भारताच्या राजकीय इतिहासातील सर्वात अटीतटीची आणि चित्तथरारकही म्हणता येईल अशी निवडणूक उत्तर प्रदेश या भारतातील सर्वात मोठय़ा राज्यात सध्या होत आहे. उत्तर प्रदेश विधानसभेच्या ४०४ जागांसाठी यापूर्वीच अनेक टप्प्यांत मतदान झाले असून ४९ जागांसाठीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान दोन दिवसांपूर्वीच पार पडले. भारतीय जनता पार्टी विरुद्ध समाजवादी पार्टी आणि काँग्रेस आघाडी असा हा संघर्ष होतो आहे.
कोणत्याही परिस्थितीत उत्तर प्रदेश हे राज्य ताब्यात घ्यायचेच ही इर्षा मनात ठेवून भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीने मैदानात उतरले असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी या दोघांनीही संपूर्ण उत्तर प्रदेश पिंजून काढला आहे. प्रथम दिल्ली आणि त्यापाठोपाठ बिहार या दोन राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांत भारतीय जनता पार्टीला मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागल्याने उत्तर प्रदेशमध्ये नरेंद्र मोदी कमालीच्या त्वेषाने प्रचार करताना दिसत आहेत. त्यांच्या सभांना मोठी गर्दी होत असल्याने मोदी उत्तर प्रदेशात बाजी मारू शकतात, असा अंदाज वर्तवला जात असतानाच लोकप्रियतेच्या शिखरावरील युवा नेता अशी प्रतिमा असलेले अखिलेश यादव मोदींना सहजपणे जिंकू देणार नाहीत. किंबहुना ते भाजपाला पराभवाची धूळही चारतील, असा ठाम विश्वास असणारा एक मोठा वर्गही उत्तर प्रदेशमध्ये आढळतो.
प्रचार म्हणजे काय, तो कसा करायचा असतो आणि त्याच्या जोरावर निवडणुका कशा जिंकायच्या असतात. याचे एक जबरदस्त आणि डोळे दिपवणारे उदाहरण नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत घालून दिले. ‘अच्छे दिन आयेंगे’ ही त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्याच प्रचाराची त्यावेळी मध्यवर्ती कल्पना होती. अच्छे दिन आयेंगे या प्रचाराचा त्यावेळी इतका मारा करण्यात आला की निवडणुका झाल्या, भाजपा आणि या पक्षाच्या मित्र पक्षांचे उमेदवार निवडून आले की अच्छे दिन शंभर टक्के येणारच याची खात्री अगदी प्रत्येक मतदाराला होती. अपवाद होता तो कट्टर भाजपाविरोधी मतदारांचा. ज्या लोकसभा निवडणुका झाल्या, त्यात भारतीय जनता पार्टीला स्वबळावर लोकसभेत पूर्ण बहुमत मिळाले. या पक्षाच्या मित्र पक्षाचेही उमेदवार मोठय़ा संख्येने निवडून आले. नरेंद्र मोदी यांचा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला. देशभर भाजपाला मतदान करणा-यांनी आनंदाने जल्लोष केला आणि मग सुरू झाली अच्छे दिनची प्रतीक्षा. लोक या आश्वासनाच्या पूर्ततेची वाट पाहात होते, पण नरेंद्र मोदी, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी, भाजपा आणि मित्रपक्षांचे खासदार मात्र हे आश्वासन विसरून गेले होते. मोदी आपल्या शब्दाला जागतील म्हणून लोकांनी अनेक महिने प्रतीक्षा केली, पण अच्छे दिन काही येण्याचे नाव घेत नव्हते.
हळूहळू आपण बनवले गेलो आहोत, याची लोकांना खात्री पटली आणि मग लोकांनीही भाजपाला धडा शिकवण्याची भाषा सुरू केली. त्याची पहिली संधी दिल्लीच्या जनतेने साधली. लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यातच दिल्ली विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत दिल्लीच्या मतदारांनी भाजपाचा इतका मोठा बदला घेतला की, दिल्ली विधानसभेच्या सर्व ७० जागा लढविणा-या भारतीय जनता पार्टीला अवघ्या तीनच जागांवर कसाबसा विजय मिळवता आला. दिल्लीच्या निवडणुकांनंतर बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. बिहार हेही भारतातील खूप मोठे राज्य. भाजपाने बिहारमधील निवडणुकीतही आपली सर्व ताकद पणाला लावली. मोदींनी जातीने संपूर्ण बिहारभर प्रचार केला. बिहारच्या विकासासाठी ५ लाख कोटी रुपयांचे पॅकेजही केंद्र सरकारतर्फे जाहीर केले. पण बिहारची जनता बहुतांशी अशिक्षित असली तरी जयप्रकाश नारायणांच्या राज्यातील ही जनता राजकीयदृष्टय़ा मात्र कमालीची सजग होती. लोकसभा निवडणुकीत भाजपाने आश्वासने देऊन नंतर सत्ता ताब्यात आल्यावर मात्र आपली फसवणूक केली, याची जाणीव असल्याने येथील जनतेने विधानसभा निवडणुकीतही भाजपाची सर्व आश्वासने फेटाळून लावत नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला भरघोस मतदान केले. भाजपाचा दारूण पराभव झाला.
