महाराष्ट्रात कलारसिकतेचं नातं घट्ट विणलं गेलं आहे. या रसिक-कलावंतांच्या रंगमैत्रीला जोडणारा एक महत्त्वाचा धागा म्हणजे लोककला होय. या लोककलावंतांनी आपल्या कला गावोगावी प्रामाणिकपणे सादर करून, त्या कलेची चटक लावली. त्याच भरोशावर कलासक्त मराठी रसिक नाटक, चित्रपट, अभिनय, संगीत, गायन, नृत्य आणि चित्रांत तल्लीन झालेला दिसतो. त्यातलाच एक महत्त्वाचा लोककलावंत म्हणजे बहुरूपी…
गोष्ट जुनी आहे. प्रत्येक गावात वर्षातून एकदाच एक माणूस यायचा.. वेगवेगळी सोंगं घेऊन सा-या गावाचं मनोरंजन करायचा.. हा लोककलावंत होता ‘बहुरूपी’. तो कधीही कुणाची फसवणूक करत नव्हता. रंजन करायचा आणि मिळेल ते दान घेऊन जायचा.. नंतर यायचा तो वर्षभरानंतरच.. काळ बदलला.. गावात वेगवेगळी मनोरंजनाची माध्यमं आलीत.. आधी टीव्ही. नंतर व्हीडिओ, हळूहळू टीव्हीची चॅनेल्स वाढली. चित्रपट, नाटक, वेगवेगळे कार्यक्रम आणि बातम्या घरबसल्या मिळू लागल्या. बहुरूपी म्हणून येणा-या या लोककलावंतांची किंमत शून्य झाली.. तो आता हरवला आहे, पण मराठी मातीत क्षणभरात वेगवेगळ्या भूमिकांतून मनोरंजन करणा-या या कलावंताची याद कायमचीच कोरली आहे. महाराष्ट्रातील नाटयोपासकांपैकी बहुरूपी हा सर्वात महत्त्वाचा आणि आद्य घटक समजला जातो. त्यानेच नाटयाभिनय, नृत्य, गीत, हावभाव करीत रंजन आणि त्यातूनच समाजप्रबोधन केलं. रसिकमनाच्या सुपीक मराठी मातीत मशागत करून, त्यानेच कलाप्रेमी समाज घडवण्यास आपलं आयुष्य खर्ची घातलं आहे.
सोंग पहिलं..
एक गाव.. दुपारची वेळ अन् सुगीचे दिवस.. घरात धान्याची रास आहे.. वातावरण आनंदाचं.. पोरंबारं अंगणात खेळताहेत.. बायाबापडया कामात व्यस्त. अचानक ‘पाटीऽऽऽल’ अशी एक दरडावणारी हाक पाटलाच्या अंगणात घुमते.. ती घरातील बायाबापडयांना ऐकायला जाताच, घरातली पाटलीण बाहेर येते. पाटलाच्या घराशेजारचेही बाहेर येतात.. आवाजाच्या दिशेने बघतात.. पोलिसाच्या वेशात आलेला माणूस प्रश्न विचारतो, ‘कुटं गेलेत पाटील?’
पोलिसाच्या वेशात असणा-या या माणसाचा ‘अवतार’ पाहून हा काही खरा दरोगा (पोलिस) नाही, हे क्षणभरानंतर सा-यांच्याच ध्यानात आलेलं असतं. दरवर्षी नित्यनेमानं हजेरी लावणारा ‘बहुरूपी’ आज पोलिसाचं सोंग घेऊन आला, हे पाटलीणबाईसह सा-यांच्याच ध्यानात येतं. काय गंमत करणार, या आशेनं, पाटलीण त्याला साजेसं उत्तर देते. ‘ते शयरात गेलेत.. काय काम काढलंत?’ बहुरूप्याची पुढची गोष्ट रंगवण्यासाठी ती सहकलाकार म्हणून आपली भूमिका यथोचित निभावते.
‘‘पाटलानं कर्ज घेतलं बँकेतून. त्याचे हप्तेही भरले नाहीत. म्हणून वारंट काढला आहे.. त्यांना अरेस्ट करायला आलो..’
‘‘कर्ज घेतलं? मला तं कायबी ठावूक नाय..’’
‘‘तुम्हाला कसं ठावूक असणार वहिनी? पाटलानं घेतलेलं सगळं कर्ज त्या शयरातल्या बाईवर खर्ची घातलं.. आम्हाला त्येंची पूर्ण हिस्ट्री मिळाली आहे. पण वहिनी, तुम्ही काळजी करू नका. पाटलाकडून आम्ही कर्ज बी वसूल करणार आणि त्यांनी दुसरं लग्न करण्याचा घाट घातला म्हणून त्यांचं तिसरं लग्न लावून देण्याची त्यांना शिक्षा करणार..’’ या संवादावर सारेच हसतात.
