मध्य रेल्वेच्या प्रथमश्रेणीतून प्रवास करणा-या एका महिला प्रवाशाला नुकताच सहकारी महिला प्रवाशांकडून प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना घडली. महिन्याभराच्या अन्यायानंतर या तरुणीने संबंधित महिला कंपूची तक्रार केल्यानंतर या महिलांना अटक व दंडही झाला. मात्र, यामुळे ऐन गर्दीच्या वेळी मुंबईतील लोकल प्रवाशांच्या बिघडत्या मनस्वास्थ्याचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला. पुरुषांप्रमाणेच आता महिलावर्गही आक्रमक होऊ लागला आहे का? सर्वच प्रवाशांच्या वागण्यात हिंसात्मक बदल होऊ लागले आहेत का? विकासाची जपमाळ जपणा-या आधुनिक महिलावर्गाचे हे नवे चित्र समाजासमोर कोणता आदर्श उभे करत आहे? रेल्वे प्रशसानाने महिलांच्या डब्यातील गर्दीवर कोणते उपाय योजावेत? सुरक्षा, सोयी पुरवण्यात रेल्वेला अपयश का येत आहे?..
ताणमुक्तीचा विचित्र मार्ग
मुंबईचा लोकलप्रवास हा जगभराचा कौतुकाचा विषय. कोणत्याही परिस्थितीत सदोदित धावणा-या रेल्वे प्रवासातील महिला प्रवाशाच्या तक्रारीने कौतुकास पात्र ठरलेल्या या प्रवासाला गालबोट लावले. मात्र त्याचसोबत ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांच्या ढासळत्या मन:स्थितीचा मुद्दाही ऐरणीवर आला. पुरुषांप्रमाणे आता महिलाही आक्रमक होऊ लागल्या आहेत का, यावर वाचकांची मते मागवली असता उत्तर होकारार्थी मिळाले. महिलांची ही प्रतिमा निश्चितच खेदजनक असताना यामागची कारणेही वाचकांनी समोर आणली. प्रवासादरम्यान केवळ महिलांनाच नव्हे तर पुरुष प्रवाशांनाही अशाच समस्येला सामोरे जावे लागते. वाढत्या लोकसंख्येच्या मानाने अपुरे पडणा-या रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या गरजेनुसार गाडय़ांची संख्या न वाढवल्याचा हा परिणाम असल्याचे मत वाचकांनी नोंदवले. त्यामुळे प्रवासादरम्यान होणा-या हिंसेची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने स्वीकारावी तसेच अशी हिंसात्मक कृत्ये करण्यास धजावणा-या प्रवाशांच्या उद्दामपणाला आळा घालण्यासाठी सुरक्षारक्षकांची फौज रेल्वे डब्यात तैनात करावी, असे मत वाचकांनी अधोरेखित केले.
रेल्वेचा गलथान कारभार प्रवाशांच्या मुळावर
संसाराला आर्थिक हातभार लावण्याच्या हेतूने नोकरीधंद्याला बाहेर पडलेली महिला आपले आस्तित्व टिकवण्याच्या हेतूमुळे आक्रमक होऊ पाहत आहे. एरव्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणा-या महिलांमध्ये पुरुषांच्या सान्निध्यातून वा विचारांतून आक्रमकता येऊ शकते. आजच्या धावपळीच्या जीवनात एका स्त्री प्रवाशाने दुसरीला समंजसपणे वागणूक देणे गरजेचे वाटते. ऐन गर्दीच्या वेळात दीड-दोन तासांच्या प्रवासासाठी बसण्यास जागा मिळणे आवश्यक असले तरी त्या जीवघेण्या गर्दीत ती तारेवरची कसरत ठरते. मात्र आसन मिळण्याच्या स्पर्धेत टिकाव लागला तरीही त्या आसनावर अन्य प्रवाशांची अनधिकृतरीत्या जाहीर असलेली मक्तेदारी आड येते. अशा अनेक कारणास्तव आता रेल्वेतून प्रवास करणा-या प्रवाशांच्या वागणुकीला हिंसेचे गालबोट लागत आहे. मागील वर्षभरात चार वेळा तिकीट दरवाढ करणा-या रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचा अंत पाहू नये व लवकरात लवकर सर्वच लोकल १५ डब्यांच्या कराव्यात. या १५ डब्यांच्या लोकलमध्ये प्रथमवर्ग महिला प्रवाशांना संपूर्ण एक डबा व द्वितीय वर्ग महिलांना २ डबे आरक्षित ठेवावेत. या डब्यांमध्ये सुरक्षारक्षक नेमावेत. महिलांनी आक्रमकता आवरून सहप्रवासी महिलांच्या अडचणी जाणून घ्याव्यात व एकमेकींना मदत करावी, कारण आजची आक्रमता एखादीचा अमूल्य जीवनाचाही शेवट करू शकतो, हे लक्षात घ्यावे. – दिलीप अक्षेकर, माहीम
माणुसकी संपत चाललीय का?
