राज्यातील सर्वात उंच शिखर गणलं जाणा-या कळसुबाई शिखरावर लग्न करण्याचा विक्रम केल्याबद्दल आमचं अभिनंदन करणारे फोन अनेक ठिकाणांहून आले. अगदी वृत्तपत्रं व टीव्हीसारख्या प्रसारमाध्यमांनीही याची दखल घेतली. या लग्नासाठी भटजीसह अगदी पाहुण्या मंडळींपर्यंत सर्वच जण उंच शिखरावर पोहोचले होते. या आगळ्यावेगळ्या लग्नाची ही गोष्ट..
‘‘अरे वा, अभिनंदन! लग्न कुठे मग?’’ या एका प्रश्नाच्या आम्ही दिलेल्या उत्तरावर समोरचा माणूस अवाक् व्हायचा व पुढे प्रश्नांची सरबत्ती सुरू व्हायची. त्यानंतर समोरच्याला लग्न खरंच कळसुबाई डोंगरावर आहे हे पटवून देताना आमची पुरेवाट व्हायची. झालं असं की मी आणि विवेक पाटील, असे आम्ही दोन ट्रेकवेडे एका ट्रेक दरम्यानच दोन वर्षापूर्वी भेटलो.
आमच्या ट्रेकिंगवरच्या प्रेमामुळे एकत्र बांधलो गेलो. नंतर अनेक किल्ले-डोंगरांचे ट्रेक आम्ही एकत्र केले. डोंगरावर भेटलो तर लग्नही डोंगरावर करू आणि मग जर डोंगरावरच लग्न करायचं असेल, तर मग महाराष्ट्रातलं १६४६ मीटर उंच सर्वोच्च शिखर कळसुबाई का नको? असा विचार करत असताना ‘कळसुबाई’वर आमचं शिक्कामोर्तब झालं. तसंच या नव्या नात्याची सुरुवात निसर्गाच्या साक्षीने करावी, असं कुठंतरी मनात होतं. मग असं ठरलं की, आयुष्यातलं हे महत्त्वाचं शिखर आपण सर करायचं महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर ‘कळसुबाई’वर!
सुरुवातीला कुणाचाच यावर विश्वास बसत नव्हता. सगळ्यात मोठ्ठं आव्हान होतं ते म्हणजे घरच्यांची समजूत घालणं. सुरुवातीचे ७-८ महिने त्यातच गेले. फिरण्यासाठी ट्रेकला जाणं ठीक आहे. पण लग्न डोंगरावर लावायचं आणि तेही कळसुबाईसारख्या सर्वात उंच शिखरावर! कसं होणार सगळं? हे सगळं सर्वाना पटवून सांगता सांगता ‘मिशन कळसुबाई’ आकार घेत गेलं. कळसुबाईवरून पहाटे सूर्योदय पाहण्याचं स्वर्गसुख आणि रोमांचक थंडी सर्वाना अनुभवता यावी या हेतूने आखणी सुरू झाली.
खरं पाहता, कळसुबाईवर अगदी टॉपला कसलीच व्यवस्था नाही किंवा वाहनेही वपर्यंत नेता येत नाहीत. पायी चढण्याशिवाय तिथं कोणताच पर्याय नाही. नेहमीच्या ट्रेकर्ससाठी ही तशी फारशी कठीण चढाई नसली, तरी लग्नाला येणाऱ्यांपैकी ७० टक्के लोक हे अननुभवी असणार होते. अशा परिस्थितीत एवढय़ा लोकांना सुरक्षितपणे वर नेणं, त्यांची जेवणाची-राहण्याची सोय करणं, सगळे लग्नविधी करणं आणि त्यासाठी भटजी शोधणं अशा एक ना अनेक समस्या समोर होत्या. आमचं ‘मिशन कळसुबाई’ हे कसं ‘मिशन इम्पॉसिबल’ आहे, हे सुरुवातीला प्रत्येक जण वेगवेगळ्या त-हेने, अगदी इमोशनल ब्लॅकमेिलग करत सांगू पाहायचा.
पण आम्हीही काही कमी नव्हतो. ‘खाईन तर तुपाशीच’ या उक्तीप्रमाणे ‘लग्न करू तर कळसुबाईवरच’ असं दोघांच्याही मनात पक्कं होतं! हे करूनच दाखवू असं म्हणत आम्ही हे आव्हान स्वीकारलं. लग्नासाठीच्या कामांची, वस्तूंची यादी बनवली आणि सुरू झालं पुढचं प्लॅनिग!
