कोणतीही समाजोपयोगी गोष्ट मोठय़ा प्रमाणात करायची म्हणजे मनुष्यबळ आणि पैसा लागतो. मात्र, प्रत्यक्ष हातात पैसा आणि मनुष्यबळ नसतानाही समाजोपयोगी अनेक गोष्टी करता येतात, हे ‘दान पारमिता’ या नागपूरच्या संस्थेनं दाखवून दिलं आहे. वाढदिवसादिवशी रक्तदान, रद्दीतून पैशाची उभारणी, पौरोहित्यातून मिळणारं धान्य आणि पैसा वसतिगृहांना देणं, अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च लोकसहभागातून उचलणं, अहेराची रक्कम समाजसेवी संस्थांना देणं, अशा अनेक कल्पक योजना सर्वसामान्यांच्या सहभागातून ही संस्था करते. अगदी घरबसल्या समाजसेवाही करता येते. विशेष म्हणजे सर्वसामान्य माणूस हाच सगळय़ात जास्त दानशूर असतो, असा महत्त्वपूर्ण निष्कर्षही आतापर्यंतच्या संस्थेच्या वाटचालीतून समोर आला आहे. सर्वसामान्य दात्याला संघटित करणा-यां आणि त्या संघटितपणाचा फायदा समाजाला मिळवून देणा-यां या संस्थेच्या कार्याबद्दल तिचे कार्याध्यक्ष अविनाश संगवई यांना यंदा ‘प्रहार भूषण जीवन गौरव पुरस्कारा’ने गौरवण्यात येत आहे. ‘दान पारमिता’ या संस्थेच्या वाटचालीबाबत संगवई यांच्याशी केलेली ही बातचीत.
संस्थेची स्थापना कधी झाली? ‘दान पारमिता’ या शब्दाचा अर्थ काय? संस्थेच्या या नावाचा अर्थबोध होत नाही आणि असं नाव का देण्यात आलं? स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिवशी, राष्ट्रीय युवा दिनी १२ जानेवारी २०१२ या संस्थेची स्थापना झाली. ‘दान पारमिता’ हा पाली शब्द आहे. त्याचा अर्थ दान म्हणजे मराठीतलं दान, दानधर्म हा अर्थ आणि पारमिता याचा अर्थ प्रवाह असा होतो. दानाचा प्रवाह असा त्याचा पूर्ण अर्थ होतो. सर्वसाधारणपणे जीवनमूल्ये ‘दस पारमिता’ ग्रंथात समाविष्ट आहे. त्यातील पहिलं मूल्य म्हणजे दान. समाजाला तुम्ही काही देणं लागता, हे अधिक ठळकपणे समजून सांगण्यासाठी हे पाली भाषेतलं नाव देण्यात आलं.
‘दान पारमिता’ नेमकं काय काम करते?
