वगनाटय, लोकनाटय, मुक्तनाटय अशी वेगवेगळ्या प्रकारची नाटकं लीलया लिहिणारा नाटककार म्हणजे पांडुरंग तुकाराम पाटणकर अर्थात पां. तु पाटणकर. मनोरंजनातून समाजातील विसंगतींवर भाष्य करणारं त्यांचं लिखाण गिरणगावी परंपरेत बसणारं. आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे, वसंतराव नाईक, यशवंतराव चव्हण, बाळासाहेब ठाकरे यांसारख्या दिग्ग्ज मंडळींसोबत काम करणा-या पां. तु. यांनी शाहीर साबळेंच्या आत्मचरित्राचंही संपादन केलं आहे. जवळजवळ सगळ्याच प्रमुख वर्तमानपत्रांतून वेगवेगळ्या विषयावर लिखाण करणा-या पां. तु. यांचा लिहिता हात आजही थांबलेला नाही. त्यांचा एक ग्रामीण कथासंग्रह लवकरच प्रकाशित होणार आहे. लोकनाटयाच्या बादशहाकडून त्याचं जीवनचरित्र ऐकणं ही पर्वणीच असते.
ज्येष्ठ नाटककार, लेखक म्हणून तुम्ही रंगभूमीवर परिचित आहात, लेखनाची ही आवड तुमच्यात कशी निर्माण झाली?
>माझ्यात लेखनाची आवड कशी निर्माण झाली, या गोष्टीचा कधी कधी मीही विचार करतो. कारण मी जन्मलो खेडेगावात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण हे माझं गाव. मुंबई-गोवा हायवेवर असलेलं हे गाव नितांत सुंदर आहे. गावावर शिक्षणाचे संस्कार पहिल्यापासूनच होते. ‘रत्नागिरी जिल्हा लोकल बोर्डाची पूर्व प्राथमिक शाळा’ या मराठी शाळेत शिकत असताना स्नेहसंमेलनासाठी आचार्य अत्रे कृत ‘सं. गुरुदक्षिणा’, ‘राजा चामुंडराय’ या नाटकांतून कामं केली होती, तीही फक्त आणि फक्तगंमत म्हणून. गावात रामेश्वराच्या देवळात पाहिलेले ‘दशावतारी खेळ’ किंवा गावच्या तिठयावर होळीच्या आदल्या दिवशी देशावरून आलेले तमाशाचे खेळ, यात्रा पाहण्यासाठी हजेरी लावायचो. माझ्या लहानपणी गावी तंबूतला सिनेमा येऊ लागला होता. या तंबूतील चित्रपटगृहात मी ‘प्रभात’चे ‘कुंकू’, ‘माणूस’, ‘संत ज्ञानेश्वर’,‘तुकाराम’ इत्यादी चित्रपट पाहिले होते. त्यामुळे चित्रपट पाहण्याची आवड माझ्यात निर्माण झाली ती कायमची. कधी कधी खारेपाटणला तंबू आला नाही तर खास तंबूतील चित्रपट पाहण्यासाठी आम्ही राजापूरला जात असू. इतकं तंबूतील चित्रपट पाहण्याचं व्यसन जडलं होतं. या चित्रपटातील गाणी, खासकरून संवादांमुळे कुठे तरी नाटकाचं बीज आपोआप मनात रुजलं असावं, कदाचित माझं कलासक्तमन घडत गेलं असावं, असं वाटतं.
तुमच्याकडून प्रसवलेलं पहिलं साहित्य कोणतं?
