कोकण रेल्वेचा आडमुठेपणा आणि हटवादी भूमिकेमुळे मध्य रेल्वेला कोकण रेल्वेवर अतिरिक्त गाडया चालवता येत नसल्याचा आरोप मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोधकुमार जैन यांनी केला आहे.
मुंबई- मध्य आणि कोकण रेल्वेच्या वादाचा फटका कोकणवासीयांना बसत आहे. कोकण रेल्वेचा आडमुठेपणा आणि हटवादी भूमिकेमुळे मध्य रेल्वेला कोकण रेल्वेवर अतिरिक्त गाडया चालवता येत नसल्याचा आरोप मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोधकुमार जैन यांनी केला आहे. या वादामुळे यावर्षीही कोकणवासीयांना अतिरिक्त गाडी सोडाच पण अतिरिक्त डबेही मिळणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.
कोकण रेल्वेवर नवीन गाडी सुरू करायची असेल किंवा एखाद्या गाडीला अतिरिक्त डबा जरी जोडायचा असेल तर त्यासाठी कोकण रेल्वेची परवानगी घ्यावी लागते. ते करत असताना कोकण रेल्वेकडून कधीच सहकार्याची भूमिका घेतली जात नाही. उलट कटकट केली जाते असा थेट आरोप जैन यांनी केला आहे. गेल्या वर्षीही मध्य रेल्वेला कोकणात काही गाडय़ा चालवायच्या होत्या. त्यावेळीही कोकण रेल्वेकडून मोठा त्रास सहन करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. कोकण रेल्वेच्या याच भूमिकेमुळे कोकणात जाणा-या गाडयांना अतिरिक्त डबे जोडता येत नाहीत. शिवाय गाडयाही सोडण्यात अडचण येत असल्याचे त्यांनी सांगितले. या मार्गावर चालवल्या जाणा-या गाडयांच्या महसुलातील अर्धापेक्षा जास्त महसूल हा कोकण रेल्वेला द्यावा लागतो.
गाडयांची देखभाल आणि त्याचा खर्च हा मात्र मध्य रेल्वेलाच करावा लागतो. त्यामुळे गाडया चालवूनही मध्य रेल्वेच्या पदरी काहीच पडत नसल्याचे त्यांनी सांगितले. असे असले तरी मध्य रेल्वेने कोकणाबाबत नेहमीच सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले. म्हणूनच दादर- सावंतवाडी गाडीला एक मार्चपासून दोन अतिरिक्त डबे लावल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शिवाय कोकण रेल्वेवर रात्रीच्या वेळी अजून एखादी गाडी सुरू करता येऊ शकते का, याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे सर्व प्रवाशींचा भार हा कोकण रेल्वेवर पडत आहे. अशा स्थितीत गाडया आणि डबे वाढवणे गरजेचे आहे, असेही जैन यांनी सांगितले.
कोकण रेल्वेवर आणखीन गाडया वाढवण्यासाठी सावंतवाडी टर्मिनलचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे असल्याचे यावेळी सुबोधकुमार जैन यांनी सांगितले. कोकण रेल्वे मार्गावर सध्या सिंगल ट्रॅक आहे. त्यात वाहतूकही वाढली आहे. त्यामुळे पनवेल पासून रोह्यापर्यंत मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाल्यास वाहतुकीचा ताण काही प्रमाणात कमी होऊन आणखीन गाडया कोकणात चालवणे शक्य होईल असेही ते म्हणाले.
कोकण रेल्वेला सध्या कोणच वाली नाही??
दोघांच्या भांडणात कोकणी माणसाचे नुकसान होत आहे