आपल्या समाजात वेगवेगळ्या आर्थिक स्तरांतील लोक राहतात. गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत असे तीन ढोबळ मानानं त्यांचे गट करू. गरीब आणि कनिष्ठवर्गीयांची संख्या मोठी आहे. त्यानंतर मध्यमवर्ग आणि त्यानंतर उर्वरित असा मोजका श्रीमंत वर्ग. गरीब आणि कनिष्ठवर्गीयांचा दिवस काबाडकष्टात जातो. त्यांना स्वत:पुरतेच मिळवताना मारामार असते. त्यामुळे असा वर्ग इतरांना मदत करू शकत नाही. श्रीमंत वर्गामध्ये काही मोजके श्रीमंत लोक सर्व सामाजिक कार्यात मदत करत नाहीत. आता राहिला मध्यमवर्ग. या वर्गाकडे थोडा पैसा, थोडा वेळ असतो. देण्याची, मदत करण्याची वृत्ती मात्र मोठी असते. मी याच वर्गाला वेगळय़ा पद्धतीनं आवाहन केलं आणि त्यांनी भरभरून दान संस्थेच्या पारडय़ात टाकलं. हाच सामान्य माणूस मोठा दानशूर आहे. त्याची देण्याची क्षमताही मोठी आहे. दान देताना, आपल्या पगाराचा, उत्पन्नाचा तो विचार करत नाही. मर्यादित उत्पन्न असतानाही तो मागचा-पुढचा विचार न करता ही मदत देतो. तो अगदी सहजपणे ते देतो. त्याच्याकडे तशी भावना असते. मदत करताना तो आढेवेढे घेत नाही. त्याला समाजभानही सर्वात जास्त असतं. सर्वसामान्यांना समाजासाठी खूप काही करायचं असतं. पण, काही वेळा त्यांच्याकडे पैसा असतो तर काही वेळा वेळ नसतो. काही वेळा त्यांच्याकडे वेळ असतो आणि ते स्वत:च श्रमदान करायला तयार असतात, पण पैसा नसतो. कोणतीही गोष्ट करण्यासाठी मनुष्यबळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. एका विशिष्ट परिस्थितीत दोन्ही गोष्टींना महत्त्व असतं. पैसा, मनुष्यबळ आणि वेळ या तिघांचंही संतुलन असणं आवश्यक असतं. आमच्या संस्थेतून नेमकं तेच केलं जातं. समाजातील ज्या वंचित, उपेक्षित घटकांकडे काही नाही, त्यांच्यापर्यंत समाजामार्फतच मदत पोहोचवणं. ‘फ्रॉम हॅव्ज टू हॅव्ज नॉट’ असं म्हणता येईल. लोकांकडून मदत घ्यायची, लोकांनाही ती देताना आनंद व्हायला हवा. त्यांच्याकडून ओरबाडून मात्र, काहीही घ्यायचं नाही. सामान्य दानदात्याला मोठय़ा प्रमाणात संघटित करणे, या संघटितपणातून समाजाला मदत पोहोचवणं, हा या संस्थेचा उद्देश आहे.
ही मदत तुम्ही नेमकी कशी करता?
संस्था दोन पातळ्यांवर काम करते. एक योजना आखणं, आयोजन, संयोजन, संपर्क करणं. त्या माध्यमातून अधिकाधिक लोकांच्या संपर्कात जाणं, त्यांच्या संपर्काचा उपयोग समाजासाठी करणं आणि दुसरं म्हणजे थेट मदत करणं. स्वत: स्वयंसेवक म्हणून काम करणं. सुरुवातीला आम्ही विद्यार्थ्यांसमोर महापुरुषांची चरित्रं यावीत, यासाठी प्रयत्न केले. महापुरुषांचं विद्यार्थी जीवन विद्यार्थ्यांसमोर मांडणं आणि त्यापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी. त्यातून समाजासाठी, देशासाठी काही करणारी पिढी तयार व्हावी, असा त्या मागचा उद्देश होता. त्यासाठी आम्ही प्रश्नावलीच्या स्वरूपात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली. त्यासाठी ४० प्रश्न तयार केले. हे प्रश्न आणि त्यांची उत्तरे यातून हे चरित्र उलगडत जातं. त्या महापुरुषांचं विद्यार्थी जीवन विद्यार्थ्यांसमोर आलं. प्रश्नावलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती मिळत गेली. