पश्चिमेकडील अथांग सागर तर पूर्वेकडे आभाळाशी स्पर्धा करणारे सहयाद्रीचे कडे यामधील चिंचोळी पट्टी म्हणजे कोकण प्रदेश.
खरोखरच कोकण प्रदेश म्हणजे निसर्गाने केलेली मुक्त हस्त उधळण. सागर किनारे, बंदरे, किल्ले, लेणी, ऐतिहासिक ठिकाणे, गरम पाण्याची कुंडे, धबधबे, मंदिरे, जत्रा, उत्सव, विविध जाती-प्रजातींचे पशु, पक्षी, वैविधतेने नटलेला हिरवागार निसर्ग, कोकणातल्या लोकांची अवस्था कस्तुरीमृगासारखी.
आमच्याकडे असलेल्या गोष्टींचा आम्हालाच थांगपत्ता नाही. आपल्या जवळच्या ठेव्याची जाण करून घेत ती दुस-याला सांगण्यात आपण यशस्वी झालो तर कोकण हे जागतीक पर्यटनस्थळ बनेल यात तिळमात्र शंका नाही. कोकणचा कॅलिफोर्निया करू अशा घोषणा करत परंतु रासायनिक कारखान्यांना उत्तेजन देत कोकण भकास करण्यावर भर देण्यापेक्षा, कोकणाचे कोकणीपण जपणे त्याला प्राधान्य देणे, कोकणप्रांताची ओळख जगभर पसरविणे हाच खरा कोकण पर्यटनाचा मुख्य कणा आहे. तो जपलाच पाहिजे.
शहरी बकालीपणा कंटाळलेला, घडयाळयाच्या काटयावर धावून दमलेला, शरिरावरचा व मनावरचा ताण हलका करण्यासाठी येणा-या पर्यटकाला कोकणातला शांतपणा भावतो, प्रदुषण विरहित सागरात डुंबायला आवडते, झावळयांनी शाकारलेल्या, शेणाने सारवलेल्या कुटिरात कोकणी पदार्थाचा आस्वाद घेणे हवे असते. दिवसाच्यो कोणत्याही प्रहरी हिरव्यागार निसर्गातील पशु पक्षांच्या मंजुळ आवाजात मनावरील ताण घालविणे हवे असते.
खरेतर देशी-विदेशी पर्यटकांना कोकणचा कोकणीपणा भावतो. परंतु विकास, इंफ्रास्ट्रक्चर वगैरे जडजड शब्दांच्या मागे धावत पर्यटकांना हवे हवे ते कोकण आपण त्यांच्यापासून हिरावून नेत आहोत याचे भान कोणालाही नाही. आपणाकडे आलेल्या पर्यटकाला आपल्याकडील गोष्टींची ओळख करून द्यावयास हवी, आपल्याकडील वेगळेपण त्यांच्या निदर्शनास आणून द्यावयास हवे. याचा विचार करून स्थानिक पर्यटनाशी संबंधीत व्यवसाय, गोष्टींना प्राधान्य, पाठींबा देत शाश्वत पर्यटनाची कास धरणे गरजेचे आहे.
पर्यटन विकासासाठी काय करायला हवे!
अथांग प्रदुषण विरहित महासागर, मऊसून सागर पुळणी, हिरव्यागार झाडांनी आच्छादलेले डोंगर, तांबडी मऊ माती, कोकण मेवा यांचे अप्रुप कोकणातल्या लोकांपेक्षा बाहेरच्या लोकांना अधिक आहे.
गावा गावांना जोडणारे रस्ते झाले. कोकण रेल्वेचे स्वप्न सत्यात उतरले पण स्थानिक माणसांची मनोभूमिका तशीच राहिली तरी बदलली पाहिजे. कोकणातील निसर्गविविधता, दुर्ग, सागरकिनारे, मंदिरे, घरगुती पाहुणचार यांचा आस्वाद इथे येणाऱ्यांनी घ्यावा अस पर्यटन व्हावं. इथल पर्यटन हा विकासाचा आत्मा बनावयास हवा.
नेहमीच्या पर्यटनाबरोबरच, इको टुरिझम, अॅडव्हेंचर टुरिझम, अॅग्रो टुरिझम, कोस्टल टुरिझम, मेडिकल टुरिझम अशा नाना अंगानी कोकणातील पर्यटन विकास व्हावा. कोकणचा कोकणीपणा, इथली संस्कृती ही खरी कोकणाची पर्यटन श्रीमंती आहे. ती जशी आहे तशी पण निटनेटकी सजविणे, भोवताली आवश्यक गोष्टींची पण मूळपणाला धक्का न लावता निर्मिती करणे व ते पर्यटकांसमोर मांडणे गरजेचे आहे. कोकण कायमच स्वच्छतेला प्राधान्य देत आले आहे. त्यात खंड पडू न देणे. नियमांच्या गुंतवळयात न अडकता, अडकवता शासनाने भरीव मदत करणे अपेक्षीत आहे.
