नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेतच, शिवाय ते एक चांगले नट आहेत. त्यांचा अभिनय प्रभावी आहे. त्यामुळेच फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या तीन देशांच्या दौ-यावरून परत आल्यावर लोकसभेतील भाजपा सदस्यांसमोर भाषण करताना त्यांनी या अभिनयाची प्रचिती दिली. गेल्या वर्षी निवडणूक प्रचार काळात जाहीर सभेत त्यांचे हातवारे आणि नाटक जसे प्रभावीपणे सुरू होते, आताही त्याच पद्धतीने पक्षाच्या खासदारांसमोर भाषण करताना मोदींचे हातवारे आणि नाटक सुरू आहे.
सगळय़ात महत्त्वाचा नाटकीय भाग आहे तो म्हणजे मोदींनी त्यांचे सरकार ‘गरिबांचे सरकार आहे,’ असे अगदी जबरदस्त अभिनय करून सांगितले. एक बरे झाले की, हे वाक्य उच्चारताना मोदींच्या अंगात ११ लाखांचा कोट नव्हता; पण तो कोट घातल्यावरही गरिबांसाठी अश्रू ढाळायला मोदींना कसलाही संकोच वाटला नसता. कारण नाटक करण्यात ते पटाईत आहेत. खासदारांसमोर बोलताना भारतीय जनता पक्ष आणि मोदींचे सरकार गरिबांच्या बाजूचे आहे, हे अतिशय प्रभावी अभिनय करून मोदींनी सांगितले. त्याचवेळी भूमी अधिग्रहण विधेयक हे शेतक-यांच्या हिताचे आहे, असे नाटकीय वाक्य उच्चारतानाही त्यांना संकोच वाटला नाही. जर हे विधेयक शेतक-यांच्या हिताचे होते तर त्यात पुन्हा अध्यादेशाने दुरुस्त्या करण्याची गरज मोदींना का पडली? खरी गोष्ट अशी आहे की, हे विधेयक फक्त आणि फक्त उद्योगपती अंबानी आणि अदानी या दोघांसाठी आहे. देशभरात सर्व शेतक-यांची आणि राजकीय पक्षांची या विधेयकासंबंधात जी भावना आहे ती हीच आहे की, चोर आणि दरोडेखोरांच्या हातात हा कायदा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाचा जो काही खर्च झाला तो कोणा उद्योगपतीच्या मेहरबानीतून झाला, हे सगळय़ा जगाला माहीत आहे. भाजपाचे सरकार दिल्लीत आले आणि महाराष्ट्रातही आले आणि मग अंबानी मोकाट सुटले आहेत. त्यांना हवी असलेली जमीन आता कुठेही खरेदी करू शकतात. जमीन कुठची हवी आहे, हे त्यांनीच ठरवायचे.. जमिनीचा भाव त्यांनीच ठरवायचा.. सरकार त्यांच्या पाठीशी असल्यामुळे धाकदपटशा करून आता अंबानी आणि अदानी शेतक-यांच्या जमिनी हवे तिथे खरेदी करायला मोकळे आहेत. जमीन खरेदी केल्याबरोबर त्या जमिनीभोवती कंपाऊंड घालून सुरक्षारक्षक तैनात करण्याची व्यवस्था विधेयकात आहे. मोदी असोत किंवा गडकरी असोत या विधेयकाची भलामण करणारे हे सगळे नेते अंबानींच्या उपकाराखाली आहेत आणि त्यांच्याकरिता हे विधेयक आधी वटहुकूम काढून जारी करण्यात आले. कायद्यात त्याचे रूपांतर होताना लोकसभेत बहुमताच्या जोरावर ते मंजूर झाले. राज्यसभेत बहुमत नाही म्हणून ते अडले. या विधेयकामुळे शेतकरी आयुष्यातून उठेल, याची कल्पना आता देशभरातील शेतक-यांना आली आहे. त्यामुळेच दिल्लीमध्ये भर उन्हात या विधेयकाच्या विरोधात जी ‘किसान रॅली’ घेण्यात आली त्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. देशभरातील शेतकरी आता हे समजून चुकला आहे की, ११ महिन्यांपूर्वी या मोदींच्या आश्वासनांना भुलून आणि त्यांच्या थापांवर विश्वास ठेवून एका हुकूमशाहाच्या हातात हे राज्य सोपवले गेले आणि आता देशाचे वाटोळे करायला आणि उद्योगपतींची धन करायला मोदी निघाले आहेत. त्या विरोधात देशातील सगळा शेतकरी जेव्हा रस्त्यावर उतरेल तेव्हा मोदींच्या डोळय़ांसमोर अंधारी आल्याशिवाय राहणार नाही. मोदी हे अपघाताने झालेले पंतप्रधान आहेत आणि भाजपा हा अपघातानेच सत्तेवर आलेला पक्ष आहे. त्यांच्या मनात जे आहे ते आता कृतीत उतरत आहेत. त्यामुळे या ११ महिन्यांत या सरकारच्या फॅसिस्ट वृत्ती आणि मोदींचे हिटलरशाहीचे वागणे जाणवू लागले आहे. या देशातील लोक ज्यांना सत्तेचा माज येतो, तो माज उतरवायला कमी करणार नाहीत. मोदींची हवा कधीच निघून गेली. ते एक नंबरचे लबाड राजकारणी आहेत, हे ही लोकांना आता समजून चुकले आहे. जेव्हा देशातील शेतकरी संतप्त होऊन रस्त्यावर उतरेल, त्यावेळी मोदी सरकारला पळता भूई?थोडी करेल. त्यावेळी कॉर्पोरेट जग मोदीला वाचवू शकणार नाही. कारण या देशातील सर्वात मोठी शक्ती जशी शेतकरी आहे तशीच कामगार शक्तीसुद्धा आहे.