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्तानं अशा प्रकारे अभिवादन केलं. हा प्रयोग नागपूर, अकोला, गोंदिया इथंही केला. त्यात एक लाख ७५ हजारांहून जास्त विद्यार्थी सहभागी झाले. त्या सगळय़ांना प्रमाणपत्रंही देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला. शिक्षकांनीही या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. आम्हालाही बाबासाहेबांच्या जीवनाबद्दलच्या काही गोष्टी नव्यानं कळल्या, अशा प्रतिक्रिया शिक्षकांनी दिल्या. अनेक महापुरुषांची चरित्रं आम्ही अशी विद्यार्थ्यांसमोर मांडली. या संस्थेच्या माध्यमातून एक डोळस व्यासपीठ उभारणं, असाही एक उद्देश आहे. सामाजिक कामं करणा-यां इतर संस्थांनाही मदत मिळवून देण्याचं काम ही संस्था करते. रद्दीचा आमचा उपक्रमही असाच आहे. एकदा वर्तमानपत्राचं वाचन झालं की, आपल्यासाठी ती एक निरुपयोगी अशी रद्दी होते. मात्र, हीच रद्दी थोडी थोडी एकाच वेळी, एकाच दिवशी गोळा केली तर त्यातून मिळणा-यां उत्पन्नातून जी थोडी फार रक्कम उभी राहते, त्याचा फायदा सामाजिक संस्थांना होतो. एका संपूर्ण इमारतीला, वसाहतीला किंवा परिसरात आम्ही एकाच दिवशी लोकांना आगाऊ कळवून त्यांच्याकडून रद्दी गोळा करतो. त्यांच्याकडून आमचे कार्यकर्ते रद्दी गोळा करतात. दर महिन्याला हे काम चालतं. या रद्दीतून गोळा होणारे पैसे आम्ही सामाजिक संस्थांना देतो. सर्वसामान्य माणसांच्या संघटना नसतात. ते असंघटित असतात. मात्र, असंघटित असूनही हाच सामान्य दाता सगळ्यात जास्त दानशूर असतो. सर्वसामान्यांकडून रद्दी गोळा केली जाते, धान्य गोळा केलं जातं. धान्य किंवा रद्दी हे माध्यम झालं. त्यातून सर्वसामान्यांना समाजाप्रती जागरूक करणं, त्यांचं प्रबोधन करणं आणि समाजकार्यात त्यांना सहभागी करून घेणं, हा उद्देशही त्यातून साध्य होतो. कोणत्याही मदतीसाठी सर्वसामान्यांच्या दारात तुम्ही गेलात तर ते कधीच नाही म्हणत नाहीत. ते आनंदानं जमेल तशी मदत करत असतात. आपल्या ऐपतीपेक्षाही जास्त मदत ते तत्परतेने करत असतात. आम्ही रद्दी सामाजिक संस्थांना तर गोळा झालेलं धान्य अनाथ मुलांच्या वसतिगृहांना देतो. त्याबरोबर अशा वसतिगृहात राहणा-यां विद्यार्थ्यांना दर्जेदार धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी धान्याच्या किमतीतील अध्र्या वाटा किंवा हिस्सा संस्था उचलते. जसं अलीकडे सौरऊर्जेवर चालणा-यां दिव्यांसाठी येणारा अर्धा खर्च समाजातील दानशूर व्यक्ती उचलतात. लोकांनाही सत्पात्री दान केल्याचा आनंद मिळतो. त्याचबरोबर अनाथ मुलांच्या वसतिगृहातील मुलांचा शैक्षणिक खर्च उचलण्यासाठी दाते मिळवून देण्याचं कामही संस्था करते. याला फायनान्सिंग अॅडॉप्शन (आर्थिक दत्तकत्व) असे म्हणतात. समजा एखाद्या मुलाच्या शिक्षणासाठी वर्षभरासाठी पाच हजार रुपये खर्च येत असेल तर त्यातील दोन किंवा तीन हजार रुपये आम्ही मिळवून देतो. त्याचबरोबर या अनाथ मुलांना दिवाळीत खाऊ देणं, सहलीसाठी शेतावर घेऊन जाणं अशा गोष्टी आणि अशा गोष्टींसाठी येणारा खर्च संस्था उचलते. मदतीची ही साखळी दान पारमिता उभारते. दानी, दात्यांचे व्यासपीठच तयार करण्याची ही चळवळ आहे. काही जण विचारतात की, तुम्ही स्वत: वसतिगृह का चालवत नाही? पण त्यासाठी मनुष्यबळ आणि पैसा लागतो. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी पूर्ण वेळ कर्मचारी नेमावे लागतील. त्यापेक्षा या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळय़ा सेवा देता येतात.
