बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या तृणभक्षक प्राण्यांना सकस खाद्य उपलब्ध व्हावे, यासाठी ‘कुरण विकास प्रकल्प’ हाती घेण्यात आला आहे.
मुंबई – बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या तृणभक्षक प्राण्यांना सकस खाद्य उपलब्ध व्हावे, यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेच्या वतीने ‘कुरण विकास प्रकल्प’ हाती घेण्यात आला आहे. रविवारी या प्रकल्पाची सुरुवात झाली. या वेळी उद्यानाचे मुख्य संरक्षक व संचालक विकास गुप्ता आणि अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक अनिलकुमार सक्सेना उपस्थित होते.
उद्यानातील मॅफ्को फॅक्टरीतील सुमारे २५ एकर परिसरात या प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. या भागातील अखाद्य वनस्पतींची छाटणी करण्याचे काम रविवारी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी केले. या वेळी सुमारे पाच हजार स्वयंसेवकांनी सकाळी साडेसात ते साडेबारा या वेळात परिसरात अखाद्य वनस्पतींची छाटणी केली. या जागेत आता मोतीपुरा गवत, रानमूग, रानबाजरी, रानमेथी, रानसोयाबीन, रानतूर, रानसुरण, पोचाटी गवत इत्यादी सकस गवताची लागवड केली जाईल. हे गवत प्राण्यांचे आवडते खाद्य असून, त्यांच्यासाठी सकस आहार असल्याची माहिती ‘लायन व टायगर सफारी’चे शैलेश देवरे यांनी दिली. या दुर्मीळ गवताच्या लागवडीमुळे तृणभक्षक प्राण्यांना जंगलातच मोठया प्रमाणात खाद्य उपलब्ध होईल. हरिण, चितळ, डुक्कर, भेकर इत्यादी तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढल्यास बिबटयालाही जंगलातच खाद्य उपलब्ध होईल. या प्रकल्पातून बिबटयाचे मानवी वस्तीवरील शिकारीसाठीचे हल्ले थांबतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गेल्या वर्षी प्रा. डॉ. गजानन मुरटकर यांनी नॅशनल पार्कची पाहणी केली होती. तृणभक्षक प्राण्यांना जंगलातच खाद्य उपलब्ध व्हावे, यासाठी या वनस्पतींची संकल्पना त्यांनी उद्यानाचे संचालक विकास गुप्ता यांना सुचवली होती. गुप्तांसह सहाय्यक वनसंरक्षक संतोष सस्ते, ‘लायन व टायगर सफारी’चे शैलेश देवरे, तुळशी परिसराचे वनक्षेत्रपाल डी. दहीबावकर, कृष्णगिरी उपवनचे वनक्षेत्रपाल आर. पवार यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पासाठी मनुष्यबळ पुरवण्यासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानशी चर्चा करण्यात आली. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून गेल्या वर्षभरापासून उद्यानातील कांदिवली येथील रामगड परिसरात १० हजार वृक्ष लावण्यात आले. यात प्रामुख्याने आंबा, पेरू, चिकू, सीताफळ, आवळा, फणस, काजू, बांबू, करंज, काशीद इत्यादी झाडांचा समावेश असल्याची माहिती वनक्षेत्रपाल डी. दहिबावकर यांनी दिली.
मॅफ्को परिसरातील जागेवर बुराडा आणि घाणेरी या अखाद्य वनस्पतींची लागवड नैसर्गिकरीत्या मोठया प्रमाणात झाली होती. उद्यानातील तृणभक्षक प्राण्यांची संख्या पाहता गवताचे प्रमाण मुबलक असण्यासाठी मॅफ्को परिसराची जागा योग्य होती. तुळशी परिसरात सांबर मोठया प्रमाणात आहेत. सांबर गवत आणि झाडांची पाने दोन्ही खाणे पसंत करतात. त्यानुसार हे दोन्ही प्रकल्प राबवण्यात आले आहेत. – प्रा. डॉ. गजानन मुरटकर, कुरण विकास व्यवस्थापक, अतिसंरक्षित भागातील व्याघ्र प्रकल्प
Very good article on the grasslands management at S. G. N. P. BORIVILI. The efforts started by the authority of the park should continue for three to five years continuous manner . It will maintain the grazing food chain in forest ecosystem. Congrats to the writer , editor of the Prahar news paper.
Muratkar chikhaldara