नव-यावर विश्वास असणारी पाटलीण त्याला खडसावते, ‘‘ते असं करूच शकत नाहीत. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.’’
‘‘हा तुमच्या दोघांतला विश्वास असाच राहू द्या,’’ असं सांगत बहुरूपी आपली पिशवी समोर करतो, मिळालेलं दान झोळीत टाकून पुढच्या दारावर निघून जातो. दुसरं सोंग घेऊन पुन्हा नव्या भूमिका जगण्यासाठी सज्ज होतो.
सोंग दुसरं
गावात फिरताना त्याच्याभोवती लहान पोरांची गर्दी होते. गंमत-जंमत करत तो गावात वेगवेगळी सोंगं घेऊन करमणूक करत राहतो. क्षणभरापूर्वी ज्योतिषी म्हणून भविष्य सांगणारा हा कलावंत लगेचच गरोदर बाई होतो. कधी पोस्टमन बनून पत्र वाटतो. मस्करी करत समाजातील अनिष्ट रूढी-परंपरेवर ताशेरे ओढतो. नकळत होणा-या चुका लक्षात आणून देतो. हसवतो. क्षणभरासाठी रडवतो. चुकत असलेल्या माणसांच्या डोळ्यात अंजन घालतो. त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देतो.. मिळालेलं दान कुठलीही तक्रार न करता निमूटपणे स्वीकारतो.. त्याचं सोंग कुणीही मनावर घेत नाही. त्याचं चिडवणं कुणालाही डिवचत नाही, पण ‘लेकी बोले सुने लागे’ याप्रमाणे त्याच्या वेगवेगळ्या सोंगातून त्या गावातील वेगवेगळ्या समस्यांवरचा उपाय सांगून जातो. वेगवेगळ्या भूमिका जगणारा हा लोककलावंत आज कुठेच बघायला मिळत नसला तरी ३०-४० वर्षापूर्वीच्या ग्रामीण जीवनात हा अस्सल अभिनयसम्राट सा-यांना आठवतो.
सोंग तिसरं
कोणतंही सोंग घेताना हुबेहुब वेशांतर, अभिनय, आवाजातील चढउतार व नाटय़मयता तो इतकी परिणामकारक साधतो की कित्येकदा अस्सल व नक्कल यातील भेद ग्रामस्थांनाही चकवणारा ठरतो. लग्नाचं निमंत्रण देणा-या बाईचं सोंग घेऊन येणा-या या लोककलावंताचं ‘लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला’ हे गाणं प्रसिद्ध आहे. या गाण्यातून विनोदनिर्मिती करत महाराष्ट्रातील खेडोपाडी या लोककलावंतांनी पिंजून काढलीत. रसिक मायबापांची शाबासकी कमावली.
उंदराची गाडी त्याला मांजराची जोडी
इतभर गाडी त्यात खंडीभर गडी
तुम्ही लग्नाला चला..
बिबळ्याचं काजळ घाला
उतरंडी संग फुगडी खेळा
तुम्ही लग्नाला चला
जेवायला केली चिखलाची कढी
दगडाची वडी, मस्करी लोनचं
गाढवाचं भजं तरसाच्या पोळ्या
लांडग्याची खीर..
लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला
शनवारचं लग्न ..इतवारची हळद
सोमवारी देवकार्य न् मंगळवारी वरात
ढेकणाची मोटार.. विंचवाचे टांगे घोडे
आवरा, लवकर चला.. आला बहुरूपी आला
लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला..
चित्रविचित्र प्रतिमांचा असंबंध वापर करून रचलेलं हे गाणं म्हणत गाव जमा करायचा. त्याच्या या सोंगाला सारं गाव प्रतिसाद द्यायचं आणि बहुरूपी वेगवेगळे हावभाव करत, हातवारे करत ‘लग्नाला चला’ असं आमंत्रण द्यायचा. सारा गाव हसायचा. त्यात उत्साहानं सहभागी व्हायचा. वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळी सोंग करत, करमणूक करणारा हा कलावंत पंचक्रोशीत प्रसिद्ध असायचा.