>कविता. लेखनापैकी माझी पहिली आवड तीच होती. ‘टुरिंग टॉकीज’मधल्या चित्रपटगीतांमधून कविता लिहिण्याची प्रेरणा मिळत गेली. गाणी एकदा ऐकल्यावर ती सहजच ओठी राहायची. आपण कधी अशी गाणी रचायला शिकणार, ही रुखरुख मनाला लागून राहायची. पुढच्या शिक्षणासाठी मुंबईला आलो. भावांनी माझं नाव शिरोडकर हायस्कूलमध्ये घातलं. या शाळेची हस्तलिखितं काढण्याची प्रथा होती. दांडगं वाचन आणि वळणदार हस्ताक्षर या गुणांच्या बळावर मला सहजच हस्तलिखितासाठी काम करण्याची संधी मिळाली. त्या हस्तलिखितासाठी पहिल्यांदा काव्य रचलं. ते शिक्षकांना आवडलं. मग हळूहळू रचलेल्या कविता बाहेरच्या मासिकांसाठी पाठवू लागलो. मुख्य म्हणजे त्या छापून यायच्या. शाळेत कवी म्हणून लोकप्रिय झालो. पुढे पुढे कवितेबरोबर कथाही लिहू लागलो. काही वर्ष एकटयानेच स्वत:चं हस्तलिखितही काढायचो. त्या हस्तलिखिताचा आई-बाप, कर्ता-करविता सगळा मीच होतो. कथा, किस्से, कविता, लेख वळणदार हस्ताक्षरात कागदावर लिहून काढायचो. त्या लेखाला साजेसं रेखाटनही करायचो. हस्तलिखितांच्या प्रतींचं बाइंडिंगही करण्याची मजाही निराळीच असायची. असं हस्तलिखित पूर्ण झाल्यावर आचार्य अत्रे, सानेगुरुजी यांच्यासारख्या दिग्गज साहित्यिकांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रियाही घ्यायला जायचो. म्हणजे मी फक्त साहित्यच लिहिलं नाही, तर प्रकाशकही झालो.
पुढे कथाकार व्हायचं, ललित लेखन करायचं, विनोदी साहित्य लिहायचं हे ठरवून झालं का?
> लेखक काही मी ठरवून झालो नाही. लेखनशैली माझ्याकडे उपजत होती. फक्त ते वेगवेगळ्या वेळी, निरनिराळ्या त-हेने प्रगट व्हायचं इतकंच. त्यातूनच ‘अस्सं गाव सुरेख बाई’सारखं ललित लेखन किंवा आगामी ‘मंडपी’सारखा कथासंग्रह सिद्ध झाला. विनोद हा माझ्या लिखाणात आधीपासूनच होता. त्यामुळेच लोकनाटय़ लिहायला मला आटापिटा करावा लागला नाही. किंबहुना मी विनोदाच्या प्रेमात होतोच, म्हणून लोकनाटय़ं अधिक प्रमाणात लिहिलीत.
शाहिरी वाङ्मय, लोकनाटय़ हा साहित्यप्रकार चांगला लिहू शकतो, हा आत्मविश्वास तुमच्यात कसा निर्माण झाला?
> आत्मविश्वास निर्माण होण्याचं प्रमुख कारण म्हणजे गिरणगाव. मी त्यावेळी गिरणगावात राहत होतो. हा परिसर नेहमी चैतन्याने सळसळता, जिवंत असायचा. थंडपणा त्याला माहीत नव्हता. तिथे सगळे सण, उत्सव दणक्यात व्हायचे. रस्त्यामध्ये भलेमोठे पांढरे पडदे लावून चित्रपट पाहायला मिळायचे. नाटक, लोकनाटयं, तमाशे, मेळे, खेळे हे जिवंत कलाप्रकारही तिथे सादर केले जायचे. या कलाप्रकारांवर गिरणगावाचं विशेष प्रेम होतं. शाहीर दादा कोंडके, शाहीर साबळे, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे असे कितीतरी शाहीर आपली कला लोकनाटयाद्वारे सादर करायचे. त्याच वेळी डिलाईल रोडला राहणारे शाहीर साबळे माझे जीवलग मित्र बनले. त्यांच्या पार्टीत मी कामंही केली. कदाचित या सर्व गोष्टींमुळे लोकनाटयाकडे माझा ओढा वाढला. शाहीर साबळेंमुळे माझं लेखन रंगमंचावर आलं.
तुमच्यातील नाटककाराला पुढे कसं प्रोत्साहन मिळत गेलं?
