शेती, शेतीपूरक व्यवसाय आणि पर्यटनातूनच सिंधुदुर्गाचा विकास शक्य आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रगत शेती व्यवस्थेवरच अवलंबून आहे.
कुडाळ- शेती, शेतीपूरक व्यवसाय आणि पर्यटनातूनच सिंधुदुर्गाचा विकास शक्य आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रगत शेती व्यवस्थेवरच अवलंबून आहे. पारंपरिक शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे.
पर्यटन व फळप्रक्रिया उद्योग यामुळे भविष्यात सिंधुदुर्ग महाराष्ट्रात अग्रेसर होईल, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केले.
जिल्हा परिषदेचा हा शेतीपूरक पशू पालन व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मेळा इथल्या शेतक-यांना जणू पर्वणीच असून तरुणांनी नोकरीकडे न वळता या शेती व्यवसायातून स्वत:ची व कुटुंबाची प्रगती साधावी, असे आवाहनही नारायण राणे यांनी यावेळी केले.
कोकणी माणसाच्या जीवनाचा शेती हाच खरा आत्मा आहे. परंतु आज दिवसेंदिवस इथला शेतकरी शेती व्यवसायातून माघार घेताना दिसतो. नोक-यांसाठी तरुण शहराची वाट धरतात. शेतीपासून मिळणारे उत्पन्न काही लाखांत असते, याचा विचार आजच्या तरुणांसमोर नाही.
शेतीमधील आधुनिकीकरण हे शेती मालाला अधिकचा हमीभाव देतात. पुशपालन, शेळीपालन यातून महिनाकाठी हजारो रुपये मिळू शकतात. त्यामुळे तरुणांनी या शेती व्यवसायाकडे अधिक लक्ष द्यावे, असेही राणे यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सिंधु कृषी औद्योगिक पशु-पक्षी व मत्स्यव्यवसाय व प्रदर्शन व मेळय़ाचा भव्य शुभारंभ व उद्घाटन सोहळा कुडाळ एस. टी. डेपो मैदानावर राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर जि. प. अध्यक्ष संदेश ऊर्फ गोटय़ा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, माजी जि. प. अध्यक्ष सतीश सावंत, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, जि. प. समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, महिला व बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, वित्त व बांधकाम सभापती संजय बोंबडी, ऊस तज्ज्ञ डॉ. डी. जी. हापसे, कुडाळ सभापती प्रतिभा घावनळकर, माजी जि. प. अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, विकास कुडाळकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. जयेंद्र परुळेकर, माजी आमदार पुष्पसेन सावंत, कुडाळ उपसरपंच विनायक राणे, कणकवली नगराध्यक्ष प्रज्ञा खोत यांसह तालुक्यांचे सभापती जि. प. सदस्य, पं. स. सदस्य उपस्थित होते.
यावेळी नारायण राणे यांनी जिल्हा परिषदेने अतिशय स्तुत्य अशा कार्यक्रमाचे आयोजन केले असून जि. प. अध्यक्ष उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विशेष अभिनंदन करत असल्याचे सांगून. ग्रामीण अर्थव्यवस्थेला वळण देण्याचे काम अशा कार्यक्रमातून होते.
१९९७ साली पशु-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. येथील शेतकरी आर्थिक उत्पन्नाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण व्हावा यासाठी असे कार्यक्रम करणे आवश्यक आहेत. शेतक-ोयांनी किफायतशीर व्यवसाय करून आपला विकास साधावा, असेही नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.
वा छान वाचून आनंद झाला ….