भारतीय सीमेत घुसखोरी करण्यात चीन आता पाकिस्तानला मागे टाकेल की, काय अशी शक्यता वर्तवली जात असतानाच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारताच्या दौ-यावर येणार आहेत.
भारतीय सीमेत घुसखोरी करण्यात चीन आता पाकिस्तानला मागे टाकेल की, काय अशी शक्यता वर्तवली जात असतानाच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारताच्या दौ-यावर येणार आहेत. तीन दिवसांच्या भारत दौरा ते पंतप्रधान मोदी यांच्या गुजरातमधून सुरू करणार आहे, ही याची विशेषत: म्हणावी लागेल. भारतात येणारा एखाद्या देशाचा पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष किंवा राजदूत मुंबई किंवा दिल्लीपासून सुरुवात करतो. मात्र, मोदींनी गुजरातचे महत्त्व वाढवण्यासाठी हा आणखी एक खटाटोप केला असावा, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. जिनपिंग यांच्या या दौ-यात भारतात गुंतवणूक केली जाणार आहे. पण त्याचबरोबर सीमा प्रश्नासारखे विषयही हाताळले जाणार आहेत.
जिनपिंग यांचा भारताचा दौरा सुरू होण्याआधीच रविवारी ३०० चिनी सैनिकांनी लडाखमधील चुमार भागात घुसखोरी करून १०० भारतीय सनिकांना घेरले. भारतीय जवानांच्या मदतीसाठी इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाचे सनिक आल्यावर चीननेही आपली कुमक वाढवली. यामुळे भारत-चीन सीमेवर तणाव वाढला आहे. या वर्षात चीनची भारतीय प्रदेशात घुसखोरी करण्याची ही ३३४वी वेळ आहे. विशेष म्हणजे ही घुसखोरी चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत दौ-याच्या तोंडावर झाली आहे. असा अनुभव भारताला या आधीही अनेक वेळा आला आहे.
चीनच्या अशा कृतीचे उद्दिष्ट भारत-चीन चच्रेच्या वेळी भारतावर दबाव आणण्याचा असतो. भारतात वेळोवेळी घुसखोरी करणे, सीमेवर गोळीबार करणे आणि भारताच्या लडाख व अरुणाचलसारख्या प्रदेशांवर आपला हक्क सांगणे, अशा चीनच्या कुरापती सुरूच असतात. चीनने भारताशी मैत्री वाढवण्याची, परंपरागत संबंध दृढ करण्याची व परस्परातील व्यापार वाढवण्याची कितीही भाषा केली तरी विस्तारवादाचा पुरस्कार करणा-या चीनचे भारतावर दबाव वाढवण्याचे धोरण आणि तंत्र सुरूच आहे. विशेषत: दोन्ही देशांच्या नेत्यांच्या भेटीच्या मुहूर्तावर भारताची आगळीक काढणे, ही चीनच्या नेत्यांची जुनीच खोड आहे. भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे चीनच्या दौ-यावर गेले होते. चीड आणणारी बाब म्हणजे जवाहरलाल नेहरू आणि चौ एन लाय या दोन नेत्यांमधील पंचशील तत्त्वांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अन्सारी यांची ही चीन भेट असताना चीनने भारतीय प्रदेशांत घुसखोरी करून आपली परंपरा कायम ठेवली आहे. चीन घुसखोरीबरोबरच अरुणाचल प्रदेशावर सातत्याने दावा करत आहे.
एवढेच नव्हे तर अरुणाचल प्रदेशासह पाकिस्तानव्याप्त काश्मीरचाही आपल्या नकाशात समावेश केला. भारताने अरुणाचलचा चीनच्या नकाशात समावेश केल्याबद्दल चीनकडे निषेधही नोंदवला. अन्सारींच्या भेटीच्या वेळी चीनचा लडाखमध्ये जलमार्गानेही घुसण्याचा प्रयत्न भारतीय लष्कराने उधळून लावला होता. भारताबद्दल पाकिस्तानचे जे धोरण आहे तेच धोरण चीनचे भारताबद्दल राहिले आहे. विस्तारवादाने पछाडलेल्या चीनला त्याच्या आजूबाजूचा भाग आपलाच असल्याचे वाटतो. म्यानमार असो की, व्हिएतनाम किंवा जपानमधील सागरी बेटे जे दिसेल ते माझे अशी चीनची मानसिकता बनली आहे. आशिया आणि जगातील एक प्रबळ सत्ताकेंद्र बनण्याच्या दिशेने चीनने प्रवास सुरू केला आहे. त्यासाठी आशियातील अनेक देशांमध्ये मोठया प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली आहे. जेणेकरून एखादा देश चीनवर संपूर्णपणे अवलंबून राहू राहील आणि त्याचा फायदा चीनला आपले अर्थकारण आणि राजकारण पुढे रेटण्यासाठी होऊ शकेल.
