प्रहारची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत जाईल आणि अखंड महाराष्ट्रात प्रहार पोहोचेल, अशा शब्दांत बुधवारी राज्याचे उद्योग, बंदर विकासमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा प्रहारचे संपादकीय सल्लागार नारायण राणे यांनी सांगितले.
कणकवली- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांनी घालून दिलेला मराठी पत्रकारितेचा वसा अविरतपणे जपण्याचे कार्य दैनिक ‘प्रहार’च्या माध्यमातून सुरू आहे. या चार वर्षाच्या वाटचालीत वाचकांना दर्जेदार व अभ्यासपूर्ण साहित्य उपलब्ध करून देताना वाचकांच्या मनाचा ठाव आणि हृदयाचे परिवर्तन करण्याची ताकद प्रहारने दाखवली आहे. समाजातील वाईट प्रवृत्तींवर शब्दांचा प्रहार व्हायला हवा, हेच उद्दिष्ट ‘प्रहार’ सुरू करण्यामागे होते. आज हे स्वप्न साकारत असताना मनाला समाधान आहे. प्रहारची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत जाईल आणि अखंड महाराष्ट्रात प्रहार पोहोचेल, अशा शब्दांत बुधवारी राज्याचे उद्योग, बंदर विकासमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा प्रहारचे संपादकीय सल्लागार नारायण राणे यांनी प्रहारच्या वाटचालीबाबत समाधान व्यक्त केले.
दै. प्रहारचा चौथा वर्धापनदिन व दीपावलीचे औचित्य साधून प्रहारच्या वतीने संपादित करण्यात आलेल्या ‘देवभूमी’ या संग्राह्य अंकाचे प्रकाशन बुधवारी राणे यांच्या हस्ते कणकवलीतील ‘ओम गणेश’ या निवासस्थानी करण्यात आले. हा अंक प्रहारच्या वर्धापनदिनी अंकासोबत वितरित करण्यात येणार आहे. २५२ पानांच्या या अंकात सिंधुदुर्गासह रत्नागिरीच्या देवस्थानांची माहिती आहे.
या प्रकाशन सोहळय़ास सौ. निलमताई राणे यांच्यासह माजी आ. राजन तेली, गणपत कदम, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, प्रा. जी. ए. सावंत, सिंधुदुर्ग प्रहारचे कार्यकारी संपादक शशिकांत सावंत, सिंधुदुर्ग प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, जि. प. उपाध्यक्ष मधुसूदन बांदिवडेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
आज साहित्य रुपाने तुमच्या समोर आलेला प्रहारचा हा ‘देवभूमी’ संग्राहय़ अंक तुमच्यासमोर नवे दालन खुले करेल यात शंका नाही. या वृत्तपत्राचे ‘प्रहार’ हे नाव ठेवण्याचा निर्णयही अतिशय विचाराने घेतला आहे. हा विचारांचा प्रहार आहे. शस्त्राचा वार शरीराला जखमा करून जातो. मात्र, शब्दांचा वार काळजाला हात घालतो. असत्यावर वार करण्याचे काम प्रहारच्या माध्यमातून होते. हा वसा कायमस्वरुपी सुरू ठेवण्याचा निर्धारही राणे यांनी केला.
‘प्रहार’च्या नव्या आवृत्त्या सहा महिन्यांत
प्रहारने पदार्पणाला मुंबई, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन आवृत्त्या सुरू केल्या. आता पुणे येथे सुमारे २२ कोटी रुपये किमतीची अद्ययावत छपाई मशिन बसवण्यात आली असून, सहा महिन्यांत पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी प्रहारच्या आवृत्त्या सुरू करून पश्चिम महाराष्ट्रात प्रहारचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. त्यानंतर वर्षभरात मराठवाडा व विदर्भातही प्रहारच्या आवृत्त्या सुरू करण्यात येणार असून, महाराष्ट्रातील सर्व भागांत प्रहारचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती राणे यांनी दिली.
हार-प्रहारला पुन्हा सुरुवात
प्रहार सुरू झाल्यानंतर आपण स्वत: ‘हार – प्रहार’ या सदराच्या माध्यमातून लिखाणाला सुरुवात केली होती. या सदराची राज्यात प्रशंसाही झाली. अलीकडे कामाच्या व्यापामुळे हे सदर बंद आहे. मात्र पुन्हा एकदा नव्या जोमाने प्रहारमधून ‘हार – प्रहार’ हे सदर वाचकांच्या भेटीला येईल, अशी माहिती ना. राणे यांनी दिली.
[EPSB]
चला उजळूया चारी दिशा!
मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ १८३२ मध्ये प्रसिद्ध केले होते. तेव्हापासून आजपर्यंत मराठी वृत्तपत्रसृष्टीत अनेक दैनिके आली. आपापल्या पद्धतीने स्वातंत्र्य संग्राम असो वा संयुक्त महाराष्ट्राचे जनआंदोलन, लोकांच्या या वृत्तपत्रांनी महाराष्ट्राच्या भावनांना आवाज दिला. गेली चार वर्षे ‘प्रहार’सुद्धा त्याच लोकहितकारी परंपरेचा वसा घेऊन वाटचाल करीत आहे…
[/EPSB]
Prahaar pune chya gramin bhagat suddha hava aahe.