घर चालवणा-या कोणत्याही स्त्रीला त्या कुटुंबाचा आधार मानलं जातं. त्या घरातली प्रमुख स्त्रीच त्या कुटुंबाला परिपूर्ण आकार देत असते. आणि कुटुंबाला घडवणारी स्त्री ही नक्कीच समाज व देशासाठी काम करतानाही हे सर्व आपलंच आहे व ते उत्तमच झालं पाहिजे, अशा भावनेतून काम करत असते. आकाश टॅबचा प्रकल्पही डॉ. माधुरी सावंत यांनी अशाच तळमळीनं यशस्वीरीत्या तडीस नेला. या प्रकल्पाच्या यशानंतर त्यांच्याकडे आता राज्य सरकारच्या शैक्षणिक सल्लागारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियात कामाच्या निमित्ताने काही काळ राहतानाच मला भारतातील शाळांमधील शिकवण्याच्या पद्धती आणि बाहेरील देशातील शिक्षणपद्धती यांच्यातील फरक प्रकर्षाने जाणवला. आपल्याकडे शिकवताना खूप कठीण करून शिकवलं जातं, मात्र तसं बाहेरील देशात असत नाही. तिथे युझर फ्रेंडली माध्यम, पद्धती वापरून शिकवलं जातं. मी मुंबईच्या आयआयटीमधून केमिस्ट्रीची पीएचडी घेतल्यावर अनेक कॉर्पोरेट संस्थांसाठी काम केलं. माझ्या मनात तेव्हापासूनच या शिकवण्याच्या तंत्रांमध्ये काही बदल करता येतील काय, यावर विचारचक्र सुरू होतं. माझ्या वडिलांनी सोलापूरजवळच्या गावात शाळा सुरू केली होती. तिथल्या शिक्षणाचाही अनुभव मी पाहिला होता. पुढे अमेरिकेत नोकरीत असताना मला माझ्या शैक्षणिक विचारांच्या दृष्टीने विधायक व सर्वागीण काम करण्याची संधी मिळाली. भारतात एखादी संकल्पना राबवताना, त्या बीज संकल्पनेवर फारसा विचार केला जात नाही, तिचा विस्तार होत नाही व प्रामुख्याने ती कल्पना मूळ कोणासाठी असेल या दृष्टीने अभ्यास होत नाही.
त्यामुळे कित्येक चांगल्या कल्पनाही त्रुटी राहून यशस्वी होत नाहीत. त्यामुळेच मला वाटतं, आपल्याकडे शैक्षणिकदृष्टय़ा कमी स्तरातील लोकांपर्यंत किंवा कमी आकलन क्षमतेच्या विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या योजना पोहोचत नाहीत, ही इथली मूलभूत अडचण आहे. अडाणी भारतीय शेतक-याला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन बनवायचं आव्हान मी पेललं. शहरी माणसालाही जेव्हा मोबाइलची नुकतीच ओळख झाली होती, त्या काळात मोबाइल तंत्रज्ञानावर आधारित अॅप्लिकेशन शेतक-यांपर्यंत पोहोचवून, त्यात त्यांना तरबेज करायचं ही मोठीच कसोटी होती. या अॅप्लिकेशनद्वारे शेतक-यांनी त्यांच्या कृषीविषयक समस्या तज्ज्ञांना मोबाइलमधून मेसेज केल्यानंतर तज्ज्ञ त्यांना मोबाइलद्वारेच सल्ला-मार्गदर्शन करणार होते. या वेळी मी शेतक-यांचे हात हातात घेऊन त्यांच्या बोटांच्या ठशांचा अभ्यास करण्यापासून ते त्यांना मेसेजिंग शिकवण्यापर्यंत मेहनत केली व हे अॅप्लिकेशन उभारून यशस्वी करून दाखवलं. पुढे याच अॅप्लिकेशनचं अनुकरण करून रॉयटर्ससारख्या अनेक संस्थांनी शेतक-यांच्या हिताची मोबाइल अॅप्लिेकशन्स विकसित केली.
