मोदींच्या सरकारला १५ महिने झाले. मोदींनी वेश बदलून एकदा बाहेर पडावे. दाढी काढून टाकावी. भगवा शर्ट न घालता सामान्य माणसांसारखे कपडे घालून त्यांनी एकदा बाहेर फिरून अंदाज घ्यावा. सामान्य माणसे या १५ महिन्यांत कशा शिव्या घालू लागली आहेत, याची कल्पना त्यांना आल्याशिवाय राहणार नाही.
मोदींच्या सरकारला १५ महिने झाले. मोदींनी वेश बदलून एकदा बाहेर पडावे. दाढी काढून टाकावी. भगवा शर्ट न घालता सामान्य माणसांसारखे कपडे घालून त्यांनी एकदा बाहेर फिरून अंदाज घ्यावा. सामान्य माणसे या १५ महिन्यांत कशा शिव्या घालू लागली आहेत, याची कल्पना त्यांना आल्याशिवाय राहणार नाही. सत्तेमुळे आलेली मुजोरी सामान्य माणसांच्या मनातील खदखद समजून घ्यायला अपुरी पडत आहे. या देशात अवघ्या १५ महिन्यांत फक्त आणि फक्त पंतप्रधानांबद्दलचा संताप किती टोकाला गेलेला आहे, याची तुम्ही माहिती घेतलीत तर तुम्हाला कळेल. तुमच्या आजूबाजूचे चमचे आणि तुमची पोलीस यंत्रणा तुम्हाला खरे सांगणार नाही. म्हणून ती माहिती तुम्हालाच घ्यावी लागेल.
राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवा आणि लोकांच्या मनातील खदखद समजून घ्या. परवा एका टॅक्सीवाल्याने एक वाक्य वापरले, ‘ये मोदीने देश चौपट कर दिया.. धंदेवालों को तो मार ही डाला. महंगाई तो इतनी बडी की, मोदी के लिए मुह से गाली निकलती है. ऐसा नही होना चाहिए, लेकीन क्या करे?’ हे एका टॅक्सीवाल्याने उच्चारलेले शब्द आहेत. हा टॅक्सीवाला सामान्य जनतेचा प्रतिनिधी आहे.
मोदी महाराज, तुम्ही जेव्हा एप्रिल, मे महिन्यात देशभर धिंगाणा घालत होतात आणि लोकांच्या भावनेशी खेळून ‘अब पडी महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार’ अशा घोषणा करत होता, त्याच्या पाटय़ा लावत होता. तेव्हा उद्या तुम्ही सत्तेवर आल्यावर ही वाढत चाललेली महागाई कमी होणार, असे भाबडय़ा जनतेला वाटू लागले होते. या देशात सामान्य माणसाची फसवणूक जेव्हा जेव्हा झाली तेव्हा तेव्हा तो माणूस पेटून उठलेला आहे. कारण तुमची भाषणे ढोंगी ठरलेली आहेत.
तुमच्याजवळ कार्यक्रम नाही. तुम्हाला सरकार चालवता येत नाही. तुम्हाला लोकशाहीची किंमत नाही. तुमची वृत्ती आणि प्रवृत्ती हुकूमशाहीची आहे. यातली प्रत्येक गोष्ट आता देशातल्या प्रत्येक माणसाला जाणवू लागलेली आहे. त्याचा स्फोट होईल, हे लक्षात ठेवा. तुम्ही किती देशात फिरलात आणि कोणत्या देशातल्या पंतप्रधानांनी तुमचा किती सन्मान केला, या गोष्टीशी या देशातल्या सामान्य माणसाला काहीही पडलेले नाही.
तुमचा सन्मान झाला, त्यामुळे देशाचा सन्मान वाढला, असे दिसत नाही. उलट व्यक्तिगत टामटूम करण्याची नशा तुम्हाला चढलेली आहे. त्यामुळे १५ महिन्यांपूर्वी आपण काय बोललो होतो, याचा विसर तुम्हाला पडलेला आहे. तुम्ही साखर आयात करणार होता, साखरेच्या किमती कमी होतील, असे तुमचे म्हणणे. तुम्ही कांदा आयात करणार होता, ८० रुपये किलो झालेला कांदा त्यामुळे स्वस्त होईल, असे तुम्ही सांगितले.
