गेल्या दहा वर्षाचा शिरस्ता मोडून रेल्वेमंत्री पवन कुमार बन्सल यांनी बुधवारी रेल्वे प्रवासाच्या प्रत्येक स्तरासाठी प्रतिकिमी दोन पैसे ते १० पैसे अशा भाडेवाढीची घोषणा केली.
नवी दिल्ली– प्रवासी रेल्वे भाड्यात वाढ करायची नाही किंवा फक्त वातानुकूलित डब्यांच्या भाड्यात किरकोळ भाडेवाढ करायची, हा गेल्या दहा वर्षाचा शिरस्ता मोडून रेल्वेमंत्री पवन कुमार बन्सल यांनी बुधवारी रेल्वे प्रवासाच्या प्रत्येक स्तरासाठी प्रतिकिमी दोन पैसे ते १० पैसे अशा भाडेवाढीची घोषणा केली. २१ जानेवारीपासून अमलात येणा-या या भाडेवाढीमुळे मुंबईकरांवर आधीचा अधिभार आणि ही नवी भाडेवाढ असा दुहेरी बोजा पडणार आहे. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात आणखी भाडेवाढ प्रस्तावित नसेल, असा दिलासा रेल्वेमंत्र्यांनी दिला आहे.
या निर्णयामुळे विरोधक संतप्त झाले असून भाडेवाढ ताबडतोब मागे घ्यावी अशी मागणी भाजप, डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेसने केली आहे. मालवाहतुकीला सध्या भाडेवाढीतून वगळण्यात आले असले तरी तेही महागण्याची शक्यता रेल्वेमंत्र्यांनी नाकारली नाही. विशेष म्हणजे रेल्वे अर्थसंकल्पाला जेमतेम दीड महिना उरलेला असताना सरकारने हे धाडसी पाऊल उचलले आहे. प्रस्तावित भाडेवाढ फार जास्त नाही असा दावाही त्यांनी केला.
गेल्या दहा वर्षामध्ये प्रवासी भाडेवाढीचा विचार न केल्याने रेल्वेची आर्थिक स्थिती बिघडली होती, त्यामुळे ही भाडेवाढ अटळ होती असे पवन कुमार बन्सल यांनी स्पष्ट केले. अधिक चांगली आणि आधुनिक सेवा मिळावी यासाठी लोक अधिक पैसे मोजायला तयार असतात, असेही ते म्हणाले.
लोकांनी हे समजून घ्यावे. प्रवासी भाड्यात गेल्या १२ वर्षात वाढ झालेली नाही. त्यामुळे आम्हाला त्यांचे सहकार्य हवे आहे. भाडेवाढीने त्रास होणार असला तरी आपल्याला वास्तवाचा स्वीकार करणे भाग आहे. – पवन कुमार बन्सल, रेल्वेमंत्री
The increase in rates are bearable. The rate hike is welcome as the same will strengthen Indian Rail.