मोदींनी देशातील शेतक-याला उद्ध्वस्त करण्यासाठी आणि उद्योगपतींची धन करण्यासाठी भूमी अधिग्रहण कायदा आणला. कारण निवडणुकीतील उपकाराची फेड त्यांना करायची आहे. त्याचवेळी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे देशातील सर्व मालकवर्गाला खूष करण्याकरिता एक कामगारविरोधी कायदाही मोदींनी मान्य करून घेतला आहे. आता कुठल्याही मालकाला आपल्या उद्योगातील-जिथे ३०० पेक्षा कमी कामगार आहेत-त्या कामगारांना काढून टाकण्याचा अधिकार मोदींनी मालकाला दिलेला आहे. देशातील उद्योगांचे स्वरूप बघितले तर अवघ्या पाच टक्के उद्योगांमध्येसुद्धा ३००पेक्षा जास्त कामगार नाहीत. मुंबईचा गिरणगाव जेव्हा बहरत होता तेव्हा एका एका कापड गिरणीत हजार हजार-दोन दोन हजार कामगार होते. आता महाराष्ट्रात सध्या एस.टी. महामंडळ आणि मुंबईची ‘बेस्ट’ वाहतूक, गोदी सोडली तर ३००पेक्षा जास्त कामगार आता जवळपास कुठेच नाहीत. त्यामुळे बहुसंख्य उद्योगांतील कामगारांना एका झटक्यात कमी करून टाकण्याचा अधिकार मोदींनी देऊन टाकलेला आहे. गेल्याच आठवडय़ात अंधेरीच्या ‘सीप्झ’ येथील अडीचशे कामगारांना कोणतेही कारण न देता व्यवस्थापनाने एका झटक्यात कमी करून टाकले आहे. आज कामगार संघटना इतकी हतबल आहे की, या विरोधात दाद मागण्याचे त्राणही कामगार संघटनांना राहिलेले नाही. शिवाय काही कामगार संघटना आतून मालकांना सामील आहेत. सांताक्रुझच्या विमानतळाजवळील सेंटॉर हॉटेल हे जेव्हा सहारा समूहाला विकून टाकण्यात आले त्यावेळी त्या हॉटेलमधील अधिकृत असलेली शिवसेनेची हॉटेल कामगार संघटना कामगारांच्या बाजूने उभी राहिली नाही. फार मोठी ‘अर्थ’पूर्ण बोलणी करून हे हॉटेल ‘सहारा’वाल्यांना विकून कामगारांना बेकार करण्यात शिवसेनेनेच पुढाकार घेतला. तेथील कामगार आज शिवसेनेच्या नावाने आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या नावाने शिव्याशाप देत आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारी ही माणसे आहेत. बाळासाहेबांच्या नावावर आणि त्यांच्या पुण्याईवर यश मिळत असले तरी शिवसेनेचे डावपेच हे भांडवलदारांना मदत करणारेच आहेत. मोदी आणि त्यांच्या मनोवृत्तीत फार फरक आहे, असे समजण्याचे कारण नाही. दुर्दैवाने आज मुंबईत किंवा महाराष्ट्रात कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी कामगार नेतृत्व शिल्लक राहिलेले नाही. डांगे, एस. एम., जॉर्ज यांच्यासारखे नेतृत्व पुन्हा होणे नाही; पण त्याचवेळी विविध कामगार संघटनांचे नेतृत्व करणारे पुढच्या फळीतील कामगार नेते आता थकलेत. नवीन पद्धतीत आता सर्व ठिकाणी ‘काँट्रॅक्ट’ पद्धत आली. त्यामुळे काम करील त्या दिवसाचा पगार या कराराने सगळी कामगार चळवळ उद्ध्वस्त झाली आहे. तिकडे मोदींनी शेतक-यांना उद्ध्वस्त केले. इकडे कामगारांना काढण्याचा कायदा आणून कामगारांनाही आयुष्यातून उठवले. शेतकरी आणि कामगारांनी सर्वशक्तीने या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय या प्रवृत्तींना आळा बसणार नाही.
[EPSB]
अकरा महिन्यांत सतरा..
नरेंद्र मोदीमहाराज फ्रान्स, जर्मनी आणि अगदी विरुद्ध दिशेला कॅनडा या देशांचा नऊ दिवसांचा दौरा आटपून रविवारी पहाटे भारतात परतले. ते पंतप्रधान झाल्याला पुढच्या महिन्यातील २४ मे ला एक वर्ष होईल. त्यादिवशी ते कदाचित आणखी कोणत्यातरी देशातच पंतप्रधान पदाचा वर्षोत्सव साजरा करण्याकरिता गेलेले असतील.
[/EPSB]
एकदम बरोबर आहे सर…. निवडणुकीपूर्वी सुरु केलेले नाटक अद्याप सुरूच आहे.. मात्र, भोळ्याभाबड्या जनतेला अद्याप हे समजलेले नाही. ती आशेवर जगते आहे. फॅसिस्ट वृत्ती आणि मोदींचे हिटलरशाहीचे वागणे, जनतेला लवकरच समजेल… मग फुटेल फुगा, मोदींचा… छान अग्रलेख
एकदम बरोबर आहे सर… निवडणुकीपूर्वी चालू केलेले नाटक सुरूच आहे.. पण फक्त मोदिंचेच नाही तर सर्वच नेत्यांचे. त्यांत सर्वच आले. सगळेच गरीबांविषयी कळवळा आहे असे दाखवतात. शेवटी काळच तुमचे हे नाटक संपवेल.