जागोजागी माहितीदर्शक फलक, संपर्क केंद्र तयार करणे, स्थानिक वाहतूकदारांना प्रोत्साहन देणे, माहिती पुस्तके उपलब्ध करून देणे, माहिती देणारे गाईड उपलब्ध करणे, कोकणी पदार्थ, मेवा यांना उत्तेजन देणे यासारख्या गोष्टी प्रत्येकाने करावयास हव्या. कोणाच्या मदतीची अपेक्षा न बाळगता स्वत:हून जे शक्य होईल त्या परिने येणा-या पर्यटकाला मदत करावयास हवी. खरे तर कोकणचे कोकणपण घालविणा-या औद्योगिकरणामागे येणारा प्रदुषणाचा भस्मासूर व बकालपणा टाळावयाचा असेल तर पर्यटनाला पर्याय नाही, त्यातच कोकणचे निसर्गसौंदर्य टिकेल आणि सत्वही.
पर्यटनाच्या नजरेतून रत्नागिरी जिल्हा-
उत्तरेला बाणकोटची खाडी पलिकडे रायगड जिल्हा, पूर्वेकडे जागतिक संरक्षण स्थळात समाविष्ट झालेला पश्चिम घाट अर्थात सहयाद्री, दक्षिणेस वाघोटणेची खाडी पलिकडे सिंधुदुर्ग जिल्हा तर पश्चिमेस अथांग दर्गासागर अशी रत्नागिरीची भौगोलिक रचना.
औद्योगिक भस्मासूर, खाडयातून सोडलेली रासायनिक द्रव्ये, लोकसंख्येची बेसुमार वाढ, पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास यामुळे पर्यावरणदृष्टया विनाशाच्या काठावर उभा असलेला उत्तर कोकणचा भाग असे कोकणचे विदारक दृष्य एका बाजुला तर निसर्गरम्य, स्वच्छ, प्रदुषण विरहीत मध्य व दक्षिण कोकण, त्यापैकी रत्नागिरी जिल्हा दक्षिण कोकणातील महत्वाचा जिल्हा.
प्रागऐतिहासिक ठिकाणे, नवरत्नांची खाण, आंबा, नारळ, पोफळीच्या बागा अशा अनेक गोष्टी गर्वाने भूषविणारा जिल्हा.
बावनदी, काजळीनदी, मुचकुंदी नदी, सावित्री नदी, वाशिष्टी नदी, जगबुडी नदी, शास्त्री नदी बरोबर केळशीची खाडी, दाभोळची खाडी, जयगडची खाडी, भाटयाची खाडी, पूर्णगडची खाडी, जैतापूरची खाडी यासोबत भरपूर निसर्ग सौंदर्य आणि सर्वाना हवा हवासा वाटणारा अथांग दर्यासागर हे पाण्याचे वैभव आहे रत्नागिरी जिल्ह्यात.
नवअश्मयुगीन काळात (सुमारे १ लक्ष वर्ष) खोदलेली, रामरोड, निवळी, देवाचे गोठणे येथील कातळ खोदशिल्प इतिहास कारांसाठी कोडे बनून गेली आहेत. मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिध्द दापोली. खेड, आरवली, राजापूर अशा विविध ९ ठिकाणी असलेली गरम पाण्याची कुंडे. जुन्या मंदिरातील अजोड संगमेश्वर येथील कर्णेश्वर मंदिर, तर अलिकडच्या काळात इंग्रजांनी बांधलेला रत्नागिरीतील थिबा राजवाडा. सहयाद्रीच्या कुशीतील मार्लेश्वर तर अथांग सागरकिना-यावरील गणपतीपुळे, प्रागऐतिहासिक श्री परशुराम क्षेत्र चिपळूण, तर इतिहासाच्या पराक्रमाचे गर्व बाळगणारे २७ दुर्ग.
स्वातंत्र्यसेनानी बाळ गंगाधर टिळक व भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान. नव्या युगातील तंत्रज्ञानाचा चमत्कार आशिया खंडातील सर्वात उंच पानवळचारेल्वे पूल अशा अनेक विविध गोष्टींनी नटलेला, सजलेला रत्नागिरी जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने कोठेही कमी नाही. गरज आहे ती हे सर्व निटनिटके उलगडून दाखविण्याची. आपापसातील हेवेदावे, सत्ता संघर्ष बाजूला ठेवून प्रामाणिकता बाळगत रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनस्थळ म्हणून म्हणून अग्रक्रम मिळवून देण्याची मानसिकता बाळगण्याची.
