबारात वाजत-गाजत शिकारीची मुंडी नेली जाते. हा मान मतकरी (मिराशी) कुटुंबीयांकडे असतो. ही मुंडी म्हणजे आंब्याचा टाळ असतो. भावईच्या उत्सवात या मुंडीला (आंब्याच्या टाळाला) मोठे महत्त्व असते.
चिखलात भल्ली-भल्ली भावयचा उत्सव सुरू असताना होळीकडील दगड उचूलन आपली ताकद आजमावण्याचा जो-तो प्रयत्न करत असतो. पूर्वी हा दगड गावातील ग्रामस्थ किती सहजतेने उचलून डोक्यावरून मागे फेकायचे याबाबत ज्येष्ठ मंडळी अनेक घटना सांगू लागतात. आपण तरुणपणी किती आणि कसा दगड उचलला होता. याबाबतच्या आठवणी कुणी जागृत करतो. आजच्या मुलांना हा दगड उचलताना किती कष्ट पडतात हे पाहून हास्यविनोद सुरू होतात. संवादावर संवाद रंगतात. मार्मिक टीका-टिप्पणी होते. मात्र या बोलाना एक मजेची झालर असते.
भावईच्या उत्सवात लहान-थोर सारे जण सर्व समाजाचे घटक कोणताही भेदभाव न राखता एकत्र होतात. हा सामाजिक एकरूपतेचा प्रसंग पूर्वजानी मोठय़ा दुरदृष्टीने कसा घडविला आणि तो देवीच्या कसा टिकविला याचे आश्चर्य वाटते. आज मनोरंजनाचे संदर्भ बदलले आहेत. गावाचे रूप बदलले आहे तरीही ग्रामस्थ मोठय़ा निष्ठेने आणि श्रद्धेने भावईचा उत्सव साजरा करतात.
देवीच्या प्रांगणातल्या चिखलात घटकाभर रमून जातात. गावातील सर्वानाच सुख-समृद्धी मिळावी म्हणून देवताना साकडे घालतात. या उत्सवात नोकरी व्यवसायानिमित्त परभागात असलेली मंडळी या दिवसांत आवर्जून गावात उपस्थित राहतात. महिला योग्य ते अंतर राखून देवीच्या प्रांगणात हजर असतात. हा उत्सव एक नवी जाणीव करून देणारा असतो.
Nice पोस्त……….
माझ्या गावाचा मला खुप अभिमान आहे…….