तुम्ही साखर आयात केली नाहीत. तुम्ही कांदा आयात केला नाहीत. १५ महिन्यांपूर्वी १५ रुपये किलो असलेला कांदा आज ७०/८० रुपये किलो झाला होता. सप्टेंबरच्या २,३ तारखांना कांदा थोडा आयात झाल्यामुळे ८० चा कांदा ६० रूपयांवर आला. पण त्याचा अर्थ कांदा स्वस्त झाला असे नव्हे.
१५ महिन्यांपूर्वी ७० रुपये किलो असलेली तूरडाळ आज १५० ते १६० रुपये किलो आहे. १५ महिन्यांपूर्वी दहा रुपये पाव किलो असलेली कोणतीही भाजी आज २० ते २५ रुपये पाव झालेली आहे. दहा रुपयांखाली कोथिंबीर किंवा मिरची मिळत नाही. ज्याला सामान्य माणूस ‘मसाला’ म्हणतो त्यासाठी २५ रुपये मोजावे लागतात. त्या गरीब जनतेच्या मुखातून तुम्हाला शिव्या-शाप येत आहेत. या सामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला त्यांनी निवडून दिल्यानंतर तुमच्या उजव्या खांद्यावर अदानी बसलेत, डाव्या खांद्यावर अंबानी बसलेत आणि तुमच्या अंगात ११ लाखांचा कोट घालून तुम्ही मिरवता. लोकांच्या भावनेशी तुम्हाला काहीही पडलेले नाही; पण ही भावना पुढच्या निवडणुकीत तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही.
भू-संपादनाची तुमची मुजोरी तुमच्या अंगाशी आली. शेतकऱ्याची मान कापायला निघालेल्या तुम्हाला माघार घ्यावी लागली. सामान्य माणसाशी तुमचे काही देणे-घेणे शिल्लक राहिलेले नाही. सामान्य माणसाच्या मतावर सत्ता मिळवून अधिकारावर बसल्यावर तुमच्या अंगात हुकूमशाह संचारला. फार दिवस लोक हे खपवून घेतील, या भ्रमात राहू नका.
तुमच्याच पक्षाचे लोक तुमच्या खुर्चीखाली काय पेरत आहेत, हे लक्षात ठेवा. उद्या याचा स्फोट होणार आहे आणि त्यात तुमची राजवट भस्मसात होईल, ही भविष्यवाणी नाही, गरिबांच्या मनातील शापवाणी आहे आणि म्हणून १५ महिन्यांपूर्वी लोकांच्या मनात तुमची काय जागा होती आणि आज तुमची प्रतिमा पायदळी तुडवली गेलेली आहे, हा फरक समजावून घ्या. तो फरक तुम्ही समजून घेणार नाही. कारण तुम्हाला त्याची आज गरज नाही.
तुम्ही सत्तेत बसलेले आहात आणि सत्ता बहिरी असते तशीच आंधळीही असते. त्या सत्तेला स्तुतीच ऐकू येते. बहिरेपणातही स्तुती ऐकू येते. त्या सत्तेला पुष्पहार गोड वाटतात. ‘जिंदाबाद’ गोड वाटतो पण लोकांच्या मनातले शिव्याशाप ऐकून घ्यायची त्या सत्तेची तयारी नसते. हे सत्तेचे गुणधर्म जुने आहेत. ते तुम्हाला लवकर लागू पडले त्यामुळे प्रत्येक दिवस तुम्ही लोकांच्या मनातून झपाटय़ाने उतरलेले आहात. महागाईने हैराण झालेले लोक तुम्हाला माफ करणार नाहीत. एवढेच!
