गानसम्राज्ञी लता मंगेशकर आज ८७व्या वर्षात पाऊल ठेवत आहेत, त्यांनीच सांगून ठेवले आहे की, ‘मेरी आवाज ही पेहचान है’ त्यानिमित्ताने…
सुरांना वय असते का? तर त्याचे उत्तर नाहीच. गानकोकिळा लता मंगेशकर यांच्याकडे पाहताना असेच उत्तर प्रत्येक भारतीयांच्या ओठांवर येऊ शकते. इतकी ही गायिका संगीत, गाणे यात समरस झालेली आहे. प्रत्येक पिढीला त्यांच्या आवाजात जादूई करिष्मा वाटतो. हे भाग्य फारच थोडया कलाकारांच्या आयुष्यात येत असते. ते लता मंगेशकर यांच्या वाटयाला आलेले आहे. ८७व्या वर्षात पदार्पण करताना ही गायिका आजही तोच मुलायम स्वर जपून आले.
भारतीय संगीताला जगभरात मान आहे. हा मान या संगीतातील शास्त्रीय बैठकीतून प्राप्त झालेला आहे. रागदारीतून आलेले गाणे असो वा लोकसंगीताशी साधम्र्य साधणारे गाणे, लता मंगेशकर यांनी या प्रत्येक गाण्याचे सोने केलेले आहे. हे सोने आजही तेवढयाच लख्खकन चमकते आहे.
‘लता मंगेशकर’ हे नाव संगीताच्या अवकाशात अवतीर्ण होण्यापूर्वी शमशाद बेगम, आमीरबाई कर्नाटकी, बेगम अख्तर,जोहराबाई, मुबारक बेगम अशा गायिका होत्या. त्या प्रत्येक गायिकेच्या आवाजात वेगळा लहेजा होता. त्यानुसार त्यांना प्रसिद्धीही मिळत होती.
त्यांचा एक चाहतावर्गही होता. या अवकाशात प्रवेश करायचा असेल तर आपला ताराही तितकाच चमकला पाहिजे, हे लता मंगेशकर यांना अवगत होते. त्यामुळेच की काय दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून कानावर आलेले गाणे मनात साठवत त्यांनी आपली वेगळी वाट चोखाळली. त्यात त्या यशस्वीही झालेल्या आहेत. ‘मेरी आवाज ही पेहचान है’ असे त्यांचे एक गाणे प्रसिद्ध आहे. खरोखरच त्यांचा आवाज हीच त्यांची ‘पेहचान’ झालेली आहे.
भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील एकाहून एक संगीतकारांबरोबर त्यांनी काम केलेले आहे. या प्रत्येक संगीतकाराला, गायकाचा मूड पाहून त्यांनी आपल्या आवाजातील कोवळीक जपलेली आहे.
‘महेल’ सिनेमातील ‘आयेगा आयेगा, आयेगा आनेवाला’ हे गाणे असो, किंवा मुगल-ए-आझम, गुंज उठी शहनाई असो, किंवा पाकिजा अशा एकाहून एक सिनेमाला लता मंगेशकर यांनी आपला सूर दिलेला आहे. सुरांचे साम्राज्य तयार करून त्यावर आरूढ होणे सोपे नसते. पण लता मंगेशकर यांनी ते हिकमतीने केलेले आहे. त्यामुळे त्यांनी गायलेल्या ‘ए मेरे वतन के लोंगो’ या गाण्यावर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हमसून, हमसून रडले होते. या गाण्याचे शब्द जितके आशयघन आहेत, तितकेच त्यातील सूरही. त्यामुळेच की काय या दोन्ही मिश्रणाने हे गाणे अजरामर झालेले आहे.
गेली साठहून अधिक वर्षे लता मंगेशकर गात आहेत. त्यांनी हजारो गाणी विविध भाषांमध्ये गायलेली आहेत. खरे तर संगीताला प्रादेशिकतेचे कुंपण नसते. ते ही कुंपणे पार करून जातात. लता मंगेशकर यांचा आवाजही असाच कुंपणे पार करणारा आहे. त्यांनी कव्वाली, भजन, विराणी, प्रेमगीते, विरहगीते अशा विविध स्वरूपांची गाणी गायलेली आहेत.
गाण्याच्या प्रांतात विहरताना या गानकोकिळेने आपल्याकडचे सगळेच काही रसिकांच्या चरणी अर्पण केलेले आहे. अजूनही त्या कधी कधी गातात. कलाकार हा कधीच वृद्ध होत नसतो. तो त्याच्यातील अंगभूत सामर्थ्यांने काळाच्या कराल दाढेलाही हलवू शकतो, हे लता मंगेशकर यांनी सिद्ध केलेले आहे. कलावंत हा केवळ स्वान्तसुखाय वावरणारा असतो, असे म्हणतात. त्यामुळे समाज, सामाजिक बांधिलकीशी त्याचे देणे-घेणे नसते, असेही बोलले जाते. पण लता मंगेशकर यांनी सामाजिक बांधिलकी अनेकदा कृतीतून दाखवलेली आहे.
आजही एखादी घटना घडल्यानंतर त्यांच्यातील कलावंत जागा होतो. उरी येथील दहशतवादी हल्ल्यात १९ भारतीय सैनिक शहीद झाले. त्यांच्या कुटुंबीयांसाठी निधी जमवण्याचे आवाहन या ८७ वर्षाच्या आजीबाई करतात, त्यामुळे त्याचे अप्रूप वाटते.
देवाने कलाकाराला बनवताना कोणत्या कुपीतले रसायन वापरले हेच कळत नाही. पण कलाकार हा आयुष्यभर आपल्याकडचे असलेले रिते करण्याचा प्रयत्न करतो. या रितेपणातून मिळणारी आत्मिक शांतता काही वेगळीच असते. ही शांतता..त्या शांततेतील आवाज ज्यांना ओळखता येतो, ते मोठे होतात.
लता मंगेशकर या मोठया गायिका आहेत यात वादच नाहीत. पण त्याआधी त्या एक चांगल्या माणूस आहेत. ही माणुसकीची जाण त्यांना आहे. त्यामुळेच आपल्यासह आपल्या बहीण-भावांना त्यांनी वेगळा ‘स्पेस’ दिला. हे अवकाश लता नावाच्या ताऱ्यामुळे सोपे नव्हते. पण ते देण्याची उदारशीलताही त्यांनी दाखवली, यातच त्यांचे मोठेपण आहे, नाही का?
आप jio hajaro साल ! वाढ divasachya haardik shubhechcha दीदी ,!