पुरुषांप्रमाणे महिलांचीही आता रेल्वे डब्यात कंपूशाही चालू झाली आहे. या हेकेखोर महिला प्रवाशांना वेळीच अद्दल घडवणे योग्य ठरेल. हा प्रकार पश्चिम रेल्वेत कित्येक वर्षापासून रुजू आहे. विरार गाडीता चढणे म्हणजे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक दिव्य ठरते. प्रत्येक आसनावर एकेका प्रवाशाचा अनधिकृत मालकी हक्क असतो. एखादा नवखा आला तर त्याला खेचून गाडीबाहेर टाकण्यापर्यंत प्रवाशांची मजल जाते. महिला डब्यांचे चित्र तर त्याहून भयानक असते. लोकसंख्येचा बोजवारा प्रत्येक व्यवस्थापनासमोर आव्हान आहे. मात्र त्यावर आवश्यक उपाय अंमलात आणणे गरजेचे आहे. ऐन कामाच्यावेळी वेळेवर स्थानकात दाखल न होणारी ट्रेन, मध्येच सिग्नल यंत्रणेत होणारा बिघाड या असंख्य आव्हानांना पार करत प्रवासी कार्यालय गाठतात. त्यात महिला प्रवाशांवर घर आणि करियर या कसरतींपुढे कामाचा डोंगर उभा असतो. त्यात आता संयमाचा तोल ढासळतो तो नेमक्या या प्रवासाच्या वेळी. ऐन गर्दीत जीव मुठीत ठेवून आयुष्य ढकलणा-या प्रत्येक प्रवाशाचा प्रवास सुखकर करणे हे रेल्वे प्रशासनाच्या हाती आहे. गर्दीत संयमी वृत्तीचा अंत होतो. शाब्दिक भांडणाचे रूपांतर नंतर हाणामारीत होते. याला आता महिला प्रवासीदेखील अपवाद नसल्याचे सिद्ध झाले आहे. या वाढत्या हेकेखोर वृत्तीला, कंपूशाहीला वेळीच आटोक्यात आणले नाही तर खूप मोठा भडका उडू शकतो. – सुभाष वाघवणकर, जोगेश्वरी (पूर्व)
नको हा जीवघेणा प्रवास
मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचे तीन-तेरा वाजलेले नेहमीच आढळते. वाहतुकीचा खेळखंडोबा हा रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीचे ठळक वैशिष्टय़ होऊन बसले आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर या ना त्या कारणास्तव व्यवस्थापकीय डोलारा कोलमडलेला दिसतो. त्यामुळे कामात होणा-या दिरंगाईने संतप्त प्रवासी आपला राग काढण्याचा मार्ग शोधतात. आसनांची मक्तेदारी ही पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची खासियत आहे. विरार ते चर्चगेट आणि चर्चगेट ते विरार लोकलमध्ये ठरावीक संघ केलेल्या प्रवाशाची प्रचंड दादागिरी चालते. मुद्दामहून मुख्य दरवाज्यावर उभे राहून नेहमीच्या आपल्या खास माणसांना प्रवेश देण्यापासून ते नवख्या माणसाला हाताने फटकारण्यापर्यंत त्यांची मजल जाते. तिकीट चुकवणा-या प्रवाशांचा चाप बसावा, यासाठी नेमलेल्या टीसींप्रमाणे आता प्रत्येक रेल्वेच्या डब्यात सुरक्षारक्षकांची फौज तैनात करणे गरजेचे होऊन बसले आहे. उर्मठ तसेच अंगावर धावून येणा-या हिंस्र प्रवाशांवर या सुरक्षारक्षकांची नजर राहील. तिकिटाचे दर गगनाला भिडलेले असताना हा अमाप पैसा गोळा करणा-या रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वप्रथम प्राधान्य द्यावे. – मयूर ढोलम, जोगेश्वरी
उपाययोजनांची अंमलबजावणी करावी
मुंबईच्या बेफाम वाढीमुळे अनेक नोकरदार महिलांना घर व कार्यालयीन कामाची कसरत करावी लागते. त्यात रेल्वेतून प्रवास करताना त्यांना सोनसाखळी, मोबाइल हिसकावणे, टवाळखोरांकडून छेडछाड, भिकारी, गर्दुल्ले व तृतीयपंथीयांचा उपद्रव अशा असंख्य मन:स्तापाचा सामना करावा लागतो. त्यामुळे कुठल्याही सुसंस्कृत महिलेचेही मानसिक संतुलन ढळणे स्वाभाविक आहे. हे टाळण्यासाठी रेल्वे प्रशसनाने खास महिलांसाठी जनता दरबार घ्यावा. प्रवासादरम्यानच्या त्यांच्या समस्यांवर व त्यावरील उपायांवर चर्चा करावी व एकमताने संमत झालेले निर्णय त्वरित अंमलात आणावेत. रेल्वे डब्यात चोवीस तास सुरू असणा-या सीसीटीव्ही कॅमे-यातून प्रवाशांच्या हालचालींवर नजर राखता येईल तसेच चोवीस तास सुरक्षारक्षक ठेवण्यासारख्या उपायांची त्वरेने अंमलबजावणी करावी. – डॉ. कृष्णकांत नाबर, माहीम
महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे
मन:स्ताप होईल इतका इतरांना विनाकारण त्रास देणे आणि त्याचा आनंद लुटणे ही एक मनोविकृती आहे. प्रथमश्रेणीच्या डब्यातून प्रवास करणा-या एका महिलेने महिलांच्या कंपूच्या विरुद्ध तक्रार दिल्यानंतर कंपूला अटक करून दंडही करण्यात आला. इतर प्रवाशांना मन:स्ताप देऊन विनाकारण राईचा पर्वत करून शाब्दिक भांडाराचा डोलारा उभारणारे असंख्य आहेत. सध्या लोहमार्गावरील प्रवास हा प्रचंड गर्दीच्या कमालीच्या ताणतणावाखाली अपरिहार्यपणे करावा लागत असल्याने एखाद्या क्षुल्लककारणावरून भांडण-तंट्टे होतात, प्रसंगी जीवावरही बेतण्याची पाळी येते. उपलब्ध सोयीसुविधा पुरवण्यात सातत्याने कमी पडणा-या रेल्वे प्रशासनाने याची जबाबदारी स्वीकारावी. तसेच घडलेल्या महिला प्रवाशाच्या प्रकरणावरून धडा घेत प्रवाशांना सक्षम सुरक्षा यंत्रणेची सोय उपलब्ध करून द्यावी. – मधुकर ताटके, गोरेगाव (प.)
सहकार्याची परिभाषा बदलली
वाढत्या गर्दीतही महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी आरक्षित डब्यांची व्यवस्था रेल्वे प्रशासनाने केली आहे. मात्र महिलांच्या बोगीत पुरुषांची सर्रास घुसखोरी सुरू असल्याचे चित्र काही नवे नाही. महिलांसाठी आरक्षित असलेल्या डब्यात काही जण जाणीवपूर्वक प्रवेश करतात. याबाबत कित्येकदा रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करूनही त्यावर कडक उपाय योजले जात नाहीत. घरापासून कार्यालयापर्यंतचा दूरवरचा प्रवास मन:स्तापाचा असल्याने या स्त्रियांचा ठरावीक वेळेचा, ठरावीक गाडी पकडणारा एक घोळका तयार होतो. दैनंदिन प्रवासात एकमेकांची सुखदु:खे वाटत असताना त्या गाडीचा तो विशेष डबा आणि त्यावरील आसनावर एका प्रकारची मक्तेदारी मिरवायला सुरुवात होते. त्यामुळे हे एखादी दुसरी महिला त्या आसनावर बसलेली दिसल्यास त्या शक्तिशाली महिलांचा राग अनावर होतो. हा प्रकार आजकाल सर्वत्र पाहायला मिळत आहे. पूर्वी गर्दीचा लोट पाहून इतर महिला प्रवाशांना सांभाळणारा सोशिक महिलावर्ग हा आता उद्विग्न झालेला दिसत आहे. परिणामी वाढत्या नोकरदार स्त्रियांसाठी रेल्वेत अतिरिक्त डबे असणे गरजेचे आहे. तसेच महिलांच्या डब्यात मार्गदर्शक सूचनाफलक लावावेत. तसेच महिलांनीही एकमेकींसाठी सहकार्य दाखवल्यास डागाळलेली प्रतिमा उजळण्यास मदत होईल. – हरीश बेडेकर, मुंबई
सोयी-सुविधांचा अभाव कारणीभूत
रेल्वे ही मुंबईची जीवनवाहिनी समजली जाते. रेल्वेत चढण्यापासून आसन मिळेपर्यंत प्रवाशांना मोठा संघर्ष करावा लागतो. निदान उभे राहण्यास पुरेशी जागा मिळाली तरीही प्रवाशांना हायसे वाटते. काही रेल्वे स्थानकांची उंची मुळात कमी असल्याने कित्येकदा अपंग प्रवासी, महिला व मुले यांना इजा होते. अशीच घटना ४ नोव्हेंबर रोजी भांडुप रेल्वे स्थानकावर माझ्या डोळ्यासमोर घडली. गर्दीने खच्च भरलेल्या महिला डब्यात चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका मुलीच्या जिवावर एक प्रसंग बेतला. सुदैवाने ती या अपघातातून बचावली असली तरीही बचावात्मक उपाय म्हणून रेल्वेस्थानकांची उंची वाढवणे अत्यंत निकडीचे आहे. ऐन गर्दीच्या वेळी असा काही प्रसंग घडल्यास महिलांच्याच नव्हे तर पुरुष प्रवाशांच्याही मन:स्तापात भर पडते. याच समस्येच्या कारणांचे अनेक कंगोरे आहेत. त्यामध्येच महिला प्रवाशांच्या समस्यांची पाळेमुळे सापडतात. याकरिता रेल्वे प्रशासनाने रेल्वेची संख्या वाढवल्यास कमी डब्यांत कोंबल्या जाणा-या प्रवाशांवरील भार हलका होईल. – प्रवीण पाटील, परळ