रत्नागिरीचे रत्नागिरीपण जपत, जुन्या ऐतिहासिक स्थळांना आधुनिकतेचा बेढव साज न चढविता, निसर्ग सौंदर्य जपत रत्नागिरीचा पर्यटन विकास होऊ शकतो. गरज आहे ती सर्वानी नि:स्वार्थी भावनेने एकमेकांना साथ देण्याची.
रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
रत्नागिरी जिल्हा ९ तालुक्यांचा बनलेला. सर्वात उत्तरेकडचा मंडणगड तालुका, महाराष्ट्रातील अंदमान अशी ख्याती काही वर्षापुवीपर्यंत या तालुक्याची होती. सर्वात दक्षिणेकडे राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका सागरापासून पार सह्याद्रीच्या कुशीपर्यंत पसरलेला. पूर्व सीमेवर टेकलेले खेड, चिपळूण, देवरूख, लांजे हे तालुके.
५ सागरी तालुके व ४ सहयाद्रीच्या पायथ्याचे तालुके असा हा रत्नागिरी जिल्हा. खेड, चिपळूण, रत्नागिरी, लांजा, राजापूर मार्गे जाणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, चिपळूण कोयनानगर मार्गे कराडकडे जाणारा कुंभार्ली घाट, साखरपामार्गे कोल्हापूरकडे जाणारा आंबा घाट हे प्रमुख रस्ते. नविनच होणारा सागरी महामार्ग भवितव्यात सर्व पर्यटकांचे लक्ष वेधून घेईल यात शंका नाही.
हिरव्यागार टेकडया, डोंगर-द-या यामधून जाणारे नागमोडी रस्ते पर्यटकांचे खास आकर्षण पावसाळयाच्या दिवसात दिसणारे सौंदर्य अवर्णनीयच असते.
तालुका मंडणगड –
एकेकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील अंदमान. म्हाप्रळ-आंबेत पुलामुळे मुख्य प्रवाहात आलेला तालुका, गच्च झाडी अफाट पाऊस हे मंडणगडचे वैशिष्टय.
१. मंडणगड – दोन शिखरांचा इ.स.पू.काळापासूनचा प्राचीन दुर्ग.
२.हिंमतगड – मंडणगड तालुक्यातील बाणकोट गावातील इतिहाच्या स्मृर्ती जागणवणारा किनारी दुर्ग प्रकारातील बाणकोट उर्फ हिंमतगड इंग्रजांनी ताबा मिळविल्यावर त्याचे नाव फोर्ट व्हिक्टोरिया असे ठेवले. हिरवी झाडी, रूपेरी दर्या वेड लावणारा. तटबंदी शाबूत
३.वेळास – नाना फडणवीसांचे नितांत सुंदर गाव, कासव संवर्धनासाठी ‘कासव महोत्सव’ भरविणारे पहिले गाव. ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अंडी घालण्यासाठी या किना-यावर येतात. या गावात त्याचे संरक्षण व संवर्धन केले जाते.
४. श्री लक्ष्मी केशव – मंडणगड तालुक्यातील शेडवई गावात श्री केदारनाथ मंदिरातील शिल्पजडीत विष्णू मूर्ती अवघ्या महाराष्ट्रात नावाजली जावू शकेल. निसर्ग रम्य परिसर, नीरव शांतता, निसर्गवेडया पर्यटकांना इथे खिळवून ठेवण्याच सामर्थ्य या परिसरात आहे.
तालुका खेड – (महिपतगड, सुमारगड, रसाळगड-दुर्गत्रयी)
१. महिपतगड – २०० एकर क्षेत्रफळाचा दुर्गमाथा असलेला हा अनगड किल्ला माथ्यावर अनेक भग्नावशेष, चुन्याच्या खाणी, गडावर पारेश्वर महादेवाचे उपेक्षीत मंदिर.
२. सुमारगड – महिपतगड व सुमारगड हे एकाच डोंगराच्या दोन उंचवटयांवर बांधलेले किल्ले, सुमारगड, हा एक छोटेखानी किल्ला.
३. रसाळगड – महिपतगड, सुमारगड, यांच्यापेक्षा उंचीने कमी, सुमारे ५ एकर क्षेत्रफळाचा किल्ला. सर्वसामान्यांना जाता येईल असा एकमेव किल्ला.
४. पालगड – या गडाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. या गडाच्या पायथ्याशी साने गुरूजींचे जन्मगाव पालगड हे गाव.
५. महिमंडणगड – इतिहासकालीन व्यापारी मार्गावरचा हा दुर्गरक्षक चार दोन टाकी आणि सांगण्यापुरते उरलेले भग्न अवशेष अशा नावाचा किल्ला आहे हे ब-याच जणांना माहित नाही.
कोकणचा पर्यटन विकास झाला पाहिजे