तुम्ही समाजकार्याकडे कसं वळलात?
मूळचा मी नागपूरचा. वयाच्या १८ वर्षापासूनच मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करायला सुरुवात केली. त्यामुळे साहजिकच संघाचे संस्कार झाले. संघाच्या विविध विकास प्रकल्पांमध्ये काम केलं. रक्तपेढी, नेत्रपेढी तसेच विविध समाजोपयोगी प्रकल्पांमध्ये काम केलं. संघाच्या रूपानं सुसंघटित व्यासपीठ मिळालं. त्यामुळे विविध जबाबदा-यां स्वीकारल्या. त्यातून एक एक करत महामंत्रीपदापर्यंत काम केलं. डॉ. हेडगेवार रक्तपेढीचा विस्तार वाढवला. अकोला, अमरावती इथं काम केलं. विदर्भाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली. त्याचबरोबर दिलीप घोष यांनी स्थापन केलेल्या ‘अखिल भारतीय दृष्टिहीन कल्याण संघा’साठी काम केलं. १९९८मध्ये ही संस्था स्थापन झाली. कालांतराने घोष यांची दृष्टी कमी कमी होत जाऊन ते अंध झाले होते. मात्र, काम करण्याची त्यांची जिद्द कमी झाली नाही. त्यानंतर अंध, दृष्टिहीन, कर्णबधिर आणि मतिमंदासाठी काम करणा-यां संघाच्याच ‘सक्षम : समदृष्टी, क्षमता, विकास एवम् अनुसंधान मंडळ’ या संस्थेसाठी काम केलं. ही संस्था २००८मध्ये स्थापन केली. बिहार आणि आसाम ही दोन राज्ये सोडून सगळय़ा राज्यांमध्ये काम केलं. मी विशेषत: डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या विकासाचं काम केलं. संघाच्या लोकांसाठी काम करण्याच्या प्रेरणेतूनच मी अविरत कार्यरत आहे. रिझव्र्ह बँकेत मी ‘सीएएस’ (सेंट्रल अकाउंट सेक्शन) विभागात कामाला होतो. सामाजिक कार्यासाठी २००३मध्ये मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर मी पूर्ण वेळ समाजकार्यासाठी वाहून घेतलं. पत्नी ज्योती शाळेत शिक्षिका होती. तीही निवृत्त झाली. मुलगा, अभिनय पेट्रोफॅक कंपनीत केमिकल इंजिनीअर आहे. त्याची पत्नी प्राजक्ताने मानसशास्त्रात एमए केलं आहे. मुलगी अनुजा देशपांडे बीई (पॉवर) केलं आहे. अमेरिकेतील हय़ुस्टन येथे वास्तव्याला आहे. तिने तिथं एमबीए (वित्त) केलं. एमएस केलं. ही संस्था सुरू झाल्यानंतर मुलीनेच पहिली देणगी दिली. २०११मध्ये सगळय़ा सामाजिक जीवनातून निवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ ‘दान पारमिता’साठी काम करू लागलो. समाजात पापपिरू तसेच प्रामाणिक लोकांची संख्या मोठी आहे. त्यांनाही ही संस्था मदत करते तसंच मदत करण्याची इच्छा असते पण वेळ देऊ शकत नाही, अशा व्यक्तींना घरबसल्या समाजसेवेत सामावून घेतलं जातं.
घरबसल्या समाजसेवा ही काय संकल्पना आहे?