मुद्दा चौथ्या आसनाचा
रेल्वेत चढल्यानंतर आसन पकडण्याची कसरत दिवसेंदिवस जीवघेणी होऊन बसली आहे. आसन मिळाले नाही तर दोन समोरासमोरील आसनांदरम्यान उभे राहणे, तीन आसने असताना चौथ्या आसनासाठी सरसकट जबरदस्ती करणे, हेच वादाचे मूळ कारण आहे. त्यातही काही हौशी मंडळी गप्पा-गाणी, भजनांचा कार्यक्रम आटोपतात. आपल्या डब्यात नवख्या प्रवाशाला येऊ देत नाहीत. प्रत्येक डब्यात आसनक्षमतेपेक्षाही जास्त प्रवाशांची संख्या आढळते. त्यामुळे आता काही प्रवाशांनी जादा पैसे मोजून प्रथम श्रेणीच्या डब्याचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता प्रथम श्रेणीच्या डब्यातही प्रवाशांची संख्या वाढत आहे. महिलांच्या डब्यांची स्थिती काही वेगळी नाही. याकरिता डब्यांची संख्या वाढवावी. आसनाच्या मुद्दय़ावरून हिंसात्मक वळण घेणा-या शाब्दिक वादांवर तात्काळ लगाम घालण्यासाठी पोलिस किंवा सुरक्षारक्षक नेमावेत. – महादेव गोळवसकर, घाटकोपर
महिलांनी वास्तवाचे भान ठेवावे
महिला सक्षमीकरणाच्या प्रेरणादायी बातम्यांचा ओघ वाढत असताना सुशिक्षित महिलांनी आपल्या सहकारी महिलेला मन:स्ताप देऊन समस्त महिलावर्गाची मान शरमेने खाली घातली. आजकाल बहुतेक महिला पुरुषांप्रमाणेच रेल्वेच्या डब्यात उभे राहून रेल्वेत चढणा-या महिलांना रेल्वे स्थानकावरच रोखतात. पुरुषांप्रमाणे धक्काबुक्की करतात. हीच महिला सबलीकरणाची प्रवृत्ती.. आज कोणतीही स्त्री एकटी फिरू किंवा प्रवास करू शकत नाही. सुरक्षेची टांगती तलवार असताना खुद्द महिलांनीच सहकारी महिलांवर मन:स्तापाची वेळ आणावी, हेच दुर्दैवी आहे. रेल्वे प्रशासनाने महिलांच्या डब्यात साध्या वेशातील पोलिस महिलांची नेमणूक करावी. अन्यथा स्त्रीअहंकाराचे विकृत स्वरूप तमाम महिलावर्गाला बदनाम करेल. – शिवदास शिरोडकर, लालबाग
ढिसाळ व्यवस्थापनाचा फटका
भारतीय रेल्वे ही स्वत:च्या मालकीची संपत्ती असल्याची गुर्मी असणारी काही प्रवासी मंडळी रेल्वेतून प्रवास करताना आपला मालकी हक्क दाखवतात. पुरुषांच्या डब्यात हे प्रकार नित्याचेच आहेत. मात्र महिलांच्या डब्यात महिलांनीच महिलांशी दादागिरी करणे हा प्रकारही आता रुजू होत असल्याचे जातिवंत उदाहरण सदर घटनेतून आढळतेय. रेल्वेतील आसने अडवण्याची दादागिरी सर्वच गाडय़ांमध्ये पाहायला मिळते. त्या विरोधात आजवर कुणीही आवाज उठवत नव्हते. मात्र एका महिलेने काही महिला कंपूविरोधात पोलिसांमध्ये थेट तक्रार करून ‘त्या’ महिलांकडून होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली. ‘त्या’ महिलांना अटक व दंड अशी दुहेरी कारवाई सोसावी लागली. मात्र याला कारणीभूत रेल्वेचे ढिसाळ प्रशासन आहे. मुंबईच्या लोकसंख्येसाठी रेल्वे गाडय़ांची संख्या दिवसेंदिवस अपुरी पडत आहे. रेल्वे प्रशासनाने फक्त प्रवाशांना ओरबाडायचे काम चालवले आहे. मुंबई, उपनगरातील रेल्वेच्या सुविधेतून ज्या प्रमाणात महसूल रेल्वेला मिळत आहे, त्या बरोबरीने सुविधा रेल्वे प्रशासन देत नसल्याने प्रवाशांमध्ये होणा-या संघर्षाला रेल्वेच जबाबदार आहे. – अनिलकुमार उबाळ, कोपरखरणे, नवी मुंबई.
