‘आपल्याकडे रवी पुजारी व दाऊद इब्राहिमला एकवेळ नागरिक घाबरणार नाहीत; पण कुत्र्यांना घाबरतील, इतकी दहशत मुंब्य्रात कुत्र्यांची आहे,’असे विधान काही दिवसांपूर्वी कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत केले आणि विधानसभेचे या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले होते.
वरवर हे विधान मनोरंजक वाटण्याची शक्यता आहे; पण ठाण्यासह राज्यातील, देशातील शहरी व ग्रामीण भागात खेडोपाडी कुत्र्यांनी मांडलेल्या उच्छादाबाबत केलेले इतके विडंबनात्मक भाष्य दुसरे ते कुठले! मनुष्य शेतीवाडी, इतर व्यापार-उदीम करायला लागल्यानंतर मनातील अवास्तव भीती घालवण्यासाठी पाळीव कुत्रे बाळगू लागला.
आजही शहरी व ग्रामीण भागात असे पाळीव कुत्रे असतात. अनेकांच्या घरात हे कुत्रे जणू घरातील एका सदस्यासारखे राहतात, वावरतात. मालक ज्या गाडीतून फिरतो, पेहराव करतो अगदी तसेच किंवा त्याच्याच बरोबरीने पेहराव कुत्र्यांनाही केला जातो. पाश्चिमात्य देशात कुत्रे-कुत्रींच्या सौंदर्यस्पर्धा होतात. एवढेच काय त्यांच्या सौंदर्यप्रसाधनांचीही तजवीज केली जाते. या पाळीव प्राण्यांसाठी पाळणाघरेही आहेत. त्याचे फॅड ‘इंडिया’तील नवश्रीमंतापर्यंतही पोहोचले आहे. क्रांतिकारी कवी नामदेव ढसाळ यांनीही एक कुत्रा पाळला होता. ढसाळ जिथे जायचे तिथे हा कुत्राही त्यांच्यासोबत असायचा. अनेकदा या कुत्र्याला आईस्क्रीम पार्लरमध्ये नेऊन त्याला आईस्क्रीमही खाऊ घातलेले आहे. कुत्रा पाळणे, ही अनेक वर्षापासून चालत आलेली हौस आहे.
अशा चतुष्पादी प्राण्याचा त्रास ही आता मोठी समस्या बनू पाहत आहे. देशातील ६६८ जिल्ह्यांपैकी एक असलेल्या ठाण्यातील मुंब्रा परिसरातील मित्तल कंपाऊंडमधून भावाबरोबर शाळेत जाणा-या लहानग्याला कुत्र्यांनी अनेक चावे घेतले. पंधरडय़ापूर्वी मुंब्रा येथे नातेवाईकाच्या लग्नानिमित्त आलेल्या एका दांपत्याच्या अडीच वर्षाच्या चिमुरडय़ाचे लचके भटक्या कुत्र्याने तोडले होते. असे कुत्र्यांपासून जीवघेणे उपद्रव सुरूअसताना तळोजा येथील खुटारी गावात एका लहान मुलीचा कुत्रा चावल्याने मृत्यू झालेला आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे.
प्रगत आणि अप्रगत देशात कुत्र्यांची समस्या जटील होत आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रत्येक देशाचे कायदे आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा दिल्लीत आले होते. मानवंदना देण्याचा जो कार्यक्रम झाला त्यात एका भटक्या कुत्र्याने उपस्थिती लावून गोंधळ निर्माण केला. अखेर सुरक्षा अधिका-यांची कुत्र्याच्या बंदोबस्तासाठी चांगलीच तारांबळ उडाली. ‘अच्छे दिन’ आणण्याचे स्वप्न दाखवणा-या नरेंद्र मोदींसमोर देशातील भटकी कुत्री हे आगामी काळात नवनिर्माणातील अडसर ठरणार आहे; पण ज्यांच्या भूतदयेमुळे देशपातळीवर कुत्र्यांनी उच्छाद मांडला त्या मनेका गांधी तर मोदींच्या सरकारमध्ये मंत्री असल्याने गांधी यांना न दुखवता हा ज्वलंत प्रश्न हाती घेण्यासाठी मोदींना ‘मन की बात’ बोलावीच लागणार आहे.
ठाणे शहरातील दक्ष नागरिक सत्यजित शहा यांनी मध्यंतरी माहिती अधिका-याच्या माध्यमातून माहिती मागवली होती. त्यात १ जानेवारी २०१३ ते ३० एप्रिल २०१४ या कालावधीत ठाणे महापालिका परिसरात ४ हजार नागरिकांना श्वानदंश झाल्याची माहिती उघड झाली होती. दररोज सरासरी दहा श्वानदंशाच्या घटना घडतात. त्यानुसार देशपातळीवर अंदाज केल्यास वर्षाला एक कोटी नागरिकांना कुत्रे चावल्याचे निदर्शनाला येत आहेत. कुत्र्यांच्या पिळावळीला जबाबदार आहे त्यांचा वाढता जन्मदर नियंत्रणात न ठेवणे हे कारण. एक कुत्री वर्षाला १२ कुत्र्यांना जन्म देते. त्यातील सहा जगतात. यावरून कुत्र्यांची संख्या मानवासारखीच दिवसेंदिवस वाढत आहे. रोमानिया देशात भारतासारखी भटक्या कुत्र्यांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. या देशातील ‘बॅच्युरेस्ट’ या शहरातील एक आजीबाई नातवाला घेऊन बागेत बसली होती. तिच्या डोळ्याची पापणी लवते न लवते तोच कुत्र्यांनी त्या लहानग्याला पळवले. अनेक दिवसांनी पोलिसांना त्या मुलाचे छिन्नविछीन्न शव सापडले. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी मोर्चा काढून कुत्रे मारण्याची परवानगी द्या, असा टाहो फोडला.