> नाटकं ही प्रयोगांकित झाल्याशिवाय आपण किती पाण्यात आहोत, ते नाटककाराला कळत नाही. मी राहात होतो, तो कामगार परिसर होता. हा कामगार परिसर विविध कलांनी आणि कलाकारांनी समृद्ध होता. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, गुढीपाडवा, सत्यनारायणाची पूजा या मराठमोळया सणसमारंभांना नाटकं सादर केली जायची. मीही त्यातून भाग घ्यायचो. यापूर्वी ‘रत्नागिरी जिल्हा लोकल बोर्डाची पूर्व प्राथमिक शाळा’ आणि ‘शिरोडकर हायस्कूल’ शाळेत असताना स्नेहसंमेलनातून ‘निशिकांताची नवरी’, ‘पतंगाची दोरी’ या नाटकांतून कामं केली होती. परिणामी नाटकांतून काम करणं ही गोष्ट माझ्यासाठी तरी नवीन नव्हती. गिरणगावातील नाटकांतून केलेल्या कामाची तारीफ व्हायची. आपण नाटकांतून कामं करतो, तर लिहीत का नाही, असा प्रश्न मनात आला. शाळेच्या हस्तलिखितासाठी एक वर्ष नाटक लिहिण्याचा अनुभव गाठीशी होताच. १९५३ पासून कामगार कल्याण केंद्राच्या, तर १९५५ पासून हौशी कलावंतांच्या नाटयस्पर्धाना सुरुवात झाली. त्यामुळे त्यातून भाग घेऊ लागलो. ‘फिटले नेत्रांचे पारणे’, ‘हाकेच्या अंतरावर’, ‘इथं माणूस जागा आहे’ अशी नाटकं स्पर्धासाठी लिहिली. १९६० पर्यंत मी अनेक एकांकिका, रेडिओ श्रुतिका, लोकनाटयं लिहिल्या. इतक्या विविध माध्यमांसाठी नाटयलेखन केल्यामुळे नाटकाचं तंत्र, त्यांची बांधणी, संवाद यात अनुभवामुळे आपोआप सुधारणा होत गेल्या. आमच्या वेळी नाटयप्रशिक्षण शिबिरं नव्हती. निरीक्षण आणि सिद्ध झालेला प्रयोग यावरून लेखनात सुधारणा होत गेल्या. १९६४ साली ‘मी तो बादशहा’ या मुक्तनाटयाचे शाहीर साबळे आणि पार्टीने प्रयोग केले. त्यातून माझ्यातल्या नाटयलेखकाला प्रोत्साहन मिळत गेलं. थोडक्यात माझं नाटयतंत्र मीच शिकत होतो.
शाहीर साबळेंबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?
> शाहीर साबळेंबरोबर काम करत असताना लेखनाच्या बरोबरीने अभिनयाचंही काम मिळालं. तुम्हाला मी एक किस्सा सांगतो. शाहीर साबळेंनी १९६० नंतर लोकनाटयाला ‘ओपन एअर’मधून बंदिस्त नाटयगृहात आणलं. त्यांनी फक्त ग्रामीणच नाही, तर शहरी-नागरी प्रेक्षकांनाही लोकनाटयाकडे वळवलं. एकदा ‘मीच तो बादशाहा’ या मी लिहिलेल्या मुक्तनाटयाचा प्रयोग शाहिरांनी ताडदेवला ‘ओपन एअर’ला ठरवला होता. त्या प्रयोगाची बिदागी ठरवून शाहिरांनी त्याचा अॅडव्हान्सही स्वीकारला. दरम्यानच्या काळात शाहीर काही कामानिमित्त आपल्या गावी वाईला निघून गेले. तिथे त्यांची प्रकृती बिघडली. इतकी की, ते प्रयोगासाठीही हजर राहू शकले नाहीत. आम्ही चिंतेत पडलो. बाहेर तर रसिकांचा महापूर होता. आता शाहीर आले नाहीत तर प्रयोग रद्द करावा लागेल आणि प्रयोग रद्द केल्यास प्रेक्षकांच्या रोषाला कोण तोंड देणार? म्हणून राजा मयेकर आणि सुहास भालेकरांनी चर्चा केली आणि निर्णय घेतला की, पां. तु. पाटणकरांनीच शाहिरांची भूमिका करावी. हा निर्णय मी ऐकताच हादरून गेलो.
