नववर्षाचं स्वागत करून आम्ही तंबूत विश्रांती घेत होतो. सर्वत्र शांतता होती. पण झोप लागत नव्हती.. रात्री दोन वाजता या शांततेची कोंडी फुटली. गडाचा माथा एकदम प्रकाशमान भासू लागला. सर्व गड प्रकाशात न्हाऊन निघाला. आम्ही भांबावल्या स्थितीत वर गडाच्या माथ्यावर पाहात होतो. कडाकड आवाज करत गड जळत होता. गडावर सुक्या गवतांचे प्रचंड रान माजले होते. ते आता आगीच्या भक्ष्यस्थानी पडत होते. पाहतो तो काय ते तीन बदमाश टारगट गडावरील सुक्या गवताला आग लावत लावत ओरडत, किंचाळत गड उतरून खाली येत होते.
जागतिक नववर्षाच्या दिनी दरवर्षी आमचा ग्रुप नववर्ष साजरे करण्यासाठी कोणत्याही गडावर जातोच जातो. हा नियम आम्ही बरीच वष्रे नित्यनियमाने पाळतो आहोत. या वर्षी आमच्या ‘ध्येय ग्रुपने’ ३१ डिसेंबर २०१६ला पद्मदुर्ग व १-१-२०१७ ला नववर्षी रविवारी सरसगडाचा कार्यक्रम आखला होता. विरार व ठाण्यावरून येणारे एकूण आम्ही नऊ सहकारी होतो. एकूण चार मुली श्वेता बंडबे, सोनल बंडबे, नेहा गोहील, अपर्णा मोरे व चारमुले सचिन हुलमुख, सुनील माने, अमर मणीकर, आनंद कोकाटे व मी. सर्वात ज्येष्ठ व वयस्क मीच होतो.
शनिवारी पहाटे चार वाजता खासगी वाहनाने विरारहून ठाणे माग्रे सर्वाना सोबत घेऊन प्रथम आम्ही मुरूडला पोहचून दुपारी पाटलाच्या उपाहारगृहात पोटभर जेऊन पद्मदुर्ग पाहण्यास निघालो. पद्मदुर्ग पाहण्यासाठी मी सारी व्यवस्था करून ठेवलेली होती. आम्ही मुरूड येथे येऊन पोहोचलो हे पद्मदुर्गावर घेऊन जाणारे बोटवाल्या दादांना मी फोन करून कळवले. ते धावत पाटलाच्या खानवळीत आम्हाला भेटायला आले. येताच त्यांनी आमच्यावर निराशेचा बॉम्बगोळा टाकाला की, नववर्षाच्या दिनी अतिउत्साही पर्यटक गडावर जाऊन गडाचा नाश करतात. नशापाणी, दारू पिऊन धिंगाणा घालतात.
तसेच सध्या गडावरून कोणीतरी एक तोफ चोरून नेली आहे. म्हणून पुरातत्त्व विभाग व पोलिसांनी आम्हाला गडावर जाण्यास बंदी घातली आहे. पकडले तर बोट जप्त करून जेलमध्ये टाकू अशी धमकी दिली आहे. तरी तुम्हाला आम्ही पद्मदुर्गावर घेऊन जाऊ शकत नाही. पण आम्ही त्यांना पुरून उरलो. पद्मदुर्ग पाहायचा म्हणजे पाहायचाच. आम्ही त्या बोटवाल्या दादांचा अगदी पिच्छा पुरवला. शेवटी त्या दादांनी दुस-या एका बोटवाल्याला तयार करून त्या बोटवाल्याने जीवावर उदार होऊन आमची पद्मदुर्ग पाहण्याची मनीषा पूर्ण केली.
पद्मदुर्ग पाहून मुरूडहून आनंदाने संध्याकाळी सहा वाजता आम्ही पालीला प्रयाण केले. सगळे आनंदीत होते. रात्री आठच्या आसपास नागोठणे माग्रे पालीला पोहोचून प्रथम आम्ही गजाननाचे पालीच्या बल्लाळेवराचे दर्शन घेतले. येथेच रात्रीचे जेवण आटोपून रात्री दहा वाजता सरसगडावर जाण्यासाठी सिद्ध झालो. थंडीचे दिवस असल्यामुळे वातावरणात प्रचंड गारठा होता. रात्रीचा ट्रेक असल्यामुळे सारेच रोमांचित झाले होते. पालीच्या मंदिराच्या जरा बाजूंनीच सरसगडावर जाणारी वाट होती.