एखादी संकल्पना यशस्वी करायची असेल तर तिचा नुसताच प्रचार करणं, त्यात महागडं तंत्रज्ञान देणं पुरेसं नाही तर त्यावर आधारित उत्पादन, जनसामान्य पूर्ण क्षमतेने वापरू शकतील की नाही याचा अभ्यास होणं जरुरी असल्याचं मला त्या वेळी जाणवलं. शेतक-यांच्या अॅप्लिकेशनच्या वेळचा हा धडा मला आकाश टॅबचा प्रकल्प हाताळतानाही खूप उपयोगी पडला. टॅबसारखं तंत्रज्ञान भारतीय ग्रामीण विद्यार्थ्यांना काय समजणार, अशी या बहुआकांक्षी योजनेची कुचेष्टा होत होती. सरकार पैसा वाया घालवत आहे अशीही टीका झाली. मात्र माझ्या आयआयटीतल्या टीमनं आकाश टॅब यशस्वी करण्यासाठी दिवसरात्र अथक मेहनत केली. बौद्धिक कौशल्याचा कस लावला. मुख्य म्हणजे टॅब तयार झाल्यानंतर आम्ही तो पंढरपूरजवळच्या ग्रामीण भागातील एका शाळेतील विद्यार्थ्यांना देऊन, त्यांना तो हाताळता येतो का नाही याची पाहणी केली. सुदैवाने मोबाइल तंत्रज्ञानाची ओळख असलेल्या विद्यार्थ्यांनी आकाश टॅबला अपेक्षेपेक्षा कमी वेळात आत्मसात केलं. आज आकाश टॅब भारतातील ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हातात दिसतो आहे. मात्र या प्रकल्पावर काम करतानाच मला भारतीय शिक्षणपद्धतीत त्रुटी असल्याचा पडताळा देणारे अनुभव आले. आकाश टॅबच्या चाचण्या शिक्षक व विद्यार्थी या दोघांवरही करताना माझ्या लक्षात आलं की विद्यार्थी जेवढे झटपट तंत्रज्ञान शिकू शकतात त्या तुलनेत शिक्षक काहीच करू शकत नाहीत. आज आकाश टॅब वापरणारे विद्यार्थी मला स्वत: ईमेल करतात, मात्र असे शिक्षक एखाद् दुसरेच आहेत. तंत्रज्ञान किंवा नवीन पद्धत अवलंबण्यात शिक्षक मागे राहण्याचं कारण मूलभूत शिक्षण पद्धतीतच आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या शैक्षणिक सल्लागारपदी आल्यानंतर या शिकवण्याच्या तंत्रांमध्येच काही बदल घडवून आणता येतील का, यासाठी मी प्रयत्न करत आहे. राज्यभरातील ४८ हजार शिक्षकांचा डेटा आतापर्यंत माझ्याकडे आलेला आहे. या शिक्षकांनाच मुळात मुलांना कसं शिकवायचं याचं शिक्षण चुकीच्या पद्धतीने दिलं गेलं आहे. त्यामुळे स्वत:लाच न समजलेली गोष्ट, हे शिक्षक विद्यार्थ्यांनाही चुकीच्याच पद्धतीने शिकवतात किंवा शिकवूच शकत नाहीत. यावरच भर देऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या मूलभूत पद्धतींमध्ये बदल करण्याची शिफारस मी राज्य शासनाला केली आहे. यावरच सध्या माझं काम सुरू आहे. शिवाय राज्यातील विद्यार्थ्यांनी गणित व विज्ञानात हुशार व्हावं यासाठीही नव्या योजना आखल्या जात आहेत. एकूणच शिक्षणक्षेत्रात मला उदासीनता जाणवते आहे व ही मरगळ जीव नसलेल्या शिक्षणपद्धतींमुळे आली असावी. हे वातावरण आता बदललं पाहिजे.
राज्यात व एकूण देशातच महिलांची शिक्षणात टक्केवारी कमी आहे हेही आकाश टॅब प्रकल्पाच्या दरम्यान माझ्या लक्षात आलं. मुळात अनेक अडचणींमुळे मुली प्राथमिक व इतर शिक्षणात मागे राहतात. त्या अडचणी मी प्रत्यक्ष पाहिल्या आहेत. अवघ्या १५-१६व्या वर्षातच ग्रामीण भागात मुलींच्या पदरी मातृत्वाची जबाबदारी पडते याची मला खंत वाटते. मी या मुलींशी त्यांच्या अडचणींबाबत वेळोवेळी बोलले आहे, त्यांना मार्गदर्शन केलं आहे. नववी इयत्तेनंतर मुली त्यांच्या शारीरिक किंवा इतर अडचणींमुळे शिक्षण सोडून देतात. याचं प्रमाण ग्रामीण भागात जास्त आहे. मुलींचा शिक्षणातला टक्का वाढावा यासाठीही आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. त्यासाठी सुदृढ आरोग्यावर भर देणार आहोत. विद्यार्थ्यांचं आरोग्य उत्तम असेल तरच त्याला पुढे शिकण्याची, भविष्यात काहीतरी बनण्याची ऊर्मी येईल असं मला वाटतं. त्यामुळेच उत्तम स्वास्थ्याची सांगड ही उत्तम शिक्षणाशी घातली गेली पाहिजे. मी स्वत: चांगली अॅथलीट होते. मुलींना क्रिडा शिक्षणातही मागे ठेवलं जातं हेही मी अनुभवलं आहे. खेळणा-या मुलीचं स्वास्थ्य चांगलं असतं व ती शिक्षणातल्या अडचणींनाही तोंड देऊ शकते. म्हणून मुलींनी क्रिडाप्रकारांवरही भर दिला पाहिजे.
मीही गृहिणी आहे. माझी दोन मुलं आज उच्चशिक्षण घेऊन त्यांच्या करिअरमध्ये स्थिरावली आहेत. पण ती लहान असताना, आधुनिक काळातली स्त्री अष्टभुजा देवीसारखी एकाच वेळी नोकरी, कुटुंब, स्वयंपाक, मुलं अशा अनेक आघाडय़ांवर कशी लढते, हे सर्व मीही अनुभवलं आहे. भारतीयांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत भारतीय स्त्रीच्या हुन्नरांचा वापर होऊन तिचा विकास होणं अवघड असल्याचं माझं मत त्या वेळी आलेल्या अनुभवांतूनच तयार झालं आहे. मुळात घरात राबणा-या स्त्रीला तिच्या आवडी जोपासण्यासाठी कुटुंबाकडून पाठिंबा मिळत नसल्यामुळे, अगदी साध्या सुविधाही मिळत नसल्यामुळे तिच्या आशा-आकांक्षा आतमध्येच मरतात. अशा महिलांनी पुढे येण्यासाठी गावातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायतीसारख्या सरकारी माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करून घ्यावा असं मी सांगेन. महिलांच्या आरोग्याबाबत आपल्याकडे जागृती निर्माण होण्याची गरज आहे. अखेर देशातली स्त्री पुढे गेली तर त्याचा फायदा देशालाच होईल. देशातल्या स्त्रीचा विकास हा पर्यायाने देशाचाही विकास असतोच की.
very well written! there should be more sincere efforts on strengthening woman on all fronts! more people especially women should come forward.