घरबसल्या समाजसेवा म्हणजे तुम्ही घरीच राहा किंवा आपली नोकरी किंवा व्यवसाय करत राहा. प्रत्यक्ष कामात किंवा थेट कामात सहभागी होऊ नका. पण, तुमच्या ओळखीची २० ते ३० व्यक्तींची नावे द्या. ही नावं मिळाल्यावर आम्ही त्या व्यक्तींना संपर्क करून त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काम करण्यात रुची आहे का? याची विचारणा करतो. संस्थेच्या विविध कामांची माहिती देतो. त्यातून मदत करणारे अनेक हात पुढे येतात. अनाथ, वंचित, उपेक्षितांना त्यातून मदत उभी केली जाते. म्हणजे तुमच्या संपर्काचा वापर करून समाजातील अनेकांपर्यंत पोहोचता येतं. समाजसेवेची ही साखळी उभी करता येते, आम्ही ती केली आहे. ही साखळी झाली की, प्रत्यक्ष काम सुरू होते. प्रत्यक्ष काम म्हणजे त्यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन त्यांची मदत घेणे. अशा प्रकारे काही जण आपले संपर्क देतात तर काही स्वत:ला स्वयंसेवक म्हणून संस्थेच्या कामात सहभागी होतात. आठवडय़ाला कामाचा आढावा घेतला जातो. भदंत डॉ. मेत्तानंद चिंचाल अध्यक्ष तर विनयाताई फडणवीस उपाध्यक्ष आहेत. मी कार्याध्यक्ष आहे. नागेश पाटील हे सचिव तर प्रवीण राजवैद्य हे कोषाध्यक्ष आहेत. अशी आमची १० जणांची टीम आहे.
नवीन पिढीला समाजकार्यात रुची आहे का?
नवीन पिढी उत्साहानं काम करते. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो की, ते येतात. विविध राज्यात काम करणा-यां संस्था आहेत. उदा. ‘मेक अ डिफरन्स’ आणि ‘गुंज’, नागपूरला ‘झीरो ग्रॅव्हिटी’ या संस्था होय. या संस्थांमार्फत १५-१५ दिवसांचे कामही तरुणांना दिले जाते. तरुण ते आनंदानं करतात. आम्हीही पुढच्या वर्षी महाविद्यालयांपर्यंत पोहोचणार आहोत. विविध स्वयंसेवी संस्थांसाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी काम करतात. मुळात तरुणांपर्यंत न पोहोचणारेच असं म्हणू शकतात. लांबूनच त्यांना भरकटलेली पिढी म्हणून मोकळे होतात. फेसबुक, व्हॉट्स अॅप यात अडकून पडलेली पिढी म्हणतात. पण, याच पिढीपर्यंतही चांगले विचार पोहोचत आहेत. मुळात नवीन पिढीपर्यंत पोहोचून त्यांच्या भाषेत बोलणारं कोणी नाही. तरुणांना जी भाषा कळते, त्या भाषेत त्यांच्याशी संपर्क केला जात नाही. त्या भाषेत इतरांना बोलता येत नाही. उदा. आज नैतिकता हा गुणधर्म आई-वडिलांमध्येच दिसत नाही, मग तो त्यांच्या मुलांमध्ये कसा असेल? ही पिढी ज्या भाषेत बोलते त्याचे प्रतिबिंब साहित्यात दिसत नाहीत. या पिढीला चेतन भगत कळतो. ते त्याच्याशी जोडले जातात. म्हणजे अशा भाषेतून त्यांच्याशी बोलता आलं, तर तरुण वर्ग तुमच्याबरोबर येतो.
सामाजिक सृजनशीलतेच्या कल्पना कशा सुचतात?