एक दिवस अगोदरच अमावस्या असल्यामुळे आसमंतात काळाकुट्ट अंधार पसरला होता. सर्वाकडे विजे-या असूनही समोरचे, काही हातावरचे काहीच दिसत नव्हते. आमची सुरुवातच एवढी झोकात झाली की, सरसगडाच्या वाटेने जाताना डाव्या हाताला सरळ स्मशानातच येऊन ठेपलो. मी सरसगड दोन वेळा पाहिला होता. म्हणून मीच ट्रेक लीड करत होतो. पुढे मी व माझ्यासोबत एक सहकारी, मध्ये चारही मुली व पाठी तीन तरुण मुले. पण जाता, येता महत्त्वाची पिछाडी सांभाळली ती सचिनने. आमची वरात स्मशानात लोखंडी सरणाने अडवताच सर्वाना विजे-याच्या उजेडात स्मशानाचे लोखंडी खांबाचे स्ट्रक्चर दिसले, ते पाहून मला सर्वानी विचारले हे काय आहे काका? मी सगळय़ांना निरागसपणे तत्पर उत्तर दिले, आपण स्मशानात येऊन पोहोचलोय.
स्मशान म्हणताच माझ्या सा-या तरुण सहका-यांनी त्या दाट, रात्रीच्या निरव शांततेत, गर्द रानात, काळोख्या रात्री खो खो पोट धरून हसून हास्याचा फवारा उडवून आसमंतात धमाल उडवून दिली. असे जिगरबाज होते आमचे सहकारी. त्या भूतनाथाचे दर्शन घेऊन पाठी फिरून शेवटी योग्य वाट शोधून गडाच्या वाटेवर लागलो. उभी, निसरडी, ब-याच ठिकाणची अवघड वाटेची चढण चढून मधे न थांबता आम्ही सरसगडाच्या मुख्य पाय-यांखाली येऊन पोहचलो तेव्हा सारेच प्रचंड थकले होते. रात्रीचे अकरा वाजले होते. आता शेवटचा टप्पा उरला होता. पण पाय-या वर चढून जाण्याचे त्राणही उरले नव्हते. सगळे म्हणू लागले येथेच तंबू लावूया. सकाळी गडावर जाऊया. पण मला थोडा-बहुत या गडांचा बरा, वाईट अनुभव माझ्या गाठीशी होता. मी सगळय़ांना निक्षून सांगितले, येथे मधेच राहायचे नाही.
एकदाचे गड प्रवेश करूया म्हणजे आपली सारी चिंता त्या सरसगडाच्या स्वामी केदारेश्वराला. त्या मध्यरात्री माझ्या शब्दाला मान देऊन सा-यांनी दमलेल्या स्थितीत सरसगडाच्या त्या अवघड, प्रचंड ९६ पाय-या चढून गडप्रवेश केला. दरवाजाच्या वरच पहिल्या बुरुजाच्या माथ्यावरच घाईघाईत प्रथम एकच टेन्ट उभारला. कारण मध्यरात्रीचे बारा वाजायला आले होते. आम्हाला गडावरून पाली गावातील फटाक्यांची आतषबाजी पाहायची होती. जागतिक कालचक्राचे नवीन वर्ष अवतरण्यास काही मिनिटेच शेष होती. शेवटी एकदाचे सा-या जगाचे बारा वाजताच सगळ्यांनी आपापल्या परीने हा सोहळा साजरा केला.
आमच्या सहका-यांनी पाली गावातील या सोहळ्याचे गडावरून छायाचित्रण केले. काही मिनिटांचा हा कार्यक्रम संपताच सा-यांना थकल्याची जाणीव होताच उर्वरित दोन तंबू उभारून सारे तीन टेण्टमध्ये विश्राम करण्यास गेलो. पण झोप कोणालाच येत नव्हती. या सा-या धावपळीत रात्रीचा एक वाजायला आला होता. गडावर किट्ट काळोख होता. गार वा-यांनी हुडहुडी भरत होती. अमर व सुनील गप्पा मारत बाहेर मोकळ्या वातावरणात उभे होते. एवढयात अमर माझ्या टेण्टजवळ येऊन मला हळूच म्हणाला काका खालून आरडाओरडा करत कोणीतरी येत आहेत.
