झी टिव्हीवर चला हवा येऊ द्या.. या कार्यक्रमात संगीतकार अजय अतुल सांगत होते की, आम्ही गाण्यांना चाली लावायला लहानपणापासूनच सुरुवात केली. म्हणजे शाळेत असतांना मराठीच्या पुस्तकातल्या कवितांना चाली आम्ही लावायचो आणि त्या कविता सुरात म्हणायचो. पुढे ते म्हणतात की, आम्ही आज जे संगीतकार आहोत त्याची बहुदा सुरुवात तिथून झाली..
मला हे ऐकून गंमत वाटली. कारण माझ्या लहानपणी आम्ही शाळेत ज्या सुंदर-सुंदर कविता म्हणायचो, त्या कवितांना प्रथम चाल लावणारा माणूस कोण हे माझ्यासाठी कायमचं गुलदस्त्यात राहिलं होतं. की, त्यांना चाली लावणा-या व्यक्ती अशाच संगीतकार झाल्यात आणि आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाहीये.. असं क्षणभर मला वाटलं.. पण कविता ऐकून आणि गावून अगदीच आम्ही संगीतकार किंवा तानसेन झालो नसलो तरी कानसेन मात्र नक्की झालो आणि त्यामुळे सुध्दा जीवनात आनंद निर्माण झाला.
प्रसिध्द लेखिका स्मिताताई राजवाडे यांच नुकतच प्रसिध्द झालेलं पुस्तक ‘फोडले भांडार’ वाचत होतो. त्यातल्या ‘मोहरा इरेला पडला’ या भागात शेवटी त्या म्हणतात ‘‘आज पन्नास वर्षानंतरही खेडय़ातील शाळा, कविता रंगवून सांगणारे कै. अनंत सावंत गुरुजी आणि भारावून जाणा-या मुलांचा वर्ग आठवतो.’’ मी या वाक्यापाशी रेंगाळलो. मला आश्चर्याचा धक्का बसला. कारण कै. अनंत सावंत गुरुजी म्हणजे माझे लांबचे मामा. पण त्यांच्या आमच्या कुटुंबाचे संबंध खूप जवळचे. त्यांना आम्ही दादा म्हणायचो. शेवटपर्यंत दादांचं आमच्याकडे जाणं येणं होतं.
माझ्या आईच्या आणि त्यांच्या खूप गप्पा रंगायच्या. त्यात खास करुन त्यांच्या लहानपणीच्या शाळेतल्या कविता हा विषय असायचा. सहज बोलता-बोलता दादा एखादी कविता म्हणायचे. त्यांनी अशी एखादी कविता म्हणायला सुरुवात केली की, माझी आई सुध्दा त्यांना साथ द्यायची. माझ्या आईचा आवाजही छान होता. ती कविता म्हणायला लागली की, का कुणास ठाऊक मला भरुन यायच.. तिच्या गळयात दर्द होता.. सत्तरी पंच्याहत्तरीत सुध्दा ही भावंड कवितेवर भरभरुन बोलायचे.
जमेल तशा कविता म्हणायचे. अभ्यास करण्याचं नाटक करत मी त्यांच्या कविता गुपचुप ऐकायचो. आई आणि दादांच्या बोलण्यात नेहेमी एक कविता असायची. माझ्या अभ्यासक्रमात ती नव्हती पण त्यांच्या तोंडून ऐकून ती माझीही पाठ झाली होती. आजही ती आठवते..
शर आला तो धावून आला काळ
‘‘विव्हळला श्रावण बाळ..
हे आई गे दिर्घ फोडून हाक जो पडला जावून झोक..’’
आईने या ओळी म्हटल्या की, दादांच्या आणि आईच्या दोघांच्याही डोळ्यातून घळाघळा अश्रू वहायचे..दाटल्या कंठाने दादा त्या कवितेचं रसग्रहण करायचे..
श्रावणबाळ आपल्या आई वडिलांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी कावड खांदयावर घेवून काशी यात्रेला जाताना वाटेत त्यांना एका जंगलात तहान लागते. म्हणून तो पाणी आणायला जातो आणि तिथं शिकारीसाठी आलेल्या राजा दशरथाकडून त्याला बाण लागून तो पडतो आणि आपण आता आपल्या मातापित्यांची शेवटची ईच्छा पूर्ण करु शकणार नाही या विचाराने श्रावणबाळ दु:खी होतो.. आपल्या हातून नकळत का होईना महापाप घडलं म्हणून व्यथीत झालेला राजा दशरथ.. पुत्र वियोगाने आकांत करणारे श्रावणबाळाचे आईवडिल.. या सगळयाचं वर्णन कवीने त्या कवितेत फार सुंदर केलं आहे.
या कवितेच रसग्रहण करताना दादा खूप भावूक व्हायचे. त्यावेळी श्रावणबाळाच्या मातापित्यांचे दु:ख ते स्वत: जगायचे. त्यामुळे ऐकणा-याच्याही डोळयात नकळत पाणी यायचं.
