श्रीनिवासन यांना पुन्हा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली तर त्यांचीच एकमताने निवड करण्यात येणार आहे.
चेन्नई- श्रीनिवासन यांना पुन्हा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली तर त्यांचीच एकमताने निवड करण्यात येणार आहे. बीसीसीआयच्या रविवारी तातडीने बोलावण्यात आलेल्या विशेष बैठकीत श्रीनिवासन यांच्याच उपस्थितीत सदस्यांनी हा निर्णय घेतला.
इतकेच नाही तर ज्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (एजीएम) अध्यक्षपदाची निवडणूक होणार होती तीच सभा (एजीएम) मुदगल समितीचा अहवाल (नोव्हेंबरमध्ये अपेक्षित) येईपर्यंत न घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. वास्तविक पाहता एजीएम ही बीसीसीआयच्या नियमांप्रमाणे ३० सप्टेंबरपूर्वीच होणे अपेक्षित आहे.
मात्र आता बीसीसीआयच्या २६ सप्टेंबरला होणा-या कार्यकारिणी बैठकीत एजीएमची तारीख ठरण्याची शक्यता आहे. एकंदरीत आयपीएल स्पॉटफिक्सिंग आणि भ्रष्टाचाराची चौकशी करणा-या मुदगल समितीला एकप्रकारे संदेश देण्याचा प्रयत्नच श्रीनिवासन यांच्या बाजूने असलेल्या बीसीसीआयने रविवारी येथे केला.
दरम्यान, जर एजीएम पुढे ढकलली तर त्यावरूनही सर्वोच्च न्यायालयात जाऊ असा इशारा आयपीएल भ्रष्टाचार प्रकरणाविरुद्ध याचिका दाखल करणारे बिहार क्रिकेट असोसिएशनचे (कॅब) सचिव आदित्य वर्मा यांनी दिला.
शास्त्री यांच्या रिपोर्टवर फ्लेचर यांचे भवितव्य अवलंबून?
वनडे मालिकेसाठी नियुक्त करण्यात आलेले ‘टीम डायरेक्टर’ रवी शास्त्री यांच्या अहवालावर भारताचे मुख्य प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचे भवितव्य अवलंबून असल्याचे बीसीसीआयच्या माहितगारांनी रविवारी सांगितले.
‘‘बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत (२६ सप्टेंबर) शास्त्री इंग्लंड दौ-यातील अहवाल सादर करतील. वनडे मालिका जिंकल्याने भारताच्या गोटात आनंद असला तरी कसोटी मालिका पराभवाकडे दुर्लक्ष करता येणार नाही,’’ असे बीसीसीआयच्या माहितगाराने सांगितले.
एप्रिल २०११ मध्ये प्रशिक्षकपदाची सूत्रे सांभाळणा-या फ्लेचर यांचा करार २०१५ वनडे वर्ल्डकपपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र इंग्लंडमधील कसोटी मालिकेतील (१-३) मानहानीकारक पराभव त्यांच्या माथी मारला जाण्याची दाट शक्यता आहे.
चोरानाच राजा बनवा! वाव