ठाण्यात गुरुवारी अनेक रस्त्यांवर शुकशुकाट होता. एकही बस रस्त्यावर दिसत नव्हती. लोक बसथांब्यांवर तास-तास ताटकळले होते, रिक्षाही गायब होत्या.
ठाण्यात गुरुवारी अनेक रस्त्यांवर शुकशुकाट होता. एकही बस रस्त्यावर दिसत नव्हती. लोक बसथांब्यांवर तास-तास ताटकळले होते, रिक्षाही गायब होत्या. चुकून एखादी बस दिसलीच तर ताबडतोब तिच्या टायरमधली हवा काढली जात होती, काचा फोडल्या जात होत्या.
ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग, लहान मुलं घाम पुसत थकलीभागली पावलं ओढत उन्हाचा मारा सहन करत होते, कॉलेजमधल्या परीक्षांचा बट्टयाबोळ झाला होता. एरव्ही विळ्याभोपळ्याइतकं सख्य असलेले जागरूक लोकप्रतिनिधी जोडीने फिरून एकही बस टीएमटीच्या आगाराबाहेर पडणार नाहीत याची दक्षता घेत होते.
ज्यांनी कायदा आणि घटनेच्या तत्त्वांचं पालन करण्याची शपथ घेतलेली असते तेच लोकप्रतिनिधी अनधिकृत बांधकामांच्या समर्थनार्थ बंद आयोजित करून निर्लज्जपणे घटनाविरोधी आणि कायदा धाब्यावर बसवणारं वर्तन करत आहेत हे पाहून कायद्याची चाड असलेल्या सर्वसामान्यांनी चडफडत त्यांच्या नावाने कडाकडा बोटं मोडली, ‘बंदला प्रचंड प्रतिसाद’ असं सांगणा-या वाहिन्यांवरून बोलताना बसथांब्यांवर रखडलेल्या, पदपथावरून नाईलाजाने पदयात्रा करणा-या अनेकांनी त्यांच्या उद्वेगाला वाट करून दिली. पण ही सगळी सविनय कायदेभंगाची चळवळ आहे ही मोठी गोष्ट कुणाच्याच लक्षात आलेली नाही. प्रसिद्धीचा कुठलाही सोस नसलेले या चळवळीतील ‘कार्यकर्ते’ बंदमुळे लोकांसमोर आले आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यासाठी लढणा-यांच्या हाती सविनय कायदेभंगाच्या रूपाने मोठं अस्त्र आलं होतं. आताही ही सगळी मंडळी स्वातंत्र्यासाठीच लढताहेत. कुणी त्याला स्वार्थही म्हणतील. दोन्ही शब्दांची सुरुवात ‘स्वा’ने व्हावी हाही योगायोगच म्हणावा लागेल. यांच्या स्वातंत्र्याची व्याख्या थोडी वेगळी आहे. मनचाहं वागण्याचं, कायदा झुगारून देण्याचं, हम करे सो कायदा असा दंडा उगारण्याचं, दुस-याचं स्वातंत्र्य चोळामोळा करण्याचे, आपल्या बेकायदा कृतीचं दडपून समर्थन करण्यासाठी सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचं स्वातंत्र्य जन्मसिद्ध अधिकार असल्यागत हवं असलेली मंडळी राजकारणातच नव्हे तर समाजाच्या विविध क्षेत्रांत आणि स्तरांत आढळतात.
त्यामुळे बेकायदा बांधकामांना संरक्षण मिळावं आणि आपली व्होटबँक सुरक्षित राहावी म्हणून कायद्याने वागणा-यांच्या घटनादत्त अधिकारांवर टाच आणू पाहणारे ठाण्यातील लोकप्रतिनिधी काही चुकीचं वागताहेत असं बोलणंच चुकीचं आहे. ही त्यांची सविनय कायदेभंगांची चळवळ आहे इतकंच. आता यातला ‘सविनय’ हा शब्द कुणाला खटकू शकतो पण, तोही मतांतराचा भाग आहे. साहेबांनी समजावून सांगूनही वनखात्याचे अधिकारी ऐकत नसतील तर एखादा उणादुणा शब्द तोंडातून जाणारच ना भाई. पण तेवढा भाग सोडला तर ‘विनय’ म्हणजे काय ते शिकावं ते यांच्याकडूनच. बसमधून प्रवाशांना आधी उतरायला सांगितलं आणि मगच हवा सोडली, काचा फोडल्या या वर्तनाला ‘विनयशील’च म्हणायचं असतं, समजलं ना भाई!