तुमच्या कुठल्या कलाकृतीला प्रेक्षकांचा सर्वात चांगला प्रतिसाद लाभला. यातील तुमचं सर्वात आवडतं नाटक कोणतं?
> ‘वा-यावरची वरात’, ‘इथे माणूस जागा आहे’, ‘फिटले नेत्रांचे पारणे’, ‘मीच तो बादशहा’, ‘अज्ञात’, ‘कोंडू हवालदार’, ‘कोंबडीशिवाय ऊरुस’ अशी अनेक वगनाटयं, लोकनाटयं आणि मुक्तनाटयं मी लिहिली.‘कोंडू हवालदार’ हे यातलं सर्वात चांगलं जमलेलं लोकनाटय. प्रेक्षकांचाही या लोकनाटयांला सर्वात अधिक प्रतिसाद मिळाला. त्या काळात रीगल, इरॉस या चित्रपटगृहांत हमखास इंग्रजी चित्रपट पाहायला जायचो. ‘एरमाला डूस’ या गाजलेल्या इंग्रजी चित्रपटावर ‘कोंडू हवालदार’चं कथानक आधारित आहे. स्वत:च्या मृत्यूची चौकशी करण्याचं काम हवालदारावर आल्यावर तो ते कशा पद्धतीने करतो, हे ‘कोंडू हवालदार’मध्ये सुहास भालेकर यांनी वठवलं आहे. माझं सर्वात आवडतं लोकनाटय म्हणजे ‘कोंबडीशिवाय ऊरुस’. गोविंद बल्लाळ देवल यांच्या ‘संशयकल्लोळ’ या संगीत नाटकावरून प्रेरणा घेऊन ‘कोंबडीशिवाय ऊरुस’ हे वगनाटय लिहिलं. संशयाचं भूत माणसाला कुठल्या थराला घेऊन जातं, हा ‘कोंबडीशिवाय ऊरुस’चा आत्मा आहे. ‘कोंडू हवालदार’ आणि ‘कोंबडीशिवाय ऊरुस’ ही दोन्ही लोकनाटय़ं ‘महालक्ष्मी थिएटर्स’तर्फे रंगभूमीवर आली होती.
वगनाटय, लोकनाटय, मुक्तनाटय यातला तुमच्या आवडीचा नाटयप्रकार कोणता?
>मुक्तनाटय हा सर्वात आवडीचा नाटयप्रकार. चटपटीत संवादांतून विनोदाचा आसरा घेत नाटक आकार घेतं. बंधमुक्त लिखाण करत येतं. तमाशाच्या जवळ जाणारा हा नाटयप्रकार आहे. उत्स्फूर्तता आणि वास्तवाच्या जवळ जाणारं लिखाण करावं लागतं. पण म्हणून मुक्तनाटय लिहिणं ही सोपी गोष्टी नाही. उलट बांधणीच्या दृष्टीने तोच प्रकार सर्वात अवघड आहे.
‘वा-यावरची वरात’ हे तुम्ही लिहिलेलं मुक्तनाटय़ १९५४ साली रंगभूमीवर आलं. त्यानंतर जवळजवळ आठ वर्षानी म्हणजे १९६२ ला ‘वा-यावरची वरात’ हे लोकनाटय़ रंगभूमीवर आणलं. तुमच्या मुक्तनाटयावर पु.लं.चं ‘..वरात’ आधारित आहे का?
> असं म्हणणं हा उद्धटपणा होईल. एवढा गर्विष्ठपणा दाखवणं ही आत्मवंचना ठरेल. माझं ‘वरात’ शाहीर साबळे यांनी १९५४ साली रंगमंचावर आणलं, तेव्हा ते ओपन एअर प्रयोग करत होते. पण पुलंच्या कानावरही आमच्या नाटकाचं नाव गेलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तुमचं ‘कोंडू हवालदार’ हे लोकनाटय़ व्यावसायिक स्तरावर ‘शाहीर साबळे आणि पार्टी’ने रंगभूमीवर आणलं. त्या नाटकाचे एक हजार प्रयोग झाले. या लोकनाटयाचा दादा कोंडकेंचा ‘पांडू हवालदार’ या चित्रपटाशी काही संबंध आहे का?