रेल्वे प्रशासनाने सुपरफास्ट व्हावे
मुंबईमधील लोकल प्रवास दिवसेंदिवस अधिकाधिक ताणतणावचा होत चालला आहे. नारीशक्तीला शक्ती देवतेची उपमा दिली जाते, पण या नारीरूपी देवतांनी एक कंपू तयार करून लोकलच्या प्रथमश्रेणी महिलांच्या डब्यात बसायला आलेल्या एका स्त्रीला जागा उपलब्ध असताना काही दिवस सातत्याने मनस्ताप दिला, ही कोणती शक्ती म्हणावी? यानिमित्ताने ‘स्त्री हीच स्त्रीची द्वेष्टी आहे!’ या वाक्याची आठवण झाली. या घटनेमागे रेल्वे प्रशासनाची अनास्था, अपु-या गाडय़ा, सुरक्षेचा अभाव, ऐन गर्दीच्या वेळी बंद पडणा-या गाडय़ा, सिग्नल यंत्रणेतील बिघाड अशा घटना आणि सातत्याने वाढणारी प्रवाशांची संख्या ही कारणे दिसून येतात. रेल्वे प्रशासनाने तांत्रिक कारणांचा सातत्याने पाठपुरावा करायला हवा. प्रायोगिक तत्त्वावर महिलांच्या प्रथमश्रेणी डब्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. निदान ऐन गर्दीच्या वेळी १ ते ४ क्रमांकाचे रेल्वे ट्रॅक फक्त लोकलसाठी ठेवावेत. मुंबईच्या लोकलपेक्षाही मुंबईच्या प्रवाशांचे जीवन सुपरफास्ट होत चालले आहे, हे लक्षात ठेवून रेल्वे प्रशासनानेसुद्धा सुपरफास्ट व्हावे. – नारायण तळकटकर, मळवा.
आक्रमण हाच बचावाचा मार्ग
त्या पीडित महिला प्रवाशाने अंगातील चंडिकादेवीचा रौद्रावतार खुद्द आपल्या महिला प्रवासी सखींसाठी धारण केला. आता महिलाही सभ्यतेच्या पल्ल्याआड जात पुरुषांसारखी दादागिरी, इतर महिलाप्रवाशांसोबत मारझोड करू लागल्या आहेत. रेल्वे पोलिस व प्रशासन तोकडे पडत असल्यास गुंड महिला प्रवाशांना समजणारी भाषा वापरण्याशिवाय पर्याय नाही. डब्यात महिला प्रवाशांना व स्थानकावर छेडछाड करणा-या पुरुषांना तेथेच, जागीच चांगले खरपूस व बेदम चोप देऊन मग त्यांना पोलिसांच्या हवाली करावे. ताकदवान महिला पोलिसांचा भरणा करून प्रत्येक स्त्रियांच्या डब्यात दोन महिला पोलिस चोवीस तास तैनात करावेत. मग छेडछाड व त्रास देण्याची हिंमतच कुणी करणार नाही. जागीच बेदम चोप याचा उपयोग अवश्य करून पाहावा अणि तोच उपाय निर्णायक ठरेल. – प्रभाकर देशपांडे, गोवंडी (पूर्व).
मदतीची सवय अंगी बाळगावी
सबंध देशभरात बलात्कार, खुनाच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. त्याचा परिणाम सध्याच्या स्त्रीवर्गावर दिसून येत आहे. एखाद्या मुलाने जाणूनबुजून हटकले किंवा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला तेथल्या तेथेच उत्तर देण्याची हिंमत आता महिलांमध्ये दिसून येत आहे. त्याचबरोबर ऐन गर्दीच्या वेळी इतर महिला प्रवाशांकडून होत असलेल्या त्रासाचा मुकाबला करण्यासही त्या सज्ज झाल्या आहेत. ज्याप्रमाणे पुरुषांच्या डब्यात खटके उडत असतात, वेळप्रसंगी मारामारी होते, तसेच चित्र आता महिलांच्या डब्यात दिसू लागले आहे. पूर्वी आपापसात सामंजस्याने वागण्याची सवय महिलांमध्ये होती. आता ती लोप पावत चालल्याचे निराशामय चित्र दिसू लागले आहे. यावर दोषारोप करण्यापेक्षा महिलांनी आपली ढासळती प्रतिमा सुधारावी. एक-दुस-याला मदत करण्याची सवय अंगी बाळगावी. – लक्ष्मण टिकार, मालाड
मानसिक स्वास्थ्य मिळणे गरजेचे
