घर बसल्या नोकरी घेऊन येणारी युवा नेते नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ‘नोकरी एक्सप्रेस’ पुन्हा महाराष्ट्रात सक्रिय करण्यात आली आहे.
कणकवली/मुंबई– घर बसल्या नोकरी घेऊन येणारी युवा नेते नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ‘नोकरी एक्सप्रेस’ पुन्हा महाराष्ट्रात सक्रिय करण्यात आली आहे. लवकरच ही एक्स्प्रेस रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या दौ-यावर येणार आहे. पंचवीस हजार युवकांना एकाच वेळी रोजगार देऊन विश्वविक्रम करणा-या युवा नेते नितेश राणे यांनी सुरू केलेली नोकरी एक्स्प्रेस निवडणुकीच्या रणधुमाळीत थांबवण्यात आली होती.
या नोकरी एक्स्प्रेसच्या माध्यमातून नामांकित कंपन्यांमध्ये युवक-युवतींना त्यांच्या गावात किंवा तालुक्यात येऊन या कंपन्या नोक-या देत असतात. दरम्यान, ही नोकरी एक्स्प्रेस युवकांना रोजगार मिळवून देतानाच एक आत्मविश्वास देत असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. नोकरी एक्सप्रेस राज्यात पुन्हा एकदा रवाना होत असल्याचे ट्विट नितेश राणे यांनी केल्याने रोजगाराच्या प्रतीक्षेत असणा-या युवा शक्तीच्या चेह-यावर पुन्हा आनंद फुलला आहे.
मुंबई आणि सिंधुदुर्गात रोजगार मेळावे घेऊन चाळीस ते पंचेचाळीस हजार बेरोजगारांना एकाचवेळी रोजगार देण्याचा यशस्वी प्रयत्न युवा नेते नितेश राणे यांनी केला होता. त्यानंतर नोकरी एक्स्प्रेसच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू झाले. तालुक्यात आणि गावाच्या मध्यवर्ती भागात ही नोकरी एक्स्प्रेस पोहोचून त्या परिसरातील युवावर्गाच्या मुलाखती घेऊन त्यांच्या योग्यतेप्रमाणे या नोकरी एक्सप्रेसमध्ये उपस्थित असलेले कंपनीचे वरिष्ठ अधिकारी त्यांना नियुक्ती पत्र देत असतात.
कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, मालवण अशा काही तालुक्यांमध्ये या नोकरी एक्सप्रेसच्या माध्यमातून अनेक युवकांना नोकरी मिळाली आहे. मधल्या कालावधीत आचारसंहितेमुळे नोकरी देण्याच्या या कामात व्यत्यय आला होता. हे काम आता आचारसंहिता संपताच पूर्ववत सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नितेश राणे यांनी घेतला आहे. आपल्या ट्विटरद्वारे त्यांनी याची माहिती दिली आहे. नोकरी एक्सप्रेस ही बेरोजगार आणि कंपनी यांच्यातील महत्त्वाचा दुवा ठरली आहे. आठ ते दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पगाराच्या नोक-या वेगवेगळया कंपन्यांमध्ये मिळवून देण्याचे काम करते. ही कार्यप्रणाली पुन्हा एकदा सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा या ठिकाणच्या नामवंत कंपन्यांमध्ये सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातील बेरोजगारांना नोकरी मिळवण्याची संधी पुन्हा एकदा उपलब्ध होणार आहे.
नोकरी म्हणजे दरोजची भाकरी