लहान मुले ही देवाघरची फुले असतात, असे म्हणणा-या आणि मानणा-या समाजात ज्युड सायमन गोन्साल्विस नावाचा मुलगा जन्मला, पण या समाजाने ज्युडला फुलण्याचा अधिकारच दिला नाही. त्याला खेळायला आवडायचे, पण त्याच्या घराच्या अवती-भवती मैदानच नसल्यामुळे इमारतीच्या अरुंद जागेत, शेजा-यांच्या टीका-टिप्पणीला घाबरत खेळण्याशिवाय त्याला दुसरा पर्याय नव्हता.
लहान मुले ही देवाघरची फुले असतात, असे म्हणणा-या आणि मानणा-या समाजात ज्युड सायमन गोन्साल्विस नावाचा मुलगा जन्मला, पण या समाजाने ज्युडला फुलण्याचा अधिकारच दिला नाही. त्याला खेळायला आवडायचे, पण त्याच्या घराच्या अवती-भवती मैदानच नसल्यामुळे इमारतीच्या अरुंद जागेत, शेजा-यांच्या टीका-टिप्पणीला घाबरत खेळण्याशिवाय त्याला दुसरा पर्याय नव्हता. त्याला कुत्र्या-मांजरांचा भारी लळा, पण घर छोटे असल्यामुळे ज्युड मित्राच्या कुत्र्यांबरोबर दोस्ती करून आपली हौस भागवत असे. हसतमुख चेहरा आणि मिश्कील डोळे, घेऊन ज्युड सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत आनंदी दिसायचा.. कधी संध्याकाळी ज्युडला त्याचा काका अभ्यासाला बसवायचा. येणा-या-जाणा-या लोकांकडे पाहात त्याचा अभ्यास सुरू असे; पण अचानक असे काय झाले? उत्साहाने सळसळणारा ज्युड अचानक शांत झाला.. कधीही एका जागी न बसू शकणारा हा अवखळ मुलगा शवपेटीत निवांत कसा निजला? होय, हा मोठा प्रश्न आहे.
शुक्रवारी सकाळी माहीमच्या व्हिक्टोरिया शाळेत गेलेला आठवीतील ज्युड डेंग्यूच्या आजाराने असा अचानक जाणे धक्कादायक आणि अनाकलनीय आहे. ज्युडचे आणि त्याच्यासारख्या हजारो भारतीय बालकांचे बालपण असे अचानक का कोमेजून जाते आणि या निष्पाप बाळांचे असे हकनाक जीव जात असताना आमची सारी ‘व्यवस्था’ ते शांतपणे कशी पाहू शकते? शासन, प्रशासन आणि सगळीच सूत्रे हलविणारी माणसे खरोखर ‘माणसे’ आहेत, असे आम्हाला वाटते. मग त्या माणसांना या लेकरांच्या मृत्यूने दयेचा पाझर फुटत नाही का? ज्युड अवघा १४ वर्षाचा होता. गेली १४ वर्षे, प्रत्येक नाताळ सणाला त्याला कपडे घेताना, त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या भविष्याची, त्याच्या लग्नाची, संसाराची स्वप्ने पाहिली असतील, जशी तुम्ही-आम्ही सगळेच आपल्या पुढील पिढीच्या उत्कर्षाची स्वप्ने पाहतो; पण आपल्या १४ वर्षाच्या मुलाला शवपेटीत पाहून ज्युडच्या आई-वडिलांच्या स्वप्नांचा कसा चक्काचूर झाला असेल याची कल्पनाही करता येणार नाही.
खलिल जिब्रान यांनी एका ठिकाणी लिहिले आहे की, ‘संपूर्ण झाडाची संमती असल्याखेरीज झाडाचे एक पानही गळत नाही.’ मग ज्युडसारखी हजारो फुले डेंग्यू, मलेरियासारख्या रोगांनी मावळताना दिसतात, त्याला शासन-समाज या सा-यांचीच संमती असते का? होय, लोकशाही शासनव्यवस्थेत लोककल्याणाची जबाबदारी घेऊन शहर, राज्य आणि देशाचे प्रशासन लोकप्रतिनिधी चालवत असतील, तर त्या व्यवस्थेच्या अकार्यक्षमतेमुळेच ज्युडसारखी मुले-माणसे दररोज मृत्यूच्या दारी जातात. आणि त्यांच्या मृत्यूच्या कारणांची चिकित्सा करीत स्वत:चा बचाव करण्यात शहाणपण आणि मोठेपण मानणारे महापौर, महापालिका आयुक्त, आमदार किंवा नगरसेवक पुन्हा स्वत:च्या विश्वात रमण्यात मोठया आत्मविश्वासाने पुढे जातात; कारण प्रशासन नावाच्या यंत्रणेला ‘हृदय’ नसते. असतो तो फक्त मेंदू, त्यामुळे तेथे ‘डोकेबाज’ लोकांची सद्दी चालते.