सामाजिक सृजनशीलतेचे मी हजारेक प्रयोग केले. मी व्यावसायिक क्षेत्रातील कल्पना सामाजिक कार्यासाठी राबवल्या. व्यावसायिक क्षेत्रांनी पैसा कमावण्यासाठी त्याचा वापर केला, तर मी या योजनांचा वापर समाजकार्यासाठी कसा करता येईल, असा विचार करून त्यात थोडे बदल करून त्या समाजासाठी राबवल्या. अलीकडे लग्नात अहेर आणू नका, असं म्हटलं जातं. माझ्या मुलाच्या लग्नाला मी मात्र हक्कानं अहेर आणायचं, असं बजावलं. ‘अहेराची काठी, रक्तपेढीसाठी’ असे लिहून लग्नपत्रिका वाटल्या. त्यातून ८३ हजार रुपये गोळा झाले. ते नागपूरच्या डॉ. हेडगेवार रक्तपेढीसाठी दिले. माझा हा कित्ता पुढे अनेकांनी गिरवला. याबाबत वृत्तपत्रे आणि वाहिन्यांमध्ये मुलाखती येऊन गेल्या. मुलीच्या लग्नावेळीही असंच केलं. अहेरची रक्कम सामाजिक संस्थांना देता येऊ शकते. लोकांना अहेर दिल्याचं आणि तुम्हाला तुमच्या आनंदाच्या क्षणी जमा झालेली रक्कम समाजकार्यासाठी दिल्याचं असं दुहेरी समाधान मिळतं. त्याचबरोबर पौरोहित्य करणाऱ्यांबाबतही असंच केलं. हे पौरोहित्य करणारे कुठे ना कुठे नोकरी, व्यवसाय करत असतात. पौरोहित्य केल्यानंतर त्यांना धान्य, दक्षिणा मिळते. कधी कधी तर एकाच दिवशी दोन-तीन ठिकाणी पौरोहित्य करत असतात. अशावेळी एखाद्या दिवशी मिळणारं धान्य, दक्षिणा अनाथांच्या वसतिगृहाला द्यावी, असं सुचवलं. समाजाला काही देणं आवश्यक आहे, याची जाणीव करून दिली. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. महिन्याला ३० ते ४० हजार रुपये जमा करून दिले. सामान्य माणसांना घेऊन दरवेळी नवनवीन प्रयोग केले. सर्वसामान्यांना उपयोगी पडतील आणि सर्वसामान्यांकडून सर्वसामान्यांना मदत होईल, अशा कल्पना राबवतो. सर्वसामान्यांच्या मदतीची साखळी तयार करणं आणि ती वाढवणं, असं काम ही संस्था करते.
भविष्यात कोणत्या प्रकारचे उपक्रम राबवायचे आहेत?
आता महाविद्यालयीन मुलांपर्यंत पोहोचायचं आहे. त्यांनाही या समाजकार्यात सहभागी करून घ्यायचं आहे. पण त्याचबरोबर वृद्धांची सेवा करायची आहे. त्यांच्यासाठी एक योजना राबवणार आहोत. समाजात वृद्धांच्या शारीरिक, मानसिक समस्या खूप आहेत. त्यांच्यात एककीपणाही खूप आहे. एकाकी वृद्ध किंवा खूपच वयोवृद्ध असलेल्या व्यक्तींना त्यांचं औषधपाणी आणायलाही कोणी नसतं. असे लोक शोधून काढून त्यांची काळजी घ्यायची, त्यांचे गट स्थापन करायचे, त्यांना एकमेकांशी जोडून परस्परांना मदत करण्यासाठी प्रवृत्त करायचं, अशी एक योजना आहे. पुढील वर्षा-दीड वर्षात ही योजना सुरू करणार आहोत. वृद्धांच्या शारीरिक आणि मानसिक समस्या असल्यामुळे अशा वृद्धांची काळजी घ्यायला कोणी तयार होत नाही. त्यामुळे असे वृद्ध स्वत:ला दोष देत जगत असतात, स्वत:शीच बडबडत कुढत असतात. मी अशाच एका वृद्धाकडे गेलो. मुळात एकाकी व्यक्तीला शारीरिक वृद्धात्वापेक्षा मानसिक वृद्धत्व जास्त येते. मी त्यांना समजावलं. देवालाही तुम्ही येथे