आधी दिल्ली मग बिहार, या दोन पराभवांमुळे नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमध्ये खूप हुशारीने आपला प्रचार करताना दिसतात. काँग्रेस आणि समाजवादी पार्टीची आघाडी असली तरी जिथे काँग्रेसचा उमेदवार आहे तिथले समाजवादी मतदार फोडण्याचा मोदींचा डाव आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मतदारसंघावरच त्यांनी लक्ष केंद्रित केले होते असे जाणवते. उत्तर प्रदेशमधील निवडणुकांचे राजकारण तिथल्या जातीव्यवस्थेभोवती फिरत असते. या भल्यामोठय़ा राज्यात इतर मागासवर्गियांची संख्या तब्बल ३८ टक्के असून मुस्लिमांची संख्या १९ टक्के आहे, ब्राह्मण १३ टक्के, तर ठाकुरांची संख्या ८ टक्के इतकी आहे. मोठय़ा संख्येने असलेल्या इतर मागासवर्गियांची मते आपल्याच पारडय़ात पडावीत यासाठी गेला महिनाभर चाललेल्या प्रचारमोहिमेत जसे अखिलेश यादव यांनी प्रयत्न केले, तसेच प्रयत्न या मतांवर पूर्वीपासूनच हक्क सांगणा-या बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनीही केले. इतर मागासवर्गियांची मते भाजपाकडे वळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी १३ टक्के ब्राह्मणांची मते भारतीय जनता पार्टीकडेच कशी वळतील या दृष्टीने प्रयत्नांची शिकस्त केल्याचे जाणवते. या निवडणुकीवर परिणाम करणारा आणखी एक मोठा घटक म्हणजे मुसलमान समाज. या समाजाची तब्बल १९ टक्के मते उत्तर प्रदेशमध्ये आहेत. ही मते समाजवादी पार्टीसाठी हक्काची मानली जातात. मात्र मायावती यांनीही आपल्या प्रचारादरम्यान हा मोठा समाज आपल्याकडे वळवण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे.
अयोध्येतील राम मंदिर हा आणखी एक विषय उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या मध्यवर्ती ठिकाणी असतो. यावेळीही या राज्यातील संपूर्ण हिंदू मते भाजपाकडे वळवण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा प्रचारात घ्यावा, अशी सूचना काही भाजपा नेत्यांकडून पुढे आली होती. पण प्रचार करताना नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचा मुद्दा पूर्णपणे बाजूला ठेवून मुस्लीम मतदार नाराज होणार नाहीत याची काळजी घेतली. मोदी हे अत्यंत चलाख राजकारणी आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी लोकांना काहीही न देता त्यांनी लोकांकडून मते वसूल केली होती. उत्तर प्रदेशच्या लोकांना त्यांनी आपल्या प्रचारसभांतून छान छान आश्वासने दिली आहेत. लोक ती आश्वासने कितपत मनावर घेतात यावर भाजपाचे यश अवलंबून आहे.
देशाचे पंतप्रधान विरुद्ध राज्याचे मुख्यमंत्री अशी अनोखी लढत उत्तर प्रदेशमध्ये रंगली आहे. २०१२ साली याच राज्यात अशीच घमासान लढाई झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्रीपदी मायावती होत्या. पण तब्बल २२९ जागा जिंकून तिथली सत्ता अखिलेश यादव यांनी अगदी सहजपणे आपल्या ताब्यात घेतली होती. त्या निवडणुकीत मायावती यांच्या बसपाला ८० जागा मिळाल्या होत्या. भाजपाला केवळ ४१ जागा तर काँग्रेसचा नंबर त्याही खाली लागला होता. काँग्रेसला केवळ २९ जागा मिळाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील ८० जागांपैकी भाजपाने तब्बल ७१ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या रूपाने दोन जागा जिंकल्या होत्या. तर उर्वरित जागांवर समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते जिंकून आले होते. नरेंद्र मोदी स्वत: उत्तर प्रदेशचे खासदार आहेत, त्यामुळे इथली विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. मोदींच्या सभांना मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पण त्यांच्या तोडीसतोड गर्दी अखिलेश यांनीही खेचली आहे. नरेंद्र मोदी अद्यापही लोकप्रिय आहेत यात शंका नाही, पण अखिलेशही कमालीचे लोकप्रिय आहेत. तब्बल ८ टप्प्यांत झालेली ही निवडणूक सर्वाचीच उत्सुकता ताणून धरणारी होती. त्यामुळेच ११ मार्चला काय निकाल लागतो, याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
दोन दिवसांनी UP चे निकाल आहे.
जर BJP ला बहुमत मिळाले तर असे समजू लोकांसाठी “अच्छे दिन आ राहे हे” .