गेल्या काही वर्षापासून मुंबई आणि लगतच्या परिसरात विविध आजारांनी पुन्हा डोके वर काढले असून डेंग्यू हा चिंतेचे कारण बनला आहे. तीन वर्षापूर्वी मुंबई व उपनगरात मलेरियाने थैमान घातले होते. मात्र, या आजाराने मृत्यूचे प्रमाण फार नसल्याने व साथ बरीच आटोक्यात आल्याने चिंतेचे कारण नव्हते. तरीही गेल्या मार्चपर्यंत मुंबई व उपनगरात विविध आजार ठाण मांडून बसले होते व विविध आजारांनी सुमारे ८०० जण ग्रस्त होते. त्यात मलेरियाचे १०७६, डेंग्यूचे ६२, विषमज्वराचे १३२, काविळीचे १३१ रुग्ण होते. अर्थात, ही आकडेवारी रुग्णांच्या संख्येची पुरेशी कल्पना देणारी नव्हती. कारण खासगी रुग्णालयात व घरीच उपचार घेणा-या सर्वच रुग्णांची नोंद पालिकेकडे असत नाही.
परंतु गेल्या काही दिवसांत डेंग्यूचा आजार जोर करत असून डेंग्यूने आतापर्यंत १२ जणांचे बळी घेतले आहेत. गेल्या आठवडय़ातच या आजाराने तीन बळी घेतले आहेत. पालिका डासांची निर्मिती रोखण्यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्नही करत आहे. मात्र, पालिकेने डासांची निर्मिती रोखण्यासाठी उपाययोजना, मार्गदर्शन करणा-या जुन्याच सूचना असलेली भित्तिपत्रिको मुंबईत सर्वत्र लावल्या आहेत. यामुळे लोकांच्या ज्ञानात नवी भर पडत नाही. ज्या लोकांच्या घरात डास निर्माण होतात, अशी परिस्थिती आढळली त्या नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याचेही पालिकेने ठरवले. पण आमच्या घरातील डास काय आम्ही निर्माण केले, असे प्रश्न लोकांनी विचारले.
डासांच्या निर्मितीला पालिका व नागरिकही जबाबदार आहेत. कारण मुंबईत रोज तयार होणा-या हजारो टन कच-याचे व्यवस्थापन पालिका करू शकत नाही, हे सिद्ध झाले आहे. हा कचरा ठरावीक डम्पिंग ग्राउंडवर नेऊन टाकला जातो व तो तेथेच कित्येक महिने पडून असतो. आता कचरा टाकायला डम्पिंग ग्राउंडही शिल्लक नाहीत. कच-याचे नियोजन होत नाही, याचे एक कारण असे आहे की, पालिकेचे अधिकारी, कचरा उचलणारे कंत्राटदार आणि काही नगरसेवक यांचे हितसंबंध असल्याने व ते राखण्यासाठी त्यांचे साटेलोटे असल्याने कच-याचा निपटारा व त्याचे व्यवस्थापन होत नाही. कच-यावर प्रक्रिया करून त्यापासून वीज तयार करण्याची योजना कार्यान्वित झाली असती तर कच-याचा प्रश्न निकाली निघाला असता. यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन कच-याचे ओला व सुका असे विभाजन झाले असते तर कच-याची समस्या दूर झाली असती.
शहरात मोठय़ा प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांच्या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी पाण्याच्या टाक्या बांधलेल्या असतात. या साठलेल्या पाण्यात डासांची पैदास होते. या टाक्या बंद असायला हव्यात. पण, त्या बंद ठेवल्या जात नाहीत. त्यामुळे त्या पाण्यात डास अंडी घालतात. डासांच्या पैदाशीला हा हलगर्जीपणाही कारणीभूत आहे. पण महापालिकांचे अधिकारी याबाबत बांधकाम व्यावसायिकांना जाब विचारत नाहीत. डासांच्या पैदाशीला नागरिकही कारणीभूत आहेत. अनेक लोक रात्री खाद्यपदार्थाचे स्टॉल्स व गाडय़ांवर जेवण करतात आणि उरलेले पदार्थ कच-याच्या डब्यात टाकण्याची तसदी घेत नाहीत. स्टॉलवाले आणि गाडीवालेही रात्री उरलेले पदार्थ रस्त्यावरच टाकून देतात आणि आपली भांडी तेथेच विसळवतात.