आम्ही सारे लगेचच टेण्टच्या बाहेर येऊन कानोस घेऊ लागलो. बरेच जण अश्लील शिव्या देत ओरडत, किंचाळत बेभानपणे शांत वातावरण ढवळून काढत वर येत होते. प्रथम आम्ही चौघी मुलींना टेण्टमध्ये पाठवले आणि आम्ही कोण येतोय याची वाट पाहात सोबत आणलेल्या काठया हातात घेऊन गडाच्या दरवाजाच्या समोरच उभे राहिलो. काही अवधीतच तीन टारगट तरुण दारूच्या नशेत अचकट, विचकट बडबडत, ओरडत आमच्या समोर येऊन पोहोचले.
माझ्या हातातल्या विजेरीचा प्रकाश मी त्यांच्या तोंडावर टाकताच मला दम देऊन विजेरी बंद करण्यास संगितली. मी विजेरीचे तोंड दुसरीकडे वळवले; पण विजेरी बंद केली नाही. आमच्या समोरूनच आमच्याकडे पाहात पाहात वर गडाकडे निघून गेले. वर जाताना बराच वेळ त्यांचा आवाज येत होता.
हळूहळू आवाज कमी होत जाऊन ऐकू येईनासा झाला. त्यांचा तो अवतार पाहून मात्र आम्ही सजग, सावध झालो. त्या टारगटांचा बेरंग पाहून आमची झोप व थकवा गडप झाला होता. नंतर एक तास मात्र प्रचंड शांततेत गेला. आणि रात्री दोन वाजता या शांततेची कोंडी फुटली. गडाचा माथा एकदम प्रकाशमान भासू लागला. सर्व गड प्रकाशात न्हाऊन निघाला. आम्ही भांबावल्या स्थितीत वर गडाच्या माथ्यावर पाहात होतो. कडाकड आवाज करत गड जळत होता. गडावर सुक्या गवतांचे प्रचंड रान माजले होते. ते आता आगीच्या भक्ष्यस्थानी पडत होते.
पाहतो तो काय, ते तीन बदमाश टारगट गडावरील सुक्या गवताला आग लावत लावत ओरडत, किंचाळत गड उतरून खाली येत होते. आम्ही लगेचच मुलींना टेण्टमध्ये सुरक्षाकवच करून आम्ही हातात काठया घेऊन मी, सुनील व सचिन झाडीत, दगडाच्या आडोशाला लपून बसलो. अमर व आनंद हातात दगड घेऊन तंबूच्या पाठी लपून आम्ही त्या टारगटांवर लक्ष ठेऊन होतो. त्या टारगटांची पुढची अॅक्शन काय होती याची वाट पाहात आम्ही होतो. तेवढयात आग लावत लावत ते आमच्या तंबूपर्यंत येऊन पोहोचले.
आमच्या तंबूकडे पाहात शिव्या देत ते बोलत होते. झोपले वाटते.. त्यांना आम्ही दिसत नव्हतो. पण आम्ही त्यांना स्पष्ट पाहात होतो. तेवढयात त्यातील एक जण म्हणाला, पेटव तंबू पण! त्या वाक्यासरशी सुनील माने झाडीतून बाहेर येऊन त्यांच्या अंगावर धावून गेला. सुनीलच्या मागोमाग आम्ही सारे प्रकट होऊन त्या टारगटांसमोर येताच ते चांगलेच गांगरले. सुनीलने त्यांना दरडावत आग का लावली? म्हणून प्रश्न करताच ते भांबावले. आमचा अवतार पाहून त्यांनी तेथून लगेचच काढता पाय घेतला. सुनील व सचिन त्यांच्या मागावर जायला निघताच मी त्या दोघांना थांबवले.