सध्या महिलांवर अत्याचार होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे महिला इतक्या अबला आहेत का, हा प्रश्न समोर असताना एक चक्रावून टाकणारी घटना घडली. मुंबई लोकलमध्ये महिलांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात काही महिला कंपूकडून एका २३ वर्षीय मुलीचा छळ करण्यात आला. या घटनेमुळे मुंबईच्या बदलत्या मानसिकतेची चिंता वाटू लागली आहे. ऐन गर्दीच्या वेळी जी विकृती पुरुषांच्या डब्यात दिसत होती ती आता अधिक प्रमाणात महिलांच्या डब्यातही दिसत आहे, हे मुंबईला नक्कीच भूषणावह नाही. एकीकडे गुन्हेगारीच्या चक्रव्यूहात वाढती बालगुन्हेगारांची संख्या, पुरोगामी महाराष्ट्रात प्रत्येक कानाकोप-यात वाढणा-या हिंसा असे चित्र पाहिले की मन आक्रसून जाते. त्यामुळे महिला गुन्हेगारीवर वेळीच सजग होणे उचित ठरेल. अवास्तव अपेक्षा न करता आपल्या ऐपतीप्रमाणे जगणे गरजेचे आहे. तरच काही अंशी महिला गुन्हेगारी कमी होऊ शकेल. महिलांची वाढती संख्या लक्षात घेता महिलांसाठी डबे वाढवणे गरजेचे आहे. मात्र रेल्वेची आर्थिक स्थिती बळकट असतानाही रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे, याचे आश्चर्य वाटते. – राजा मयेकर, लोअर परळ
परस्परांना समजून घ्यावे
महिलावर्गाच्या डब्यातून प्रवास करणा-या महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो, हे खरे असले तरीही आपल्या मैत्रिणीसह प्रवास सुखाचा असल्याने गर्दीतही आपल्या मैत्रिणींव्यतिरिक्त अन्य कुणास बसाायला जागा देण्यास त्यांची तयारी नसते. कुणी कोणत्या स्थानकावर उठायचे-बसायचे याची निश्चिती त्या आधीच करतात. त्याला ‘क्लेम’ लावणे असे म्हणतात. आपली मैत्रीण थोडी दूर उभी असेल तर प्रसंगी तिला बोलवून कंपूतील स्त्रियांनी बसायला जागा दिल्याने कडाक्याची भांडणे होतात. कित्येकदा शाब्दिक वाद विकोपास जाऊन त्याचे रूपांतर मारामारीत होते. परिणामी स्वभाव चिडचिडा होतो. यावर काही स्त्रिया पुरुषांच्या डब्याचा आधार घेतात. हे चित्र हमखास सायंकाळच्या चर्चगेट-बोरिवली गाडीत पाहायला मिळते. ताणतणावाची कारणे देत एकमेकांवर आग ओकण्यापेक्षा परस्परांना समजुतीने घ्यावे. त्यातच भले आहे. – नरेश नाकती, बोरिवली (प.)
‘ई मेल’द्वारा आलेली पत्रे..
संवेदनशीलता हरवते आहे
नोकरीच्या निमित्ताने होणारा रेल्वे प्रवास मुंबईकरांना चुकलेला नाही. गर्दीच्या वेळी होणारी भांडणे, शिवीगाळ यानंतर मारहाण हे नित्याचेच समीकरण झाले आहे, याला आता महिलावर्गही अपवाद नाही. नोकरी आणि घर अशी तारेवरची कसरत सांभाळताना लोकल उशिराने येणे, दोन गाडय़ांत बारा ते पंधरा मिनिटांचे अंतर, एकाच बाजूला येणा-या स्थानकांमुळे वाढत्या गर्दीत चढायला न मिळणे, लेटमस्टरची भीती, बॉसचे खडे बोल, घरगुती वाद यांचे पडसाद रेल्वेत पाहायला मिळतात व यातूनच महिला प्रवासी आक्रमक झालेल्या दिसतात. धकाधकीची जीवनशैली, काही त्रासदायक प्रवासी, शारीरिक वा मानसिक अस्वास्थ्य यामुळे सर्वच प्रवाशांमध्ये हिंसात्मकता वाढलेली दिसते. रेल्वेच्या ठरावीक डब्यात तयार होणारे गट आणि त्यांची अरेरावी, गटबाजी, क्षुल्लक कारणांमुळे सुरू होणारी हाणामारी यामुळे रेल्वेचा प्रवास आदर्शवत राहिलेला नाही. हरवलेली माणुसकी आणि नाती, मला काय त्याचे, ही स्वार्थी वृत्ती यांचा आदर्श समाजासमोर उभा आहे. आम्ही साक्षर झालो, पण सुसंस्कारित नाही झालो. यावर उपाय म्हणून अशा फाजील महिला प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करावी. सकाळच्या वेळी जादा फे-या सोडाव्यात. तसेच महिला डब्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. – प्राची गुर्जर, कळवा
मागणी जास्त आणि पुरवठा कमी