आर्थिक मदत देऊन आणि प्रसंगी घुसखोरी करून प्रदेश काबीज करण्याचे तंत्र चीन गेल्या काही वर्षापासून अवलंबले आहे. भारत ही चिनी मालाची मोठया बाजारपेठ असूनही चीनचे भारताबाबतचे धोरण नेहमीच आक्रमक राहिले आहे. त्यामुळे जिनपिंग यांच्या या दौ-यात चीनने मोठया प्रमाणात गुंतवणूक केली तर प्रत्यक्ष सीमारेषा धगधगती ठेवण्याची कुटनीती हा चीनच्या परराष्ट्रीय धोरणाचा एक भाग राहील. सीमाप्रश्नाचा गुंता न सोडवल्यामुळे प्रत्यक्ष घुसखोरी केल्यानंतर ती घुसखोरी नसून तो चीनचाच एक भाग असल्याचा कांगावा चीन नेहमीच करत आला आहे. त्यातूनच भारतीय सीमारेषेत घुसखोरी करण्याची चीनची हिंमत वाढत चालली आहे. चुमार वगळता चीनने भारतीय हद्दीला लागून असलेल्या सगळयाच चिनी सीमेत मोठया प्रमाणात पायाभूत सोयीसुविधा गेल्या काही वर्षापासून उभारायला सुरुवात केली आहे. त्याचा फायदा घुसखोरीसाठी करण्यात येत आहे. चीन आता एवढा निर्ढावला आहे की, भारतीय प्रदेशात घुसून भारतीय सैनिकांचे तंबू आणि चौक्या उद्ध्वस्त करण्यापर्यंत मजल गेली आहे.
भारतीय सीमेतील पायाभूत सुविधांना अडथळा आणले, तेथील बांधकाम बंद पाडणे, चिनी नागरिकांची वस्ती वसवणे, चिनी वस्तू आणि माल अशा ठिकाणांवर टाकून तो भाग आपलाच असल्याचा कांगावा करणे असे प्रकार चीनने सुरूच ठेवले आहे. चीनने गेल्या तीन वर्षात प्रत्यक्ष ताबारेषेचा तब्बल ६०० वेळा भंग केला आहे. रविवारी चुमार भागात ३०० चिनी सनिकांनी भारतीय हद्दीत घुसून भारतीय सनिकांना घेरण्याचा जो प्रकार केला तो गंभीर आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग भारताच्या तीन दिवसांच्या दौ-यावर येत असताना होत आहे; परंतु या गंभीर प्रकाराला मोदी सरकार कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहे. चिनी अध्यक्षांच्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर, चीनकडून जी घुसखोरी होत आहे त्याची गंभीर दखल परराष्ट्र खात्याने घेतलेली नाही. लडाखमधील भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी परराष्ट्र खात्याकडे चीनच्या या घुसखोरीची तक्रार करूनही परराष्ट्र खात्याने ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही. दिल्ली, मुंबईला मागे सारत देशातील विकसित राज्याचा डंका पिटणा-या गुजरातमध्ये चीनने गुंतवणूक करावी, अशी मोदी यांची इच्छा दिसते.
मुळात गुजरात हे विकसित राज्य असेल तर मग त्या ठिकाणी गुंतवणूक नेण्याऐवजी मोदी यांनी अविकसित अशा राज्यांमध्ये चीनने गुंतवणूक करावी, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गुजरातसारख्या विकसित राज्याला अधिक विकासाची गरज नाही. भारत ही जगातील एक मोठी बाजारपेठ असल्याने इतर देशांप्रमाणे चीनचेही भारताकडे लक्ष आहे. आज भारतात चीनमधून मोठया प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक वस्तू, धुलाई यंत्रांसारख्या विविध यंत्रांचे सुटे भाग, खेळणी यापासून तो रक्षाबंधनाच्या राख्या आणि दिवाळीचे कंदील यासारख्या वस्तूही येतात. पण चीनशी होणारा आपला व्यापार आपली त्या देशाला होणारी निर्यात पाहता असंतुलीतच आहे. गुंतवणूक आणि व्यापार या विषयी चर्चा करताना भारताने चीनबाबतीत सावध धोरण बाळगावे लागेल व आपले हितसंबंध सांभाळावे लागतील. त्याचबरोबर देशांच्या सीमांबाबतीत व चीनच्या भारतीय प्रदेशावरील दाव्यांबाबतीत कणखर भूमिका घेऊन चीनला त्याची जागा दाखवून द्यावी लागेल. एकाच वेळी घुसखोरी आणि एकाच व्यापारासाठी दौरा करणा-या या चिनी भाईला लगाम घालणे आवश्यक आहे.
[EPSB]
स्वयंघोषित विजयी पक्ष
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होऊन चार दिवस होऊन गेले तरी, लोकसभेप्रमाणेच विधानसभेची निवडणूकही आम्हीच जिंकणार, अशा गर्जना आणि वल्गना करणारे महायुतीतील दोन प्रमुख घटक पक्ष शिवसेना आणि भाजप आता जागा वाटपाच्या बाबतीत परस्परांवर कुरघोडी करण्यासाठी डावपेच लढवत आहेत.
[/EPSB]
ढापण्या मोदी .. महाराष्ट्राचे project पळवतो काय?