महाराष्ट्रातला शेतकरी त्रस्त आहे. नुसताच त्रस्त नाही तर संतापलेला आहे. आक्रमक झालेला आहे. महाराष्ट्राचे सिंचनमंत्री गिरीश महाजन यांच्या लाल दिव्याच्या गाडीला शेतक-यांनी घेराव घातला. महाजनांना गाडीतून उतरू दिले नाही. पत्रकारांनाही धक्काबुक्की झाली. तिकडे नागपुरात कापूस पिकवणारा शेतकरी हैराण आहे. त्यात शेतक-याच्या कापसाला भाव नाही.
आताच्या महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात आश्वासन दिले होते की, क्विंटलला सहा हजार रुपये भाव देऊ. प्रत्यक्षात आज तीन हजार रुपयेही भाव मिळत नाही. विदर्भातला कापूस शेतकरी सरकारच्या नावाने शिव्या घालतो आहे. तिकडे दुष्काळी भागातले तमाम शेतकरी आज जगावे कसे, या विवंचनेत आहेत. फडणवीसांनी त्यांची फसवणूक केली. मोदींनी फसवणूक केली.
परदेश दौ-यात फिरणारे मोदी शेतक-यांची दु:खे बघायला येत नाहीत, याबद्दल आता महाराष्ट्रातल्या शेतक-यांना दु:ख नाही तर संताप आहे.?मोदींनी या शेतक-यांनी सभा घेऊन दाखवावी. कापूस उत्पादकांची सभा घेऊन दाखवावी. परदेशात खोटेनाटे अनेक करार करणारे मोदी इथे शेतक-याला पाच पैसे मदत द्यायला येत नाहीत. खरिपाचे पीक गेले. रब्बीचे पीकही हाती लागणार नाही.
ग्रामीण भागात कडाक्याची थंडी आहे. त्या थंडीच्या जोरावर आला तर थोडा गहू चांगला येईल; पण गव्हाचे पीक मर्यादित आहे. चांगली थंडी झाली तर भाज्यांचे पीक अतिशय छान येते; पण आवक वाढल्यानंतर वस्तूचे दर घटण्याचे अर्थशास्त्र?पार कोलमडून पडले आहे. आवक भरपूर आहे आणि दर गगनाला टेकलेले आहेत. टॉमेटो ७०-८० रुपये किलो, कोबी फ्लॉवर १०० रुपये किलो. शिराळे आणि पडवळ कोकणात अनेकांच्या दारातल्या मांडवात वेलीत लटकलेली असायची, त्याचा भाव ६० रुपये किलो. आमच्या कोकणात कुणाच्याही दारातला शेवगा हलवा आणि शेवग्याच्या शेंगा पाहिजे तेवढया घेऊन जा, असा काळ होता.
आता चार शेंगांना वीस रुपये. तूरडाळीच्या बरोबरीने आता भाज्या स्पर्धा करू लागल्या आहेत. सरकार तर एवढे खोटे आहे की, १०० रुपये किलो तूरडाळ होणार, याच्या जाहिराती वारंवार करत आहेत. आता जाहिरात करत आहेत तूरडाळीचा लिलाव करणार. हे काय बोलतात, कसे वागतात? कसलाही निर्णय करण्याची कुवत नसलेली माणसे सत्तेवर बसली आहेत. पंधरा दिवस तूरडाळीचा घोळ चाललेला आहे.? सरकारला सरकार म्हणून वागता येत नसेल तर घरी जा म्हणावे.
कोणी तुमच्या हातावर गूळ, खोबरे दिले आहे का? आणि वर भाषणे नाकाने कांदे सोलण्याची! इतके भंपक सरकार महाराष्ट्रात कधीही झालेले नव्हते. लोकांच्या संतापाला आता सीमा राहिलेली नाही. परवा कार्यालयात टॅक्सीने येताना उत्तर प्रदेशचा एक टॅक्सीवाला सांगत होता. संतापून बोलत होता. तो जे बोलला ते शब्द असे होते, ‘अरे भाई, ये भाजपा को हमने वोट दिया, गुन्हा किया। हम को जुते से मारो. हम को बेवकुफ बना दिया। जनता की हाय लग जाएगी..। लोगों को खाने को नही मिल रहा है.
