राज्यावर ओढावलेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे पाणीटंचाई हा कळीचा मुद्दा बनला आहे. गेल्या काही वर्षात वरुणराजाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचे सावट पसरले आहे.
मुंबई- राज्यावर ओढावलेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे पाणीटंचाई हा कळीचा मुद्दा बनला आहे. गेल्या काही वर्षात वरुणराजाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचे सावट पसरले आहे. उपलब्ध पाण्याचा साठा पाहता कुठे एक दिवस आड तर ग्रामीण भागात आठवडाभरानंतर पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईने त्रासलेली जनता स्वत:हूनच पाणी बचत करत आहे.
शहरी भागात सोसायटय़ांमध्ये पाणी साठवणुकीसाठी प्रयत्न केले जात असताना ग्रामीण भागात भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अशा ठिकाणी जलसंवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.
ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणी पुरवले जात असताना आता रेल्वेद्वारेही पाणीपुरवठा करण्याची वेळ ओढावली आहे. अशा परिस्थितीत यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला.
उन्हाचा कडाका आणि दुष्काळाची दाहकता सोसत असलेल्या नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पावसाचा हा अंदाज लक्षात घेता पाण्याची साठवणूक करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करायला हवेत, असे मत जलतज्ज्ञ आणि पर्यावरणतज्ज्ञांद्वारे व्यक्त करण्यात येत आहे.
देशात यंदा सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. या अंदाजाचे वेळीच महत्त्व ओळखता पाणी संवर्धनाच्या दृष्टीने उपाययोजना केल्यास राज्यावर ओढावलेले दुष्काळाचे सावट काही अंशी का होईना, पण कमी केले जाऊ शकते.
विशेषत: ग्रामीण भागात या योजनेची अंमलबजावणी करावी. पाण्याचा विकास आराखडा बनवत ‘पाण्याची बँक’ बनवावी आणि राखीव जलसंवर्धनास वाव निर्माण करून द्यावा, असे मत जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे यांनी व्यक्त केले.
ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेता मनसेद्वारे मराठवाडयामध्ये पिण्याच्या पाण्याच्या ३ हजार लिटर्सच्या टाक्या वाटण्यात येणार आहेत. तर शहरी भागात काही सोसायटय़ांमध्ये, स्वयंसेवी संस्थांद्वारे पाणी बचतीचे उपक्रम राबवले जात आहेत.
लोकसंख्या, नागरीकरण, शहरीकरणाचा वेग वाढत असताना धरणातील पाण्याचा साठा कमी पडू लागला आहे. अशा परिस्थितीत हवामान विभागाने पावसाळासंदर्भात वर्तवलेला अंदाज लक्षात घेता महानगरपालिका, शासनस्तरावर पाणी संवर्धनाच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. ग्रामीण भाग दुष्काळाने होरपळून निघत असताना मराठवाडयातील लातूरमध्ये रेल्वेने पाणी पोहोचवण्याची वेळ आली आहे. पाऊसच नसल्याने नद्या, नाले, तलाव कोरडे पडल्याने पाण्यासाठी प्रत्येक जण वणवण करत आहे.
याचा सर्वाधिक फटका बळीराजाला पडला आहे. ‘रेन वॉटर हॉर्वेस्टिंग’ प्रकल्प, पाण्याचा पुनर्वापर, जलसाठे, धरणे, तलाव, विहिरी या पाणी संवर्धनासाठी महत्त्वाच्या असणा-या योजनांकडे लक्ष देत दुष्काळावर मात करत पाणी बचतीसाठीचे ठोस धोरण बनवणे गरजेचे आहे. यासोबत ‘निसर्ग व्यवस्थापने’वरही भर देणे गरजेचे असल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञ अॅड. गिरीश राऊत यांनी व्यक्त केले.
वाढते तापमान आणि बाष्पीभवनमुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. गारपीट, अतिवृष्टी, वादळे, महापूर, ध्रुवावरील बर्फ वितळणे या समस्या निर्माण होत आहेत. या सगळ्याला मानवच जबाबदार आहे.
पूर्वीच्या काळी तळे, विहिरी, नद्या यांची जोडणी असल्याने पाण्याचा स्त्रोत पुरेसा होता. मात्र शहरीकरणामुळे विहिरी बुझवल्या गेल्या. पाऊसच न पडल्याने तलाव, तळे, नद्या कोरडया पडल्या. या सगळ्यांमुळे पाणीटंचाई निर्माण झाली असून हा प्रश्न भविष्यात अधिक तीव्र होत जाणार असल्याचे मत अॅड. राऊत यांनी व्यक्त केले.
यंदा पावसाचा प्रभाव जास्त का?
नैऋत्य मोसमी पावसाच्या वाटचालीवर ‘एल निनो’चा प्रभाव पडतो. गेल्या काही वर्षापासून हा प्रभाव कायम असल्याने पाऊस सरासरीपेक्षा कमी पडत होता. यंदा ‘एल निनो’चा प्रभाव कमी होणार असल्याने पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.
सर्वप्रथम जमिनीतील पाण्याची पातळी वाढवणे गरजेचे आहे. ही पातळी खूप खाली गेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात घराच्या छतावरून येणारे, रस्त्यावर साचणारे पाणी नाल्यांमध्ये वाहून न देता ते जमिनीत कसे मुरवता येईल यासाठी प्रयत्न करायला हवेत.
बळीराजासाठी यंदाचा पावसाळा पीक उत्पादनाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरू शकतो. वर्षाऋतू पिके ज्याला म्हणतात अशा पिकांच्या बी-बीयाणांचा साठा केल्यास पावसाळ्यात त्याची लागवड करावी. दुष्काळामुळे बळीराजावर जे आर्थिक संकट ओढावले आहे, ते कमी होण्यास मदत होईल.
– डॉ. माधव चितळे, जलतज्ज्ञ
काही प्रमाणे जर त्रास होत असेल तर तो शेतकरी ला
पण शेतकरीवर्गाने जर पाण्याचे नियोजन केले तर त्याला पाणी साठी जे काही त्रास अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येणार नाही