एखादा विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचा ध्यास घेऊन लिखाण करणा-या लेखकांपैकी एक म्हणजे वामन होवाळ. आपल्या कथांच्या माध्यमातून दलित कथेला एक उंची प्राप्त करून देणा-या या लेखकाच्या आजवरच्या साहित्याचा आढावा घेणा-या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नुकताच पार पडला. त्याचाच हा वृत्तांत..
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन मराठीत जी काही साहित्यनिर्मिती झाली, ते साहित्य ‘दलित साहित्य’ म्हणून ओळखलं गेलं. आशय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टिकोनातून या साहित्याकडे पाहिलं तर प्रस्थापित व्यवस्थेनं केलेल्या अन्यायाचा जाब विचारण्याचं काम या साहित्यातून झाल्याचं दिसतं. बाबासाहेबांच्या विचारांशी बांधिलकी ठेवून लेखणीद्वारे आपल्या समाजाचा उद्धार करण्याचं असं व्रत घेणारे एक लेखक म्हणजे वामन होवाळ.
गेली पन्नास वर्ष कथालेखन करणा-या होवाळ यांनी नुकतंच वयाच्या पंचाहत्तरीत पदार्पण केलं. साहित्य लिखाणाला पन्नास र्वष आणि वयाची पंचाहत्तरी पूर्ण करणा-या होवाळांच्या आजवरच्या लेखनप्रवासाचा आढावा घेणा-या ‘आरस्पाणी-वामन होवाळ व्यक्तित्त्व आणि साहित्य’ या गौरवग्रंथाचं नुकतंच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं.
या ग्रंथाचं संपादन महेश केळुस्कर आणि सिसिलिया काव्र्हालो यांनी केलं आहे. मान्यवरांच्या हस्ते पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्यात उपस्थित वक्त्यांनी होवाळ यांच्या लिखाणावर आपली मतं मांडली. आशयसंपन्न कथा, वननाटय़ आणि कथाकथन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रवाहात मुशाफिरी करणा-या या लेखकाच्या आजवरच्या लेखनप्रवासाला उपस्थित वक्त्यांनी आपल्या भाषणातून उजाळा दिला.
होवाळ यांनी दलित साहित्यात काय योगदान दिलं आहे, या विषयावर शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. कृष्णा किरवले यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणामुळे कार्यक्रमाची रंजकता उत्तरोत्तर वाढत गेली. तमाशाचा अवकाश घेऊन कथानक सजवणा-या वामनरावांची कथा दु:खाचे अनेक पदर उलगडत जाणारी आहे. आंबेडकरी विचार आणि धर्मातराची पार्श्वभूमी बाजूला ठेवून त्यांच्या कथेबद्दल विचारच करता येणार नसल्याचंही किरवले म्हणाले. त्यांची कथा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा एक वेगळा टप्पा घेऊन उभी राहिलेली दिसते. या कथांमध्ये येणारा विनोद हसवण्यासाठी नसून तो वाचकाला अंतर्मुख करायला लावणारा असल्याचंही ते म्हणाले.
कुसुमाग्रजांचे मित्र आणि होवाळ यांची संपूर्ण कारकीर्द जवळून पाहणारे त्यांचे मित्र अरविंद इनामदार यांनी खास पोलिसी शैलीत केलेल्या भाषणाने उपस्थितांना हसवून सोडलं. माणूस माणसापासून दुरावत जात असतानाच्या या काळातही माणूसपण जपणारा हा साहित्यिक असल्याचं ते म्हणाले.
दलित असून दलितपणाचं भांडवल ते कधीही करत नाहीत. म्हणूनच महाराष्ट्राचा थोर कथाकार म्हणून त्यांना सन्मान मिळाला आहे, असे गौरवोद्गार सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला काढले. आज बाबासाहेबांच्या विचारांची चळवळ पुढे नेण्याची गरज असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. होवाळ यांच्या साहित्यातले छोटे शब्द आणि लहान वाक्यसुद्धा वाचकाला विचार करायला लावणारं आहे, या शब्दांत त्यांनी लेखकाचा गौरव केला.
होवाळ नेहमी दुस-यासाठी मागतात, असं सगळे जण नेहमी बोलतात, पण स्वत:साठी मागायला गेल्यावर देतच नाहीत, या वाक्याने मनोगताची सुरुवात करणा-या होवाळ यांनी यावेळी उपस्थितांना न्यूनगंड टाकून दिल्याशिवाय पुढे जाता येणार नसल्याचा सल्लाही दिला. याबरोबरच आजवर त्यांना साथ देणा-या विविध लोकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायलाही ते विसरले नाहीत. संपूर्ण कार्यक्रमात ‘होवाळांचा स्वभाव माणूस जोडणारा आहे’ या वाक्यांचा उल्लेख प्रत्येक वक्त्याच्या भाषणात आणि निवेदनातसुद्धा वेळोवेळी होत होता.
होवाळ हे खरंच माणसं जोडणारे आहेत, याचं उदाहरण कार्यक्रमातच पाहायला मिळालं. वामन होवाळ शाळेत असताना त्यांच्या पहिल्या कथेला दाद देणा-या त्यांच्या बाईंचा सत्कार करून आपण आजही त्यांना विसरलो नसल्याचं त्यांनी दाखवून दिलं. यावेळी होवाळांनी आत्मचरित्र लिहावं, अशी विनंती त्यांना करण्यात आली. ती मान्य करून मी लवकरच आत्मचरित्र लिहिणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. या प्रकाशन समारंभाला साहित्यिक नामदेव ढसाळांव्यतिरिक्त चळवळीतले अनेक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
VAMAN HOWAL IS GREAT WRITER & SPEKAR KATHA KAVITA & KADAMBARIKAR IN MARATHI LATERAL.