एकटय़ा मनुष्याची मानसिकता आणि समूहाची मानसिकता यात पुष्कळ तफावत दिसून येते. पुष्कळ प्रसंगांत समूहशक्ती विघातक कार्यासाठीच वापरली जाते. यात महिलांची, मुलींची छेडछाड, एखाद्याला विनाकारण त्रास देणे, दंगल पसरवणे इत्यादी समाजविघातक गोष्टी समूहाकडून केल्या जातात. या समूहात आतापर्यंत पुरुषांचा समावेश होता, पण नुकत्याच समोर आलेल्या महिला रेल्वे प्रवाशांच्या कंपूकडून झालेल्या महिला सहप्रवाशावरील अन्यायामुळे आता हे लोण महिलावर्गातही पसरलेय की काय, अशी भीती वाटू लागली आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती असेल तर साहजिकच जे उपलब्ध आहे, ते ओरबाडून घेऊन आपल्याला जास्त कसे मिळेल याकडे मनुष्य स्वभावाचा कल असतो. वाढत्या महिला रेल्वे प्रवाशांच्या मानाने महिला डब्यांची संख्या वाढलेली नाही. साहजिकच हा सर्व ताण महिला प्रवाशांवर येऊन एक प्रकारची जागेबद्दलची असुरक्षितता त्यांच्या मनात वाढू लागलीय. त्याचेच पर्यवसान आपापले कंपू करून जागा आरक्षित करण्याकडे झाले असावे. परिणामी उपरोक्त घटना घडली. वेळोवेळी वाढत्या रेल्वे प्रवासी संख्येचा अभ्यास करून रेल्वे प्रशासनाने हे प्रवासी रेल्वेत कसे सामावले जातील आणि त्यांचा रेल्वे प्रवास कसा सुखकर होईल, याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. तरच असे प्रकार टाळता येतील आणि रेल्वे प्रवाशांचे मन:स्वास्थ्य शाबूत राहील. – दीपक गुंडये, वरळी
बदलती मानसिक विकृती
मध्य रेल्वेच्या महिला प्रथमश्रेणी डब्यातील कंपूशाहीविरोधात एका महिलेने पोलिसांत तक्रार दाखल करताच सात सुशिक्षित नोकरदार महिलांना दंड व शिक्षा भोगावी लागली. परिणामी रेल्वे डब्यात चालणा-या कंपूशाहीला आगामी काळात पायबंद बसण्याची दाट शक्यता आहे. गेली अनेक वर्षे महिलांना महिलांकडूनच अशी सापत्न वागणूक मिळत होती. प्रवाशांची वाढती गर्दी, फेरीवाल्यांचा त्रास, तृतीयपंथी, भिकारी यांचा त्रास, गडबड-गोंगाट व भांडणे, आंबट शौकिनांची विकृत नजर, घर ते कार्यालय गाठण्यासाठी होणारी धावपळ, शारीरिक व्याधी, प्रापंचिक समस्या, महागाईची विवंचना, असुरक्षितता, त्यात प्रवासात होणारा त्रास यामुळे महिलांचे मन:स्वास्थ्य बिघडत आहे. परिणामी महिलांतील चंडिकेचे रूप जागृत होऊन हिंसात्मक कृत्याकडे वाटचाल होताना दिसते. त्यामुळे महिलाही आता निष्ठूर होऊ लागल्याचे हे द्योतक आहे. रेल्वे प्रशासनाने महिला प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा विचार करून डबे वाढवण्याबरोबरच महिला सुरक्षारक्षकही तैनात करून अशा कंपूविरुद्ध कठोर कारवाई करावी. अन्यथा झुंडशाही वाढून महिलांचा प्रवास सुकर होण्याऐवजी बदलत्या मानसिक विकृतींमुळे खून-मारामारीसारखे हिंसक अपराध वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. – पांडुरंग भाबल, भांडुप
रेल्वे प्रवाशांचं मन:स्वास्थ बिघडतंय!
लोकलमध्ये ये- जा करताना प्रवासी महिला अगर पुरुष यांना ताटकळत प्रवास करावा लागतो. जर कुणाला चुकून धक्का लागला तर काही खैर नाही. फक्त पैसा हेच जीवन झाले आहे, त्यामुळे कोणीही कुणाची कदर करत नाही. याचा कोणीतरी माणुसकीचा विचार करण्याची गरज आहे. प्रवाशांना शिस्त लागावी याकरता काही नियमावली व कडक धोरण रेल्वे प्रशसनाने अमलात आणावेत व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी एवढीच अपेक्षा. – अनिल राऊत, कांदिवली
सचिनचा वारसदार कोण?
