बिहार राज्यात १ एप्रिल, २०१६ पासून दारूबंदीचा निर्णय बिहार सरकार घेणार असून महाराष्ट्रातही अनेक वर्षापासून दारूबंदीसाठी सामाजिक संस्था झटत आहेत.
मुंबई- बिहार राज्यात १ एप्रिल, २०१६ पासून दारूबंदीचा निर्णय बिहार सरकार घेणार असून महाराष्ट्रातही अनेक वर्षापासून दारूबंदीसाठी सामाजिक संस्था झटत आहेत. राज्यात वर्धा, गडचिरोली व चंद्रपूरमध्ये दारूबंदी आहे. तसेच, गुजरात, नागालँड, लक्षद्विप, मणिपूरचा काही भाग या केंद्रशासित प्रदेशात दारूवर पूर्णपणे बंदी आहे.
महाराष्ट्रातही दारू बंद व डान्सबारवर बंदी घालून समाजाला उद्ध्वस्त होण्यापासून थांबवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. महाराष्ट्रात खरोखरच दारूबंदी व डान्सबारवर बंदी येईल का याबाबत सर्वसामान्यांच्या मनातील विचार जाणून घेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न दै. प्रहारने केला आहे.
दारूबंदीची मागणी करणारे लेखी पत्र भाजपा आमदाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले. परंतु महाराष्ट्र सरकारला दारूमुळे होणारा १८ हजार कोटींचा महसूल गमवावा लागेल आणि त्यामुळे दारूबंदी शक्य नाही, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. दारू व इतर व्यसनामुळे अनेक परिवार उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे अनेक प्रदेशात दारूबंदी करण्यात आली आहे.
तसेच, डान्सबारवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सामांन्याकडून होत आहे. दारू व डान्सबारमुळे अनेक तरुण मुले-मुली वाईट मार्गावर जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सरकारला मोठा महसूल गमवावा लागेल म्हणून राज्यात दारूबंदी शक्य नसल्याचे खडसे यांनी सांगितले. मात्र दारू व डान्सबारमुळे कुटुंब उद्ध्वस्त झालेले या भाजपा सरकारला चालेल का, असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.
महसुलासाठी दुसरा पर्याय शोधा
दारू विक्रीतून सरकारला १८ हजार कोटींचा महसूल मिळत असला, तरी अनेक परिवार आज दारूमुळे उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे दारूवर बंदी आणली पाहिजे. सरकारने महसूल वाढीसाठी वेगळा पर्याय शोधला पाहिजे. महसूल मिळतो म्हणून दारू सुरू ठेवणे हे चुकीचे आहे.
– प्रकाश मेना
दारूमुळे अनेक परिवार उद्ध्वस्त
लवकरात-लवकर दारूबंदी झाली पाहिजे. अनेक घरे यामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. दारूच्या व्यसनामुळे पिणा-या व्यक्तीला व इतरांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. राज्यभरात दारूबंदी झाली पाहिजे. दारू बंद झाल्यावर जर बेरोजगारीचा प्रश्न उद्भवत असेल, तर सरकारने त्यांना दुसरे कोणतेही काम दिले पाहिजे.
– नरेश चावला
डान्सबारमुळे तरुण पिढी भरकटणार
डान्सबारमुळे आज अनेक माणसे आपल्या परिवारांवर लक्ष देत नसून त्याचा परिणाम हा लहान मुलांवर होत आहे, त्यांच्या परिवारावर परिणाम होत आहे. त्यामुळे डान्सबार हे बंद झाले पाहिजेत. आणि डान्सबारमध्ये काम करणा-या मुलींना रोजगार म्हणून डान्सबारचे रूपांतर हॉटेलमध्ये करत रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. त्यासाठी त्यांना कोठेही कामासाठी फिरायची गरज भासणार नाही, याची सरकारने काळजी घेतली पाहिजे. मात्र डान्सबारबरोबर दारूवरही बंदी आणली पाहिजे.
– अर्जुन गुप्ता
डान्सबार बंद करा
बारमध्ये नाचणा-या मुलींकडे कला या दृष्टीने पाहिले गेले पाहिजे. परंतु त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा असून बारमध्ये अश्लील चाळे होत असतील, तर डान्सबार बंद केले पाहिजेत. डान्सबारमध्ये अनेक लोक दारू पितात. आणि या दारूच्या व्यसनामुळे अनेक गुन्हे वाढत आहेत. म्हणून दारू व डान्सबारवर बंदी आणली पाहिजे. राज्याच्या महसुलासाठी दुसरा पर्याय निवडला पाहिजे.
– सुभांशू सांडेलिया
महाराष्ट्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियानात १० वि च्या फुढे शिकलेल्या मुलीना दोन वेळेचे जेवण मिळवण्या साठी डान्स बार हे एकमेव साधन महाराष्ट्र शासनांनी निर्माण केले आहे. हे सत्य किती जणांना माहित आहे. शेतीची काम शाळेत शिकवत नाहीत म्हणून येत नाहीत. नोकरी मिळत नाही. भूक लागते खायचे काय…