‘मरावे परी अवयव रूपी राहावे’ या शीर्षकाद्वारे समाजात अवयव दान करण्यासाठी लोकांना जागरूक केले जात आहे. मृत्यूनंतर अवयवदान करून दुस-याला जीवन देणे म्हणजे दुस-याच्या देहातील अवयवरूपाने जीवनाचा अनुभव घेण्यासारखेच आहे. ‘अवयवदानाचे’ हे महत्त्व पटू लागल्याने सर्वसामान्य नागरिक अवयव दान करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेऊ लागले आहेत. पण मुंबईतील पवई येथील हिरानंदानी रुग्णालयातील ‘किडनी रॅकेट’ उघड झाल्यानंतर अवयवदानासंदर्भात लोकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या रुग्णालयातील मूत्रपिंड तस्करीच्या व्यापाराचा पर्दाफाश म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात केवळ अवयवांचा नाही तर मूल्यांचाही बाजार किती तेजीत आहे याची नक्कीच कल्पना करू शकतो.
मुंबईतील उच्चभ्रू वर्गातील लोकांसाठी असलेल्या हिरानंदानी रुग्णालयात मूत्रपिंड तस्करीचा प्रकार १४ जुलै २०१६ रोजी उघड झाला. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. शहरातील बडय़ा रुग्णालयांच्या यादीत असणारे हे रुग्णालय असून यात अशा प्रकारचा गैरव्यवहार चालत असेल याची कदाचित कोणालाही कल्पना सुद्धा नव्हती. पण एका समाजसेवकाच्या निदर्शनास हा प्रकार आला. समाजसेवक महेश तन्ना यांच्या तक्रारीची दखल घेत पवई पोलिसांनी गुप्तपणे केलेल्या कारवाईमुळे रुग्णालयात सुरू असलेले भले मोठे ‘किडनी रॅकेट’ समोर आले व प्रतिष्ठित मानल्या जाणा-या या रुग्णालयाचा खरा चेहरा समाजासमोर आला. किडनी रॅकेट उघड होणारी ही पहिला घटना नाही. अकोल्यातील एका खासगी रुग्णालयातही असाच प्रकार समोर आला होता. पोलिसांनी सुरू केलेल्या या तपासकार्यात तस्करीचे मूळ मुंबई व पुण्यात असल्याचेही उघड झाले होते. मुंबईतील मोठय़ा तीन रुग्णालयांत किडनी प्रत्यारोपणाचे प्रकार घडल्याचीही माहिती तपासात पुढे आली होती. त्यानुसार आता किडनी तस्करीत हिरानंदानी रुग्णालयाचे नाव समोर आल्याने पोलिसांचा संशय योग्य असल्याचे समजते. मात्र, त्याचबरोबर अन्य दोन मोठी रुग्णालये कोणती हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यातच आहे. याही रुग्णालयांची नावे पटकन समोर आल्यास गरीब रुग्णांच्या होणा-या फसवणुकीला आळा बसण्यास मदत होईल.
सध्याच्या प्रचलित कायद्याद्वारे रक्ताचे किंवा पती-पत्नीचे नातं असल्याशिवाय कुणाही जिवंत व्यक्तीला दुस-या रुग्णासाठी अवयव दान करण्याची परवानगी नाही. याशिवाय ‘लाईव्ह रिलेटेड’ या अवयवदान प्रक्रियेत कागदपत्रे तपासून घ्यावी लागतात. ही फार मोठी प्रक्रिया असते. दात्याचे रेशनकार्ड, ओळखपत्र, जन्मदाखला या सर्वाचा पुरावा द्यावा लागतो. पूर्वी राज्य सरकारची पडताळणी समितीद्वारे या कागदपत्रांची छाननी केली जात होती. पण या प्रक्रियेला प्रचंड विलंब लागत असल्याने संबंधित रुग्णालयाच्या ‘एथिक्स कमिटी’ व अवयव प्रत्यारोपण समितीला ही जबाबदारी सोपवण्यात आली. यांची कागदपत्रे तपासल्यानंतर ही सर्व कागदपत्रे वैद्यकीय शिक्षण व संचालनालयाच्या अध्यक्षतेखाली असलेल्या अवयव प्रत्यारोपण समितीकडे पाठवली जातात. समितीने दिलेल्या मंजुरीनंतर अवयव दान केले जाते. या ‘लाईव्ह रिलेटेड’मुळे गरजू रुग्णांचा फायदा घेतला जात आहे. लाईव्ह रिलेटेड शस्त्रक्रियांमुळे काही रुग्णालये कोटय़वधी रुपयांची कमाई करत आहेत. याचा प्रत्यय म्हणजे सरकारच्या नियमावलीला शह देत हिरानंदानी रुग्णालयातील डॉक्टरांची टोळी बनावट कागदपत्रे तयार करून आई-वडील, पती-पत्नी व बहीण-भाऊ अशी नाती जन्माला घालत होती. रुग्णाला ५० लाख रुपये टाकून मिळणारे जीवदान व तीन-चार लाखांसाठी स्वत:ची किडनी विकायला होकार देणारे गरजू लोक या सर्वाची सांगड घालून ‘किडनीचा हा बाजार’ सुरू होता. मागील पाच वर्षापासून सुरू असलेल्या या रॅकेटच्या माध्यमातून १३०हून अधिक मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले असून तब्बल ६३ कोटींचे आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. इतक्या मोठय़ा रॅकेटसंदर्भात माहिती नसल्याचा आव आणणा-या निरंजन हिरानंदानी यांच्या व्यवस्थापकीय क्षमतेवरच शंका घ्यावी लागेल. कारण रुग्णालयात होणा-या लहान-सहान बदलांची माहिती हिरानंदानी यांच्यापर्यंत पोहोचत असते; असे असताना ‘रुग्णालयात घडणारा काळाबाजार माहिती नाही’ हे उत्तर पचवणं अवघड होत आहे.
या सर्व गोष्टींना हिरानंदानी यांचा पाठिंबा असल्याशिवाय घडणं शक्यता नाही. त्यामुळे राज्य सरकारने यासंदर्भात ठोस पावले उचलून दोषींवर योग्य ती कारवाई केली पाहिजे. याशिवाय अन्य काही रुग्णालयांत अशा प्रकारचे गैरव्यवहार सुरू आहेत का याची चौकशी करावी. तसेच अवयवांच्या प्रतीक्षेत असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची कोणतीही फसवणूक होऊ नये याकरता दात्यांची व रुग्णांची कागदपत्रे तपासणीसाठी राज्य सरकारने स्वतंत्र पडताळणी समिती गठीत करून त्या समितीकडे हे काम सोपवण्यात यावे. जेणेकरून रुग्णालयात चालणा-या किडनी तस्करीच्या या व्यापाराला आळा बसेल व तरीही अशा प्रकारचे कृत्य करणा-या डॉक्टरांना कडक शिक्षा करण्यासाठी कायद्यात बदल करण्यात यावा; असे झाल्यास अवयवांच्या तस्करीचा व्यापार बंद होऊन पारदर्शकपणे अवयव प्रत्यारोपण होईल व अवयव प्रत्यारोपणाच्या या चळवळीला गती प्राप्त होऊन अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना नव्याने जीवनदान मिळू शकेल.
Mr. हिरनानंदानी इस originally builders. हे इस इंटरेस्टेड इन Money. खास पर्सन डोईस न पाय थे PF & ESIC अंत तो govt. रॅकेट इस या व्हेरी स्मॉल थिंग तो him. इ आम सुरे हे विल म्हणजे इट properly.