नंतर या देशाच्या संसदेने भटक्या कुत्र्यांच्या सुखकर मृत्यूचे विधेयक मंजूर केले; पण तिकडच्या प्राणीमित्रांनी हे विधेयक अश्मयुगासारखे असल्याचे गळे काढायला सुरुवात केली तसेच सरकारलाच न्यायालयात खेचण्याचा प्रयत्नही केला. रोमानियासारखीच भारताची परिस्थिती आहे.
भारतात दरवर्षी ३५ हजार नागरिकांचा कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीज होऊन मृत्यू होतो. असा रेबीज होऊ नये म्हणून कुत्र्यांच्या पैदाशीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. त्याचबरोबर रस्त्यावरच्या चायनीजसह इतर मांसाहारी व शाकाहारी पदार्थ विकणा-या गाडय़ांवरही नियंत्रण येणे गरजेचे आहे. शहरी भागांसह ग्रामीण भागातही आता चायनीज पदार्थाचे पेव फुटले आहे. अनेकदा मांस खाल्यावर हाडे रस्त्यावर इतरत्र टाकून दिली जातात. मांसाहारामुळे कुत्रे हिंसक होतात. अनेक प्राणीमित्र भूतदयेपोटी कुत्र्यांना घरातील उरलेले अन्न व बिस्किटे, पाव देतात. त्यामुळे त्याचा मानसशास्त्रीय परिणाम असा होतो की, कोणीतरी आपले लाड पुरवणारे आहे.
एखाद्या वेळी प्राणीमित्रांकडून कुत्र्यांना वेळेत अन्न व तत्सम पदार्थ मिळाले नाही तर ते कासावीस होतात. पर्यायाने ते उपद्रव देऊ लागतात. भुंकत बसतात, येणा-या जाणा-यांच्या पिशव्या खेचण्याचा प्रयत्न करतात. काही खाद्यपदार्थ असेल म्हणून त्यांच्या मागेही लागतात. पोटाची आग शमवण्यासाठी मग ते सॉफ्ट टार्गेट शोधतात आणि घराबाहेर खेळणारी लहान मुले त्यांची शिकार होतात. भूतदया किती करावी, याचेही भान बाळगले पाहिजे. मांसाहारी पदार्थ शक्यतो कुत्र्यांना सरसकट सहज उपलब्ध होणार नाहीत, याचीही तजवीज त्या-त्या महापालिकांनी करणे आवश्यक आहे. सर्व परिस्थितीत कुत्र्यांची पिळावळ रोखणे, हाच एकमेव पर्याय आहे.
जगात कुत्र्यांच्या समस्येपासून वाचण्यासाठी किंबहुना या प्राण्यांचे वंशसातत्य रोखण्यासाठी निर्बिजीकरणाच्या शस्त्रक्रियेसाठी शेल्टर होमही उभारलेले आहेत. भारतात प्राण्यांच्या हत्येवर निर्बंध आणण्यासाठी १९६०चा ‘प्रिव्हेंशन ऑफ क्रु एलिटी टू अॅनिमल’ हा कायदा अस्तित्वात आहे. त्यात सुधारणा करून प्राणी संततिनियमन (कुत्रा) ‘रुल २००१’मध्ये केंद्राने केले. त्यानुसार संततिनियमन रुलचे पालन करण्यासाठी १८६०च्या सोसायटीज रेग्युलेशन कायद्याचा आधार घेत अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. या कायद्याच्या ‘कलम ५-अ’ नुसार स्थानिक पातळीवर महापालिका स्तरावर, जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्याचे निर्देश आहेत.
या समितीच्या माध्यमातून निर्बिजीकरण कार्यक्रम, निर्बिजीकरण केलेल्या प्राण्यांसाठी शेल्टर बांधण्याच्या सूचना केलेल्या आहेत. मुंबई महापालिकेसह राज्यातील कोणत्याच महापालिकांनी त्याची दखल न घेतल्याने याबाबत प्राणीमित्र संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. नंतर न्यायालयाने मुंबई महापालिकेला शेल्टर होमसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. त्यानुसार सरकारने वाडा व पालघर तालुक्यात या शेल्टर होमसाठी जागाही देऊ केली; पण या परिसरातील नागरिकांचा त्याला विरोध आहे. पाळीव प्राणी म्हणून कुत्र्याकडे पाहिले जायचे; पण गेल्या काही वर्षापासून हा प्राणी नागरिकांना नकोसा झाला आहे. भटक्या कुत्र्याला मायेने साद घातली तर तो येतो; पण काही खाद्यपदार्थ मिळणार नसेल तर तो भुंकतो.
कुत्र्यात हा स्वार्थीपणा भरण्यास मानवही तितकाच जबाबदार आहे आणि तितकीच यंत्रणा. एकमेकांवर दोषारोप करून हा गहन प्रश्न कधीही संपणारा नाही. पोटात दुखायला लागल्यानंतर अॅपेंडिक्स काढून टाकण्याचा पर्याय असतो. ते कुरवाळले तर त्रास होणारच! कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवरही असाच उपाय शोधणे गरजेचे आहे. अन्यथा आधाराची अपेक्षा असणारे कुत्रे दहशतच निर्माण करत राहतील.
कुत्र्यांना पकडा संजय गांधी उद्यानात नेउन सोडा.मनेका गांधी खुश होतील.कुत्र्यांना उद्यानात ठेवल्या बद्दल.संजय गांधी मनेका गांधींचे कैलास वाशी पतींचे नाव आहे.