शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केल्याने सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना व्यासपीठ सोडावे लागले. या घडामोडींमुळे शिवसेना पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर आहे.
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर झालेल्या पहिल्याच दसरा मेळाव्यात शिवसेनेला जोरदार हादरा बसला. या मेळाव्यात शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केल्याने सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना व्यासपीठ सोडावे लागले. या घडामोडींमुळे शिवसेना पुन्हा फुटीच्या उंबरठय़ावर उभी राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मेळाव्यासाठी सर्व नेते व्यासपीठावर विराजमान झाल्यानंतर उशिरा मनोहर जोशी आले. मात्र ते व्यासपीठावर येताच शिवसैनिकांनी ‘मनोहर जोशी हाय हाय, चले जाओ, चले जाओ’, अशा घोषणा दिल्या. तब्बल दहा मिनिटे या घोषणा सुरू होत्या. काही शिवसैनिक तर बॅरिकेट्सवर उभे राहू लागले. व्यासपीठावरील नेत्यांनी शांततेचे आवाहन करूनही शिवसैनिक दाद देत नव्हते. अखेर या गोंधळातच जोशींनी व्यासपीठावरून काढता पाय घेतला.
या नाटय़मय घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. मात्र जोशी यांच्या समर्थनार्थ किंवा त्यांचे मेळावा सोडून जाण्याची कुठलीही खंत ठाकरे यांनी व्यक्त केली नाही.
दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मनोहर जोशी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वशैलीवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. जोशी यांनी आपल्याच अंगावर चिखल उडवून घेतल्याची शिवसेनेत चर्चा रंगली होती. त्यानंतर जोशी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र या टीकेमुळे शिवसैनिकांमध्ये जोशींविरोधात प्रचंड नाराजी निर्माण झाली. त्याचे पडसाद सेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्यात उमटले.
हा प्रकार गैरसमजातून निर्माण झाला. आपल्या उपस्थितीला शिवसैनिकांनी विरोध केला नाही. शिवसैनिकांवर मी कधीही रागावलो नव्हतो व आताही रागावलो नाही. मला त्यांच्याविरोधात बोलण्याची गरज नाही. – मनोहर जोशी, ज्येष्ठ नेते, शिवसेना
[EPSB]
पंत रडले आणि नियती हसली »
बाळासाहेबांच्या अनुपस्थितीतील पहिल्याच दस-या मेळाव्यात अत्यंत वाईट पद्धतीने अपमानित होऊन मनोहरपंतांना व्यासपीठावरून खाली उतरावे लागले.
[/EPSB]
शिवसेना फुटणार नाही उडतील ते कावळे राहतीलते मावळे