राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षण पद्धतीने विविध शिक्षणक्रम उपलब्ध करून ‘ज्ञान गंगा घरोघरी’ पोहोचविणा-या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात पुन्हा पी.एचडी, पदव्यूत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
मुंबई- राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षण पद्धतीने विविध शिक्षणक्रम उपलब्ध करून ‘ज्ञान गंगा घरोघरी’ पोहोचविणा-या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात पुन्हा पी.एचडी, पदव्यूत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. विद्यापीठात काही तांत्रिक अडचणींमुळे हे दोन्हीही अभ्यासक्रम बंद करण्यात आले होते. मात्र येत्या शैक्षणिक वर्षापासून ते सुरू करण्यात येणार असून त्यासाठीचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी दिली. तसेच हे अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांप्रमाणेच प्रवेश परीक्षा घेऊन देण्यात येणार असल्याचे याचा अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याचेही साळुंखे म्हणाले.
मुक्त विद्यापीठाच्या वतीने दूरशिक्षण प्रणालीमध्ये उल्लेखनीय कार्य करीत असल्याबद्दल मुंबईच्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या सेंटर फॉर डिस्टन्स एज्युकेशन विभागाला कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते नुकतेच ‘ज्ञानदीप’पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर, पी.डी. हिंदुजा महाविद्यालयाचे संचालक डॉ. टी. एन. शिवारे आदी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. साळुंखे म्हणाले की, भारतातील ८२ टक्के समाज आजही शिक्षणापासून दूर आहे. त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी पुढील काळात मुक्त विद्यापीठाकडून विशेष प्रयत्न करण्यात येतील त्यात महिलांना अधिक प्राधान्य दिले जाईल. विद्यापीठाकडून केवळ पदवी पर्यंतचे शिक्षण देऊन न थांबता मल्टीस्कील विकसित करणारे शिक्षण देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. यासाठी पुढील शैक्षणिक वषार्पासून तंत्रज्ञानाची मदत घेऊन मुक्त विद्यापीठाकडून नवीन कौशल्याधिष्ठित शिक्षणक्रम सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मराठीसाठी स्वतंत्ररीत्या कार्य
आपल्या मातृभाषेला समृद्ध करण्यासाठी युरोपीय देश, अमेरिका, चीन, जपान आदींनी अनेक प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत मात्र आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर अशा प्रकारचे प्रयत्न म्हणावे त्या प्रमाणात झालले नाहीत. यासाठी विद्यापीठ स्तरावरून मराठी भाषेला अधिक प्रभावी माध्यम बनविण्यासाठी स्वतंत्ररित्या काम काम करण्यात येणार आहे. त्यासाठी पदवी आणि सुरूवात होणा-या पदव्यूत्तरच्या काही अभ्यासक्रमात बदल करून नव्याने संरचना करण्यात येणार असल्याचेही डॉ. साळुंखे यांनी सांगितले.
मातृभाषेतून जेवढे मराठी माणसाला कळते तेवढे इंग्रजी भाषेत नाही समजत व महाराष्ट्रात जास्तीत जास्त मराठी भाषाच बोलली जाते त्यामुळे सर्व प्रकारचे शिक्षण इंग्रजी बरोबर मातृभाषेतून घेण्याची सुद्धा मुभा असायला हवी.आणि प्रत्येकाला आपापल्या मातृभाषेचा अभिमान असणे काही गैर नाही.जसे मी मातृभाषेतून अर्थात मराठीतून मुंबई विद्यापीठातून LL .B ., LL .M .केले आहे. व त्यामुळेच मी कायद्याला बारकाईने आज समजू शकलो आहे.