खलनायक असला तरच नायकाच्या भूमिकेला अर्थ येतो. त्याची कुशलता खलनायकाच्या ताकदीत दडलेली असते. यामुळेच खलनायकाची भूमिका साकारणे दिव्यत्वाचे काम आहे.
सिंधुदुर्ग- खलनायक असला तरच नायकाच्या भूमिकेला अर्थ येतो. त्याची कुशलता खलनायकाच्या ताकदीत दडलेली असते. यामुळेच खलनायकाची भूमिका साकारणे दिव्यत्वाचे काम आहे. मात्र, कणकवली तालुक्यातील तिवरे गावचे सदाशिव वाळवे जेव्हा खाद्यावर गदा घेतात तेव्हा.. रंगमंच हादरून जातो. लहान मुले आईच्या कुशीत लपतात. अन् त्यांच्या गडगडाटी हास्याने अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. बिनधास्त आणि दमदार पावले टाकत रंगभूमीवर आल्यानंतर समोरच्या कलाकाराला चाबकाने फोडून काढणारा हा दानव खरोखरच कलाकार आहे की खराखुरा दानव.. असा समज अनेकांचा होतो. अन् दबक्या आवाजात विचारणाही होते. हेच तर या धिप्पाड कलाकाराचे अभिनय यश.. दशावताराची हीच तर खासियत आहे.
अभिनयात कसलीही कसर राहू नये. यासाठी हा लालमातीतील कलाकार केवळ जागृतच असत नाही तर कलेवर त्याची मोठी निष्ठा असते. सदाशिव ऊर्फ आप्पा वाळवे हे व्यक्तिमत्त्व याहून वेगळे नाही. भूमिकेशी समरस झाल्यानंतर त्यांचे ते उरत नाहीत. गेली ३२ वर्षे दशावताराच्या रंगभूमीवर वावरणा-या वाळवेंचा रंगभूमीवरील प्रवासही आश्चर्यचकीत करणारा आहे. कलेची आवड म्हणून अभिनय करता करता अस्सल दशावतारी कलावंत ते केव्हा बनले हे त्यांचे त्यांनाच कळले नाही. आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी त्या पात्राची पुराणातील संपूर्ण माहिती आपल्याला असायला हवी असा त्यांचा आग्रह असतो. याचमुळे रावणाची भूमिका असो अथवा शनीची यम असो अथवा कली.. मारुती असो वा बलराम! रावण हा वेदशास्त्रनिपुण पंडित होता. त्याच्या मुखात असणारे प्राकृत बोल कधीही विकृत होऊ नयेत, अशी दक्षता घेतानाच ताकदीचा असलेला रावणाचा ‘अहंकार’ आपल्या कुशल अभिनयातून ते जेव्हा साकारतात तेव्हा पाहणारा थक्क होतो.
दांडपट्टा फिरवणे, युद्ध कौशल्य हे अनेक दशावतारी कलावतांना जमेलच असे नाही. पण, सदाशिव वाळवे जेव्हा हंटर फिरवतात. नाटय़प्रयोगात खलनायक किती अत्याचार करू शकतो, हे दाखवताना एखाद्या कलाकाराला प्रेक्षकांच्या देखत चाबकाने फोडून काढतात तेव्हा प्रेक्षकांचे रक्त उसळून जाते. शिव्यांची लाखोली सुरू होते. अत्याचारांचा कळस दाखविण्याची त्यांची पद्धत नाटकाला एका वेगळय़ाच उंचीवर नेणारी असते.
या चाबूक मारण्याच्या कलेत ते निष्णात आहेत. हवेत चाबूक फडकवतानाचा कडकलक्ष्मीच्या शिलेदारांची आठवण व्हावी, असा त्यांचा आविर्भाव असतो. मात्र त्यांचा बलराम, अथवा भीमही तेवढाच सात्विक असतो. सातत्याने वाचन, टीपण करणे यामुळे हे सारे शक्य होत असल्याचे ते सांगतात. जालंधर नाथाचा संवाद, मारुतीची रामनिष्ठा जाणून घ्यायची तर सदाशिव वाळवे यांना विचारायला हवे! या आपल्या रंगभूमीच्या प्रवासात बाळा भाट, अप्पा दळवी, धोंडी घाडीगावकर, नाथा गोसावी, याप्रमाणेच अनेक ज्येष्ठांनी मार्गदर्शन केले. संवादफेक शिकवली. कोणा एकाचे नाव घेणे म्हणजे गुरुंवर अन्याय होईल, असे ते सांगताना खांद्यावर गदा घेतल्या शिवाय मजा येतच नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. उत्कृष्ट खलनायक अशी अनेक बक्षिसे मिळवलेले वाळवे रंगमंचाबाहेर मात्र अत्यंत हळवे आणि धार्मिक वृत्तीचे आहेत, असे सहकारी कलाकार सांगतात. रंगभूमीवरचे काम संपले की, ते थेट शेतीकडे वळतात. सध्या गणेश भवानी दशावतार नाटय़मंडळात ते कार्यरत आहेत. त्याची बलरामाची भूमिका विशेष गाजली आहे.
raju mazhya Sonya, tu kasa hases? Love you eternally.