पालिकेचे अधिकारी या गाडीवाल्यांवर, स्टॉलवाल्यांवर कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे ही अस्वच्छता अशीच चालू राहते. त्याचबरोबर चांगल्या गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये राहणारा उच्चभ्रू वर्गही अस्वच्छतेला आणि डासांची पैदास होईल, अशी परिस्थिती निर्माण करण्यास जबाबदार असतो. अनेक सोसायटयांमध्ये टाकींमध्ये पाणी चढवणारे पंप तसेच चालू ठेवल्याने पाणी वाहून जाते व हे वाहून जाणारे पाणी सोसायटीतील सखल भागात साठून राहते आणि त्यामुळे तेथे डासांची पैदास होते. अशा सोसायटय़ांवर कारवाई केली पाहिजे. डासांच्या पैदाशीचे नियंत्रण करण्यासाठी महापालिकेने जी फवारणी सातत्याने करायला पाहिजे ती केली जात नाही. ही फवारणी काही विशिष्ट भागातच वारंवार केली जाते. अशी फवारणी करण्याकडे टाळाटाळ करण्यात येत आहे. याबाबत असे कारण सांगण्यात येते की, पालिकेकडे या फवारणीसाठी पुरेसा कर्मचारीवर्ग नाही.
अलीकडे तर या फवारणीसाठी लागणारे आवश्यक ते साहित्य उपलब्ध नसल्याने ही फवारणी मंदावल्याचे सांगण्यात येते. महापालिकेची फवारणी सातत्याने होत नाही, याकडे स्थानिक नगरसेवकांनी पालिका अधिका-यांचे लक्ष वेधून ही फवारणी सर्वत्र विशिष्ट काळाने होईलच, याची काळजी घेतली पाहिजे. मुंबईत सध्या इतर कुठल्याही आजारापेक्षा डेंग्यूची साथ पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तो त्वरित रोखणे आवश्यक आहे. कारण १ ऑक्टोबपर्यंत सरकारी रुग्णालयांमध्ये ६६० रुग्णांची नोंद झाली आहे, तर खासगी रुग्णालयांमध्ये १७ ऑक्टोबपर्यंत ५१५ रुग्णांची नोंद झाली आहे.
डेंग्यूची साथ केवळ मुंबईतच नाही तर नवी मुंबई, ठाणे, रायगड एवढेच नव्हे तर भंडा-यासारख्या दूरच्या जिल्हय़ामध्येही आहे. त्यामुळे डेंग्यूच्या आजाराची समस्या केवळ मुंबईपुरतीच मर्यादित आहे, असे समजण्याचे कारण नाही. म्हणून ही साथ रोखण्यासाठी राज्य पातळीवरही उपाययोजना होणे आवश्यक आहे. ज्युडच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जे दु:ख झाले असेल, ते या देशातील कोणत्याच मातेला होऊ नये. गोविंदाग्रजांच्या ‘राजहंस माझा निजला’ या कवितेतील हृदय विदीर्ण करणा-या ओळी कोणत्याच आईच्या ओठी कधीही येऊ नयेत..
मग रडूनि वदे ती सकला। राजहंस माझा निजला।
करू नका गलबला अगदी। लागली झोप मम बाळा।
आधीच झोप त्या नाही। खेळाचा एकच चाळा।
जागतांच वा-यासरसा। खेळाचा घेईल आळा।
वाजवू नका पाऊल।
लागेल तया चाहूल।
झोपेचा हलका फुल।
मग झोपायाचा कुठला। राजहंस माझा निजला..
प्रिय ज्युड, तुझ्या जगण्याचा हक्क नाकारण्यासाठी, तुझ्या आई-वडिलांना दु:खसागरात लोटण्यासाठी आमची सारी समाजव्यवस्था जबाबदार आहे.. मित्रा, तू आम्हाला माफ कर!
Very Bad News. Goverment Should take prompt action and save innocent people.