फाल्गुन पौर्णिमेला येणारा शिमगा म्हणजे होळी हा सण करण्यामागे जे गुह्य लपले आहे, ते समाजाने अंगीकारले तर कधीही स्वत:ची होळी करायची वेळ येणार नाही. मनुष्यदेहातील षड्रिपूंना मुक्त करणे, हा त्यामागचा खरा उद्देश आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी होळीबाबतही समाजाचे प्रबोधन केले आहे.
। होळीचा आला शिमगा सण।
त्यात मोठी मारहाण।
। लोकइभ्रतमान सोडोन। पळती मार्गी वेडेसे।
होळीचा सण अर्थात शिमगा हा सण वाईटाचा नाश करत चांगल्याची कास धरायला लावणारा सण आहे. पण आज लोकांनी याला वेगळे स्वरूप दिले आहे. लोक यादिवशी एकमेकांना रंगाच्या माध्यमातून मारहाण करतात. विविध राज्यात विविध पद्धतीने होळी सण साजरा केला जातो. काही वेळेस लोक एकमेकांना शिव्या देत चिखलाने मारहाण करतात. या पद्धतीने आजवर कधीच होळी साजरी केली गेली नव्हती. खरं तर वाईटाचा नाश करणारी होळी पेटवल्यानंतर त्याची राख अंगाला लावायची असते. पण लोकांनी याला वेगळे स्वरूप दिले आणि रंगांची उधळण करत वेगळा सण निर्माण केला. जर आपण आपल्या रंगात रंगू शकत नाही तर लोकांना कसं रंगवणार, असा प्रश्न महाराज विचारतात.
। हा वाढला विचित्रपणा। ऐसा नोहे शिमगा जाणा।
। त्यातहि आहे तात्विकपणा। घेण्यासारिखा समाजा।
होळी साजरी करण्याची कलियुगातील पद्धत पाहून महाराज म्हणतात, हा सर्व विचित्रपणा आहे. या पद्धतीने होळी साजरी होतच नव्हती. पण आज होळी साजरी करण्याची शैली पाहून समाजात विचित्रपणा वाढला आहे, असे महाराज सांगतात. रंगांची उधळण आणि एकमेकांना शिवीगाळ करून कधीच शिमगा साजरा झाला नव्हता. शिमगा सणातील तात्त्विकपणा समाजाला घेण्यासारखा आहे, असे महाराज याठिकाणी ठामपणे सांगतात.
। याचदिवशी प्रल्हादाची छळणा।
केली होती होळीने जाणा।
। परि दु:ख न झाले प्रल्हाद प्राणा। हरिभक्त म्हणोनि।
महाराज म्हणतात, लोकहो, यादिवशी भक्त प्रल्हादाची छळवणूक करण्यात आली होती. होलिकाने भक्त प्रल्हादाला संपवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र तीच त्या होळीत राख झाली. मात्र प्रल्हादाला इजा झाली नाही, कारण तो हरिभक्त होता. वाईटाचा नाश होतो; पण सत्याचा नाश होत नाही. हरिभक्ती करणा-याला भगवंत तारून नेतो; पण सणावारांच्या नावाखाली सोंगढोंग करणा-याला परमेश्वर कधीच प्राप्त होत नाही, अशी ग्वाही महाराज याठिकाणी देतात.
। शेवटी छळणारेची जळले। हे गावासी कौतुक झाले।
। म्हणोनि जन ओरडले। उपहास त्याचा करोनि।
प्रल्हादाला ठार करण्यासाठी आलेली होलिका स्वत: दहन झाल्यावर लोकांनी प्रल्हादाचे कौतुक केले. वाईटाचा निषेध करण्यासाठी हा सण उपहासात्मक पद्धतीने केला जातो.
। म्हणती कोणी वर्षातून। शिव्यासाठीच एक दिन।
। परि सज्जनासि याचे काय कारण। ये उत्तेजन दुर्जना।
होळी या सणाचे महात्म्य साधूसंतांनी विविध पद्धतीने वर्णिले आहे. पण दुर्जनांच्या मतिप्रमाणे विचार केला असता, तुकडोजी महाराज म्हणतात, होळीचा हा वर्षातील हा एक दिवस एकमेकांना शिवीगाळ करण्यासाठी राखून ठेवला आहे, परंतु वास्तविक पाहता हे सत्य नाही. सज्जनांनी यातून जो बोध घेतला आहे, या बोधातून दुर्जन काय शिकणार, असा प्रश्न तुकडोजी महाराज लोकांना विचारतात. जर सज्जनांनी या सणांचा अवलंब केला तर या सणातून दुर्जनांना प्रोत्साहन दिल्यासारखे होईल, असे ही महाराज निदर्शनास आणून देतात.
। पुढे याचा विपर्यास झाला। शिविगाळ देती परस्पराला।
। पोथ्याहि सांगती ‘अभद्र बोला’। मूळ त्याचे न जाणता।
महाराज म्हणतात, सणासुदीच्या नावाखाली ढोंग केली जातात. कोणत्याही सणाचा बोध घेतला तर त्याचा आयुष्य जगण्यासाठी उपयोग होतो. मात्र दुर्जनांना हा सण का साजरा करायचा असे विचारल्यास ते पुराणाचे ग्रंथ पोथ्याचे दाखले देतात आणि सांगतात की, हाच दिवस अभद्र बोलण्यासाठी राखून ठेवला आहे. आता आपण ठरवायचे आहे की, आपण सज्जन आहोत की, दुर्जन?
। त्याच दिवशी शंकराने।
काम जाळीला तिस-या नयने।
। म्हणोनि कामांस धिक्कारले भुतसेनेने। हलकल्लोळ करोनि।
याच दिवशी भगवान शंकरांनी त्यांचा तिसरा डोळा उघडला होता, अशी कथा सांगितली जाते. भगवान शंकरांनी त्यांचा तिसरा डोळा उघडून काम (वासना) जाळले होते. मनुष्यदेहात काम नसता तर मनुष्य भगवान झाला असता. यासाठी काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, अहंकार या षड्रिपूंपासून दूर राहा, असाही संदेश या होळीतून मिळतो. म्हणून भूत योनीत काम हा प्रकारच नाही. भूतसेनेने कामाला वर्ज्य केले आहे.
। त्याच दिवशी सज्जनांनी।
वार्षिक यज्ञाची केली आखणी।
। संपूर्ण गाव साफ करोनी। द्यावे पेटवोनि कैचण ते।
या सगळ्या कथांचा सारांश काढून सज्जनांनी मात्र यातील एकच चांगला गुण घेतला. महाराज म्हणतात, सज्जनांनी या दिवशी संपूर्ण गाव साफ, स्वच्छ केला आणि वर्षातून एकदा ग्रामस्वच्छतेचा वसा घेतला. वाईटाचा नाश करत त्यांनी चांगला गुण अंगीकारला, असे महाराज सांगतात.
झकास लेख आहे … मस्त खूपच छान
लेख छान आहे …भरपूर माहिती लेखकाला दिसतेय …