श्रीमती सोनिया गांधी यांनी पाटणा येथील सभेत मोदींचे नेमके विश्लेषण केले आहे. रुपयाची किंमत जशी घसरली, तशी मोदींची किंमतही पंधरा महिन्यांत घसरली, असे सोनिया गांधी म्हणाल्या आणि त्या त्यांच्या विश्लेषणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जी गोष्ट लोकांना थेट भिडते ती गोष्ट लोक लगेच स्वीकारतात. डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन झालेल्या रुपयाचे बाजारातले आजचे मूल्य चौदा पैसे आहे. चांदीचा बंदा रुपया, त्याची किंमत आज बाजारात चौदा पैसे आहे. रुपयाप्रमाणे मोदींची किंमत घसरली असा निष्कर्ष जेव्हा निघतो तेव्हा मोदींचा बाजारातला भाव रुपयाप्रमाणे चौदा पैशांवर आला आहे, असा त्याचा अर्थ मानला जातो.
२०१४ साली नरेंद्र मोदी या व्यक्तिमत्त्वाचं मूल्य बंदा रुपया होतं. पंधरा महिन्यांनंतर मोदींचे मूल्य १४ पैशांवर येऊन कोसळले. शेअर बाजाराचे अर्थशास्त्र असे आहे की आज घसरलेला बाजार उद्या उसळी मारू शकतो आणि रुपयाचे मूल्य क्वचित वाढू शकते. पण रुपयाचे मूल्य वाढले तरी आता पुढच्या चार वर्षात मोदींचे मूल्य वाढेल अशी शक्यता अजिबात राहिलेली नाही. गेल्या पन्नास वर्षात रुपयाचे मूल्य घसरले नाही असे नाही. चार वेळा घसरले आहे आणि दोन वेळा पुन्हा उसळले आहे. पण जेव्हा जेव्हा रुपया घसरला त्या त्या वेळच्या घसरलेल्या रुपयाची तुलना कोणत्याही विरोधी
पक्षनेत्याने-त्यावेळी भाजपा विरोधी पक्षातच होता-पंतप्रधानांचे मूल्य घसरले, अशा स्वरूपात केली गेली नव्हती. पहिल्या प्रथमच रुपयाचे घसरलेले मूल्य पंतप्रधानांच्या घसरलेल्या पतीशी जोडलेले आहे. पंतप्रधानांची पत घसरली म्हणजे नेमके काय झाले? तर पंधरा महिन्यांपूर्वी त्यांना जी प्रतिष्ठा होती, ती प्रतिष्ठा आता राहिलेली नाही. उलट घराघरात मोदी टीकेचा विषय बनले आहेत.?‘अच्छे दिन’ शब्दाची टिंगल होत आहे. महागाई कमी करण्याच्या घोषणांची टिंगल होत आहे. मोदी जे जे बोलले ते ते खोटे निघाले. कारण मुळात हा माणूसच खोटा आहे.
एका हुकूमशाही प्रवृत्तीच्या माणसाच्या हातात ज्या मतदारांनी देश दिला आणि तो देत असताना त्या व्यक्तिमत्त्वाच्या ओव्या गायल्या गेल्या; पण भारतातले लोकशाही मानणारे लोक ज्याला डोक्यावर घेतात त्याला आपटायला कमी करत नाहीत. त्यामुळेच ज्यांनी ओव्या गायल्या होत्या तेच आज मोदींना शिव्या घालत आहेत. मोदींच्या अध:पतनाचा काळ सुरू झालेला आहे आणि पंधरा महिन्यांतली रुपयाची घसरण मोदींना जशी रोखता आली नाही तशी स्वत: मोदींची घसरणही त्यांना रोखता येत नाही.
ओव्या ऐकताना बरे वाटले आता शिव्या खातानाही मोदींनी त्या पचवायची तयारी ठेवावी. अजून काय झाले आहे? पुढच्या चार वर्षात लोक मोदींना फिरणे अशक्य करून टाकतील इतका लोकांचा मोदींबद्दल संताप मनामनात गच्च दाटलेला आहे. त्याचा स्फोट ज्या दिवशी होईल, त्या दिवशी मोदींना चंबूगबाळे गुंडाळून गुजरातला पळून जावे लागेल. हे काल्पनिक वर्णन नाही, चार वर्ष थांबा आणि मग सांगा.
परवा सर्वे झाला त्यात मोदी अजून हि तितकेच लोकप्रिय आहेत असे दिसून आले ते खोटे कि खरे ?