‘मध्यरात्रीची वेळ होती, सोबत तरुण मुली होत्या. त्यांची जबाबदारी आमच्यावर होती. गडावर या वेळी आमच्या शिवाय दुसरे कोणीच नव्हते.’ जरासा गड उतरून जाताच त्या तीन टारगटांनी आम्हाला शिव्या देत धमकीच दिली. आम्ही अजून माणसे घेऊन येतो. मग तुमची वाट लावतो. आता मात्र प्रकरण गंभीर वळण घेऊ पाहात होते. वा-यावर फरफर करत आग आमच्यापर्यंत येऊन पोहोचली होती. सारा गड आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. आमचे तिन्ही टेण्ट जळून जाणार यात शंकाच नव्हती. सर्वप्रथम अमरला व आनंदला मुलींच्या सोबत ठेऊन आम्ही तिघांनी वेगवेगळ्या ठिकाणी काठीने आगीला झोडपण्यास सुरुवात केली. पण आग आटोक्यात येत नव्हती.
आमची आगीसोबत अर्धा तास झोंबाझोंबी सुरू होती आणि केदारेश्वराला आमची दया आली असावी. आमच्या प्रयत्नांना यश आले. हळूहळू आग विझून आटोक्यात येऊन पूर्णपणे विझली. आम्ही पार थकून गेलो होतो. मुलीही झाल्या प्रकाराने प्रचंड भेदरल्या होत्या. आम्ही सारे जागता पहारा देत होतो. जरा कुठे खुट्ट झाले की सगळ्यांच्या विजे-या पेटवून प्रतिकारास सज्ज होत होतो. पहाटेचे चार वाजले तेव्हा सचिन व इतरांना मी म्हणालो, आता तुम्ही थोडा वेळ झोपा, आता घाबरण्याचे कारण नाही. कारण सृष्टीचा नियम आहे.
पहाटे तीन ते सकाळचे सहा हा देवप्रहर असतो, या वेळी काळोखात काळ्या कारवाई करणा-या शक्ती निस्तेज झालेल्या असतात आणि हा सत्य अनुभव नरभक्षक वाघांचा प्रख्यात शिकारी जिम कॉब्रेट याने आपल्या ‘रूद्रप्रयागचा नरभक्षक’ या पुस्तकात कथन केलेला आहे. पण कोणीच झोपले नाही. काहीतरी भयंकर घडणार म्हणून जीव मुठीत घेऊन सारे बसलो होतो. बरोबर चार वजता खालून ब-याच विजे-यांचा प्रकाश आम्हाला पाहायला मिळाला, सोबत ब-याच जणांचे आवाज ऐकू येऊ लागले. त्या थंडीतही आम्हाला दरदरून घाम फुटला.
आता काहीतरी भयंकर घडणार या कल्पनेने सर्वात प्रथम मुलींना सावध करून सावध राहण्यास सांगितले. हळूहळू खालून वर येणा-यांत मुलींचा आवाज ऐकू आला तसा आम्हाल धीर आला. मी ट्रेकरांचा परवलीचा शब्द ए ओ म्हणून आवाज देताच खालूनही आम्हाला ए ओ चा प्रतिसाद येताच आमच्या जीवात जीव आला. ते एकूण पाच जण होते. तीन तरुण व दोन तरुणी पुण्याहून आले होते. त्यांच्यात, आमच्यात जुजबी बातचित होऊन असे कळले की, वाटेत त्यांना इतर जाता-येता कोणीही दिसले नाही. आमचा निरोप घेऊन ते सारे गडाच्या वरच्या अंगाला निघून गेले.
आता आम्ही निर्धास्त झालो होतो. जरा निर्धास्त होताच पहाटेच्या थंडीचा जबर कडाका जाणवू लागताच सगळ्यांनी तंबूमध्ये जाऊन आराम केला. पहाट सरून सकाळ होताच सरसगडाच्या सर्वोच्च शिखर माथ्यावर जाऊन केदारेश्वराला जलाभिषेक करून त्याचे स्तवन करून नमन केले.
येथून गडाच्या चौफेर पाहिले असता गड आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे सारे रान जळून सर्वत्र गड काळा कुळकुळीत झाला होता. रात्रीचा प्रसंग आठवून अजूनही अंगाला कापरं भरत होतं. आतापर्यंत गडावर ट्रेकरांची जत्रा सुरू झाली होती. त्या पाठीराख्या केदारेश्वराला पुन्हा एकदा मनोभावे हात जोडून आभार मानून एक भयानक प्रसंग हृदयात बंदिस्त करून गड उतरण्यास सुरुवात केली.. ती सारसगडावर पुन्हा येण्यासाठीच!
सुंदर लेख ,लेखकांना धन्यवाद !