> इथेही तोच प्रकार. दादा कोंडकेंचा ‘पांडू हवालदार’ खूप गाजला होता. आमचा ‘कोंडू हवालदार’च्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या, तेव्हा खुद्द दादांनी ‘कोंडू..’च्या बद्दल माहिती काढल्याचं आमच्या कानावर आलं होतं, कारण दादांचा समज झाला होता, नवीन लोकनाटय ‘कोंडके’ या विनोदी वाटणा-या आडनावाची खिल्ली उडवण्यासाठी काढलं आहे. त्यामुळे ‘कोंडू हवालदार’ हे नाटक ‘दादा’ या व्यक्तीवर काही टीकात्मक पद्धतीने लिहिलेलं असावं, असं वाटल्यामुळे त्यांनी ते गुपचूप पाहिल्याचं मला एकदा हसत हसत सांगितलं होतं.
तुम्ही आकाशवाणीवरही काम केलं आहे. ही संधी कशी मिळाली?
> आमच्या वेळी मनोरंजनाची साधनं म्हणजे नाटक, सिनेमा आणि गायनाचे सणासुदीचे कार्यक्रम. त्यामुळे आम्हाला आकाशवाणीचं तुफान आकर्षण होतं. हवेतून होणारं प्रक्षेपण हा कुतूहलाचाच विषय होता. त्यामुळे आकाशवाणीच्या कार्यक्रमातही आपला सहभाग असावा, असं सुरुवातीपासूनच वाटायचं. त्यातून शेजारीपाजारी रेडिओ ऐकून ऐकून मी स्वत:च श्रुतिकांचं तंत्र आत्मसात केलं आणि स्वयंशिक्षेतून लिहिलेली श्रुतिका दिली आकाशवाणीला पाठवून. ना वशिला ना ओळख. पण आकाशवाणीकडून पसंतीचं पत्र आलं. त्यावेळी मी खरंच हरखून गेलो. वास्तविक माझं त्यावेळी काहीच नाटयलेखन झालेलं नव्हतं. मी लिहिलेली ती पहिली श्रुतिका सात जून १९५३ रोजी रात्री १० च्या कार्यक्रमात झोकात प्रक्षेपित झाली. ती सादर करणारे कलाकारही मला नीट आठवतात. सादरकत्रे होते बाळ कुडतरकर. तर नट होते, प्रभाकर जोशी, बाळ कुडतरकर आणि विमला दळवी-जोशी. आकाशवाणीवर आवडलेल्या कार्यक्रमांसाठी प्रश्नोत्तरंही सादर केली जात. त्यात अनेक प्रेक्षकांनी माझ्या त्या श्रुतिकेला पसंती दिली होती. तेव्हापासूनच आकाशवाणीवर हुकूमी एक्का झालो. ‘ए’ ग्रेडचा लेखक होतो. २००५पर्यंत रेडिओसाठी नियमित लेखन केलं. विविध सदरांत ४०० हून अधिक श्रुतिका आणि लोकनाटयं मी लिहिली, ‘हाकेच्या अंतरावर’ हे संपूर्ण तीन तासांचं तीन अंकी नाटकही आकाशवाणीवरून प्रक्षेपित झालं होतं.
आकाशवाणीवरील कार्यक्रमामुळे तुम्हाला अधिक प्रसिद्धी मिळाली का?
> अजिबात नाही. इतके कार्यक्रम झाले, हे आपलं एक सांगणं. पण रेडिओवरचे कार्यक्रम म्हणजे हवेतला ध्वनी. त्या कार्यक्रमांचं कायमस्वरूपी जतन करता येत नाही. त्यातील गाणी, संवाद सर्व अळवावरचं पाणी. स्वान्तसुखाय केलेलं लेखन; पण प्रसिद्धी मिळाली नाही तरी लेखनाचा सराव होत होता. त्याचा नाटयलेखनासाठी भरपूर उपयोग झाला.