सचिन तेंडुलकर याचे क्रिकेटप्रेमही अगदी मोर प्रेमासारखे मनस्वी, यशस्वी आणि आेजस्वी, आणि म्हणूनच असेल कदाचित सचिनच्या संपूर्ण कारकिर्दीत प्रसिद्धी मिळूनही तो कधीही वादग्रस्त ठरताना दिसला नाही. क्रिकेट म्हणजे सत्ता, स्पर्धा, वादविवाद परंतु सचिनचा त्यात कुठेही समावेश दिसून आला नाही. क्रिकेटविश्व मॅचफिक्सिंग आणि बेटींगमध्ये गुंतले जात असतानाही सचिन मात्र उजळ माथ्याने आपल्या बॅटीचा लखलखट करताना दिसत होता. त्यामुळे सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ नये, असे त्याच्या चाहत्यांचा वाटत होते. परंतु प्रत्येक क्षेत्रात काम करताना काही मर्यादांचे पालन करावे लागते. आता सचिनसारखा महान क्रिकेटरने क्रिकेट जगातून संन्यास घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघातील सचिनचा खरा वारसदार कोण ..
याबद्दल वाचकांनी आपली मते शुक्रवारपर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत. शब्दमर्यादा: १०० ते १५० शब्द. पाकिटावर ‘वाचकांचे व्यासपीठ’ असा आवर्जून उल्लेख करावा.
आपली मते तुम्ही vyasapith@gmail.com या ई-मेल आयडीवरही पाठवू शकता.
प्रहार,
वन इंडियाबुल्स सेंटर,नववा मजला,
ज्युपिटर मिल्स कंपाउंड,
लोअर परळ,
मुंबई – ४०००१३,
फॅक्स : ०२२-४०९६९९००. ०२२- ६१२३९९६६
‘वाचकांचे व्यासपीठ’ ऑनलाइन पत्र लिहा
vyasapith@gmail.com वर तसेच ‘प्रहार’च्या संकेतस्थळावर किंवा प्रहारच्या फेसबुक पेजवरही मत नोंदवू शकता. त्यासाठी लॉग इन करा www.prahaar.in किंवा www.facebook.com/prahaar.in
संवेदनशीलता हरवते आहे – नोकरीच्या निमित्ताने होणारा लोकल प्रवास मुंबईकरांना चुकलेला नाही. गर्दीच्या वेळी होणारी भांडणे, शिवीगाळ यानंतर मारहाण हे नित्याचेच समीकरण झाले आहे याला आता महिलावर्गही अपवाद नाही. नोकरी आणि घर अशी तारेवरची कसरत सांभाळताना लोकल उशिराने येणे, दोन गाड्यांत बारा ते पंधरा मिनिटांचे अंतर, एकाच बाजूला येणा-या स्थानकांमुळे वाढत्या गर्दीत चढायला न मिळणे, लेटमस्टरची भीती, बॉसचे खडे बोल, घरगुती वाद यांचे पडसाद रेल्वेत पाहायला मिळतात व यातूनच महिला प्रवासी आक्रमक झालेल्या दिसतात. धकाधकीची जीवनशैली, काही त्रासदायक प्रवासी, शारीरिक वा मानसिक अस्वास्थ्य यामुळे सर्वच प्रवाशांमध्ये हिंसात्मकता वाढलेली दिसते. विशिष्ट रेल्वेत ठरावीक डब्ब्यात तयार होणारे गट आणि त्यांची अरेरावी, गटबाजी, शुल्लक कारणांमुळे सुरू होणारी हाणामारी यामुळे रेल्वेचा प्रवास आदर्शवत राहिलेलाच नाही. एकविसाव्या शतकात दरवाज्यात, खिडकीत लटकणारी माणसे, गच्च भरलेले डब्बे, पुरेसा श्वास घेण्यासही जागा नसल्याने गुदमरलेली अवस्था, गटनिहाय वर्गीकरण, पहिल्या वर्गाचे अरूंद व अपुरे डब्बे, दुस-या वर्गात शिस्तीचा अभाव, फेरीवाले, भिकारी, तृतीयपंथी यांचे गर्दीत आगमन, हरवलेली माणुसकी आणि नाती, मला काय त्याचे ही स्वार्थीवृत्ती यांचा आदर्श समाजासमोर उभा आहे. आम्ही साक्षर झालो पण सुसंस्कारित नाही झालो. रेल्वे सुरक्षिततेची तर ऐशीतैशीच झालेली दिसते. महिलांच्या डब्ब्यातील गर्दीवर उपाय म्हणजे स्वतःचे स्टेशन येण्याअगोदरच दरवाजे अडविणा-या, हवा खाणा-यांवर दंडात्मक कारवाई, दोन गाड्यांतील अंतर हे पाच मिनिटांपेक्षा अधिक नसणे, सकाळच्या गर्दीच्या वेळी गाड्यांच्या जादा फे-या, महिला लोकलची किंवा डब्ब्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. सरकारने आपल्या अखत्यारितील कंपन्यांमधील निवृत्तीचे वय ५५ वर्षांवर आणावे तसेच सदर कामगार ज्या ठिकाणी राहत असेल त्याच्या पाच किलोमीटरच्या परिसरातील कार्यक्षेत्रातच नोकरी उपलब्ध करून द्यावी ज्याद्वारे गर्दीवर नियंत्रण मिळवणे काही प्रमाणात शक्य होईल.