बाप्पांच्या आगमनाचे पडघम वाजू लागले आहेत. मुंबईतील अनेक मंडळांनी नऊ तारखेला होणा-या बाप्पांच्या स्वागतासाठी तयारी सुरू केली आहे. सजावट, मखर, पर्यावरणपूरक मूर्ती, वैविध्य, सामाजिक विषयांचे देखावे, धार्मिक कार्यक्रम अशा सर्वच आघाड्यांवर मुंबईतील गणेशमंडळे कामाला लागली आहेत. मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेला या गणेशोत्सवाचे वेगवेगळे पैलू‘ ओमकार स्वरूपा’ या सदराच्या माध्यमातून ‘प्रहार’मधून उलगडले जाणार आहेत.
मुंबई- मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे हे गणेशोत्सवापूर्वी बुजवले जाणार, असे आश्वासन महापालिकेने दिले आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेने दिलेले आश्वासन पाळले जाणार नसल्याची खात्री मुंबईतील गणेशमंडळांना असल्याने त्यांनी महापालिकेच्या आश्वासनावर विसंबून न राहता, स्वत:च बाप्पांची काळजी घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. माती किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्ती खड्ड्यांच्या रस्त्यांवरून नेताना मूर्तीना धक्का लागण्याची भीती मंडळांना असते. त्यामुळे मंडळांनी यंदा कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या मूर्तीना पसंती दिल्याचे चित्र आहे. अंधेरीतील गणेश मंडळाने कागदापासून तयार केलेल्या इको फ्रेंडली मूर्ती साकारणे सुरू केले आहे.
दरवर्षीच मुंबईत गणरायाचे आगमन व विसर्जनाचा प्रवास हा खड्ड्यांच्या रस्त्यावरूनच होतो. महापालिका दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याचे आश्वासन देते व दरवर्षी ते पाळले जात नाही. हा अनुभव मुंबईतील मंडळांना आहे. खड्ड्यांतून बाप्पांचे आगमन होत असल्याने मूर्ती कलडण्याची भीती असते. मोठय़ा मूर्तीबाबत हा धोका वाढतो. त्यामुळे खड्ड्यांतून बाप्पांचे आगमन व विसर्जन कुठलेही विघ्न न येता व्हावे यासाठी मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीना पसंती दिली आहे.
अंधेरी पूर्वेतील पारशी लेनजवळील बाळगोपाळ मित्र मंडळाने बाप्पांची कागदाच्या लगद्यापासून साकारलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. अंधेरीश्वर म्हणून ओळखल्या जाणारा या गणपतीची मूर्ती कागदापासून बनवलेली १० फूट उंचीची आहे.
अंधेरी पूर्व येथील देवरामपाड्यातील तरुण मित्र मंडळाने यंदापासून पर्यावरणाला अनुकूल इको-फ्रेण्डली श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. हे मंडळ ३९ वर्षे जुने असले तरी प्रत्यक्षात सहा वर्षापूर्वी नोंदणीकृत झाल्यानंतर त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने प्रथमच कागदी गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे गणेशाच्या आगमन आणि विसर्जनात विघ्न येऊ नये यासाठी मंडळाने हा निर्णय घेतल्याचे मंडळाचे सल्लागार नीलेश भोजने सांगितले.
या मंडळाच्या वतीने प्रथमवर्षी शाडूच्या मातीपासून बनवलेली मूर्ती बसवण्यात आली होती. परंतु शाडू मातीच्या गणेशमूर्तीला प्रचंड जपावे लागते. मिरवणुकांमध्ये खड्ड्यांमुळे मूर्तीला धोका पोहोचतो. त्यामुळे नंतरच्या वर्षात प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेली मूर्ती बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मूर्तीही नेताना कार्यकर्त्यांची खड्ड्यांमुळे दमछाक होऊ लागली. विलेपाल्र्यातील मूर्तिकार राजू मयेकर यांनी कागदापासून बनवण्यात येत असलेल्या गणेशमूर्तीची माहिती आम्हाला दिली. वर्तमानपत्रांचा पुरेसा कागद उपलब्ध असल्यास ही मूर्ती बनवणे सहज शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. मंडळातील सर्व पदाधिकारी व सदस्यांनाही या मूर्तीचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर याला सर्वानीच पाठिंबा दिल्यानंतर मूर्तिकार राजू मयेकर यांना १० फुटी गणेशमूर्ती कागदापासून बनवण्याची ऑर्डर देण्यात आल्याचे भोजने यांनी सांगितले.
कागदापासून बनवलेली मूर्ती ही वजनास हलकी आणि पर्यावरणास अनुकूल अशी आहेच. त्याबरोबरच जास्त मनुष्यबळ नसलेल्या मंडळांना सहज उचलणेही सोपे असते. त्यामुळे आज ही गणेशमूर्ती आम्ही बनवल्यानंतर संपूर्ण अंधेरीतच नव्हे तर पश्चिम उपनगरातही कागदापासून बनवलेली १० फुटी मूतीपैंकी ही एकमेव मूर्ती असल्याचे समोर आले आहे. या अंधेरीश्वराचे आगमन रविवार मंडपात झाले. गणेशोत्सवात महागाईचा राक्षस या संकल्पनेवर आधारित सजावट केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या कागदी गणेशमूर्तीचे औसुक्य अंधेरीतील नागरिकांना लागले असून या भागातील प्रत्येकाला गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा असल्याचे भोजने सांगतात. ग्लोबल वॉर्मिगमुळे पर्यावरणाचा -हास टाळणे आवश्यक आहे. प्रत्येकांनी यासाठी प्रयत्न करायला हवे. आज आपण खड्ड्यांमुळे महापालिकेला दोष देत असलो तरी या खड्ड्यांमुळे आम्हाला पर्यावरण प्रेमी बनवल्याचेही भोजने यांनी मिस्कील पद्धतीने सांगितले.
कृपया कागदी गणेशमूर्ती मिळणारे ठिकाण / पत्ता कळवावा.