तुम्ही स्वातंत्र्याची चळवळ पाहिली आहे. तुमच्या ऐन उमेदीच्या काळात संयुक्त महाराष्ट्राची चळवळही जोरात होती. शेतक-यांची त्यांच्या हक्कांसाठी विविध आंदोलनं होत होती. तुमच्यावर या सगळयाचा नेमका प्रभाव कसा झाला?
> स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी मी गावी शालेय जीवनात रमलेलो होतो. पण त्या चळवळीचा जबरदस्त प्रभाव, त्या आडबाजूलासुद्धा आमच्यावर खूपच होता. गंमत सांगतो. आठवी-नववीत असताना ‘तो देशाचा’ या नावाची एक कादंबरी मी स्वातंत्र्य चळवळीतला एक नायक कल्पून लिहिली होती. ते बाड नंतर कुठेतरी हरवलं. अर्थात, त्या लेखनावर प्रभाव होता, आमचे आवडते लेखक आणि स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजी यांचा. या सगळ्या चळवळी मी दूरवरूनच पाहत होतो. गणेशोत्सवात ‘संयुक्त महाराष्ट्रच का?’ किंवा ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळीत माझं योगदान’ असे विषय निवडून गणेशोत्सवात वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होतो. पण एक खरं आहे, या प्रत्येक चळवळीचं सूक्ष्म निरीक्षण करून त्याचा लेखनात उपयोग करत असे. गोवा मुक्तीनंतर गोव्यात महाराष्ट्रात विलीनीकरण करण्यासाठी जी जनमत निवडणूक झाली, तिचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रातून शाहीर साबळे स्वत: गोव्यात गेले होते. त्यावेळी विविध कार्यक्रमांतून ते मी लिहिलेली स्फूर्तिगीतं सादर करत होते, हे आजही स्पष्ट आठवतंय.
‘मार्मिक’ या व्यंगचित्र साप्ताहिकातील तुमची ‘चाळीतल्या चकाटय़ा’ ही राजकीय घटनांवर टिप्पणी करणारी विनोदी मालिका विशेष गाजली. ‘मार्मिक’मध्ये कसा प्रवेश झाला?
> ‘मार्मिक’मध्ये ‘चाळीतल्या चकाटया’ हे आठवडयाभरातील महत्त्वाच्या राजकीय घडमोडींवर विनोदी अंगाने मार्मिक टीका करणारं सदर खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच सांगितल्यामुळे मी लिहायला लागलो. तत्पूर्वीच बाळासाहेबांची आणि माझी दोस्ती झाली होती. ती दोस्ती झाली शाहीर दादा कोंडकेंमुळे. दादा कोंडकेंचं किंवा शाहीर साबळेंचं लोकनाटय थिएटरला असलं की, ते मला आवर्जून माझ्या कामावर फोन करायचे. दादांची पार्टी सुरू झाली, तेव्हा दादांनी वसंत सबनीसांचे ‘खणखणपूरचा राजा’ हे लोकनाटय ‘अमर हिंद मंडळात’ सादर केलं होतं. त्या प्रयोगाला आम्ही दोघंही मुद्दाम हजर राहिलो होतो. एकमेकांच्या मांडयांवर थाप देत आम्ही ते तुफान विनोदी लोकनाटय पाहिल्याचं चांगलंच आठवतंय. आमच्याबरोबर बहुतेक वेळा संगीतकार श्रीकांत ठाकरेही असायचे. शाहीर साबळेंनी रंगभूमीवर आणलेलं माझं ‘मीच तो बादशाह’ हे सटायर टाइप मुक्तनाटय बाळासाहेबांना खूप आवडलं होतं. त्यामुळे त्यांनी मला ‘चाळीतल्या चकाटया’ हे सटायर सदर लिहायला सांगितलं. त्यामुळे त्यांची आणि माझी मैत्री अधिक दृढ झाली होती. एकदा ते मला म्हणाले, ‘पाटणकर, तुमच्या मुक्तनाटयातल्या त्या पंचमस्तंभी कम्युनिस्टाला लोक मागे लागून हाकलून लावतात. त्याऐवजी लोक त्याला दगड, धोंडे, अंडी नि टोमॅटो मारतात, असं दाखवा!’ त्यावर मी खो, खो हसलो. माझं हसणं पाहून बाळासाहेब म्हणाले, ‘असा, असा खो खो हंशा पिकेल बघा!’
आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे, वसंतराव नाईक, यशवंतराव चव्हण, बाळासाहेब ठाकरे यांसारख्या दिग्गजांना तुम्ही खूप जवळून पाहिलं आहे. यातील भावलेली व्यक्तिमत्त्वं कोणती?
> १९५० ते १९७० च्या काळात माझ्या शालेय जीवनात आणि लेखनाच्या आवडीमुळे पुढेही अनेक मान्यवारांचा सहवास लाभला. प्रथम भेटले सानेगुरुजी. ते म्हणजे आम्हा विद्यार्थ्यांचं दैवत. त्यांचं लेखन म्हणजे आमची गीता. त्यांना भेटण्याचा योग आला हस्तलिखित मासिकांमुळे. शाळेत असताना हस्ताक्षर, चित्रं, कविता, कथा, लेखन असं सब कुछ माझंच असणारी हस्तलिखित मासिकं मी अनेकदा काढली. त्यावर अभिप्राय मिळवण्यासाठी मी आर्थर रोडला साधना प्रेसमध्ये जाऊन सानेगुरुजींना भेटायचो. गुरुजी म्हणायचे, ‘हे हस्ताक्षर तुमचं? आणि ही चित्रंही तुम्हीच काढली? किती परीक्षा दिल्यात ड्रॉइंगच्या?’ ‘मी एकही परीक्षा दिली नाही,’ असं सांगितल्यावर ते लाजून म्हणाले, ‘कमाल आहे, मी दोन ड्रॉइंगच्या परीक्षा दिल्यात; पण अशी नाही चित्रं काढता येत!’ तिथंच प्रेसमध्ये गुरुजींना कंपोझिटरला तोंडी मजकूर सांगत असताना पाहिलं. एकदा माझ्या हस्तलिखिताच्या कविता बघून त्यांनी मात्रावृत्त, शब्दवृत्त, मुक्तछंद यातला फरक समजावून सांगितला. कवितेतल्या मात्रा अशा मोजायच्या, -हस्व-दीर्घ हे कवितेत कधी माफ असतात, ते सारं समजावून सांगितलं होतं. आचार्य अत्रे यांच्याकडेही मी हस्तलिखितावर अभिप्राय मागायला गेलो होतो. त्यांनी छान उभ्या ठळक हस्ताक्षरात अभिप्राय लिहून दिला. पुढे खासदार झालेले राजा कुलकर्णी, तेव्हा माला आचार्य अत्रेंकडे घेऊन गेले होते. समाजवादी पक्षाचं एक मासिक तेव्हा निघत असे. त्यात माझ्या कोणत्या कविता घ्याव्यात ते आचार्य अत्रेंनी राजा कुलकर्णीना सांगितलं. नंतर एकदा त्यांनी कुलकर्णीना सांगितलं, ‘पाटणकर आपल्याकडे पक्षकार्य करतील का विचारा?’ कुलकर्णीनी मला सांगितलं, तेव्हा मी म्हटलं, ‘काय काम करावं लागेल?’ ‘काही नाही, गिरण्यांसमोर गेटसभा घ्यायच्या. ऑफिसात अनेक लोक तक्रारी वगरे घेऊन येतात.’ मी ते जेमतेम ऐकून घेतलं. गेटसभा घेऊन तिथे बोंबलणारे नेते मी पाहिले होते. म्हणून मी नंतर तिकडे जाणंच सोडलं. मामा वरेरकारांनीही मला हस्तलिखितावर मस्त अभिप्राय दिले होते. पण ते आपल्या लेखनिकाकडून लिहून घेत. अभिप्रायाखाली सही करीत. एकदा त्यांच्याकडे गेलो असताना मामा आपल्याला दोन्ही बाजूला बसलेल्या दोन लेखनिकांना एकाच वेळी दोन कादंब-यांच्या मजकुराचं श्रुतलेखन (डिक्टेशन) देताना मी पाहिलंय.