संपूर्ण लग्नाचा कार्यक्रम लक्षात घेता एका दिवसात सगळं होणं शक्य नव्हतं. कळसुबाईवरून सूर्योदय पाहण्याचं स्वर्गसुख आणि तिथली हुडहुडी थंडी सर्वाना अनुभवता यावी या हेतूने आदल्या रात्री डोंगरावर राहून दुस-या दिवशी पहाटे ब्राह्ममुहूर्तावर लग्न करावं अशी कल्पना समोर आली. सगळ्यात आधी कळसुबाईला जाऊन कुठे तळ ठोकता येईल ते पाहून आलो. बेस गावातल्या आवस्करांना भेटून त्यांच्यासमोर संपूर्ण कल्पना मांडली. त्यांनी इतर गावकऱ्यांच्या मदतीने जेवण आणि राहण्याकरिता तंबू पोहोचवण्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दाखवली.
त्यामुळे तिथल्या व्यवस्थेच्या दृष्टीने एक प्रश्न सुटला होता. पुढचा प्रश्न होता तो म्हणजे भटजीचा! आता लग्न म्हटल्यावर विधी आलेच व विधी म्हणजे भटजी हवा! एवढय़ा उंचावर लग्न लावण्यासाठी कुठचा भटजी तयार होईल? पण वेस्वीकर गुरुजी कोणतेही आढेवेढे न घेता आमच्या मदतीला धावून आले. त्यांचा हा पहिला ट्रेक असणार होता. लग्नाआधीचे १०-१५ दिवस त्यांनीही चालण्याचा-पळण्याचा सराव केला. मग २७ डिसेंबर २०१४चा शनिवार आम्ही तारीख म्हणून पक्का केला. ई-आमंत्रणं पाठवली गेली, काय-कधी-कुठे- कसं अशा चर्चा चालू झाल्या.
दुपारी अडीच वाजता सगळ्यांनी कसा-यापुढे असलेल्या बेस व्हिलेज बारी इथं एकत्र जमायचं, असं ठरलं. तिथं पोहोचण्याचे सर्व मार्ग, अगदी नकाशा आणि रेल्वे गाडय़ांच्या वेळापत्रकासहित सर्वाना पाठवले. तिथलं दोन दिवसांचं वेळापत्रक, सोबत आणायच्या गोष्टी, काय काळजी घ्यावी याच्या अनेक सूचनाही ईमेल-व्हॉट्स अॅपद्वारे देण्यात आल्या होत्या. साधारण दीडशे लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून (अगदी मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूरहून) वेगवेगळ्या वेळी येणार होते. १५-२० जणांचे ग्रुप केले. प्रत्येक ग्रुपमध्ये वाट माहिती असलेला असा एक जण सोबत होता.
कुणाला काही दुखापत झाल्यास गरसोय होऊ नये याकरिता दोन डॉक्टर्स आणि मेडिकल कीट घेतले होते. कळसुबाईवर अगदी टॉपला कसलीच व्यवस्था नसल्याने सर्व सामानासहित वर चढणे, हे एक दिव्य होतं. अंथरूणं-पांघरूणं, स्वेटर -जॅकेट्स, लग्नासाठीचे कपडे, लग्नाच्या विधींचे सामान आणि बरंच काही इतर सामान बरोबर होतं. थोडं थांबत, धापा टाकत मजल दरमजल करत वऱ्हाडी मंडळी आगेकूच करत होती. आणखी थोडं चाला, अजून ५ मिनिटे फक्त चढा असं करत करत अखेर साडेचार-पाच तासांच्या चढाईनंतर थकले- भागले सारे जीव वर पोहोचले.
साधारण १५० लोक असल्यामुळे अगदी शिखरावर एवढय़ा लोकांसाठी तंबू लावणे अथवा व्यवस्था करणे शक्य नसल्यामुळे रात्री थोडा खालीच तळ ठोकावा, असं ठरलं आणि पहाटे उठून शिखरावर लग्नसमारंभासाठी पोहोचायचं असं ठरलं. आम्ही वर पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे सात वाजून गेले होते. एव्हाना थंडी सुरू झाली होती. सगळ्यांचे स्वेटर, मफलर्स बॅगेतून बाहेर पडू लागले. थोडं फ्रेश होऊन चहाचा आस्वाद घेतल्यानंतर सगळे एकत्र जमलो, हळदीच्या कार्यक्रमासाठी! हळदीसाठी आम्ही साडी-सद-यामध्ये तयार झालो. छोटय़ा मैदानात सतरंजी अंथरूण इ. सामान मांडले गेले.
