भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रकाशित न झालेले अनेक ग्रंथ, टिपणे, नोंदी, लेखी सल्ले, चळवळींसंबंधित दस्तऐवज, संदर्भविषयक लेखन आणि छायाचित्रे यांची माहिती देणा-या २० प्रकल्पांचे काम ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती’कडून केले जात आहे.
मुंबई – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रकाशित न झालेले अनेक ग्रंथ, टिपणे, नोंदी, लेखी सल्ले, चळवळींसंबंधित दस्तऐवज, संदर्भविषयक लेखन आणि छायाचित्रे यांची माहिती देणा-या २० प्रकल्पांचे काम ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती’कडून केले जात आहे. मात्र, राज्य सरकारकडून योग्य निधी मिळत नसल्याने समितीचे हे काम रखडले आहे. त्याशिवाय या कामासाठी संशोधन आणि प्रकाशन करण्यासाठी लागणा-या मनुष्यबळाचीही कमतरता असल्याने दोन वर्षापासून या कामांना गती मिळत नसल्याचे चित्र आहे.
उच्चशिक्षण विभागाच्या अंतर्गत येणा-या चरित्र साधने प्रकाशनाच्या तज्ज्ञ समितीने या प्रकल्पांना मंजुरी दिली असली तरी उच्चशिक्षण विभागाच्या संचालक, सहसंचालक आणि उपसचिव यांच्यामध्ये या प्रकल्पांसाठी समन्वय नसल्यामुळे निधीची तरतूद करण्यासाठीची प्रक्रिया केली जात नसल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी चरित्र साधने प्रकाशन समितीने वेळोवेळी पाठपुरावा केला असला तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.
काय आहे या चरित्र साधनांमध्ये?
डॉ. आंबेडकर यांनी केलेला महाड चवदार तळे सत्याग्रह, त्यासंदर्भातील न्यायालयीन खटले यांचे अत्यंत दुर्मीळ दस्तऐवज, न्यायालयातील महत्त्वाची कागदपत्रे यांचे संकलन करण्यात आले आहेत. डॉ. आंबेडकर केंद्रात मंत्री असताना कायदा, जलनीती, ब्रह्मपुत्रा नदीवरील पूर नियंत्रण, देशभरातील महत्त्वाच्या धरणांसंदर्भात त्यांनी घेतलेले निर्णय, लोकसभेतील विविध प्रकारच्या निर्णय प्रक्रिया त्यासंदर्भातील दस्तऐवज जमवण्यात येत आहेत. शेतकरी कामगार फेडरेशनची चळवळ, स्वतंत्र मजूर पक्षाची चळवळ, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, बाबासाहेबांचे शैक्षणिक कार्य, धर्मातराची चळवळ, त्यांना भेटलेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व्यक्ती आणि त्यांनी स्थापन केलेले राजकीय पक्ष आदी २० प्रकल्पांमध्ये अप्रकाशित असलेल्या असंख्य दस्तऐवजांची माहिती संकलित करण्यात येत आहे.
बाबासाहेबांच्या चळवळींशी संबंधित असलेली दुर्मीळ कागदपत्रे
सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी आणखी वेळ लागला तर ही दस्तऐवज हाती येणे अवघड आहे. त्यामुळे राज्य सरकारने यासाठी लागणारा निधी तात्काळ दिला, तर पुढील कार्यवाहीला वेग मिळेल.– डॉ. अविनाश डोळस, सदस्य सचिव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती
समितीला आवश्यक असलेले टंकलेखक, स्टेनो यांसारखे कर्मचारी पुरवण्यात आले आहेत. संशोधन सहाय्यक हे पद सरकारी पातळीवरून नियुक्त करणे आवश्यक आहे. पण ते नसल्याने संशोधनाचे काम काही थांबलेले नाही. समितीचे सर्वच ग्रंथ, दुर्मीळ दस्तऐवजाची माहिती सरकारी मुद्रणालयातून छापली जाणार असल्याने त्यासाठी मोठय़ा निधीची आवश्यकता दिसत नाही. मात्र, त्यासाठी समितीने मागणी केली आहे का हे तपासून पाहावे लागेल.- डॉ. मंजुषा मोळवणे, सहसंचालिका, उच्चशिक्षण विभाग
nice artical…