> शाहिरांचं १९४७ पासूनच मुंबईतील वास्तव्य माझ्या डोळयासमोर आहे. तेव्हा ते आत्मचरित्र संपादित करताना मला फार कष्ट घ्यावे लागले नाहीत, पण एक गोष्ट होती शाहीर आता शारीरिकदृष्टया विकलांग झालेले आहेत. त्यांची दृष्टी शाबूत आहे. पण ऐकू येत नाही. विशेष म्हणजे, त्यांना फार विस्मरण होतं. परंतु त्यांच्या आयुष्यातील अनेक घडामोडी माझ्या डोळयांसमोरच्या असल्याने त्यांना आठवल्या नाहीत तर मी त्यांना पुन्हा सांगून त्या आठवायला लावायचो. त्यामुळे वेळ जायचा, पण एकदा आठवलं की, मग मात्र ते सुसंगत सांगायचे. एखाद्याचं आत्मचरित्र संपादित करताना मी तरी ती एक ललित कलाकृती आहे, असं समजून लिहितो. हाच अनुभव मला इथंही आला.
कलाक्षेत्रातील भावलेली व्यक्तिमत्त्वं कोणती?
> दादा कोंडके, डॉ. श्रीराम लागू, विजयाबाई, भक्ती बर्वे, मधुकर तोरडमल, वसंत कानेटकर, रत्नाकर मतकरी आणि आणखीही काही कलाकार. शाहीर साबळे गाण्यामुळे खूप आवडतात. विनोदी कलावंत म्हणून राजा मयेकर, राजा गोसावी यांचाही उल्लेख करावा लागेल. सुहास भालेकर हरहुन्नरी कलावंत म्हणून कायमच लक्षात राहतात.
नव्या पिढीतील नाटककारांविषयी काय सांगाल?
> हृषीकेश जोशी, गिरीश जोशी, संजय पवार असे अनेक नव्या पिढीतील नाटककार उत्कृष्ट लिखाण करणारे आहेत. अलीकडची पिढी खूप हुशार आहे. त्यांच्यात ऊर्जा आहे. नव्या नाटककारांना नवी दृष्टी, लेखनशैली आहे. हे सिद्ध करणा-या नव्या नाटयकृती रंगभूमीवर येत आहेत. मात्र टीव्हीवरच्या अनेक मालिकांचा फार परिणाम नाटककारांवरही झालेला दिसतो. तिथला सवंगपणा, रिअॅलिटी शोजमधील धांगडधिंगा, पात्रांचं एक महाकंटाळवाणं दळण, एकसाची मेलोड्रामा हा काही नव्या नाटककारांच्या नाटयकृतींतही आढळतो, तो मालिकांचा दुष्परिणाम आहे, तो त्यांनी टाळावा. रंगमंचावरच्या कलाकृतीचा आस्वाद घेणारा प्रेक्षकवर्ग हा अधिक चोखंदळ असतो. तो तरतम भाव असलेला असतो, तेव्हा असला सवंगपणा, भेसळ नव्या नाटककारांनी टाळावी, असं त्यांना सांगावंसं वाटतं.
आजही नवं लिखाण करावंसं वाटतं का?
> हो, नव्याने लिहिण्याची उमेद आहेच. १९८२ चा गिरणी कामगारांचा प्रदीर्घ संप माझ्यासमोरच घडला. भलंमोठ्ठं गिरण्यांचं औद्योगिक विश्व आमच्या डोळयांसमोर उद्ध्वस्त झालं. या गिरणगावची म्हणून एक संस्कृती होती. इथेच अनेक कला फुलल्या. कलाक्षेत्रातले अनेक दिग्गज इथे जन्मले, पण गिरणी कामगारांच्या आयुष्याचं होत्याचं नव्हतं झालं. कधी कल्पनाही केली नव्हती, अशा दुर्दैवाचे फेरे गरीब बिचा-या गिरणी कामगारांच्या वाटयाला आले. या दुर्दैवाच्या दशावताराचं प्रत्ययकारी चित्र रेखाटणारी, ‘गिरणगाव’ हाच नायक असलेली एक प्रदीर्घ कादंबरी लिहावी, असा मनात विचार आहे. पाहू कसं जमतंय ते!
खूप छान….