काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका गांधी-वद्रा यांनी नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी पुन्हा लक्ष्य केले. तथाकथित गुजरात मॉडेलअंतर्गत मोदी यांनी शेतक-यांची फसवणूक केली असून त्यांनी हजारो एकर जमीन ‘मित्रांना’ कवडीमोल भावात दिली, अशी खरमरीत टीका प्रियंका गांधी यांनी केली.
रायबरेली– काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका गांधी-वद्रा यांनी नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी पुन्हा लक्ष्य केले. तथाकथित गुजरात मॉडेलअंतर्गत मोदी यांनी शेतक-यांची फसवणूक केली असून त्यांनी हजारो एकर जमीन ‘मित्रांना’ कवडीमोल भावात दिली, अशी खरमरीत टीका प्रियंका गांधी यांनी केली. हा देश म्हणजे एखाद्या शाळेतील वर्ग असल्याप्रमाणे मोदी वागत असल्याचे त्या म्हणाल्या. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासाठी आयोजित एका प्रचारसभेत त्या बोलत होत्या.
‘मोदी यांच्या तथाकथित गुजरात मॉडेलअंतर्गत तेथील शेतक-यांची आणि कामगारांची काय परिस्थिती आहे? आणि महिलांसाठी काय काम केले आहे, हे त्यांनी सांगावे. मोदी हे आपल्या भाषणांमध्ये कधी एबीसीडी तर कधी आरएसव्हीपी या अद्याक्षरांचा उल्लेख करत असतात.
द वरून देश तर क वरून कावळा अशाप्रकारे
तोंडपाटीलकी करणा-या मोदींनी आता हे ब म्हणजे बंद करायला हवे,’ असा टोलाही प्रियंका यांनी लगावला. तुम्ही प्राथमिक शाळेत शिकवत नसून देशातील लोकांना संबोधित करत आहात याचे भान ठेवा, असे त्या म्हणाल्या. कोणत्याही नेत्यांनी मग तो काँग्रेसचा असो किंवा इतर पक्षांचा लोकांसाठी काय करणार आहे हे त्यांनी आधी सांगायला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. मोदी यांचे सहकारी अमित शहा यांच्यावरही प्रियंका गांधी यांनी अप्रत्यक्ष टीका केली.
संपूर्ण सत्ता ही आपल्याच हाती असायला हवी, अशी मोदी यांची प्रवृत्ती आहे. तुम्ही आमच्या हातात संपूर्ण सत्ता द्या, आम्ही तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ, अशाप्रकारे सध्या देशात प्रचाराची एक विचित्रच पद्धत निर्माण झाली आहे. मात्र काँग्रेस अशा पद्धतींवर विश्वास ठेवत नाही, असे सांगत त्यांनी मोदींच्या हुकूमशाही वृत्तीवरही कठोर टीका केली. लोकांच्या हातात सत्ता देणे यावरच काँग्रेसचा भरवसा असल्याचे सांगत त्यांनी यूपीए सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. देशातील जनतेचे सक्षमीकरण करण्यासाठी काँग्रेसने मनरेगा, माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, अन्न सुरक्षा योजना अशा विविध योजना राबवल्या. देशातील प्रत्येकाला निवा-याची गरज असून आगामी काळात निवा-याचा अधिकार आणण्याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
Deshka Naita Kaisa Ho Narendra Modi Jaisa Ho.