वेस्वीकर भटजींचे सुरेल मंत्रोच्चार, मित्रमैत्रिणींची धम्माल डायलॉगबाजी, हशा-टाळ्या आणि हळदीच्या गाण्यांनी कार्यक्रम चांगलाच रंगला. शिवाय डोंगरावर ‘किती आवाज-गोंधळ आहे हा..’ असं म्हणणारंही कोणी नव्हतं. मग आमच्यातल्या काही जणांनी चुलीवर सर्वासाठी खिचडी बनवली. ते गरमागरम अन्न पोटात जाताच काही जण विश्रांतीकरता तंबूकडे वळले तर काही जण शेकोटीकडे!
४-५ डिग्री अंशाच्या थंडीत झोप लागणं शक्यच नव्हतं. सगळे जण सकाळ कधी होतेय याची वाट पाहत होते. अखेर ‘तो’ रविवारचा दिवस उजाडला. २८ डिसेंबरच्या पहाटे साडेचारला तंबूमध्ये टॉर्चच्या उजेडात लग्नाची तयारी सुरू केली. मी नऊवारी साडीत आणि विवेक पगडी-धोतर नेसून, असे पेशवाई थाटाच्या पारंपरिक वस्त्र-आभूषणांनी आम्ही दोघेही लग्नासाठी सज्ज झालो. बोचणारी थंडी आणि त्यात सोसाटयांचा वारा यामुळे सगळे गारठून गेले होते. आम्ही दोघे सोडलो तर बाकी कुणीही स्वेटर-जॅकेट्समधून बाहेर पडायला तयार नव्हते. मग गरम चहा घेतल्यावर सर्वाना थोडी तरतरी आली. शेवटच्या चढाईचा छोटा टप्पा पार करून आम्ही शिखरावर पोहोचलो. क्षितिजावर नुकतंच तांबडं फुटायला लागलं होतं.
दाट धुक्याच्या चादरीतून डोंगररांगा हळूहळू डोकं वर काढत होत्या. अतिशय नयनरम्य देखावा! स्वर्ग असाच असावा बहुतेक! विवाहस्थळाच्या सजावटीसाठी निसर्गाने आकाशात अप्रतिम रंगांची उधळण केली होती. आधी देवी कळसुबाईचे दर्शन घेतले आणि पहाटे साडेपाचला उगवत्या सूर्यनारायणाच्या साक्षीने, महाराष्ट्रातल्या सर्वोच्च शिखरावर, आम्ही दोन ट्रेकर्सनी एकमेकांना आयुष्यभर (खरं तर खूप ट्रेक्स करण्यासाठी) साथ देण्याचं वचन दिलं. मंगलाष्टकं, सप्तपदी, होमहवन असे कोणतेही लग्नविधी न वगळता, वर चढू शकलेल्या कुटुंबीय-आप्तेष्ट व गिरीप्रेमी मित्रपरिवाराच्या उपस्थितीत, आम्ही संपूर्ण विधिवत लग्नबंधनात अडकलो. यावेळी जो आनंद झाला तो शब्दात व्यक्त करता येणार नाही.
त्यानंतर चहा-पोह्यांची पोटात थोडी भर पडल्यानंतर सर्वानी उतरायला सुरुवात केली. एवढं सगळं धाडस कमी होतं की काय म्हणून उतरताना आम्ही लग्नवेशातच उतरायचं ठरवलं. नऊवारी साडी-धोती, पाठीवर ट्रेक बॅग आणि पायात ट्रेकिंग शूज अशा वेषात आम्ही उतरलो. हे करण्यातलं थ्रिल काही वेगळंच होतं! उतरताना वाटेत भेटलेल्या सगळ्या ट्रेकर्स ग्रुपनी आश्चर्य आणि कौतुकभरल्या नजरांनी आम्हाला खूप शुभेच्छा दिल्या. बेस गाव बारीमध्ये आवस्कर यांनी दारात मांडव घातला होता. मांडवात लग्नाच्या जेवणाचा आस्वाद घेऊन सर्वाचा परतीचा प्रवास सुरू झाला.
ट्रेकिंगवर असलेल्या आमच्या प्रेमापोटी आम्ही लग्न कळसुबाई शिखरावर करण्याचा निर्णय घेतला होता, तरी आजच्या धकाधकीच्या जीवनात घडय़ाळाच्या काटय़ावर पळणा-या आणि सुखसोयींच्या अधीन झालेल्या मित्र-आप्तेष्टांनी आपापल्या ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर येऊन निसर्गाच्या सानिध्यातील मजा अनुभवावी हेदेखील त्यामागचं प्रयोजन होतं, ज्याला खरंच यश मिळालं. लग्नामुळे मिळालेल्या उत्साहात आमचा ‘ट्रेकलव्हर्स’ ग्रुप पुढच्या ट्रेकच्या तयारीला सुद्धा लागलाय!
नांदा सौख्य भरे ! वधू वरास हार्दिक शुभेच्छा !!!