ठाण्यातील अनधिकृत बांधकामांविषयी खूप काही लिहिलं-बोललं जात आहे. पण तीदेखील सविनय कायदेभंगाचीच चळवळ आहे हे लक्षात घ्यायला हवं. प्रारंभी जे लिहिलं त्यात थोडी सुधारणा करावी लागेल. ठाण्यातच नव्हे तर सविनय कायदेभंगाची चळवळ समाजाच्या सर्वच क्षेत्रांत सुरू आहे. ठाण्यात तर पूर्वीपासून सुरू आहे. या चळवळीच्या उमाळ्यातूनच अनधिकृत बांधकामं करणा-या गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी अभूतपूर्व सर्वपक्षीय एकजूट गुरुवारी दिसून आली. ही अर्थातच कायदेभंगाची चळवळ असल्यामुळे कायद्याने वागणा-या, सनदशीर मार्गाने पाणी, विजेचे कर वगैरे भरून करदात्यांसाठी अशी एकजूट होणं अशक्य आहे हे आपण समजून घ्यायला हवं. अधिकृत-अनधिकृत अशा घोळात न पडता दिसेल त्या भूखंडावर, सरकारी जागेवर इमारत उभी करायची, शेजारच्याच कुठल्यातरी इमारतीतून वीज घ्यायची, बाजूने जाणा-या पायपातून पाण्याचं कनेक्शन घ्यायचं असा कायदेभंग या चळवळीतील ‘कार्यकर्त्यांनी’ कैक वर्षापासून सुरू
ठेवला आहे.
केवळ गरीब माणूस बेघर राहू नये म्हणून, त्याला डोक्यावर छप्पर मिळावं म्हणून या कार्यकर्त्यांनी कायदेभंगाचा धोका पत्करून इतका मानवतावादी खटाटोप गेली कितीतरी र्वष ठाण्यात, मुंब्य्रात, कल्याण-डोंबिवलीत चालवला आहे. राज्यातील इतर शहरांतही त्यांचे अनुयायी ही चळवळ चालवत आहेत. त्यांच्या या लढयाचं कौतुक कुणालाच नाही. प्रसिद्धीचा सोस, हव्यास, ध्यास नसल्यामुळेच इतकी र्वष या चळवळीतील धुरीण मंडळी पडद्याआडून या लढयाची सूत्रं हलवत होती. पण आता सरकारनेच त्यांच्या या लढय़ावर कारवाईचं शस्त्र उगारल्यामुळे संरक्षकाच्या भूमिकेतील मंडळींना बंदचं हत्यार नाईलाजाने उपसावं लागलं असणार हे समजून घ्यायची गरज आहे!
‘कायद्याचं राज्य’ वगैरे भ्रामक कल्पनांत गुंतलेली मंडळी ठाणे बंद घटनाविरोधी असल्याचं सांगतात. बंदच्या आयोजकांनी थेट घटनाविरोधी भूमिका घेऊन अतिक्रमणकर्त्यांना पोषक, प्रोत्साहन देण्याचा, पाठीशी घालण्याचा, संरक्षण देण्याचा अट्टहास चालवला आहे. ठाणे महापालिकेच्या महासभेने २०१० पर्यंतच्या सर्व अनधिकृत बांधकामांना नियमित करण्याचा जो ठराव केला तोही याच वृत्तींना पाठबळ देणारा, नव्या अतिक्रमणकर्त्यांना कायद्याविषयी बेदरकार बनवणारा असल्याचं कायदा मानणा-या मंडळींचं म्हणणं आहे.
राष्ट्रीय संपत्तीवर कब्जा करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्यापासून रोखणं, सरकारी कामात हस्तक्षेप करणं हे घटनेच्या विरोधात असल्याचा, लोकशाहीला आव्हान असल्याचा टाहो ही प्रामाणिक म्हणून समजली जाणारी अल्पमतातील मंडळी फोडत आहेत. या लोकांना सविनय कायदेभंग ही संकल्पना कशी समजावणार? बेकायदा बांधकामं दंड आकारून नियमित करायची, या धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचं अन्यत्र पुनर्वसन करायचं, यासाठी येणा-या खर्चाचं काय? शिळफाटय़ासारख्या घटनेची दुर्दैवाने पुनरावृत्ती झालीच तर जी काही मदत जाहीर होते ती कोणाच्या खिशातून जाणार? यांसारखे चळवळीतील कार्यकर्त्यांना हतोत्साहित करणारे, मागे खेचणारे प्रश्न काही नतद्रष्ट मंडळी विचारू लागली आहेत. यासाठीच करदाते कर भरत असतात इतकं साधं उत्तर ज्यांना माहिती नाही त्यांना या चळवळीची महती कशी कळावी?
udhya vasandada eng colleg chunabhatti yethil bhandhkam todyakarita bmc yenar hahe udhya mulancha exam hahet ,5va 6 va mala padnyche notice dhile hahe emarat arketechar cha plan pramane bhandhli geli hahe tari hi kahi lok assa tarhchi kame karit hahet