अवकाश संशोधन क्षेत्रात भारतासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मंगळ मोहिमेला मंगळवारी यशस्वी सुरुवात झाली.
श्रीहरिकोटा- देशाच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणा-या मंगळ मोहिमेला मंगळवारी यशस्वी सुरुवात झाली. पीएसएलव्ही सी-२५ या प्रक्षेपकाद्वारे उपग्रहाचे येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून मंगळवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. अमेरिका, रशिया, युरोपीय समुदाय यांच्यानंतर मंगळ ग्रहावर उपग्रह सोडणारा भारत जगातील चौथा देश बनला आहे.
मंगळवारी दुपारी दोन वाजून ३८ मिनिटांनी हा उपग्रह अवकाशात झेपावला. पृथ्वीच्या कक्षेत साधारण २० ते २५ दिवस राहिल्यानंतर एक डिसेंबर रोजी मध्यरात्री पाऊण वाजेच्या सुमारास हा उपग्रह मंगळ ग्रहाच्या दिशेने प्रवास सुरू करेल. नऊ महिन्यांचा प्रवास करून तो २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळाच्या कक्षेत प्रवेश करेल. तब्बल ४५० कोटी रूपये खर्च करून आखलेल्या या मोहिमेद्वारे मंगळ ग्रहावर जीवसृष्टीचा अभ्यास करणे तसेच तेथे मिथेनच्या स्त्रोतांचा शोध घेणे अपेक्षित आहे.
मंगळ मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. अत्यंत कमी वेळात ही मोहिम यशस्वी केल्याबद्दल इस्त्रोचे अध्यक्ष के.राधाकृष्णन यांनी सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही यशस्वी मंगळ मोहिमेबद्दल राधाकृष्णन यांना दूरध्वनीकरुन इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
[poll id=”449″]
या उपग्रहाच्या मदतीने मंगळावरील वातावरण आणि जीवसृष्टीचा अभ्यास करण्यात येणार आहे. मंगळाबद्दल आतापर्यंत अज्ञात असलेले अनेक पैलू या मोहिमेव्दारे शोधण्यात येणार आहेत.
मोहिमेपूर्वीच्या सर्व चाचण्या, रंगीत तालीम यशस्वी झाली असली तरी, वैज्ञानिकांमध्ये एक उत्सुकता, चिंता होती. मोहिम यशस्वी व्हावी यासाठी सोमवारी इस्त्रोचे अध्यक्ष के.राधाकृष्णन यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. इस्त्रोचे एक हजार शास्त्रज्ञ उड्डाण स्थळाजवळील प्रत्येक बाबीवर बारीक लक्ष ठेऊन होते.
ही मोहिम भारतासाठी अत्यंत महत्वाची आहे. या मोहिमेतून अवकाश संशोधनात भारताने केलेली प्रगती जगासमोर येणार आहे. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि युरोपीय समुदाय अशा तिघांनाच मंगळ मोहिम यशस्वी करता आली आहे. आतापर्यंत ५१ वेळा मंगळ मोहिमांचे आयोजन करण्यात आले असून, यातील फक्त २१ मोहिमाच यशस्वी झाल्या आहेत. भारताचे मंगळयान मंगळावर पोहोचले तर, ती चीन आणि जपान या आशिया खंडातील स्पर्धकांवर मात ठरेल. २०११ मध्ये चीनची मंगळस्वारी अपयशी ठरली होती.
इस्त्रोसमोरील आव्हाने
इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना यशस्वी चांद्रयान मोहिमेचा अनुभव असला तरी, चंद्र आणि मंगळ या ग्रहांमध्ये प्रचंड अंतर आहे. पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचे अंतर ३.८० लक्ष किलोमीटर तर, पृथ्वीपासून मंगळादरम्यानचे अंतर ५६० लक्ष किलोमीटर इतके प्रचंड आहे. उपग्रहाला मंगळाच्या कक्षेत पोहोचण्यासाठीच तब्बल तीनशे दिवस लागणार आहेत. हा उपग्रह पृथ्वीवरुन नियंत्रित करण्यात येणार आहे. उपग्रह मंगळाच्या कक्षेत पोहोचेपर्यंत नको असलेली उपकरणे, तंत्रज्ञान बंद ठेवून ती योग्यवेळी चालू करण्याचे शास्त्रज्ञांसमोर आव्हान आहे.
मोहिमेची उद्दिष्टे
मंगळावरील जीवसृष्टी, वातावरण आणि खनिज पदार्थांचा अभ्यास करणे
उपग्रह मंगळाच्या कक्षेत पोहोचल्यानंतर बंद करण्यात आलेली उपकरण पृथ्वीवरुन सुरु करणे
डीप स्पेस नेटवर्कच्या मदतीने अवकाश यानाला नियंत्रित करणे
आंतरग्रहीय मोहिमेसाठी भारताची तयारी तपासणे
इस्त्रोच्या टीमचे अभिनंदन…. आणि शुभेच्छा
congrates