दहीहंडीचा सण नुकताच पार पडला. यंदा न्यायालयानेच त्याच्यावर अनेक निर्बंध घातले. त्यांचं पूर्णपणे पालन झालं नाहीच. मुळात दहीहंडीचं लहानग्यांच्या मनातलं आकर्षण कमी झालं पाहिजे, पण ते कसं होणार?
‘दहीहंडीची उद्या सुट्टी आहे बरं का मुलांनो’ शाळेत बाईंनी असं म्हटलं, आणि एकच गलका झाला. तो पाचवीचा वर्ग होता. बाईंनी पुढचा प्रश्न केला, ‘सांगा बरं, दहीहंडीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? काय करता तुम्ही दहीहंडीच्या दिवशी?’ मागून तिस-या बाकावरचा अमरिश उभा राहून सांगायला लागला. ‘बाई आमच्या समोरच्या चौकात असते दहीहंडी. सॉल्लिड उंच असते. पाचव्या मजल्यावरच्या आमच्या गच्चीइतकी उंच. तिथे ना सकाळपासून मस्त गाणी लावलेली असतात. आम्ही तिथेच जातो मित्र मित्र. खूप नाचतो. मग दुपारनंतर हंडी फोडायला लोकं येतात. जाम मजा येते. लाइटिंग असतं, कोल्ड्रिंक मिळतं. पुढच्या वर्षी सतीशदादा मला चढवणार आहे एकदम टॉपच्या थरावर हंडी फोडायला.’ बाईंच्या डोळ्यासमोर पन्नास फुटांवर चढलेला तो लहानगा आला आणि बाई काही क्षण गप्प झाल्या.
पहिल्या बाकावरच्या राघवने हात वर केला. ‘हं सांग राघव.’ अपेक्षित उत्तराची अपेक्षा करत बाई म्हणाल्या. ‘बाई मला तर खूप आवडते दहीहंडी. त्या दिवशी आई लवकर उठवत नाही मला. मस्त लोळतो मी. बाबा बाहेरून मस्त काही तरी खायला घेऊन येतात. आम्ही ते खाऊन फिरायला जातो मॉलमधे. मग संध्याकाळच्या आत परत येऊन आम्ही सगळे टीव्हीवर हंडी बघतो. खूप सही मजा येते. सगळीकडच्या उंच उंच हंडया दाखवतात.’, राघव म्हणाला. ‘हं! बरं बस.’, बाईंची निराशाच झाली. कुणी तरी दहीहंडीबद्दल नेमकी माहिती असणारं असेल अशी आशा असलेल्या बाईंनी आणखी दहा जणांना तो प्रश्न विचारला. परंतु प्रत्येकाच्या उत्तराने बाईंची निराशाच केली. तास संपल्यावर बाईंनी स्वत:शीच विचार केला. यात मुलांची काहीच चूक नव्हती. कळायला लागल्यापासून ते दहीहंडीचं जे स्वरूप बघत आलेत, तीच त्यांची दहीहंडीबद्दलची संपूर्ण संकल्पना झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या उत्तरात श्रीकृष्ण नाही, त्याचा खटयाळपणा नाही, लोणी नाही, दहीकाला नाही, मित्रांसोबत एकत्र येऊन एखादं उद्दिष्ट साध्य करण्याचा सूर नाही, त्यातला आनंद नाही, या सगळ्यात नवल ते काहीच नाही.
आपण या दहीहंडीतलं सत्त्व हरवूनच बसलोय मुळी. दहीहंडी हा खरं तर श्रीकृष्णाच्या बाललीलांमधून जन्मलेला खेळ. त्याचा आता एक ‘स्पोर्ट’ झालाय. त्यात संस्कृती उरलीच नाहीय. हे जे त्याचं स्वरूप आजच्या पिढीच्या पुढे येतंय ते खरं तर त्या मूळ संकल्पनेशी प्रचंड विसंगत आणि अतिशय भयानक आहे. आज त्या हंडयांसाठी लावलेल्या बक्षिसांच्या रकमेत शून्यावर शून्य चढवली जातात. त्या पैशासाठी गोविंदा आपला जीव धोक्यात घालतात. वर्गण्या गोळा केल्या जातात. त्या वर्गण्या कमी, खंडण्या अधिक वाटतात. स्पॉन्सर्सचे बॅनर आणि डीजेंचे स्पीकर दोन्ही वर्षागणिक मोठे होतात. यातले गोविंदा मात्र मनो-यासरशी वर जातात आणि मनो-यागत खाली येतात. दारू पिऊन, विकृत हावभाव करत ट्रकमधून, बाइकवरून जाणारे गोविंदा बघितले की श्रीकृष्णाची प्रतिमा डोळ्यांसमोर येते आणि खळ्ळकन तिला तडा जातो. आयोजकांची कथा तर आणखीच निराळी. त्यांच्यातच खरी स्पर्धा असते. आठ थर, नऊ थर, दहा थर; थरांची संख्या वाढत जाते. आयोजक याला ‘थरार’ असं म्हणतात. बघणा-यांचा हे बघूनच थरकाप होतो. आणि प्रत्यक्ष गोविंदा मात्र थराथराला थरथरतात. एकूणच सगळं कुठल्या थराला गेलंय, तूच बघ रे श्रीकृष्णा. बाईंची शिक्षक खोलीतल्या श्रीकृष्णाच्या प्रतिमेकडे खिळलेली नजर हळुवार बाजूला झाली आणि समोरचं पुस्तक उचलून बाई पुढच्या तासावर जायला निघाल्या.
Dahihandi chi niragasta ya rajkarnamule layala geli. Ata fakta urla to tharancha thartharat.