राहावं, असं वाटतं, असं सांगितलं. रोज थोडं थोडं चाला. त्या थोडय़ा थोडय़ा अंतरात तुम्ही किती घरे किंवा इमारती पार केल्या त्या मोजा. घरी आल्यावर ती संख्या लिहून ठेवा. त्या घरातील माणसांना भेटा, त्यांचे नाव, नंबर आणि वाढदिवस लिहून ठेवा. त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या घरी जा. त्यांना वाढदिवसाला गुलाबाचं फूल भेट द्या. मी आणि ते वृद्ध मग एके दिवशी सकाळीच एका व्यक्तीच्या वाढदिवसाला घरी गेलो. ती व्यक्ती आंघोळ करून, गंध लावून तयारच होती. तिला फूल दिलं. वाढदिवसाला समाजाला काही द्यायला हवे. रक्तदान केलं पाहिजे, वगैरे सांगितलं. त्यालाही ते पटलं. त्यानं दुपारी रक्तदान केलं. हे रक्तदान म्हणजे समाजसेवाच आहे. कारण समाजाला हे रक्त उपयोगी पडणार आहे. समाजाला त्याचा फायदा होणार आहे. मग, ही समाजसेवा नाही का? त्या व्यक्तीला वृद्धाला पाहून आपल्या आजोबांची आठवण झाली, हेही नसे थोडके. या वृद्धांचे बचतगट तयार करणं, आवश्यक आहे. वृद्धांचे छंद काय आहेत, ते विचारावं, त्यांना समाजकार्यात सक्रिय करून घेणे आवश्यक असतं. वृद्धांना दुपारी चार ते सातो या दरम्यान करायला काहीही काम नसतं. त्या दरम्यान ते अक्षरश: वेडेपिसे होतात. हा वेळ वृद्धांनी एकमेकांशी बोलणं, भेटणं आवश्यक असतं. एकमेकांच्या भेटीगाठी करणं आवश्यक असतं. वृद्धांनीही एकमेकांच्या घरी जाणं, घरातील इतर व्यक्तींच्या ओळखी करून घेणं, आवश्यक आहे. संपर्कात येणा-यां तरुण-तरुणींचं लग्न जमवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. निदान स्थळं सुचवू शकतात. त्यातून आनंद घेऊ शकता. त्यामुळे आपण कोणाच्या तरी उपयोगी पडत आहोत, याची त्यांना जाणीव होते. अशा प्रकारे आपलं विश्व आपणच उभं केलं पाहिजे, याची जाणीव वृद्धांना करून देता आली पाहिजे. त्यामुळे त्यांना पैसा, साधनांचा, संपन्नतेचा पाठिंबा मिळतो. वृद्धत्व आणि समृद्धी बरोबर घेऊन जाता येते. त्यांच्या अनुभवांचा उपयोग युवावर्गाला होऊ शकतो. अशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचता येतं आणि एकदा एकापेक्षा जास्त लोकांकडे आपण पोहोचलो की, आपल्या कामाला गती येते. निवृत्त माणसाला १०० कामं येत असतात. कौशल्य, वेळ आणि पैसा यांची सांगड घालता येणं आवश्यक आहे. जे आहे ते अधिक चांगलं केलं पाहिजे. हाती असलेल्या साधनांमधून अधिक चांगलं समाजासाठी द्यायचं आहे. ‘एसएमएम’ हा सध्या बिझिनेस झाला आहे. पण, त्याच ‘एसएमएस’चा वापर करून समाजसेवाही करता येते. पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की, सगळं बदलतं. आपल्या सामाजिक परंपरेला, धार्मिक रूढींना, सवयींना, छंदांना सामाजिक फोडणी दिली, स्पर्श दिला तर अनेक आश्र्चयकारक घटना घडू शकतात, समाजाला त्याचा फायदाही होऊ शकतो.
खूप चं छान उपक्रम आहे. मी हि माझ्या परिसरातील गरीब लोकांसाठी मदत करू इच्छिते आपण मला सहकार्य व मागर्दर्शन करावे.
वैशाली