दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेना-भाजपामध्ये चांगलीच जुंपली आहे.
मुंबई – दिल्लीत भाजपाचा झालेला पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचाच आहे. लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिले आहे, अशी खोचक प्रतिक्रिया देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला डिवचले आहे.
भाजपाच्या गळय़ात गळा घालून एकीकडे सत्तेची गोड फळे चाखत असताना दुसरीकडे मित्राच्या पराभवाचा आनंद उद्धव ठाकरे यांच्या चेह-यावर ओसंडून वाहत आहे.
दिल्लीत भाजपाचा पराभव झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावली. देशाच्या लोकशाहीचे आणि दिल्लीच्या जनतेचे कौतुक वाटते असे सांगून ते म्हणाले की, लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते हेही या निकालावरून दिसून आले आहे. जनता हीच सर्वोच्च स्थानी असून जनतेला कधीच गृहीत धरू नका. तुम्हाला पाहिजे तशी जनता वागणार नाही.
जनतेला पाहिजे तेच जनता करणार, हे सर्वानी ध्यानात घ्यावे. देशातील जनता किती अस्वस्थ होती हेही या निकालावरून दिसून आले. लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील निकाल पाहा आणि आत्ताचे निकाल पाहा. दिल्लीची जनता कोणत्याही दबावाला आणि आमिषाला बळी पडली नाही, हे त्यांनी दाखवून दिले आहे, हे माझ्यासकट सर्व राजकीय पक्षांनी लक्षात घेतले पाहिजे.
त्यामुळे यापुढे दिलेले शब्द पाळा, घोषणांची अंमलबजावणी करा, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला. एकहाती सत्ता आणणा-या अरविंद केजरीवाल यांचे उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन करून भाजपाच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करायची असेल तर पहिल्यांदा सत्तेतून बाहेर पडा, असा सणसणीत टोला भाजपाने उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका आम्ही सहन करणार नाही, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे.
महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा यांनी मिळून सत्ता स्थापन केलेली असली तरी या दोन्ही पक्षांतून आडवा विस्तव जात नाही. शिवसेनाला सत्तेत सामावून घेतले असले तरी त्यांना दिलेली मंत्रीपदे अत्यंत किरकोळ आहेत. जी खाती दिली आहेत, त्यांना मोकळेपणाने कामही करू दिले जात नाही. म्हणूनच शिवसेनेमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. तरीही सत्तेचा मोह सुटत नसल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.
म्हणूनच दिल्लीच्या पराभवानंतर सर्व मळमळ बाहेर पडली आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेतृत्वावर जोरदार टीका केली. मात्र ही टीका भाजपाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला जोरदार उत्तर दिले आहे. नरेंद्र मोदी भाजपाचे सर्वश्रेष्ठ नेते आहेत आणि अमित शहा पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावरील टीका आम्ही सहन करणार नाही. ज्यांना टीका करायची असेल त्यांनी सत्तेतून बाहेर पडायचे धाडस दाखवावे, असा टोला शेलार यांनी लगावला आहे.
हिम्मत असेल तर भाजपने सेनेला सत्तेतून बाहेर काढावे, ते त्यांच्या हातात आहे.