काही वर्षापूर्वी भारतात ३६५ सण साजरे केले जायचे. मी वर्षाच्या दिवसांत आणि सणांत गफलत करतेय असे वाटत असेल पण, नाही!
काही वर्षापूर्वी भारतात ३६५ सण साजरे केले जायचे. मी वर्षाच्या दिवसांत आणि सणांत गफलत करतेय असे वाटत असेल पण, नाही! खरोखरच इथे काही काळापूर्वी ही परिस्थिती होती. पण, आजमितीला साजरे केले जाणारे सण ८-१० वर आलेत हे सत्य आहे. सणांची सुरुवात समाजातील भेदभाव विसरून त्याला एकसंघ करण्यासाठी झाली.
दुस-या बाजूला सण हे धार्मिक श्रद्धांतील विविधता आणि जगण्यांतील उत्साहाच्या प्रदर्शनाचे एक साधन होते. धार्मिक श्रद्धा ही सापेक्ष कल्पना असली तरी त्यातून जगण्यातील आव्हानांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य मिळते हे सत्य आहे!
भारतातील सणांचे विभाजन ढोबळ मानाने राष्ट्रीय/राजकीय, धार्मिक आणि हंगामी असे करता येईल. आणि प्रत्येक सणाच्या साजरे करण्याच्या खास अशा पद्धतीमुळे आपल्या सांस्कृतिक वारशाला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे. प्रत्येक सणाला आपला स्वत:चा असा इतिहास व महत्त्व आहे. मी स्वत: विभक्त कुटुंबात वाढलेली असले तरी माझ्या आजी-आजोबांच्या जाणकार ‘टिप्पणी’ खाली सर्व सणांच्या पौराणिक पैलूंची माहिती मला झाली. त्याचबरोबर त्यांचा वर्तमानातील संदर्भसुद्धा समजावून घेता आला.
जुन्या काळात सणांच्या साजरीकरणात, धर्मिक मिरवणुका, उपवास, जत्रा, आत्मपरीक्षण, सणाच्या विषयाला धरून सादर केलेल्या संगीत नृत्य-नाटिकांबरोबरच एकमेकाला भेटून केलेली सदिच्छांची देवाण-घेवाण असायची.
आजकालच्या पिढीसाठी मात्र सणाचे महत्त्व, पुराणाची सद्यस्थितीशी सांगड घालून दिव्यांचे, रंगांचे, गोडाधोडाच्या विशिष्ट पदार्थाचे, पूजेचे किंवा त्या वेळी गायलेल्या गीतांचे संदर्भ जाणून घेण्याऐवजी सुट्टी, खरेदी, मिळालेल्या भेटवस्तू इतपतच उरले आहे.
व्यापारीकरणामुळे सण साजरा करण्याच्या पद्धतीबरोबर त्या मागचा उद्देशच ‘सुधारला’ गेल्याची जाणीव होते. आज पैसा आणि सामाजिक पत यांना अवास्तव महत्त्व प्राप्त झाले आहे आणि ते सहज मिळवण्याचे मार्ग व्यापारीकरणाने लोकांना उपलब्ध करून दिले आहेत. सणासुदीचे दिवस म्हणजे अशा संधीसाधू व्यापा-यांसाठी एक पर्वणीच ठरतात. या काळात सर्वसाधारणपणे ३५ टक्के अधिक व्यवसाय होतो असे जाणकारांचे मत आहे.
सणासुदीच्या दिवसांच्या काही आठवडे आधीच व्यापारीवर्गाची जय्यत तयारी सुरू होते. नवनव्या मालांच्या व आकर्षक सवलतींच्या जाहिरातींचा मोठमोठया फलकांद्वारे, वर्तमानपत्रांतून व दूरदर्शनच्या माध्यमांतून भडीमार केला जातो. त्याचा सूरही असा असतो की, ‘जणूकाही या वस्तू विकत घेणे म्हणजेच सण साजरा करणे आहे!’ आणि अशा आकर्षणांना बळी पडणे हेच शेवटी व्यापारीकरणाला प्रोत्साहित करत असते!
काही दिवसांपूर्वीची गोष्ट, गणेशोत्सवापूर्वी मी माझ्या नेहमीच्याच दादरमधील श्रीराम स्टेशनरी स्टोअरला भेट दिली. दादरमधील रहदारीचा विचार करता एरवीसुद्धा खाजगी वाहन टाळणारी मी, या वेळी सार्वजनिक वाहनसुद्धा टाळले व आपल्या पावलावरच भरवसा ठेवला. छबिलदासचा जिना उतरतानाच माझ्या लक्षात आले ती गल्ली गणपतीच्या सजावटीसाठी वापरल्या जाणा-या मखरांनी भरून गेली आहे.
अत्यंत आकर्षक पद्धतीने बनवल्या गेलेल्या मखरांकडे पाहता मनोमन मी त्या कलाकारांच्या कल्पकतेचे कौतुक करत होते. पण दुस-या बाजूला या उत्सवांतून समाजात एकी निर्माण करण्याचा लोकमान्यांचा उद्देश कधीच लोप पावल्याची जाणीवही होत होती. दुर्दैवाने या उत्सवाचे स्वरूप आता फारच खाजगी पातळीवर आले आहे. आणि तो ‘चढाओढी’ने साजरा करण्याकडे सगळ्यांचा कल असतो.
मूलत:, सणांचे स्वरूप सर्वसमावेशक, ना-नफा तत्त्वावर, पुराणमतवादाला नाकारत समाजाच्या गरजांचे नव्या संदर्भाशी जुळवून घेण्याचे होते. पण त्याच्या आजच्या रूपाचे, आर्थिक, मानसिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक, राजकीय आणि व्यावसायिक पातळीवर सकारात्मक व नकारात्मक असे परिणाम झालेले आहेत.
माझी खात्री आहे की आपणा सर्वानाच आपल्या जिवलगांच्या गरजा/मागण्या पुरवणे ही आपली जबाबदारी वाटते. पण, त्या सोबतच साज-या केल्या जाणा-या सणांची पार्श्वभूमी समजावून त्याचा वर्तमानांतील संदर्भ समजावून देणे हीसुद्धा आपलीच जबाबदारी आहे. आजच्या कंप्युटरच्या जमान्यात स्काईप, वायबर आणि व्हॉटसअपमुळे सणांच्या साजरे करण्याला प्रदर्शनीयता आली आहे. त्यामुळे ‘सणांमागील सांस्कृतिक महत्त्वाची जागा फक्त व्यापारी लोकप्रियता घेईल की काय?’ अशी भीती वाटते!
तुमचं लेखन खरोकरच उत्कृष्ट आहे. धन्यवाद साहेब