महंगाई इतनी बढ गयी है। यूपीवालोंने बहुत गलती किया।’ त्याच्या पुढे त्याने ज्या शिव्या दिल्या त्या लिहिता येण्यासारख्या नाहीत. त्यामुळे या सरकारला आता शब्दाने शिव्या देण्याच्या पलीकडे गेलेले हे निर्ढावलेले सरकार आहे. त्या सरकारवर कशाचाही परिणाम होईल, अशी स्थिती नाही. मंत्र्यांच्या गाडया अडवल्या, मंत्र्यांना फरक पडत नाही.
मुख्यमंत्री नागपूरचे म्हणजे विदर्भाचे, अर्थमंत्री विदर्भाचे. विदर्भातल्या शेतक-यांच्या संत्र्याला भाव नाही. मातीमोलाने संत्रा विकावा लागतो आहे. त्या संतप्त शेतक-यांनी संत्र्याची प्रेतयात्रा काढली. शेतकरी ज्या उत्पादनावर आपले जीवन चालवतो, ते कष्टाचे पीक असे मातीमोल होताना पाहून तो मनातून किती संतप्त झालेला आहे, याची जाणीव या सरकारला कुठेही दिसत नाही. शहरातल्या गरीब लोकांसाठी असलेल्या काँग्रेसच्या चांगल्या योजना या दुष्ट सरकारने बंद करून टाकल्या. दोन रुपये किलोने गहू मिळत नाही. तीन रुपये किलोचा तांदूळ गायब झाला.
‘स्मार्टसिटी’च्या घोषणा या नुसत्या प्रसिद्धीकरिता. या स्मार्टसिटी फुटपाथवर ताडपत्र्या लावून संसार उभे आहेत. तिथेच आंघोळ आहे, तिथेच जेवण आहे. तिथेच विश्रांती आहे. ऊन, पाऊस, थंडीची पर्वा न करता या गरीब माणसाला नाईलाजाने तिथे राहावे लागत आहे. या कशाचीही खंत या सरकारला नाही. या सरकारचे काय करायचे, असा प्रश्न आता मनामनात निर्माण होत आहे. काय दुर्बुद्धी आठवली आणि कमळाचे निशाण असलेले बटण दाबले, असे आता सामान्य माणूस म्हणू लागला आहे. शिवसेनेचे नेते म्हणत होते की, उद्या सकाळी निवडणूक झाली तर शिवसेना सत्तेवर येईल. त्या नेत्यांना सांगावे लागेल, ‘वाट पाहा.’ सेनेची सत्तेची मिलीभगतही लोकांना आता कळून चुकली आहे.
लाचारी नंतर लोटांगण, लोटांगणानंतर हस्तांदोलन, हस्तांदोलनानंतर भागिदारी. हे सगळे शुद्र डावपेच लोकांना आता पूर्णपणे कळून चुकले. ना कोणी कोणाला आता तडीपार करत, ना कोणी जबडयात हात घालत. सगळयांचे हात खिशात आहेत. राज्यातल्या गरीब माणसाचे पोट हातावर आहे आणि सत्ताधा-यांचे हात पोटावर आहेत.?इतका जमीन आस्मानाचा फरक सरकार आणि लोकांमध्ये आहे.?तेव्हा या सरकारचे काय करायचे, हे आता मतदारांनी ठरवून टाकलेले आहे. बिहारमधील अडाणी मतदार शहाणे ठरतात, हे आता महाराष्ट्रही शिकतो आहे.
तेल गेले तूपही गेले हाती राहिले धुपाटणे.असि गत कॉंग्रेसची आहे. तर पांच वून्गली घी मे भा ज प ची आहेत. सरकार चालवण्याची सिस्टीम जुनी झाली. भाकड गाईला खायला घालून ती आता दुध देणार नाही हे जनतेच्या लक्षात आले आहे.पण आमच्या नेत्यांच्या लक्षात येत नाही.