खरंतर त्याकाळी आजसारखी सुबत्ता नव्हती. सर्वाची आर्थिक परिस्थितीही यथातथाच.. अनेक प्रापंचिक अडचणी, खांदयावर मोठया कुटूंबाची धुरा पण अशा प्रतिकूल परिस्थितीत माझी आई आणि दादा ही दोघं भावंड त्यांच्या आवडीच्या कविता म्हणून त्यातला भावार्थ जाणून घेवून स्वत:च दु:ख विसरत होते.. आपल्या कष्टमय जीवनात काव्य निर्माण करत होते. अशीच एक कविता माझी आई नेहमी म्हणायची किंवा घरातील मुलं ती कविता गायला लागली की तांदूळ निवडण्याचं निमित्त करुन ती कविता आई ऐकत बसायची..
‘‘बाळ जातो दूर देशा
मन गेले वेडावून
आज सकाळ पासून..’’
या ओळी म्हणताना किंवा ऐकताना आईचे डोळे पाणावायचे. तिला असं कोणतं दु:ख होतं? तिचे डोळे असे का पाणावायचे? कदाचित त्या कवितेच्या सुंदर चालीत आर्तता असावी.. मला त्या वयात हे कळायचं नाही. पण आता या वयात माझी मुलं जेव्हा बाहेरगावी शिक्षणासाठी भूर्र्रकन दूर उडून गेली तेंव्हा हळूहळू त्या काळातले संदर्भ लागतात आणि आई विषयी मनात असलेलं आदराचं स्थान अधिक उंचावतं.
त्यांच्या पिढीतील कवितेचा वारसा पुढे आमच्या पिढीतही चालू राहिला. काही कविता काळा बरोबर बदलल्या. पण नव्याने मराठीच्या पुस्तकात दाखल झालेल्या कविता तितक्याच सुंदर आणि अर्थपूर्ण होत्या. त्यांच्यातही गेयता होती.
‘‘राजासही महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सवय प्राप्त झाली या झोपडीत माझ्या..’’
किंवा
‘‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे..’
‘‘गवत फुला रे गवत फुला..’’, ‘‘धरू नकाही बरे फुलावर उडती फुलपाखरे..’’ , ‘‘पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर..’’, ‘‘गोधमू वर्ण तिचा हरिणाच्या पाडसा परि डोळे..’’
अशा अनेक श्रवणीय कविता आमचं जीवन समृध्द करून गेल्या. या कवितांमुळे आमच्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला.
एकूणच आमच्या लहानपणी खूप सुंदर-सुंदर कविता एका सुरात वर्गातून समुह गायनासारख्या म्हटल्या जायच्या. अशावेळी शाळेच्या जवळून जाणारे येणारे वाटेचे वाटसरू क्षणभर शाळेजवळ रेंगाळायचे. बहुदा थकल्या भागल्या जीवाला शाळेतून येणा-या निरागस स्वरांमुळे पुढच्या वाटचालीसाठी एक नवी उमेद मिळत असावी. इतक्या त्या कविता अर्थपूर्ण आणि सुश्राव्य असायच्या. त्यांना लावलेल्या चाली अप्रतिम होत्या. या कवितांना प्रथम कोण चाल लावायचं हे जरी गूढ असलं तरी मला चांगलं आठवतं की, वडिलांच्या सतत बदली होण्याच्या नोकरीमुळे दर तीन चार वर्षानी शाळा बदलली जायची. वेगवेगळया तालुक्यातून माझं शिक्षण झालं.
पण जिल्हाभर सगळया कविता या सारख्याच चालीच्या होत्या. कारण मंडणगडच्या शाळेत एखादी कविता ज्या चालीत गायली जायची, त्याच चालीत राजापूरच्या शाळेतही मुलं ती कविता गाताना दिसायची. पण अशा कविता गाताना वर्गातलं वातावरण स्वरांनी आणि सूरांनी मात्र भारलेलं असायचं. त्या कविता चालीत म्हणायला लावणारे शिक्षक आम्हालाही लाभले. कवितेचा तास मराठी शाळांमधून आरक्षित असायचा. कोणत्याही शाळे जवळून आपण गेलो तर एखाद्या तरी वर्गात एका सुरात आणि तन्मयतेने मुलं कविता गाताना आढळायची.
त्यांच्याबरोबर शिक्षकही मनापासून कविता म्हणत असायचे. मुलांची कविता तोंडपाठ व्हायची. आणि मग सुट्टीत खेळताना किंवा झोपाळयावर झोके देताना मुलांच्या या पाठ झालेल्या कविता आपसूक सुरु व्हायच्या आणि आजुबाजूचं वातावरण प्रसन्न व्हायचं. काम करणारे मोठे हात देखिल काव्य श्रवण करायचे. काय होतं त्या कवितांमध्ये आणि आज ते सगळं कुठे हरवलं? बदलेल्या शिक्षण पध्दतीने शाळेतल्या कवितेंचा गळा दाबला.. की शिक्षकी पेशाला आलेल्या व्यावसायीक स्वरुपाने किंवा शिक्षकांवर लादलेल्या अध्ययन सोडून इतर कामाच्या अतिरिक्त भाराने कविता पुस्तकाबाहेर यायलाच कचरली? सगळेच प्रश्न निरुत्तरीत आहेत.
‘गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा ,
गुरु साक्षांत परब्रह्मा:, तस्मै श्री गुरुवे नम: ‘