सोंग चौथं
हा लोककलावंत वेगवेगळी सोंगं घेऊन ग्रामस्थांच्या जीवनात करमणुकीचं दान टाकत होता. बदल्यात त्याच्या झोळीत जे पैसे, धान्य, कपडे पडतील ते स्वीकारून आपला उदरनिर्वाह करत होता. आज चित्र बदललं आहे. असे ‘कलावंत’ आजही वेगवेगळ्या शहरांतही फिरताहेत. ते त्यांच्या बिरादरीचे नाहीत. त्या लोककलावंतांशी या कलावंतांचा काहीही संबंध नाही. पण वेगवेगळी सोंगं घेऊन येणारे हे कधी ते सोन्याच्या दागिन्यांना चमकवून देतो, म्हणून सांगतात आणि शिकल्यासवरल्या माणसांनाही लुटतात. कुणी पोलिस होतो, कुणी आयकर अधिका-याचं सोंग घेऊन येतो आणि फसवतो. अशी फसवेगिरी त्यांनी कधी केली नाही. उलट खोटी आश्वासनं देणारे पुढारी, फसवणारे व्यापारी यांची सोंगं घेऊन ग्रामस्थांना सावध करण्याची भूमिका निभावली आहे.
हा कलावंत आज कुठंही दिसत नसला तरी त्याचा प्रामाणिकपणा, त्याच्या अभिनयाची ताकद, वेगवेगळ्या भूमिका एकाच वेळी रंगवण्यासाठी त्याच्याकडे असणारी हुकूमत ग्रामीण भागात वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी महत्त्वाचं माध्यम ठरू शकल्या असत्या. या लोककलावंतांचं काम काही सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्यासाठी वापरतात. हुबेहुब ‘बहुरूपी’ म्हणून त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी आजही किती मोलाचं आहे, ते पुढील सोंगावरून लक्षात येईल.
सोंग पाचवं..
एक गाव.. पावसाच्या प्रतीक्षेत.. सारे गावकरी देवळात जाऊन पाणी पडू दे म्हणून देवाला साकडं घालत आहेत. त्याच वेळी देवाचं सोंग घेऊन एक कलावंत देवळाबाहेर बसला आहे. त्याच्या चेह-यावर चिंता, उदासी.. देवळात घंटानाद सुरू आहे. देवाला नवस बोलला जात आहे. बेडकाचं लग्न लावलं जात आहे. एक गावकरी देवळात येतो आणि त्याला पायरीवरच हा अस्वस्थ बसलेला देवाच्या सोंगातील बहुरूपी दिसतो. देवळातील सा-यांना तो गावकरी बोलावतो. ‘‘देव पावला, बाहेर या’’, असं ओरडतो. सारे गावकरी बाहेर येतात. ‘‘पाऊस कधी पडेल?’’ या प्रश्नाची त्याला गळ घालतात.
देवाचं सोंग घेतलेला कलावंत विचारतो, ‘‘कराल ते भराल. देव त्याला काय करणार?’’ असा उलट प्रश्न येताच गावकरी भानावर येतात. त्याला विचारतात, ‘‘आम्ही काय केलं?’’
‘‘तुमचं गाव आधी जंगलानं वेढलं होतं, सांगा खरं की खोटं?’’
सारे गावकरी खरं असल्याचं सांगतात.
‘‘आता ते सारं जंगल गेलं. डोंगर बी बोडखं झालं. खरं की नाही?’’
‘‘हो तेबी खरंच आहे..’’ असं गावकरी पुन्हा सांगतात.
‘‘जंगल जसजसं कमी होऊ लागलं तसतसा पाऊस पडणं कमी झालं.. तरीही तुम्ही झाडं तोडतच राहिलात.. खरं की खोटं?’’
सारे गावकरी होकारार्थी मान हलवतात.
‘‘आता आम्ही का कराचं देवा, तूच सांग..’’ अशी विनवणी गावकरी करतात.
‘‘नाल्यावर बांध घाला.. जेव्हा केव्हा पाऊस पडतो, त्या पावसाचं पाणी वाया जाऊ देऊ नका.. ते अडवा.. जिरवा.. त्या पाण्याच्या भरोशावर आपली शेती करा.. आणि झाडं लावा, ती जगवा..’’
‘‘हो हो बरोबर आहे,’’ असं गावकरी म्हणतात. त्याच्या पाया पडायला लागतात, तेव्हा कलावंत म्हणतो, ‘‘माझ्या पाया पडून काही बी उपयोग नाही.. या देवळात घंटानाद करूनही काही भेटणार नाही.. पायाच पडायचं
असल तर त्या बंधा-याचा पायवा मजबूत बांधा.. त्याच्याच पाया पडा.. या ‘बहुरूप्या’च्या पाया कशाला पडता?’’
असं सांगताच, सारे गावकरी अवाक् होतात, ‘‘हे लोककलावंता तू खरंच आमचा देवदूत झालास!’’ असं म्हणत बंधारा बांधायला जातात..
so much Informative….